त्या पडद्याच्या पल्याड वसते
गूढ असे "ते "काही
(अंतर "त्या"च्या-माझ्या मधले
घटते, कळतही नाही)
भेट अटळ आहेच "त्या"ची मग
वाट कशाला पाहू?
(अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या
अविरत टपला राहू)
"अस्तित्वाच्या पूर्णविरामा-
-नंतर काहीच नसते"-
(माहित असले - तरी मानसी
उत्कंठा का वसते?)
त्या पडद्याचे धूसर दर्शन
अधुनी मधुनी घडते
("जाऊनी वरती, परतुनी आले"
ऐसी कुजबुज होते ) 
बोलघेवडी साळुंकी तू
बोल मधूरसा किती
अबोला धरीला असा
उमलेना प्रीत गिती
बहरावीन पारिजात दारा
थांबविला दरवळ सारा
मूक तुझ्या वागण्यात
हरवला मोर पिसारा
थांबव हे जिवघेणे
घाल प्रीतीचे ऊखाणे
हट्टही पुरविल तुझे
गाऊया प्रीत तराणे
ओंथंबले शब्द अंतरी
किती काळ लपवशील?
वेळ उगा नको दवडू
कधी ओठ खोलशील?
काजळला चंद्र बघ
ओसरला चांदण ओघ
थांबेल का कधी जगी?
प्रीत अस्त्र हे अमोघ
©दत्तात्रय साळुंके
२४-५-२०२५
त्या उजाड माळावर
एक गाव शापित
करपलेली माणसं
कळकट घरं त्यात
राबतात दीसरात हात
नाही पोटभर पोटाला
फाटका देह, चिंध्या नेसूला
पण रोज नवं सपान गाठीला
कशाला दिली इथं
भूक, तहान, लाज
भागवाया ही चैन
तू कुठं लपला आज?
करपलेला माणूस
हतबल आहे जगाया
आंधळं सरकार इथलं
फुरसत कुठे पाहाया?
उघड्यावर गाव तरी
वाट कुणाला दिसेना
तहानलेल्या ओठांना
पाणी घोटभर मिळेना
आज सकाळीच म्हणे
एक प्रसंग घडला
पंढरीच्या वेशीतून
विठू बाहेर पडला
हाल विचारू भक्ताला
आज त्यालाही वाटले
साध्या पाऊल वाटेने
गाव दूरचे गाठले
चंद्रमौळी झोपडीच्या
विठू येताच दाराशी
थांब बाहेरच देवा
आली आरोळी कानाशी
आला कसा अचानक
नाही निरोप धाडला
कसे स्वागत करावे
प्रश्न भक्ताला पाडला
आता आलाच आहेस
मग बस जेवायाला
पण गोडधोड नाही
माझ्याकडे वाढायाला
झोप कोपऱ्यात जिथे
नाही गळणारं पाणी
नवी गोधडी काढतो
तुझ्यासाठी चक्रपाणी
पहाटेच्या ओल्यावेळी
नकळत रुजताना
भरू पाहे दरवळ
पान पान हलताना
वाऱ्यासवे थरथर
उन्हांसंगे चढे लाली
डवरली फांदी फांदी
शीळ घुमे भवताली
कातरते ओलीवेळ
भास वाटे खराखुरा
पाय रुतल्या वाळूत
पडे चांदण्यांचा चुरा
- द्वैत
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
विजनातून घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
वा सडून जाते, कुजते... पण हे असले नसते!
मी असते म्हणजे माझे दान माझ्या पदरी
मी असते म्हणजे माझा श्वास माझ्या उदरी
तुमचा श्वास मिसळला असता... जगले असते.
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
माझ्या असण्याची मुळे भटकली दहा दिशांना
अधांतरी बिलगून राहिली आभासांना
अंतरंग मातीचे कळते... निजले असते.
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
लकाकली चैत्र गुढी
केलं ऊन्हानं हो न्हानं
थंडाव्याला शिरी धरी
कडू लिंबाचं वं पान
आक्रसली जलाशये
माती उन्हानं तापली
लाही, लाही, जीव, जीव
करी सावली आपली
ऊन झळा बोलबाला
जीव जीव हो कावला
आम्र वृक्ष डहाळीत
गाणं कोकीळ गायला
अंग अंग शहारले
पान पान मोहरले
वृक्षवृक्षी हर्ष दाटे
कुणी वसंता हो केले?
फुलं, फळांची परडी
आला ऋतुराज दारा
जेव्हा माणसाच्या अंगी
खा-या घामाच्या हो धारा
खा-या घामाच्या हो धारा
© दत्तात्रय साळुंके
१४-४-२५
गाणे आधी सुचले की
तू आधी भेटलीस
आठवत नाही
पण मग अधून मधून
गुणगुणत राहिलो गाणे
आणि तूही भेटत राहीलीस
अधून मधून
असते निरंतर सुरु
टिकटिक, धडधड
आणि बरंच काही
आणि आपण मात्र
जगत असतो
हे असंच अधून मधून
- द्वैत
सोसूनि उन्हाचा चटका जळले तनु माझे
शीतल हवांचा शोध न लागे, दु:ख हे साचे
अंतास आता आरंभ गवसे, मंत्र हा काळा
प्रवास नव्याचा मार्ग खुला, चित्त हे उजळा
परतीत गेले मेघ उमटती, आशा हरपली
वर्षाव होता, संहाराची सीमा गाठली
वाटेवरीती अंधार होता, एकटी झाली
मार्तंड आला, तेजाने दिशा उजळली
सुखसुविधा या येऊनि बसती दारामाजी
स्वप्नांमध्ये फक्त दिसे हे, खरे काही नाही
सुवर्णयुग फसवेपणाने हुलकावणी देते
इच्छा बिचारी, कैद होऊनि थांबुनी बसते