चेंगरलेल्या शहरामध्ये मंडळांचा घोळ,
नव्या सणाच्या नावाखाली नवा गदारोळ ;
थर्माकोलात बसवून देवा नवीन भिक मागतो,
घरात देव नसल्यावरती, देव आणावा लागतो!
घाई-गडबड, लगबग-तगमग नुसती पळापळ,
संस्कृतीच्या आड घरच्या लक्षुमीचा छळ ;
आपला नारायण सारं सोफ्यावरती मागतो,
घरात देव नसल्यावरती, देव आणावा लागतो!
चार दिवस घरोघरी आरत्यांचा नाद,
नंतर पुन्हा तीच खुसपूस तोच जुना वाद;
माळ्यावरती मखर जाता पुन्हा राक्षस जागतो,
घरात देव नसल्यावरती, देव आणावा लागतो!
श्वासांमधलं अंतर तू
चांदणगच्च अंबर तू
युगायुगांची तहान मी
कातळांतला पाझर तू
संध्याकाळी कातर मी
ज्योती ज्योती सावर तू
महाभारता कारण मी
पार्थाचा योगेश्वर तू
चिंता, शंका, संभ्रम मी
त्या साऱ्यांचं उत्तर तू
- मंदार.
म्हणावया हा भावनेचा कहर असू शकतो,
एक माणूस कुणासाठी 'घर' असू शकतो;
उलगडा बेघरपणाचा व्हायचा नसतो,
कैकदा हा 'ध्यासही' 'उत्तर' असू शकतो!
हे जरूरी नाही की देवच असावा तो,
कोण जाणे सुदैवी 'पत्थर' असू शकतो!?
तू भलेही लाखदा बरसात कर,
भूभाग तो कदाचित 'बंजर' असू शकतो!
- मंदार खांबेटे ©
#कवी_मी ♥️
उतारा
--------
सर्व भाषांना। मराठीचाच उतारा
चढतच राहिल्या तर मोजोनी मारा पैजारा
माझी माय आगळी वेगळी
जरतारी लुगडं अन
नथ ठसक्यात घातली
माझ्या मायेच्या बेचाळीस बोली
रंगत त्यांची
कुणाला न कळली
तलावाच्या मध्यभागी, एक प्राचीन मंदिर....
निळ्या पाण्यावर शोभे... शुभ्र संगमरवर...
देवदर्शन कराया... येती नेहमी भाविक...
वय वास्तूचे त्या किती? नसे कुणाला ठाऊक...
तलावातलेही पाणी, स्वच्छ निर्मळ सतत,
कुण्याकाळचे आश्चर्य.. नाही वाढत ...आटत!
स्थान केंव्हाचे हे इथे... पिढ्या अनेक पहिल्या...
आजूबाजूला काळाच्या... घड्या, मोडल्या पडल्या...
फोफावला चहूकडे... भवताली परिसर...
वाटे पाहते चोरून... भविष्यातले शहर...
थोडा कच्चा, थोडा पक्का.. रस्ता तळ्याच्या पूर्वेस...
अर्धवट रंगलेली, पाठ वाकलेली वेस...
तू येता जगणे पुरे बदलले व्हावे कसे सांग ना?
आधीच्या जगण्यात मी परतुनी जावे कसे सांग ना?
.
येताना तुजला बघून हलके होते पिसा सारखे
ओझे मी लपवूनही पण तुला ठावे कसे सांग ना?
.
तू माझ्या जगण्यातली तरलता आनंद तू
तू तेथे नसता सभांमधुन त्या गावे कसे सांग ना?
.
वेगाने हृदयामधे धडधडे आश्वस्त माया तुझी
ठोके जे चुकते पुन्हा हृदय ते धावे कसे सांग ना?
.
नित्याने भुलणे अशी गहनता आहेस सौभाग्य तू
दुःखाने फिरुनी कधी जवळही यावे कसे सांग ना?
.
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, १९ मार्च २०२६
रस्त्यावरती भिरभरणारा पाचोळा समजून मला
किती खुबीने दिलेस तू ही वाऱ्यावर सोडून मला
नकार देउन निघून गेली दूर नभाच्या पलीकडे
द्यायचाच धोका होता तर द्यायचास जवळून मला
पसंत नव्हते मला स्वतःचे अत्तरण्यासाठी सुकणे
म्हणुन बहर ओसरण्याआधी मीच दिले उधळून मला
प्रेमामधली कटू आठवण चितारलेला कागद मी
फाडा,फेका,जाळा अथवा टाका चुरगाळून मला
मरून जातिल माझ्यासोबत राहिलीच जर ....जीवनभर
अमर करा माझ्या स्वप्नांना कुणीतरी मारुन मला
जन्म थांबला एका जागी ह्याच विचारामध्ये की
जायचेच केवळ आहे हा रस्ता ओलांडून मला
पहाटच्या पारी उठू, काटा पायात रुततो,
घाम पुसत डोळ्यांचा, जीव शेतात राबतो.
ऊन-पावसात नशिबाच्या, जळलीये पुरणाची पोळी,
काट्याकुट्याने लाल झाले हात, ओंजळीत थोडी फुलं जरी!
घराच्या त्या उंबऱ्यात, धनी हताश बसून,
जीव खचतो आत . मोडलेले बघून पाय,
लोकं गावकुसाबाहेरची , काळज टोचती ,
"करम हीच काळ !" हसू चवीनं पाहती
माज्या कपाळाचं हे कुंकू, नुसता लाल मळवट न्हाई,
अंधाऱ्या संसाराला माझ्या , तोच उजेड गाठाई.
नशिबाच्या या कोऱ्या कागदावर, दुःखाचीच का फक्त शाई?
मी खचणारा माणूस नाही, नसांत माझ्या अजून विझली नाही आग ही!
रोज सोसाव्या फसव्या चांदण्या, रोज वाटेत काटे पेरले,
मी जरा हसू पाहतो कुठे, तोच डोळे पुन्हा आसवांनी भरले.
अडचणींचा सुटलाय हा वेढा, भोवती एकटेपणाचा अंधार दाटतो,
पण अशाही एकाकी रात्री, मी स्वतःच्याच साथीने दिवा लावतो!
कितीही छळू दे ही वेळ मला, कितीही लावू दे माझा अंत,
माझ्याच कष्टाने लिहीन आता, माझ्या उद्याच्या विजयाची वाट.