कोकण म्हटलं की त्याला एकच विशेषण सार्थ आहे आणि ते म्हणजे “ सुंदर “ ! तिथली वृक्षराजी, त्यात लपलेली छोटी छोटी घरं, निळेशार शांत समुद्र किनारे, त्यातुन आत आलेल्या छोट्या छोट्या खाड्या, लहान लहान व्हाळ , नागमोडी रस्ते , हे सगळं तर सुंदर आहेच पण कळस म्हणजे तिथले खडक ही वैशिष्ट्य पूर्ण आणि सुंदर आहेत. तुम्ही म्हणाल खडकात कसलं सौंदर्य ? चला तर मग, सांगतेच आता ह्या खडकांच्या सौंदर्याबद्दल.
मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी मिळते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की.
निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगते ... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही.
श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या रक्षबंधन, गौरी गणपती नवरात्र, दसरा अशा सणांची, उत्सवांची सांगता होते दिवाळीने . पण गावाकडे जिथे स्वतःची घरं असतात, घरांपुढे अंगण असत आणि अंगणात तुळशी वृंदावन असतंच असत तिथे दिवाळी झाली तरी सणाचा माहौल टिकून असतो कारण दिवाळी नंतर वेध लागतात तुळशीच्या लग्नाचे . कोकणात आमच्याकडे ही तुळशीचं लग्न फार थाटामाटात साजरं होत दरवर्षी.
जगात सर्वानाच झोपाळ्याचं आकर्षण असतं. झोपाळ्याचे उल्लेख अगदी रामायण महाभारतात ही आहेत. राधा कृष्णा च्या रास क्रीडेत झोपाळा असतोच. मराठीत ही झुला / झोपाळा ह्या विषयावर झुलवू नको हिंदोळा, झुलतो झुला, उंच उंच माझा झोका या सारखी अनेक प्रेमगीत, बालगीत, कविता लिहिल्या गेल्या आहेत. कोकणातल्या माणसांना हे झोपळ्याचं वेड जरा जास्तच असत. पिढ्यान पिढ्याच्या दारिद्र्यामुळे, कोकणात असलेल्या द्ळण वळणाच्या कमतरतेमुळे कोकणी माणसाचं आयुष्य तसं खडतरच असत. झोपळ्याच्या हिंदोळ्यावर त्याच मन स्वप्न रंजनात रमत असेल म्हणून कदाचित कोकणी माणसाला झोपाळा जास्त आवडत असावा.
आमच्या कोकणातल्या घरा वरचा आणखी एक लेख
पुष्पा, गो, ती मोठी कढई दे जरा पटकन घासून.
पुष्पा, तेवढं अळू दे चिरून आणि आठळ्या ही दे सोलून आळवात घालायला
पुष्पा, ह्या ओढणीचा रंग जातोय तेव्हा वेगळी धु.
पुष्पा , निखिलला घे जरा आणि आगरात फिरवून आण.... किती किरकिरतोय बघ.
तुम्ही ओळखलचं असेल ही पुष्पा कोण ते. हो बरोबर आहे … ही आमची कोकणातल्या घरची कामवाली . पु. लं च्या नारायणा सारखी हसतमुखाने सर्व आघाड्यांवर लढत असते दिवसभर.
कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.
आंबा मोसमाच्या सुरवातीला लिहायला घेतलेला हा लेख काही कारणामुळे आता आंबा सिझन जवळ जवळ संपला आहे तेव्हा पूर्ण झाला आहे.
आंबा हा फळांचा आणि कोकणचा राजा आहे. एप्रिल मे महिना आला की सगळयांनाच आंब्याचे वेध लागतात. आंबा आवडत नाही असा माणूस विरळाच. आमच्याकडे तर सासऱ्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागा, कळश्या - हांडे डोक्यावर घेऊन आडजागी असलेल्या झाडांना घातलेले पाणी, पोटच्या पोराप्रमाणे त्यांची केलेली निगराणी, जीवाचं रान करून वाढविलेली कलमं आणि आता पुढची पिढी ही त्याच प्रेमाने ही संपदा वाढवतेय, जोपासतेय म्हणून वाटणारा अभिमान ह्यामुळे आंबा ही आमच्या मर्मबंधातली ठेवच बनला आहे .
तीन अँटमबॉंब वाजले तसा पडवीच्या कट्टयावर झोपलेला सोमा दचकला. अंगावर टॉवेल टाकून अंगणात आला आणि कानोसा घेऊ लागला.
"सुसल्या आज कोण गो गचाकला?"
घरातून सुसल्याने ऐकले नसावे. वरच्या आवाटाच्या दिशेने ढोल वाजू लागला तसे कोणीतली गचकलेच असावे हे निश्चित झाले. त्याने घरात येवून फोन फिरवला.
"हालव, मी सोमा गावकार बोलतय, तुमच्या आवाटात कोण वारला काय?" समोरून हो असे उत्तर आले असणार.
"मी आटमबामावरणाच वळाखलय.. शिक हूती काय? तीचे झील इले काय? "असे बरेच प्रश्न विचारू लागला. शेवटी समोरच्याने फोन ठेवला असणार.