प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय!
पुढच्यावेळी एकमेकांना दुखावताना...
नंतर हसून ’असूदे’ म्हणायचं असं ठरलंय!
कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!
तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!
कधी शेवटी तुला-मला हे कळेल तेंव्हा...
रडं उरातील वाहू द्यायचं असं ठरलंय!
अवघड अवघड बोलत असते
तरी मला मी सांगत असते
बोल जरासे माणसातले
राहूदे जरा काळजातले
स्पर्शांमधली अतर्क्य कळकळ
डोळ्यांतील नेहेमीची खळबळ
श्वासांमधले उष्ण उसासे
हृद्यी घुमती पोकळ वासे
कधी पहाते नुसते भेदक
कधी हासते विषण्ण सूचक
कसे कळावे सांग कुणाला
सर्व इंद्रिये लाव पणाला...
गाठ जरासे शब्दही कधी
ऐक मनाचे सांगही कधी
बोल कधीतरी बोल ना जरा
ओठही कधी खोल ना जरा
सोपे सोपे जोड शब्द अन्
ओव अर्थ त्यातून भाबडा
खोल, गूढ, अन्वयार्थ सारे
टाक! ठेव तो शब्द रांगडा!
हळवे कातर अशक्य काही
सदैव धुमसत काचत असते
आत कुणीतरी सदा सर्वदा
स्वप्न फाटके टाचत असते
’त्यास’ एकटे सोड कधीतरी
सांधायला गेलं की तुटतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!
डोळ्यांच्या आत... बाहेर जगात...
ढगातल्या पाण्याला नसतेच जात!
बघावं तेंव्हा काळीज फोडून
आत आत कुणीतरी रडतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!
मनात तसंही नसतंच काही
अगदिच नसतं असंही नाही
मनाच्या गाळात खोल खोल तळात
जीवात काहितरी रुततंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!
सगळंच तसं चाललंय छान
नियमित बहरून येतंय रान
मातीच्या खाली ओल्या पावली
हळूहळू रान सारं जळतंय गं...
कुठेतरी काहितरी चुकतंय गं...!
स्पर्शानं आताशा मोहरत नाही
ठरवून सुद्धा काही आठवत नाही!
सोबत नी गप्पा नी वाट नी धुकं...
सगळंच अलवार झालंय मुकं.
काय चाललंय काय
कुठे ओढताय पाय
कशी डोक्यात धूळ
तरी ओठांत साय
हौस सारी पुरवली
तिची कूस उजवली
सारी पैदास माजली
तरी रडतेच माय
सारे घर विटाळले
मग देऊळ बाटले
त्याने फक्त विचारले
’याचे कारण काय?’
संत देवाघरी बरे
इथे काही नाही खरे
चार खांबावर घरे
पण छप्पर नाय
झाले अनंत भोगणे
उर फाडून घोकणे
त्याची चाहूल ऐकणे
ज्याला नाहीत पाय
माझ्या मना तुझे मन
पहा निर्ढावले कसे
ज्याला जगी कुणी नसे
त्याला सोडून जाय...
मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!
नकोस लागू नादी माझ्या बजवणार आहे!
असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!
पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे जगणे
हाच श्वास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!
तू काटे दे वा उन्ह, वादळे, चटके दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ दमवणार आहे!
तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!
धाव धाव रे आयुष्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या वळणावर गाठणार आहे!
’असते’ म्हणजे थोडेफार
शुद्धित असतात माझे भास
नाहितर नुसतेच घुम्यासारखे
छातीत झिरपत असतात श्वास!
’हसते’ म्हणजे काळजातून
उगवू देते चांदणवेल
नाहितर दृष्टीआड सगळे
असतेच नेहमी आलबेल
’जाते’ म्हणजे माझ्यामधून
उडून जाते अत्तर बनून
नाहितर बंद रेडिओत सुद्धा
रेंगाळतेच ना चिवट धून...
’रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार
’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात!
एकदा रातीला
चांदणे पेरताना
गार झुळूकीनी चंद्रास धक्का दिला
पात्र हेलावूनी
सांडले चांदण्याचे
झेलले मी इथे अन्... तुझा जन्म झाला!
तिथे दूर मेघांत
काही पर्या
हरवल्या वेचताना दंवाच्या लडी
मला भेटल्या अन्
दिले भेट मोती
मी स्वीकारले अन्... तुझा जन्म झाला!
एकदा पावसाने
बरसता बरसता
आणिले वाहूनी स्वर्गीचे अमृत
थेंब तो एक छोटा
मला गवसला
ओंजळी लपवला अन्... तुझा जन्म झाला!
मुळे जराशी बळकट असती तर गगनाला भिडले असते
गजांआडूनी ऋतू बघण्याचे दुःख तुलाही कळले असते!
कातर ओली एखादी सर तुझ्या आत पाझरली असती
तर मी कदाचित वसंत होऊन तुझ्या मनी मोहरले असते!
किनार्यावरी भिरभिरणारी नजर तुझी जर ठरली असती
क्षितिजावरती न्याहाळणारे तुला... नेत्र ते दिसले असते!
पहाट होते, सकाळ होते, दुपार आणि सांज रात्र मग
त्यानंतरचे मुके बहकणे तू असता तर टळले असते!
दवबिंदूंना पाहून साधे मोघम हसणे सुचले असते
तुझ्या बगिच्यातील फुलांचे हसणे सार्थक फळले असते!
त्या धारांच्या पल्याडचे ते तुला रिक्तपण दिसले असते
या प्रश्नांनी उठता-बसता तुलाही असे छळले असते!
जेंव्हा जेंव्हा तुला अशी मनसोक्त भेटले आहे
तेंव्हा तेंव्हा रात्रभर असेच धुके दाटले आहे
पाहिले आहे आभाळाला मी असे उतरताना
तेंव्हा कुठं माहित होतं...? त्याचेही जग फाटले आहे!
तुझे भास कुशीत जपत जागते बापडी निज माझी
तिच्या स्वप्नांत तुझे झाड कुणीतरी छाटले आहे.
कुणीतरी कधीतरी यावे खरेच ढगांमधून
खरं सांगू? मनातल्या मनात मी खूपदा बाटले आहे!
तुझे घरकूल दहा दिशांचे पसरेल तितके पसरू दे
मी तुझ्या या घरात माझे ईवले जग थाटले आहे.
आज पुन्हा मी जरा वैतागले आहे
रात्रभर गस्तीत माझ्या जागले आहे...
उर पाहून आठवावे दूध आईचे
ते निरागसपण ढळाया लागले आहे...
भूक त्यांची कोणती जी हाय भागेना
भाकरीचे चंद्र सगळे भागले आहे...
माय म्हणते झाक बाळा आबरू सगळी
मी तिच्या डोळ्यांत तरळू लागले आहे...
कुणीतरी सांगा मला हे नीट समजवूनी
नेमके का ’बाय’ असणे चांगले आहे...?