मन पुसून कोरडं कर
पाऊस पडून गेल्यावर
पुन्हा छातीत वारं भर
श्वास सुटून गेल्यावर...
उनाड स्वप्नं घडी घालून
ठेऊन दे उशापाशी
उलगडून पुन्हा डोळ्यांत भर
निखार जळून गेल्यावर...
तुझं असणं, तुझे श्वास
तुझं नसणं, तुझे भास..
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...
जमेल तेंव्हा जमेल तसं
जमेल तिथे भेटत जा
वसंत पुन्हा दिसणार नाही
एकदा बहरून गेल्यावर...
डोह फारच झालाय खोल
सांभाळ चुकून जाईल तोल
बुडशील, मरशील, येशील पुन्हा
सगळं आटून गेल्यावर...
पुन्हा तोल जातो जरासा जरासा
मला भास होतो जरासा जरासा
मनाच्या तळी दाबलेला उमाळा
तुझा श्वास होतो जरासा जरासा
तुझे पाहणे नेमके या दिशेने
मी बेजार होतो जरासा जरासा
असा उंबरा काळ ओलांडताना
तुही हासला ना जरासा जरासा?
सभोती दिशा फाकल्या एवढ्या की
रडे पिंजराही जरासा जरासा...
पहा आजमावून दूरी जरा ही
पुन्हा लांब हो तू जरासा जरासा
मनाची दिशाभूल ही रोजची रे
तरी त्रास होतो जरासा जरासा...
येतोस तरी येतच नाहीस... असं कुठे असतं का?
दिसतोस पण बघत नाहीस... असं कुठे असतं का?
पाऊस म्हणवतोस स्वतःला अन् भिजवून जातोस चिंब पण
मातीत खोल झिरपत नाहीस.... असं कुठे असतं का?
वाटेल तेंव्हा वाटेल तिथे जातोस निघून.... ठिक आहे...
मागे काहीच ठेवत नाहीस... असं कुठे असतं का?
क्षण क्षण शेवरीसारखा भिरभिरत निसटून जाऊ देतोस
चिमूट जराही उघडत नाहीस... असं कुठे असतं का?
हट्ट वगैरे, तत्त्व वगैरे, मुद्दे वगैरे सगळंच ठाम!
झुळुकीनं सुद्धा हलत नाहीस... असं कुठे असतं का?
पाऊस फार झाला
जीवाच्या पार झाला
पुन्हा ओल्या सरींचा
मला आजार झाला
ढगांच्या पार त्याने
ओढूनी चित्त नेले
इथे उरले धुके अन्
तिथे अंधार झाला
कसा निर्लज्ज पाऊस
शिरे वस्त्रांत माझ्या
मोकळी गात्रं झाली
निळा शृंगार झाला
बिलगला तो असा की
स्मृती सगळ्या निमाल्या
उरी काळ्या मण्यांचा
उगाचच भार झाला
असे त्याचे गरजणे
नी मी चोरून भिजणे
जुन्या सवयींस माझ्या
नवा आधार झाला
बदलती ऋतू तरिही
कोरडे उरे तरिही
दिठीच्या पार नेहमी
पाऊस फार झाला...
भेटलो जिथे पाऊल
पुन्हा तिथे वळेल का?
पुन्हा माझी आठवण
तुला तशी छळेल का?
दूर जायचेच होते
सार्या रहाटीपासून
पण तुझे दूर जाणे
मला सांग टळेल का?
आता देशील सोबत
आता धरशील हात
माझे पांगूळले मन
कधी पुन्हा पळेल का?
दोन शब्द हवे होते
तेंव्हा गप्प राहिलास
आता गाईलेस गाणे
माझ्या कानी पडेल का?
वाट पाहता पाहता
जीव कंटाळून गेला
उंबर्यात तू दिसावा
असे कधी घडेल का?
असे मन जाळताना
क्षण क्षण हारताना
माझ्या हासण्याचे रडे
तुला कधी कळेल का?
भुलथापांना माझ्या
मन फसेलंसं वाटतंय
आता मला जगणं
जरा जमेलंसं वाटतंय...
थेंबभर पाऊस, मुठभर वारा
चोचभर थोडा चिमणचारा
आभाळभर माझी तहान
आता भागेलंसं वाटतंय...
एक रस्ता अनवाणी
पाऊलभर हिरवळ गार
सोबत माझी मलाच
आता लाभेलंसं वाटतंय...
उन उन भातासारखं
उन्ह दाटल्या वरणासारखं
लिंबू पिळून आयुष्य
मला चघळेलंसं वाटतंय...
जाता जाता एक कर
पेटते दिवे हातात धर
तुझ्यामागे रेंगाळत रस्ता
वाट चुकेलंसं वाटतंय...
तुझ्या चिंतनाची नशा और आहे
तू नसणे समोरी... तसे गौण आहे!
जिथे पाऊले दूर वळली तुझी रे
तिथे मी स्वतःची रोवली वेल आहे!
पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!
फुले सांडली ओंजळीतून काही...
तुला काय नुकसान कळणार आहे?
नसूदे तुझा थेंबही सोबतीला
मनी दाटले तूच आभाळ आहे!
मनीच्या प्रदेशी तुझे राज्य असते
जरी ते अताशा कोरडे शुष्क आहे!
अशा छान बेबंद जमतात गप्पा...
मध्ये शब्द उच्चारणे.. व्यर्थ आहे!
फार कठीण आहे... तुला जाताना बघणं
तुझ्यामागे माझं असं कोरडं कोरडं जगणं
वाट बघणं एवढं तरी काम असायचं तेंव्हा
नकोसं वाटतं आताशा ते उंबरठ्यावर झुरणं
रात्रभर मी पावसाच्या सरी झेलत र्हायचे
भेगाळलेल्या मनाला आता झेपत नाही भिजणं
युगे युगे चालून तुझ्या जवळ आले होते
तुला बरं जमलं क्षणात क्षितीज दूरचं गाठणं
झोपेत बदलावी कूस तसं नातं पालटून जातं
कुठवर सोसेल तुला-मला हे नातं राखत जागणं?
प्रवाहातल्या दिव्यांसारखे सोडून दिलेत तुझे विचार
प्रेम, सवय, कर्तव्य, माया... जमतंय का तीर गाठणं?
अताशा मीच मजला गुणगुणाया लागले आहे
होऊनी काव्य मी मजला स्फुराया लागले आहे
तिची ती सावली आहे अजुनही माझिया पायी
तिचे असणे जरी गगनी भिडाया लागले आहे
स्वतःला आरशातून पाहणे मी टाळते हल्ली
तिथे भलतेच काही मज दिसाया लागले आहे
कशिबशी रात्रभर गुंत्यातुनी त्या निसटले होते
पहाटेस स्वप्न ते मज विंचराया लागले आहे
जिव्हारी लागले माझ्या विखारी बोलणे त्यांचे
कुणाचे काय त्यासाठी अडाया लागले आहे?
’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...
माझं गुर्हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...
कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...
कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...
मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...
मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...
फार काही मागत नाही