शेवटच्या प्रवासाचा सन्मान ......
आपल्या समाजात मृत्यू हा आजही निषिद्ध विषय आहे. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अनेकदा रुग्णापेक्षा त्याचे नातेवाईक अधिक अस्वस्थ, गोंधळलेले आणि अपराधीपणाच्या भावनेत अडकलेले दिसतात.
याच कारणामुळे "उपचार" आणि "उपचारांचा अट्टहास" यामधला सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक अनेकदा लक्षात येत नाही. काही वेळा उपचारांमुळे रुग्णाला जगण्याची संधी मिळते; पण काही वेळा ते केवळ मृत्यू काही दिवस पुढे ढकलतात आणि त्या बदल्यात रुग्णाला अधिक वेदना, अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यात आर्थिक ओझे, भावनिक ताण आणि "लोक काय म्हणतील?" ही भीतीही निर्णयांवर परिणाम करत असते.