शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन रिकामी, की ट्रेन रिकामी असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते.
काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले.
सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने.
बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्या मतलई सुरमई वार्यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा.
दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.
गेले वर्षभरात बदललेला हा चौथा डॉक्टर. आजाराने पुन्हा उचल खाल्ली होती. बारावीला चांगले मार्क काढले असतेस तर डॉक्टरच बनवला असता तुला, असे आई कित्येकदा बोलायची, अन माझ्याजागी एखाद्या नर्सशीच लग्न का केले नाहीस असे बायको वरचेवर सुनवायची. म्हणूनच का माहीत नाही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यास माझी पहिली नजर नर्सेसवरच भिरभिरते. अगदी आजही भिरभिरत होतीच, हॉस्पिटलच्या आवारात शिरल्यापासूनच. इतरवेळी रोगट वाटणार्या वातावरणात बघण्यासारखे एक तेच तर असते. बस्स भिरभिरतच होती नजर, अन अचानक अडकली.
दर दुसर्या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्याच्या फोनवरून कितीसे बोलणार..
गोपाळष्टमी, गोपालकाला, कृष्णाष्टमी, कृष्णजन्म...... वगैरे वगैरे एखादे नाव चुकले असल्यास चु.भू.दे.घे.. कारण माझ्यासाठी किंवा आम्हा चाळकरी मित्रांसाठी हा सण आजही दहीहंडी म्हणूनच ओळखला जातो. अगदी बालपणाच्या आठवणी जिथून सुरू होतात तिथे जाऊन आठवायचे म्हटल्यास पहिली हंडी घरातल्या घरात वडिलांच्या किंवा बाळूमामाच्या खांद्यावर बसून फोडल्याचे आठवतेय. दाराच्या चौकटीला बांधलेला पाण्याने भरलेला फुगा फोडताना जी मजा त्यावेळच्या बालमनाला गवसली होती तीच तशीच पुढेही या हंडीचे स्वरूप बदलत गेले तरी कायम राहिली.