कानात रात्रीचा गोंधळ ओटीवर हाले काही
पालीची चुकचुक सांगे, ही वेळ खऱ्याची नाही
प्राशून वेदना ओली गावातून घुमतो वारा
झाडांना टोचून भाले संताप शमवतो सारा
फांद्यांची तडफड वाढे, पानांच्या उल्का होती
अश्राप झाड ते पाही मदतीचा हात सभोती
मिणमिणत्या वातीवरली जळणारी ज्योत चुकार
झाडाला वाटे बहुधा, आता मी उघडीन दार
भिंतीच्या आडून मजला दुःखाचा कळतो नाद
जागेवर ऐकू येते मरणाची अंतिम साद
खिडकीतून अंधुक दिसते हरलेले जीवन भोळे
कुबडीच्या आधाराने मी टिपतो विझले डोळे
तू लाजतेस जेव्हां
आठवण लाजाळूची
अबोल होतेस जेव्हां
आठवण अबोलीची
आरक्त होतेस जेव्हां
आठवण गुलाबाची
मिठीत असतेस जेव्हां
आठवण कमलदलाची
तू नसतेस तेव्हां -
साठवण निवडुंगाची !
विषण्णतेची छाया ..
वहात होते धरूनिया मी तुझा किनारा
ओढत खेचत घेउन गेला सुसाट वारा
भिती दाटली, मागमूस ना सजीवतेचा
दु:खावरती अथांगतेचा जणू पहारा
आणा-भाका, शपथा-वचने झाल्या अंती
पोकळ घर वाळूचे, अन वाळूच्या भिंती
हवा-पाणी, वारा कुणीही ठोकर द्यावी
अन मनातली ध्वस्त करावी नाजुक वस्ती
सभोवताली वाटे मजला सारे जहरी
खात्री नाही, ऋतू तुझ्या प्रीतीचे लहरी
ग्रिष्मानंतर पाऊस यावा जरी वाटले
वळीव व्हावा, तोही का सांजेच्या प्रहरी?
देही संदेहाचे जाळे गर्द दाटते
गाली खार्या अश्रूंचे शव जणू ताठते
खोल मनाच्या मनातली स्पंदने थांबती
विषण्णतेची छाया मजला पूर्ण गाठते
बरेच झाले
दुःखाने मी कधी न चळलो बरेच झाले
माझा मी ही मलाच कळलो , बरेच झाले !
भरात होता गंधोत्सव तव वसंतवेडा
अवचित मनभर मी दरवळलो , बरेच झाले !
समोर होत्या सोप्या लंपट वाटा तरिही
काट्यांमधून मी भळभळलो , बरेच झाले !
पाउस येता झडून गेला मोरपिसारा
मी ही थेँबांसंगे ढळलो , बरेच झाले !
पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले !
- राजीव मासरूळकर
दि .२.६.१२
रात्री १०.१५ वाजता
खंत
हृदयास रोज माझ्या
खंत फार वाटे...
स्वजनी पेरलेले
बोचतात काटे.....
झाले इथे किती हे
अपराध दानवांचे
तरीही सजेस दोषी
उपकार मानवाचे........
या क्षुद्र जीवनाचा
दोष कोणता तो
दुखावल्या मनाला
मारी लाथ जो तो...........
होते जरी मुखाशी
तृष्णा कधी न शमली.....
जयही नसे नशिबी
तडजोडही न जमली........
आशा तरी उराशी
भोळी असे सुखाची........
आता मनी न वाटे
भीती बुळ्या विषाची......!!
__अनिल आठलेकर, पुणे
२७ फेब्रुवारी २०१३
''ये ना घरी कधीतरी '' एका मित्राची अपुरी मागणी होती
माणुसकी होते नाव त्याचे, भेटीच्छा लोचनी चाळवली होती
चटकन उठलो, सहृदय बांधिले, होती सोबतीला हास्याची पुरचुंडी
ओला आनंदाश्रूचा 'कृतज्ञ' सदरा, त्यावर जुनी आपुलकीची गुंडी
''आटपाट नगरात कोणालाही विचार'' अगदी सोप्पा पत्ता होता
कल्पकतेने बनेल रंगरंगोटीत झाकला विध्वंसी जरीपटका होता
अंती हवे असलेले छत्र गावले, थोडी शेजारी दांभिक घाण होती
मी मी करणारे जनावरच सर्व ,पण थोडी सुशिक्षित जाण होती
चव्हाट्यावरच पाय थबकला, विधिलिखिताचे भाग्यप्रताप बघून
''माणुसकी'' भिंतीवर दिसला, दिसले अस्पष्ट हंबरडे निर्माल्यातून
तझ्या हाती काजवे ,
हळुवार देत होतो ;
हात तुझा हाती माझ्या ,
हलकेच घेत होतो ;
तो स्पर्श तुझा नवखा,
जणू की मागत होतो ;
चांदण्याच्या मोहराने,
देहात फुलत होतो ;
निरागस हासत तू ,
सारेच हाती घेतले ;
उजळल्या डोळी तुझ्या ,
मग मीच गात होतो;
घेवूनी क्षणात पुन्हा ,
तू तया सोडून दिले ;
काजव्यांची दिवाळी ती,
मीच उजळत होतो ;
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
अधिक आयुष्य सुंदर होत आहे
तुझे माझे नवे घर होत आहे
करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे
असेही चित्र डोळ्यांना दिसावे
उले पाऊल घरभर होत आहे
तुझे माझे जमेना लाख तरिही
तुझ्याविण जन्म दुर्धर होत आहे
मला सांभाळुनी घेशील ना तू
सुखाची जीर्ण चादर होत आहे
समीर चव्हाण
सुखाच्या शोधात.....
चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,
नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,
स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी
गजानन....
मान्यच आहे मला समजणे दुरापास्त आहे
आता तुझ्याच अकलेवर सगळी भिस्त आहे!
कठीण केवढी तुझी गणिते
मी बापुडी गिरवीते कित्ते
विश्वाचे तुज प्राप्त ज्ञान अन्
मलाच मी शोधण्यात व्यस्त आहे!
तुझे बोलणे किती शहाणे
माझे अल्लड वेडे गाणे
मम शब्दांसही नाही तितकी
तव विस्मरणांसही शिस्त आहे!
इथे तिथे भटकूनी थकले
कडे कपारी शोधून आले
बाजारी तुज भेटुन कळले
ज्ञान खरे एवढे स्वस्त आहे!
अथांग आकाश आणि धरती
अशी अंतरे कोण पार करती?
कुठेतरी क्षितिजावर भेटू
अशी अपेक्षा जरा रास्त आहे!
तुझे बहरणे घमघमणारे
तुला ऋतूंचा तोटा नाही
असेन फुल मी बिनवासाचे
परंतू अगदिच काटा नाही
असल्या चिंता तुला सोपवून