छावणी - ९
जथा पुढे निघाला होता! मागे राहीलेल्यांना कायमचे मागे ठेवून.
पूर्वीचा उत्साह आता नावालाही शिल्लक नव्हता. वास्तविक मुरीदके इथल्या छावणीत त्यांना दोन दिवस पूर्ण विश्रांती मिळाली होती, परंतु छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे जो मानसिक धक्का बसला होता आणि जे आप्तेष्ट गमवावे लागले होते, त्याची कसर कोणत्याही उपायाने भरुन निघणारी नव्हती. आला तो दिवस आपला म्हणत हिंदुस्तानच्या सीमेकडे चालत राहायचं एवढं एकमेव लक्ष्यं प्रत्येकासमोर उरलं होतं. एखाद्या गोळीवर, एखाद्या तलवारीवर आपलं नाव असलं तर मुकाट बळी पडावं, नाहीतर उरलेले भोग भोगत पुढे जात राहवं इतकंच हातात होतं.