#कविता
फ़क्त एक हाक...
आकाशात उडणारे जेव्हां जमीनीवर चालू लागतात
आणी चक्क् माणसांशी बोलू लागतात...
खरं म्हणजे अशात् इतरांनाच आश्च्रर्य व्हावं
ह्यांना धरतीवर बघुन माणसांनीच घाबरावं
पण वर हेच उलट शिमगा करतात
म्हणे, हि माणसं आम्हाला घाबरवतात
आकाशी उडतांना तर सर्वच् जवळ होते
चंद्र, सुर्य, तारे नेहेमीच आटोक्यात होते
मग आता, आकाश सोडुन इथे काय भावलं?
हे पाखरु आज् जमीनीकडे कसं काय धावलं?
म्हणे, सुर्य लांबूनच गुलाबी वाटतो
जवळ जाता नुसताच् जाळतो
तारे आहेत लांबच-लांब रे सारे
चंद्र् ही एकच् आणी कितीतरी झुरणारे
अस्तित्व
नादरहित एका स्पंदनात
अस्तित्वाची रेघ उमटते...की नाहीच?
श्वासांच्या आड लपलेली सावली
स्वतःच्याच शोधाला निघते...की थांबते?
दिसतं ते विरघळत जातं
आणि न दिसणारं आकार धारण करतं,
ओळखीच्या पल्याडचं काही
आपल्यालाच ओळखत राहतं.
शून्याच्या काठावर टेकलेली जाणीव
स्वतःलाच स्पर्श करू पाहते,
पण प्रत्येक स्पर्शाआधीच
ती धूसर धाग्यासारखी तुटून जाते.
काळ इथे सरकत नाही,
तो फक्त साचत राहतो थराथराने,
आणि त्या थरांच्या आड
कुणाचंतरी अस्तित्व दडलेलं असतं...की फक्त भास?
भास
अंधाराच्या दाट श्वासात
तुझी चाहूल विरघळत राहते,
जणू रिकाम्या हवेलाही
तुझ्या उबेची सवय लागते.
तू दिसत नाहीस
पण जाणवत राहतेस,
त्वचेच्या अगदी आत
एक हळूवार कंप सोडत.
जवळ येण्याआधीच
क्षण थांबून जातो,
आणि त्या थांबण्यातच
संपूर्ण जवळीक जळू लागते.
स्पर्श होत नाही
पण त्याची वेदना होते,
जणू न झालेल्या स्पर्शानेच
देह आतून विरघळतो.
श्वास तुटक होतात,
आणि मन अधिकच तुझ्याकडे ओढलं जातं,
पण अंतर तसंच राहतं
निर्दयी… न हलणारं.
दूर नभाच्या पलीकडे
दूर नभाच्या पलीकडे, एक गाव असू दे,
जिथे वेदनांना थारा नाही, फक्त शांतता वसू दे.
नसेल तिथे गर्दी जगाची, ना पैशांची ओढ,
असेल फक्त मनाची माया, अन् आपुलकी गोड.
चंदेरी त्या चांदण्यात, स्वप्न आपले सजलेले,
दवबिंदूंच्या मोतीमाळा, पानात पानात रुजलेले.
वाहतील तिथे गार वारे, मनी सुखाची लहर,
फुलतील रोज फुले नवी, येईल आनंदाला बहर.
नसेल भीती कशाची तिथे, ना उद्याची चिंता,
लिहिली जाईल तिथे फक्त, प्रेमाचीच गाथा.
हिरवेगार डोंगर असतील, पांढरे शुभ्र झरे,
जिथे माणसाचे मन असेल, आरशासारखे खरे.
भांडणानंतरची तू
भांडणानंतरची तू
किती वेगळी दिसतेस…
डोळ्यांत अजूनही राग असतो,
ओठांवर अबोला दाटलेला,
आणि मनात मात्र
न बोललेली वादळं उसळत असतात.
तू काही बोलत नाहीस,
मीही शब्द शोधत बसतो…
घरभर एक विचित्र शांतता पसरते,
जणू भिंतीही आपला श्वास रोखून
आपल्याकडेच पाहत असतात.
ओठांवर अबोला असतो,
शब्द सारे हरवून गेलेले…
पण तुझ्या त्या गहिऱ्या शांततेच्या तळाशी
माझंच नाव निःशब्द धडधडत राहतं.
खजुराहो - पाषाणपुष्पांतील शृंगारगाथा
शिळांच्या देहावरी उमटली, एक लावण्यमयी काया,
पाषाणालाही फुटला घाम, बघून मदनाची माया.
खजुराहोच्या गाभाऱ्यात, इतिहास श्वास घेतो,
शृंगाराच्या या रंगात, देवही भान हरपतो.
कुठे लज्जेचा पदर ढळतो, कुठे ओढ यौवनाची,
अंगप्रत्यंगाच्या वळणांत, अवीट गोडी प्रणयाची.
कुठे नर्तकीच्या पैंजणांचा, निनादतो अजूनी नाद,
कुठे विरहिणीच्या नयनी, व्याकुळ प्रीतीची साद.
नक्षीदार त्या कोनाड्यात, विसावली जणू साक्षात रती,
हळव्या स्पर्शाच्या खुणांना, आजही पाषाण साक्ष देती.
जागतिक महिला दिन विशेष कविता : 'अक्षरांचे पंख'
अक्षरांचे पंख
होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते
बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते
का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी
अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते
त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी
तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते
चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा
कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते
सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण
मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते!
अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी?
घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!!
आदिशक्ती
हसते ती खुळी... म्हणून तुम्ही तिला 'भोळी ' समजलात?
मायेच्या ओलाव्याला तिची 'लाचारी' समजलात?
आतल्या जखमांनी आता निखाऱ्याचं रूप घेतलंय,
तुमच्या या ढोंगी जगाचं तिनं पारं डोकं फिरवलंय!
बाहेर पडली की तुमच्या नजरांच्या 'टोळ्या' सज्ज बसतात,
वस्त्रांमधून शरीराचा 'भूगोल' शोधत असतात;
रस्त्यांच्या वळणांपेक्षा तुमच्या 'लाळघोट्या' नजरांना चुकवलंय ,
तिला चवचाल म्हणणाऱ्याना तिने चारित्र्य शिकवलंय!
आपली माणसे
अनेक दिवस झाले,
आता ते कॉल येत नाहीत,
तासनतास बोलणारी माणसे,
आता साधा मेसेजही करत नाहीत.
शेवटचा संवाद होऊन,
अनेक आठवडे लोटले,
मनमुराद गप्पा मारणारे,
सांगा नेमके कुठे हरवले?
एक फोन जरी आला,
तरी गावभर चौकश्या असायच्या,
पण त्या साध्या गप्पा,
कधीच कंटाळवाण्या नसायच्या.
नावे पुन्हा सारी तपासली,
कॉन्टॅक्ट लिस्ट ही चाळली,
माणसांच्या या अफाट गर्दीत,
आपली माणसे कुठे विखुरली?
फोन नसताना कधीतरी,
मायेचे एक पत्र यायचे,
२५ पैशांचे ते टपाल,
अफाट आनंद देऊन जायचे.