जरी माघार होती घेतली..पळणार होते का
खरोखर सांग.. पुर्वज आमचे गद्दार होते का ...?
कशाला एवढी गर्दी जमा केलीत दुःखांनो
मला पाहून सरणावर कुणी रडणार होते का...?
मुलांना प्रेम दे मित्रा..तुझा पैसा नको फ़ेकू
बियाणे फ़क्त मातीने कधी गर्भार होते का..?
शहीदाची मिळाली देशभक्ती आज देशाला
घरी बापास त्याच्या लेकरु मिळणार होते का..?
तिला आनंद व्हावा याचसाठी शांत निजलो मी
गळा कापून हत्या एरवी अलवार होते का..?
तिला साडी पुरवताना...पुरवले शस्त्र का नाही
तुलादेखील अन्यायी कुणी म्हणणार होते का..?
पुसून ओठ शेवटी प्रिया निघून जायची
बराच वेळ पावले नशेत अडखळायची...
म्हणून सांगतो व्यथे रडायचे शिकून घे
सहीष्णुता तुझी इथे कुणास ना कळायची...
जळून जायचा जरी पतंग ज्योत चुंबुनी
समर्पणात त्या मिजास केवढी असायची...
असेल त्या घरात फ़ास घेतला कुणीतरी
म्हणून भाकरी घरास पोटभर मिळायची..
तिला रफी उदास अन किशोर आवडायचे
तरी समोर माझिया गुलाम गुणगुणायची..
लबाड एवढी कशी असेल ओढणी तिची
मला समोर पाहुनी उगाच फडफडायची...
जखम हवीच एक.. जीवनास कैफ़ यायला
अशक्त वेदना मनातली किती पुरायची...!
-- संतोष
हीच शिक्षा खरोखर मला पाहिजे
की तुझी आठवण यायला पाहिजे...
जीव जाणार नाही गळा कापुनी
घाव पाठीमधे घातला पाहिजे...
आसवांना नशा जर कधी पाहिजे
एकदा दुःखही प्यायला पाहिजे ...
प्रेम आहे तुझे तर दुरुन बोल ना
हात अंगास का लावला पाहिजे?
प्रेत म्हसणात नेले गड्या जाळण्या
ते म्हणे जातिचा दाखला पाहिजे..
लाभते सौख्य मित्रा निखार्यात पण
वेदनेचा लळा लागला पाहिजे..
धुंद स्वप्ने नको जडजवाहिर नको
मी भुकेला.. मला खायला पाहिजे...
-- संतोष
ठेवला विश्वास आम्ही वादळावर
अन म्हणालो की सुरक्षित जाहले घर..
शांतता होती चिवट मेलीच नाही
झाडल्या गोळ्या जरी त्यांनी तिच्यावर..
शेवटी पर्याय सापडला व्यथेवर
की निजावे शांत चित्ताने चितेवर..
काल ओठांचा पुन्हा अपघात झाला
हात कमरेला सख्याचा लागल्यावर...
जाळले आम्हास दुनियेच्या दयेने
दोष शेवट लादला गेला उन्हावर...
नेहमी ठेवायच्या पकडून त्याला
जीव जडला पापण्य़ांचा आसवावर...
चार खांद्यांवर मला उचलून नेले
एवढा मी भार होतो का जगावर...
-- संतोष वाटपाडे ( नाशिक)
निरोप द्यायचा म्हणून ती मिठीत घ्यायची
निरोप देउनी पुन्हा तिथेच घुटमळायची..
निघून जायचे खुशाल तेल पाठ फ़िरवुनी
दिव्यात वात एकटीच रात्रभर जळायची...
तिला समोर पाहुनी जरी न दुःख व्हायचे
जखम जुनी मनातली उगाच दरवळायची...
बघून दुःख भरजरी नकोस जीवना जळू
सदैव वाटते भिती तुझी नियत चळायची...
मनुष्यजन्म दे कधीतरी चुकून विठ्ठला
किड्यासमान जिंदगी किती युगे जगायची...
हवेमुळे तिची खट्याळ ओढणी उडायची
गुन्हा नसूनही प्रिया मलाच दोष द्यायची...
तव्यामधेच बाप राहिला रुतून जन्मभर
चुलीत माय भाबडी अधेमधे दिसायची...
चिता पेटून गेल्यावर सभा भरणार असते
जिचे सौभाग्य गेले तीच बस रडणार असते...
जुन्या जखमेस गोंजारु नको दररोज इतके
पुन्हा केव्हातरी खपली जखम धरणार असते...
दिव्याचे नाव होते अन उजेडाची प्रशंसा
खरेतर वात तेथे एकटी जळणार असते...
तिला आढ्याकडे बघणे जिवावर येत असते
धन्याची आठवण कारण तिला छळणार असते...
दिला आधार फ़ासाने..किती उपकार झाले!
खरी माणूसकी कोठे अशी मिळणार असते?
किती हे प्रेम निस्वार्थी नदीचे पाहिले का !!
समुद्राला मिठी मारुन नदी मरणार असते..!!
मित्रांनो,
एक निखळ हळुवार प्रेमगीत... आणि एक उत्कृष्ट गझल...
प्रेयसी आणि प्रतिभा... दोघीही सारख्याच... कधी चांदणं बरसवणाऱ्या तर कधी उन्हात उभं करणाऱ्या... कंपोजर म्हणून मलाही असंच जाणवतं... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." म्हणून... प्रियकर "अथांग यमन", मी आणि रोमँटिक वॉल्ट्झ...
"कळेना मला हे कशी वेगळी तू..."
जरूर ऐका आणि आपले मत नोन्दवा....
धन्यवाद.... प्रवरा
आले गेले बसले नाही
कोणीसुद्धा रडले नाही..
ठेव चितेवर मला एकदा
कधी वेगळे घडले नाही..
जरी प्यायचो प्रिये नेहमी
पाऊल तिरपे पडले नाही..
लपवत आलो जखमा सार्या
दुःख नेमके दडले नाही..
पहा वादळा उन्मळलो मी
पान तरीही झडले नाही..
मृत्यू दारी स्वतःच आला
माझे काम रखडले नाही..
असह्य होते दुखणे जोवर
काळीजही ओरडले नाही..
विज जराशी चमकून गेली
मेघ कसे गडगडले नाही..
प्रेम शोधले दगडामध्ये
तुझ्यात का सापडले नाही..
- संतोष वाटपाडॆ (नाशिक)
गजल :पाहतो मी
आरसा हा रोज आता तोडण्याला पाहतो मी !
साक्ष आताची खरी ही फोडण्याला पाहतो मी !
कोरलेल्या ह्या कपाळा सोसलेल्या मी नशीबा
'रूप माझ्या वेदनेचे ' खोडण्याला पाहतो मी !
हा दिलासाही नकोसा ना कुणाचाही भरोसा !
तोडलेल्या काळजाला जोडण्याला पाहतो मी !
जीव झोके घेत राह्या दोर कोणी बांधली ही
वंचनेचे खेळणे या पाळण्याला पाहतो मी !
काल येथे वेढलेला झाकलेला घोळक्यांनी
का मलाही एकटा मी सांगण्याला पाहतो मी !
साक्षखोटी चांदण्यांची चंद्रमाही डागलेला
चांदण्याचा मांडवाला मोडण्याला पाहतो मी!
ह्या मनाशी आदळे ही लाटमोठी वादळांची
भावना आता अशाही रोखण्याला पाहतो मी!
पिके जाताच गारांनी
दया केली सराफांनी..
प्रभू तंटा सुटावा पण
नशीबाच्या लवादांनी..
जखम असली जरी मोठी
बरी होते दिलाशांनी..
गुन्हा नव्हताच मी केला
गुन्हा केला पुराव्यांनी..
नको विहिरीत डोकावू
असा आश्वस्त डोळ्यांनी..
उरी सांभाळले होते
किती काटे गुलाबांनी..
नको संबंध तू तोडू
प्रिये थोड्या दुराव्यांनी..
तहाची बोलणी झाली
गरीबीच्या दबावांनी..
मनुष्या सोड त्या जातीं
बनवल्या अंध लोकांनी..
दिला आधार आयुष्या
तुझ्या बंदिस्त हातांनी...