हातामध्ये हात कधी जर दिलास असता...
वाऱ्यावर हा जन्म उभा थर-थरला नसता!
मवाळ जगणे सर्कशीतल्या या 'शेरां'चे...
विदूषकाचे सोंग वठवतो हसता-हसता!
एक हुंदका दिला न केंव्हा जगताना मी...
शांत रहा जखमांनो आता का ठस-ठसता!
नव्या कुळाचे नवे कायदे लागू झाले...
'माती' झाली कसणाऱ्याची कसता-कसता!
मृत्यू येतो..निघून जातो बघता-बघता...
जन्म चालला होता माझा फसता-फसता!
—सत्यजित
ग़ज़ल - सुरेश भट यांना विनम्र अभिवादन
ऐना जरी तडकला, प्रतिमा तशीच जपतो...
तो चेहरा अजुनही डोळ्यासमोर दिसतो!
यंदा वसंत आला, आला तसाच गेला..
मी चांदणे उन्हाचे अंगावरी सजवतो!
गेला सुरेश, संगे गेली ग़ज़ल म्हणाले,
आहो जिवंत आम्ही, जगतो, तिला जगवतो!
सूर्यास काय भीती अस्तास जावयाची?
अंधार जाळण्याला येतो, पुन्हा उगवतो!
लावून बाग त्याने, केली तिची मशागत..
आता फुले ग़ज़लची आम्ही 'शरद' फुलवतो!!
शरद.
गझल जराशी खट्याळ झाली...
रात..मखमली,मधाळ झाली!
एक लेखणी अत्तर-अत्तर...
एक डायरी नव्हाळ झाली!
उगाच गेली चंद्र पहाया...
लक्ख गोरटी,गव्हाळ झाली!
ओठ टेकता अलगद मिटली...
तिची पापणी मवाळ झाली!
जशी अवघडे मिठी गुलाबी...
उगाच वाटे!सकाळ झाली!
—सत्यजित
कसे क्षणात आपले करू
उडेल तेवढ्यात पाखरू
टिकेल तोपर्यंत वापरू
तुटेल एकदाच हे तरू
नको पडूस थंड एवढा
अजून एक वेड पांघरू
लगाम वापरायचा कसा
कसे मनास सांग आवरू
नको रडूस एकटा असा
बसून दुःख साजरे करू
जयदीप
'हे मला सांगा !'
कुणाचा देव तो जो रोज येतो हे मला सांगा
कुण्या भक्तास भेटू योग येतो हे मला सांगा
उपाशी झोपतो कितिदा आम्ही तरी देवा
तुला छप्पन ठेवू भोग येतो हे मला सांगा
गरीबाने गरीबाला पुसावे एवढ्यासाठी
कधी धावून राजा भोज येतो हे मला सांगा
फणा रानात नागाचा किती फुत्कारला होता
विषाला काय देता दोष येतो हे मला सांगा !
किती वठवू मनाशी एकपात्री नाटके जिवना
नव्या अंकात सोबत कोण येतो हे मला सांगा!
विलास खाडे
मा . सुरेश भट यांना विनम्र अभिवादन !......
हा सूर- ईश त्याच्या मधु बासरीस होता
मृदगंध या धरेचा त्या वैखरीस होता
एल्गारही असा की कल्लोळ भावनांचा
भक्तीत भाव भोळा त्या पंढरीस होता
रंगात वेगळा तो, ढंगात वेगळा तो
हर एक रंग त्याच्या श्रावणसरीस होता
शब्दास तोलण्याची जादूच काय न्यारी
ठरवून शब्द येथे जणु चाकरीस होता
माझा प्रणाम येथे त्या अवलियास आहे
मी एक गारगोटी तो तर परीस होता
--- बाळ पाटील (उस्मानाबाद )
आज उमलली कळी लाजरी
मंद हवेच्या झोक्यावरती
मीत मनीचे गुणगुणले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी
गेले असता भल्या पहाटे
फुले वेचण्या प्राजक्ताची
गंध घेउनी झुळूक येता
सळसळली पाने झाडाची
अंगावरती टपटपलेल्या
दवबिंदूंनी थरथरले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी
चिउकाऊच्या गोष्टी सरल्या
स्वप्न गुलाबी पडू लागले
गोंधळ सारा किती अनामिक !
भाव आगळे मनी जागले
"तारुण्याशी हात मिळव तू"
कानी माझ्या कुजबुजले मी
आज उमलली कळी लाजरी
गोड अनुभुती, शिरशिरले मी
मला न कळले काय जाहले
कुठे तरी मन हरवुन असते
आरशात मी बघता बघता
कारण नसता गाली हसते
मन
मन चंचल पाखरु
कसे त्याला आवरु
कधी रमते ऐलतीरावर
क्षणात नजर पैलतीरावर
मन चंचल पाखरु
कसे त्याला सावरु
कधी आनंदडोही विहार
क्षणात चिंतेचा शहार
मन चंचल पाखरु
कसे त्याला मारु
कधी भिक्षुक योगी
क्षणात विलासी भोगी
मन चंचल पाखरु
कसे त्याला मारु
कधी भिक्षुक योगी
क्षणात विलक्षण भोगी
मन चंचल पाखरु
कसे त्याला चितारु
कधी ऊंच गगनात
क्षणात सोनेरी पिंजर्यात
मन चंचल पाखरु
कसे त्याला गोंजारु
कधी घुटमळे पायात
क्षणात नखे नरड्यात
मन चंचल पाखरु
कसे त्याला चुचकारु
कधी जाज्वल्य अभिमान
क्षणात उपहास कस्पटासमान
मन चंचल पाखरु
कसे त्याला धरु
कधी कवडसा खिडकीतून
मुर्खपणाचे मोजमाप
आयत्या पिठावर रेघोट्या
मालकी हक्कानं मारतात
दुसर्यांनाच करतात पुढे
स्वत:चे अंगही चोरतात
त्यांचा मुर्खपणा मोजायला
सोपी-साधी शक्कल आहे
त्यांच्याच बोलण्यात कळते
त्यांना किती अक्कल आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
चिता पेटून गेल्यावर सभा भरणार असते
जिचे सौभाग्य गेले तीच बस रडणार असते...
जुन्या जखमेस गोंजारु नको दररोज इतके
पुन्हा केव्हातरी खपली जखम धरणार असते...
दिव्याचे नाव होते अन उजेडाची प्रशंसा
खरेतर वात तेथे एकटी जळणार असते...
तिला आढ्याकडे बघणे जिवावर येत असते
धन्याची आठवण कारण तिला छळणार असते...
दिला आधार फ़ासाने..किती उपकार झाले!
खरी माणूसकी कोठे अशी मिळणार असते?
किती हे प्रेम निस्वार्थी नदीचे पाहिले का !!
समुद्राला मिठी मारुन नदी मरणार असते..!!