नितीश कुमार - एक आशादायी सुरुवात
कधी कधी मन विषण्ण होतं. सगळ्या बाजूने वाईट बातम्याच ऐकायला येत असतात. मुंबईमध्ये दहशतवादी हाहाकार उडवतात. आंतरराष्ट्रीय चित्रपट भारतातील दारीद्र्याचं (सत्य) दर्शन घडवतात. कुणी मित्र नुकताच भारतात जाऊन आलेला असतो. तो तिथल्या भ्रष्टाचाराचे नवीन अनुभव ऐकवतो. निराशेने मन अंधारुन जातं. पण अशा वेळी एखादी बातमी अशी येते की आपल्या आशा पुन्हा पल्लवीत होतात. अंधाऱ्या भुयारातून जात असताना प्रकाशाची लकेर दिसते. पुन्हा एकदा मन स्वप्नं बघायला लागतं - सोन्याचा धूर निघणाऱ्या - ऐतिहासिक पुस्तकांच्या कपाटात लुप्त झालेल्या भारताचं.