अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून
अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून
अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून
तुझं माझं नातं...
तुझं माझं नातं,
कधी एखाद्या डोहा प्रमाणे,
स्थिर, शांत, गंभीर...
कधी एखाद्या नदी सारखं अवखळ,
पण तेवढंच प्रांजळ आणी निखळ.
कधी स्फटिकासारखं, पारदर्शी, नितळ
तर कधी अगदी स्पष्ट, रोखठोक, सरळ...
कधी मनात अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या,
धुक्यातल्या नागमोड्या पायवाटी सारखं.
तर कधी सूर्य मावळतीला आलेला असताना,
मनाला अनामीक हुरहुर लावणाऱ्या,
त्या कातरवेळी सारखं.
जगण्याच्या शर्यतीत चालु असलेली
धावपळ, दग दग, ओढाताण
कधी कधी खूप असह्य होते...
मनातला विचारांचा कोलाहल,
ती तगमग जीव पार
पिळवटून काढते...
अश्या वेळी वाटतं,
नको ते विचार,
म्हणजे विचारांची दिशा
चुकण्याचा प्रश्नच नाही.
नको त्या भावना,
म्हणजे भावना दुखावल्या
जाण्याचा प्रश्न नाही.
नको ती स्वप्नं,
म्हणजे स्वप्नभंग
होण्याचा प्रश्न नाही.
नको ती आशा, ते प्रयत्न,
म्हणजे पदरी निराशा,
अपयश येण्याचा प्रश्न नाही.
मनी असावा एक विरक्त,
निर्विकार, स्थितप्रज्ञ भाव...
...लढतं राहणं सोडायचं नाही!
काय सांगू तुम्हाला
मी आणि परिस्थिती
आमचं कधीच जमत नाही…
पण मी मात्र पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.
कधी कर्तृत्व सिद्ध करायला
योग्य संधीच मिळत नाही
कधी अपार कष्ट करून ही
त्याचं चीझ होतं नाही
किती हि मोठे अडचणींचे
डोंगर दिसतं असले तरीही
मी मात्र महत्वाकांक्षेची
ज्योत विझू देत नाही
कारण मी पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.
खरा सेल्फी...!
आज सकाळी नेहमी येतात त्याप्रमाणे अनेक गुड मॉर्निंग चे मेसेजेस आले, पण त्यातला एक मेसेज खरंच विचार करायला लावणारा होता.
"खरा सेल्फी म्हणजे आपल्या अंतरंगाचा सेल्फी".
मनातल्या मनात...!
जाणिवांच्या बेड्या
सतत सोबतीला असतात.
विचारांच्या सावल्या तर
पाठलागचं करीत असतात.
मन नावाच्या सागरात
विचारांचे तरंग उठत राहतात.
भावनांची वादळं अवचित
येत जात असतात.
उपभोग आणि षड्रिपुंच्या
लाटा तर सतत
तांडवचं करीत असतात.
आयुष्याच्या क्षितीजावर
निर्मात्याने उधळलेले
ते गूढ, पण तितकेच
विलोभनीय, अदभुत रंग
या वेड्या जीवाला सतत
अचंबित करीत राहतात!
- स्वाती
किनारा
सागराची लाट वाऱ्यासम होऊनी बेभान
धुंडाळते जणु एक किनारा
असे चहुबाजुंनी वेढलेली
नानाविध किनाऱ्यांनी
परि धुंडाळते ती जणु
तो एक किनारा
थांबायचे क्षणभरच
विसाव्यासाठी;
स्पर्श होताच
त्या किनाऱ्याचा अलवार
मग वेगी परतायचे
मागे ओल्या पाऊली
दुर्दैव तिचे ते कुणा सांगावे
उमटत नाही पाऊलखुणा
अन्
उरत नाहीत पुरावे त्यांच्या
त्या क्षणमात्र भेटीचे..
-दिप्ती भगत
(01 Aug 2020)
पिया तोरा कैसा अभिमान आणि आत्मविश्वास वगैरे
पिया तोरा कैसा SS अभिमान म्हणताना शुभाजी दुसऱ्या 'कैसा' ला अशी सुरेल , गंभीर तान घेतात की तो अभिमान आणि त्याचं वैयर्थ सुद्धा समान क्षणात शून्य होतात. खरंच एक चित्र स्वतःला सहस्र शब्दात व्यक्त करत असेल तर एक गाणं सहस्र भावनांना मुक्त करत असेल, वाट करून देत असेल असं म्हणायला हरकत नसावी. संगीत अशी निर्मिती आहे ती दुसऱ्या अशा निर्मितीला वाट करते , जिचे अस्तित्व आत आहे हे माहितीही नसतं. ओह असही वाटू शकते का मला , कुठले प्रतल आहे हे..... असं काहीसं.