मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच पुण्याच्या विष्णुकृपा हॉल मध्ये लग्नाला गेले होते . मेनू मध्ये चक्क पनीर चा एकही पदार्थ नव्हता . बरेचसे जण म्हणत होते , खूप दिवसांनी छान मराठी जेवण जेवलो लग्नाचे !!! विशेष म्हणजे अक्षता ही वाटल्या नव्हत्या . त्याऐवजी स्टेज वर वधू वरांपाशी ठेवल्या होत्या . त्यामुळे पायदळी तुडवल्या गेल्या नाहीत . हे आवडले .

माझ्या भाच्याचे लग्न ठरले तेंव्हा लग्नाचा हॉल भाच्याने त्याच्या पसंतीचा असावा अशी अट घातली होती. मुलीच्या वडीलांची सरकारी नोकरी त्यात मोठ्या हुद्द्यावर असल्याने आर्थिक परिस्थितीही चांगली होती, त्यांनी हरकत नसल्याचे सांगितले. हॉल पसंद करायला माझ्या मेव्हण्यांनी भाच्याला मला बरोबर घ्यायला सांगितले. मुलीच्या वडिलांनी आणि मामाने चार पाच लॉनवाले मंगल कार्यालय दाखवले, सगळे चांगले होते,पण भाच्याला एकही कार्यालय पसंद पडले नाही. भाच्याने आम्हाला एका थ्री स्टार हॉटेलमध्ये नेले, त्यांच्याकडील लॉन आणि हॉल दाखवला , ज्याचे दोन दिवसांचे भाडेच आठ लाखापेक्षा जास्त होते. हळद, लग्नाच्या नाश्ता आणि जेवणाचे पॅकेज , स्टेज सजावट, लायटिंग जे भाच्याने पसंद केले ते सगळे पकडून तीस लाखापर्यंत जात होता. मुलीचे वडील थोडे नाखुशीने तयार झाले. सगळा खर्च मुलीकडे असल्याने मला पटत नव्हते, भाच्याला म्हटले निदान येथील मेनुची चव बघू मग ठरवू. दुसऱ्या दिवशी आम्ही मेनुतील सगळे पदार्थ टेस्ट करून बघितले ( पैसे भरून ), फार काही विशेष आवडले नाही मला आणि माझ्या भाच्यालाही, तरीही तेथील भपक्याला ( तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या सेविका )हुरळून भाच्याने तेच फायनल करायला सांगितले. मुलीचे वडील लगेच बुक करायला निघाले,त्यांना मी थांबवले. उद्या बुक करू म्हटले. घरी आल्यावर भाच्याला समजावले , तिथले जेवण आपल्या गावाकडील मंडळींना आवडेल का? आणि तिथल्या भपकेबाज वातावरणात वावरताना संकोचल्यासारखे होईल त्यांना आणि आपल्यालाही, बघ तू एकदा विचार करून. बहीण आणि मेहुण्यांनाही माझे म्हणणे पटले.
दुसऱ्या दिवशी भाच्याने अगोदर दाखविलेले मंगल कार्यालय पसंद केले, स्टेजवरील फुलांच्या सजावटीचा अल्बम मागून घेतला आणि साठ सत्तर हजाराचा देखावा पसंद केला. हळद आणि लग्नाचा मेनू ठरवताना दोन्ही पार्टीचे एकमत होत नव्हते, मी म्हटले हळदीला तुमच्या पसंदीचा मेनू ठेवा, लग्नाला मुलाच्या पसंदीचा मेनू ठेवा. घरी आल्यावर भाच्याला म्हटले, पंजाबी किंवा कुठल्याच प्रकारच्या डिशेस नको, आपल्या सगळ्यांच्या पसंदीचे पदार्थ ठेवू, भाचा म्हणाला माझे मित्र नावं ठेवतील मला, त्याला म्हटले आपले गावाकडील हजारेक लोकं खुश होतील, तुझे शंभर मित्रही येणार नाही इतक्या दूर लग्नाला, आणि आले तरी त्यांनाही नक्कीच आवडेल. बहीण, मेव्हणे, भाचा ,भाची आणि मी ह्यांनी शेवटी लग्नाचा मेनू ठरवला. बटाटा उसळ, वांग्याचे भरीत,चपात्या ( पुऱ्यांना कट केले ) साधा भात , वरण, कोशिंबीर, (लोणचे आणि तूप आमच्या घरचे ) आणि पापड. मुलीच्या वडिलांना तसे कळवले आणि फायनल करायला हॉलच्या आचाऱ्याकडे गेलो. भातासाठी कोणता तांदूळ वापरणार विचारल्यावर , त्याने बासमती सांगितले. साधे वरण आणि बासमती बेचव लागते हे माहीत असल्याने त्याला कोलम तांदूळ भातासाठी सांगितला. मुलीच्या वडिलांनी स्वीट कोणते ठेवायचे विचारले ,मी म्हटले स्वीट फक्त एकच राहील आणि ते पण चमचम ( बंगाली मिठाई ). आचाऱ्याने आणि मुलीच्या वडिलांनी हा काय पदार्थ आहे म्हणून विचारले. आचाऱ्यालाही हा पदार्थ माहीत नव्हता, त्यामुळे तो बाहेरून मागायचे ठरवले. बंगाली मिठाईच्या दुकानात मुलीच्या वडिलांना चमचम खायला घातले, त्यांना तो खूप आवडला. प्रत्येकी दोन प्रमाणे किती लागतील ह्याचा आम्ही अंदाज केला आणि तेथून निघालो.
लग्नातील जेवणाची सगळ्यांनी तारीफ केली. मुलीच्या वडिलांनी चमचमची दुप्पट ऑर्डर दिली होती त्यामुळे चमचम कमी पडले नाही.
लग्नाचा अल्बम बघताना भाच्याने फुलांच्या सजावटीची स्तुती केली, त्याला म्हटले तू पसंद केलेली सजावट मी तुझ्या सासऱ्यांना कॅन्सल करायला लावली व अल्बम मधील केवळ सात हजाराची सजावट करायला सांगितली. भाचा म्हणाला मामाने मला मामा बनवले. मी म्हटले तुझ्या सासऱ्याचे जवळजवळ बावीस लाखही वाचवले.
लग्नात जेवण आणि पंगतीची सोय व्यवस्थित असेल तर लोकं तेच लक्षात ठेवतात ( बुफे नकोच)

हो, हरवत चालले आहे. सीमांत पूजन तेवढं हरवलं तरी चालेल. ते गळाभेटीची साईडवेज फोटो फार बोअर असतात. देवब्राह्मण , गौरीहार, कानपिळणी, सुन्मुख, विहिण पंगत ,सप्तपदी आवडते. ज्याला सात फेरे म्हणलं की मला दुर्लक्ष करावे लागते. सासरकडच्यांचे पाय धुणे अजूनही आहे का ? ते ही हरवूया.

लवंग कशी स्पायसीयर , 'असा रंगला विडा, अशा रंगल्या राती' नं ??? Lol लवंग तोडणे म्हणजे मराठी लग्नाचं फ्रेंच किस व्हर्जन वाटतेयं.

फा ला +१
इथेही नाचाच्या बाबतीत शरीरानी व तत्त्वानी 'मोडेल पण वाकणार नाही' लोक आहेत हे बघून बरं वाटलं.

चांगली गोष्ट म्हणजे हल्ली बरेच जण लग्नातला खर्च निम्मा निम्मा वाटून घेतात. आहेर पण नसतोच हल्ली बहुतेक ठिकाणी.

मांग मे सिंदूर भरना हे आता मराठी लग्नातले गुरुजी पण करायला सांगतात.
परवाच्या दोन्ही लग्नांत लग्नविधी जमिनीवर पाटावर बसून न करता सर्वांना कोचावर बसवून चालले होते. मधे काचेच्या टीपाॅयवर होमकुंड ठेवलं होतं.

एकुणात पनीर हे मराठीपणाचे क्रिप्टोनाईट आहे किंवा मराठीधर्माच्या प्रेषिताने पनीर निषिद्ध आहे अशी आज्ञा देऊन ठेवलीय असं वाटतंय Happy

फारेंड यांचा प्रतिसाद आवडला.

आग्यावेताळ,तुमचे खरेच कौतुक!दुसऱ्याचा विचार करून होणारा अनाठायी खर्च वाचवलात.अर्थात भाच्यानेही रुकर दिला हे पण आहे.मुलीच्या वडिलांनी मनापासून धन्यवाद दिले असावेत तुम्हाला.

मराठी लग्नात लाजाहोम आणि सप्तपदीच असते ना पण...

बाकी आमचं लग्न वैदिक पद्धतीने झालं. आदल्या संध्याकाळी सीमांत पूजन वगैरे. हार घालताना उचलून घेणं आम्हाला दोघांना आणि घरच्यांनाही आवडत आणि पटत नव्हतं.
पंगत मात्र शक्य नव्हती म्हणून बफे होतं. मेनू आठवतच नाही.

देवकी तै +१
आवडलं हे आग्यावेताळ. Happy

खरं तर दोन्ही पार्ट्या मजेत हसत खेळत राहतील असं काहीही चालावं.
अगदी पंजाबी भांगडा, संगीत, हल्दीला नाच हे सर्व विशेष पचलं नाही तरी चांगले नाच, चांगले फोटो, चांगला वॉर्डरोब असला तर मजा येते.
जे केलं जातं ते दोन्ही संमतीने व्हावं, मजेचं पिअर प्रेशर बनू नये इतकं पाळलं तरी भरपूर.
मेनू च्या बाबतही तेच.चांगलं, फार जास्त तेलकट नसलेलं चांगल्या चवीचं पंजाबी मराठी बंगाली आसामी कोणतंही जेवण मस्त.मराठी जेवणातला तोंडले वाला मसालेभात, श्रीखंड हे अति नावडते पदार्थ.पंजाबी मध्ये नुसतीच पनीर भाजी, लसूण घातलेली डाळ हे नावडते पदार्थ.
अगदी खूप रेलचेल नसून 4 चांगले पदार्थ असले की मस्त.परवा नातेवाईक जेवणात सीमांत पूजनाला छान मेनू होता. अगदी साधी मूग डाळ खिचडी, गोड नसलेली आणि तिखटजाळ नसलेली कढी, सुरळी वड्या, बटाटा वाटाणा थोडी घट्ट भाजी, अगदी चिमुकला खमंग पराठा असा.मला खूप आवडला.काही लोकांनी अर्थातच 'आजारी माणसाच्या जेवणासारखं म्हणून नाकं मुरडली.

हल्दी चे हल्ली पिवळे ड्रेस वाले फोटोशूट फोटो सुंदर येतात.
मला एक प्रकारे छान वाटतं काही रीती बदलल्याचं.आयुष्यातली सुंदर मेमरी, तिचे फोटो मस्त स्वप्नवत रंगीत, टिपटॉप,योग्य मेकअप,स्टेटमेंट ड्रेस सहित दिसावे, की विधीवत भसाभस हळदीकुंकू लावलेल्या, संस्कृती रक्षक प्रेशर मुळे पदर अंमळ रुंद काढून उगीच पोक्त दिसणाऱ्या, 'मेकअप ठसठशीत दिसलाच पाहिजे' असा दृढनिश्चय करून आलेल्या पार्लर वालीने बनवलेलं पांढरट फाउंडेशन, लाल चोच रंगवलेलं भूत बनलेल्या नवरी चे, रुसव्या फुगव्या च्या टेन्शन ने चेहरे ताणलेल्या वधूमाता पित्याचे?(हे न करताही विधीवत लग्न होतात,मला माहित आहे.मूळ मुद्दा हा की विधी मधले कंटाळवाणे प्रकार काढून किंवा थोडे शॉर्ट करून, सर्वांची करमणूक होईल अश्या प्रकारे पॉलिश केलेल्या इव्हेंट बघण्यातही लांबून आलेल्या पाहुण्यांचे पैसे वसूल आहेतच.)

पटवरऽऽधनऽऽ राजूस खास शोऽभेऽ गोख्ल्यांची हीऽ दूऽ(!)हिताऽऽ >>> Lol हो अजून होते बहुधा. मध्यंतरी एका लग्नात त्यातली नवरीमुलगी गाण्याच्या ग्रूप मधली होती. तर त्यांचा ग्रूप आदल्या दिवशी सीमांतपूजन वगैरे झाल्यावर स्टेजवर आला आणि यांनी गाणी म्हणायला सुरूवात केली. एक दोन गाण्यांपर्यंत सर्वांनी कौतुकाने दाद दिली. पण हे होईपर्यंत जेवणाचा चान्स नाही हे दिसल्यावर मग प्रतिक्रिया बदलत गेल्या Happy

इथेही नाचाच्या बाबतीत शरीरानी व तत्त्वानी 'मोडेल पण वाकणार नाही' लोक आहेत हे बघून बरं वाटलं. >>> Lol भारी

जे केलं जातं ते दोन्ही संमतीने व्हावं, मजेचं पिअर प्रेशर बनू नये इतकं पाळलं तरी भरपूर. >>> मी_अनु, आपसे ये समंजसपणा की उम्मीद नहीं थी Wink उलट लग्नातील कॅरेक्टर्सचे "मांजर" वगैरे कॅरेक्टरायझेशन वाचायला मिळेल असे वाटले होते. त्या ऑफिस वाल्या लेखांसारखे Happy

आग्यावेताळ तुमच्या हस्तक्षेपाने मुलिच्या वडीलाचा खर्च वाचला हे चान्गले झाले पण खर्च जर मुलिचे वडिलच करणार आणी भाचा ३० लाखाच बजेट काढणार हे मात्र पटल नाही , आपल्याला हव तसा मनमानी पणा करायचा असेल तर स्वत;च खर्च करायची तयारी ठेवावी.

आग्या१९९० - पोस्ट व तुम्ही केलेले (यशवी) प्रयत्न आवडले Happy
मुलीच्या वडिलांनी मनापासून धन्यवाद दिले असावेत तुम्हाला. >>> +१

विशेष म्हणजे अक्षता ही वाटल्या नव्हत्या >> हा एक बद्ल मात्र एकदम योग्य आहे. उगाच इतके तांदूळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. स्टेजवरच्या एक दोघांनी टोकन म्हणून करावे. आजकाल फुलेही टाकतात ना लोक? ते एकवेळ चालेल.

स्टेजवरच्या एक दोघांनी टोकन म्हणून करावे. >>> +१
फुलेही टोकन म्हणूनच असावीत. बरेचदा पुढच्या रांगेतल्या सुंदर मुलीच्या डोक्यावर टाकतात हुषार लोक.

ऑनेस्टली, लग्नांचं वय बरंच पुढे गेलं आहे आता. मुलंमुली करिअरमध्ये सेटल झाल्यावर लग्न करतात - मग खर्च स्वतःच का करत नाहीत? आईवडिलांची मदत घेणं निराळं आणि तो बोजा त्यांच्याच डोक्यावर टाकणं निराळं, नाही का?
बदल मुळात तिथे व्हायला हवा, मग अनावश्यक विधी आणि बडेजावाला आपोआप आळा बसेल.

हेहे फारएन्ड, वयाचा परिणाम, आयुष्याशी गोडी गुलाबीने नमतं घ्यावं, बाकी रुसवे फुगवे,मांजर उंदीर सर्व मिथ्या(हे वाक्य गंगाधर टिपरे च्या कापऱ्या आवाजात वाचावे)

ऋन्मेषजी, चित्रपटाच्या धाग्यावर मला उद्देशून विचारलेय का ? त्या प्रश्नाचे उत्तर हा आपला ट्रॅप आहे का स्पॉयलर साठीचा ?
असे ट्रॅप का बरे लावता ? Wink तिथे उत्तर देणे बरे वाटले नाही.

बदल मुळात तिथे व्हायला हवा, मग अनावश्यक विधी आणि बडेजावाला आपोआप आळा बसेल. >> ऑ ऑ???? बदल करायचा नाहीये ठरलं ना?

हो ना!
हरवत चाललेल्या मराठीपणावरुन गाडी कुठल्याकुठे घसरतेय Wink

मग खर्च स्वतःच का करत नाहीत? आईवडिलांची मदत घेणं निराळं आणि तो बोजा त्यांच्याच डोक्यावर टाकणं निराळं, नाही का? >>> टोटली. त्यात "न्यू इकॉनॉमी" मधे ज्यांच्या नोकर्‍या, व्यवसाय वगैरे आहेत त्यांचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असते.

फुलेही टोकन म्हणूनच असावीत. बरेचदा पुढच्या रांगेतल्या सुंदर मुलीच्या डोक्यावर टाकतात हुषार लोक. >>> Happy हो बरोबर. फक्त मी विचार केला फुले तशीही फांदीवर सुकूनच जाणार. मग मधल्या मधे फुलवाल्याला तरी पैसे मिळतील. पण सुंदर मुलीच्या डोक्यावर क्लॉजला वॉर्निंग द्यायला हवी. तसे करायचे असेल तर नेम धरून फुले टाकण्याची प्रॅक्टिस पाहिजे. नाहीतर चेन्नई एक्स्प्रेस मधे ते चिठ्ठीचे होते तसे होईल. किंवा ज्या व्यक्तीच्या डोक्यावर फूल पडेल ती सुंदर आहे असे तुम्हाला वाटते असा पब्लिकचा समज होईल.

ऑ ऑ???? बदल करायचा नाहीये ठरलं ना? >>> Lol अमितचा जॉर्डन क्लेपर झाला आहे. तो मागा लोकांच्या कळपात जाउन अशी आर्ग्युमेण्ट फिरवतो की ते शेवटी स्वतःच्या आधीच्या वाक्याच्या उलट बोलू लागतात Happy

किंवा ज्या व्यक्तीच्या डोक्यावर फूल पडेल ती सुंदर आहे असे तुम्हाला वाटते असा पब्लिकचा समज होईल. >>> अशा वेळी प्रत्येक स्त्री / व्यक्ती सुंदरच असते, सौंदर्य आपल्या डोळ्यात असते असे दवणीय वाक्य चिकटवून द्यायचे.

नागपूरकडे 'सुलग्न लावणे' अशी पद्धत असते. म्हणजे लग्न लागल्यावर पाहुणे स्टेजवर जाऊन वधूवरांना भेटतात तेव्हा त्या दोघांची डोकी एकमेकांना टेकवायची Happy आणि परत अक्षता टाकायच्या. माझ्या मैत्रिणीच्या लग्नात हे बघितलं होतं. अजून एक मजेशीर पद्धत बघितली. लग्नाच्या आधी सकाळी नवरा मुलगा वधूच्या बिऱ्हाडात खीर खाण्यासाठी येतो. मग तो परत जायला निघाला की करवल्यांनी त्याला अडवायचं. मग त्याच्याकडून पैसे घेतल्याशिवाय त्याला सोडायचं नाही!

लग्नाच्या मेनूमधे काळानुसार किंवा आवडीनुसार बदल होणं ठीक आहे. विधींमध्येही बदल व्हावेतच. 'मराठीपण हरवत जाणे' म्हणजे भपका वाढणे, दाखवायला म्हणून अगदी कोरिओग्राफी करून नाचगाणी करणे, हे खटकतं. प्रीवेडिंग फोटोशूटचाही आता बघून बघून कंटाळा आला.

हल्ली बाळांचेही हौशीने वेगवेगळ्या कपड्यांमध्ये, पोझेसमधे, दर महिन्याच्या वाढदिवसाला वगैरे फोटो काढतात (आणि व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवतात) ते बघायला गोडच दिसतात. कारण बाळं छानच दिसतात.
पण फोटोंचा नैसर्गिकपणा हरवत चाललाय. कॉलेजकन्यकांना माहिती असतं आपण कुठल्या अँगलने छान दिसतो. मग त्या नेहमी त्याच प्रकारची पोझ देतात. काही विविधताच नसते फोटोंमध्ये.
विषय भरकटत गेला हे मान्य आहे. पण मला या सगळ्यात 'दाखवेगिरी' हे समान सूत्र दिसतं.

ते स्वतःच्या हातानी च जेवण घ्यायचे आणि उभे राहून जेवायचे हा प्रकार काही मला तरी बिलकुल न आवडे
जेवणाची प्लेट सांभाळायची की पाण्याचा ग्लास अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते.
मजा येत नाही.
बसून जेवण करणे ही जी आपली भारतीय पद्धत आहे ती अचानक लोकांना मागास का वाटू लागली हे मोठ गूढ च आहे.

लग्नाचा खर्च हा समान असावा.
खर्च च नवऱ्याकडचे ,किंवा नवरी कडचे करणार नसतील तर दुसऱ्या लं विनाकारण खर्चात पाडू नये.
आणि पैसे असतील च खूप खर्च लग्नात करावा .
नसतील पैसे तर उगाच सर्व करतात म्हणून आपण कर्ज काढून भपके गिरी करण्याची गरज नाही .
विदर्भात शेतकरी आत्महत्या मध्ये लग्नात झाले ले कर्ज हे पण एक मोठं कारण आहे

इतका बदल झाला तरी खूप झाले

उत्तर भारतात लग्न रात्री लागतात जास्त करून राजस्थान मध्ये.
यूपी बिहार मध्ये मुली ची बाजू ही कनिष्ठ असते.
वर पक्षाचे नको ते लाड करावे लागतात.
महाराष्ट्रात त्या मानाने खूप प्रगत आहे.
उत्तर भारतात लग्नात जे छान छोकि चे कार्यक्रम असतात त्याचा खर्च मुली कडचे करतात.
बाईक पासून कार पर्यंत नवऱ्याला द्यावे लागते.
आपला महारष्ट्र च ह्या बाबतीत सुधारला आहे.
पण काही मोजकेच महाराष्ट्र ल मागास विचाराकडे घेवून जात आहेत जे स्वतःला प्रगत समजतात तेच.
राजस्थानी लोकात बायका नाचतात घरातील च आणि पैसे पण उडवले जातात.
किती मागास प्रथा आहे.
आपल्या कडे बायका नाचायला लागल्या आहेत फक्त पैसे उडवणे बाकी आहे.

सिंगल माता, सिंगल पिता,समसेक्स विवाह,जास्त वयात झालेले विवाह ४० शी पार.
ह्याची भालमन मीडिया करते आणि लोक सवयी प्रमाणे त्याचे अनुकरण करतात .कारण ह्या घटना नवीन आहेत
हे सर्व प्रकार करणारे आज जगात चाळीस ते पन्नास वर्षांची च माणसं आहे त
ही जेव्हा ७० वयात पोचतील तेव्हा त्यांच्या मुलाखती घेवून प्रसिद्ध केल्या पाहिजेत...बँकेत पैसे असून वापरता येत नाहीत कारण आणून देणारा कोणी च नाही.
आजारी पडले तर साधी crocin पण कोणी आणून देत नाही
नोकर ठेवले तर ते सर्व गोळा करून गायब होत आहेत पण complaint करायला पण कोणी नाही.

वर पक्षाचे नको ते लाड करावे लागतात.
महाराष्ट्रात त्या मानाने खूप प्रगत आहे.>> नाही ओ सर. महाराष्ट्रातील वरपक्षाचे काही कमी नखरे नसतात. अंगठीसाठी मानपानसाठी रुसून बसलेले किती तरी नवरदेव पाहिले आहे.

Pages