मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लगानची गाणी आवडली नाहीत. म्हणजे लागली कुठे तर बंद नाही करणार. पण लगानचं कुठलंही गाणं मी स्वतः कधी लावलं नाही ऐकायला.
जावेद अख्तरची मुलाखत जनरली ऐकायला आवडते. बऱ्यापैकी रॅशनल माणूस वाटतो तो. त्यामुळे ही पण ऐकेन.

दुःखाबद्दलच्या चर्चेत मला दोन बाबी जाणवताहेत.
१. अस्मिता बोलते आहे ते दुःखाच्या कारणांबद्दल, आणि संदीपची कविता बोलते आहे ते दुःखाच्या परिणामा/अनुभवाबद्दल.
२. कवितेचा (नळाचा उल्लेख इ.) फार शब्दशः अर्थ लावला जातो आहे.

आत्ता गडबडीत आहे, नंतर जमलं तर सविस्तर लिहिते.

सायोनं ३७व्या पानावर सुचवलेली आरपार मधली तेजस्वी सेवेकरी यांची मुलाखत बघीतली. बघताना/ऐकताना त्रास होतो. पण एकदा नक्की बघण्यासारखी आहे.

फा, सहमत. ओ री छोरी मधला इंग्लिश पार्ट मला सगळ्यात जास्त आवडतो. गाणी कधीही ऐकत रहावीत असं वाटलेलं नाही.

लगानची गाणी मला आवडत नाहीत. एकदा ऐकली, त्या नंतर पुन्हा ऐकावीशी वाटली नाहीत. (माझ्यामते) त्या काळानुरुप रहमान गाणी करायला गेला पण त्याची खासियत नव्या काळाला अनुसरुन जबरदस्त गाणी द्यायची आहे म्हणुन मला ती परिणामकारक वाटत नाहीत.
अस्मिताने दिलेली वरची खरेची कविता स्वदु:ख किंवा परदु:खाची पण वाटत नाही. दु:खाला कसं चिडवायला हवं त्याची वाटली. म्हणुन खोल वाटली नाही.
स. कुलकर्णीचा कार्यक्रम १५ वर्षापुर्वी एकाच्या घरी केला गेला होता तेव्हा जरा “मी मी“ जाणवले होते. खरे नम्र होता.
म्हणुन सलील कु. ची मुलाखत ऐकावी वाटेना.
आणि हो, दोघे overhyped वाटतात मलाही.

चित्रपटातली गाणी चित्रपटातल्या त्या प्रसंगाला अनुरूप असायला हवीत . ती त्यानंतर सुटीही ऐकायला आवडली तर तो बोनस. नाहीतर आपल्याकडे नुसतेच म्युझिकल हिट्स म्हणून अनेक सिनेमे असतात. संगीतावरच चित्रपट तरून गेल्याची उदाहरणे आहेत. राजेंद्रकुमारची बहुतेक गाणी हिट असत. ते सिनेमे आणि त्यातला अभिनय, ती गाणी आवडतात म्हणून आता पाहाल का?

गीतकार दिग्दर्शकांना आपली प्रतिभा दाखवायला स्वतंत्र गाणी करायलाही वाव असतो. जसं रहमानने माँ तुझे सलाम मध्ये करून दाखवलं.

हिंदीमध्ये चित्रपटेतर संगीताची परंपरा कदाचित मराठी आणि बांग्ला एवढी मोठी आणि ठळक नाही.

संदीप-सलील ओव्हरहाईप्ड असतीलही.
पण नवीन पिढीला परत कवितेकडे आकर्षित करण्याचं श्रेय संदीप खरेला (त्यात सलीलचंही श्रेय आहे.) मोठ्या प्रमाणात आहे. तो एकटाच नाही अर्थात. सौमित्र, वैभव जोशी, गुरू ठाकूर हेही आहेत. अजूनही कुणी असतील. पण संदीप खरेचा वाटा मोठा आहे. 'आयुष्यावर बोलू काही' कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये अनेक कविता पाठ असणारी, कवितांची फर्माईश करणारी कॉलेजवयीन मुलंमुली असायची. अनेकांनी तो कार्यक्रम अनेक वेळा बघितला आहे. ही मुलं एरवी मराठी कविता वाचायला गेली असती असं मला वाटत नाही.
मला वाटतं वैभव जोशीने एका कार्यक्रमात म्हटलं होतं की आज ही मुलं माझ्या कविता ऐकतात, मला हीच आशा आहे की उद्या ती मला ओलांडून विंदा, बोरकर यांच्या कविता वाचायला जातील.
आणि यापलीकडे जाऊन, संदीप खरे, सौमित्र, वैभव जोशी, गुरू ठाकूर हे सगळे खरोखरच चांगले कवी आहेत असं मला वाटतं.

>>प्रेक्षकांमध्ये अनेक कविता पाठ असणारी, कवितांची फर्माईश करणारी कॉलेजवयीन मुलंमुली असायची. >> +१
आता फारच लंबाण लावलंच आहे तर.. संदिप सलीलच्या कार्यक्रमांत ते फक्त त्यांच्याच कविता/ गाणी नाही म्हणत. संधीप्रकाशात तर संपूर्ण आल्बम इतर कविंच्या आवडलेल्या कवितांवरच आहे. तुकाराम, बोरकर, मोघे, शांता शेळके, कुसुमाग्रज, अनिल कांबळे आणि नामदेव यांच्या कविता आहेत. त्यांच्या कार्यक्रमांत अगदी पूर्वीही इतर दि:गज कवींचा, समकालिन कवींचा उल्लेख आलेला आणि आदराने आलेलाच आठवतो. "माणसे गेली तरी ही सावल्या उरतात मागे, हे उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे" ही गझल अन्यथा मला कधी समजलीच नसती.

नवीन पिढीला परत कवितेकडे आकर्षित करण्याचं श्रेय संदीप खरेला >>>>
हे मात्र खरंय. कदाचित सोप्या, ममव आणि गेय असल्यामुळे अगदी बारक्या (प्राथमिक शाळेतल्या) मुलांनाही त्या अपिल होतात. माफक क्रांतीकारी गाणीही त्यांना समजतात.

पण या जोडीचं दुःख काय किंवा ओव्हरऑल आवाकाच ममव आहे. त्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सगळेच ढसाळ, नारायण सूर्वे किंवा सुरेश भट कसे होतील? काळीज पिळवटून टाकणारं काहीतरी लिहिण्यासाठी तुम्ही किमान मानसिक पातळीवर तसं काही अनुभवलेलं पाहिजे.

हो अमित.
स्टोरीटेलवर मधुरा वेलणकर- संदीप खरे यांचा एक कार्यक्रम आहे. त्यात तो जुन्या-नव्या मराठी कवी आणि त्यांच्या कवितांवर उत्तम बोलला आहे.

पण या जोडीचं दुःख काय किंवा ओव्हरऑल आवाकाच ममव आहे. >>>> इथे आलेल्या "पण" मुळे हा प्रश्न. ममव असणं हे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं आहे का? असेल तर का ? जात, धर्म हे जन्मणार्‍याच्या हातात नसतं असं जे म्हंटलं जातं तेच ममव पणालाही लागू नाही का? आणि ममव असणं ह्यात चुकीचं किंवा गैर काही आहे का?

सगळेच ढसाळ, नारायण सूर्वे किंवा सुरेश भट कसे होतील <<< ह्याला अनुमोदन. फक्त जे होणार नाहीत, त्यांना तुक देऊ नका.

गायकांच्या बाबतीतही हे जाणवतं. उदा. महेश काळेने हल्ली शास्त्रीय संगिताच्या मैफिली सोडून अभंगरंग किंवा त्या ज्यॉनराचे कार्यक्रम सुरू केले आहेत. ते त्याला उत्तम जमतं. तो ही "परफॉर्मर"च आहे. पण तो ह्या माध्यमात परफॉर्म करतो. तो अवधूत गुप्ते किंवा शंकर महादेवन टाईपचा परफॉर्मन्स नाही देत पण त्याच्याही कार्यक्रमात लोकं दंग होऊन नाचतात. तसच काहीसं.

वावेच्या पोस्टला पुन्हा एकद अनुमोदन.

ममवनीच ममवला नाकं मुरडली तर ममवने जायचं कुठे?

परदु:ख शीतल म्हणत ढसाळ , सुर्वेंच्या कविता मिटक्या मारत उसासे सोडत वाचायच्या का?

ही नावं माझे मन यांच्या प्रतिसादात आली असली, तरी हे स्पेसिफिक त्यांना उत्तर नाही.

पण नवीन पिढीला परत कवितेकडे आकर्षित करण्याचं श्रेय संदीप खरेला (त्यात सलीलचंही श्रेय आहे.) मोठ्या प्रमाणात आहे >> चांगली गोष्ट आहे. त्यांनी कविता प्रकाराला जरा साधं व तरीही ग्लॅमरस केलं असेल म्हणुन असेल.

आयुष्यावर बोलू काही च्या कवितांमध्ये शब्द सरळ सोपे असतात त्यामुळे त्या कविता लक्षात राहतात. बऱ्याच कविता ह्या ममव ला relatable वाटतात म्हणून आवडत असाव्या.
सलील कुलकर्णी ने गायलेली ' नसतेस घरी तू जेव्हा...' मला खूपच आवडलं.
संदीप खरेच ' मी हजार चिंतांनी...' पण आवडतं.

संदीप खरेंच्या सादरीकरणात खूपच आत्मप्रौढी जाणवते.

पराग +१
मी हेच लिहिता लिहिता थांबले होते (ममव बद्दल).
त्याही पलीकडे जाऊन- फक्त कविता नाही, तर एकंदरीत साहित्य किंवा अगदी चित्रपट/नाटक, या कुठल्याही बाबतीत मला असं वाटतं की 'रिलेटेबल' असणं हा एक भाग आहे, पण दर्जेदार असणं हा दुसरा मोठा भाग आहे. उदा. बहिणाबाईंच्या कविता, शंकर पाटील यांच्या कथा, या शहरी मध्यमवर्गीय वाचकाला रिलेटेबल नसतील पण जो चांगला वाचक असतो, तो यापलीकडे जाऊन 'दर्जा' बघतो. तिथे ते साहित्य रिलेटेबल आहे की नाही हे महत्त्वाचं रहात नाही. मी स्वतः ग्रामीण भागात लहानाची मोठी झालेली आहे. पण मग मी पुलंचा 'नारायण' मला 'रिलेट' होत नाही म्हणून नाकारायचा का? असं कसं होईल? ते दर्जेदार आहे म्हणून ते एक वाचक म्हणून मला आवडतं, भले मी ते आजूबाजूला कधीच बघितलेलं नसेल.
शिवाय मानवी वृत्ती या कमीअधिक फरकाने सगळीकडे सारख्याच असतात. तपशील बदलतात.

छान चर्चा सुरू आहे.
रिलेटेबल आणि दर्जा बद्दल पटलंच वावे. केवळ रिलेटेबल आहे म्हणुन आवडेलच असं नाही आणि नसेल तरी पोचायचे ते पोचते लिहिण्याची शैली, दर्जा वगैरे योग्य असतील तर.

बरोबर मानव.
आणि आवड-निवड ही व्यक्तिसापेक्ष असते हे इथे अध्याहृत आहे.

लगानची गाणी सतत ऐकू वाटत नाहीत असे म्हणणाऱ्याचे थोडे आश्चर्य वाटले. हा खरेतर जनरेशनल गॅप म्हणायला पाहिजे. कारण त्या बरोबर त्याच काळात जी मुलं म्हणजे आम्ही मोठी होत होतो त्या नोस्टलिजिया पायी त्यांना सगळ्यांना ही गाणी प्रचंड आवडतात आणि सतत ऐकू वाटतात. रंग दे बसंती तर याहून श्रेष्ठ वाटतात. आशुतोषचेच म्हणायचे तर त्याचे तीन सलग चित्रपट लगान, स्वदेस, जोधा अकबर (यातली काही गाणी) ही आमच्या पिढीकडून सतत ऐकली जातात. स्वदेसचे ये जो देस है मेरा चे इंस्ट्रुमेंटल तर एवढे सुंदर वाटते रेणू मुजुमदार यांची बासरी आहे.

हे संदीप/ सलील ला लागू नाही... पण ममवपण, घरगुती - कौटुंबिक प्रकार चटकन एकसुरी बनतात. ते करायला फारशी प्रतिभा लागत नसल्याने सोम्या गोम्या त्यात खूप पडतात आणि सगळा विचका होतो. बहुतांश मराठी नाटकं, बहुतेक सगळ्या सिरियल, अनेक सिनेमे तीच कथा स्थळ काळ बदलून, एक थोडं काही नवं टाकून ऑन्व्हालप पुढे ढकलल्यागत समोर देतात.
ममव, पण सकस 'प्रपंच' बनवता येतेच. इतर उदाहरणे कमी नसतील, ममव बनवून त्यातून एकाहून अधिक लेयर्स देता आले पाहिजेत. नाहीतर मग कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो! ममव पण तोंडीलावयला बरं वाटतं ताटभर दिलं की उबग येतो. तो कशाचाही येतो पण ममवचा फार लवकर येतो.

नारायण रिलेट झाला नाही, रामा रिलेट झाला नाही तर मग तू नसशील तर कुणी माराव्या रसमय पिचकाऱ्या, दुग्ध केंद्री मग कुणी लावाव्या सांग गड्या बाऱ्या, काळे जाकीट - गिरणीतून पीठ, ते संदर्भ नाही रिलेट झाले तर अगदीच 'उरेल केवळ उभय नयन मिटणे ' राहिलं नाही तरी बहुपदरी मजा हळूहळू विरत जाईल. आणि पुढच्या पिढीत ते गरीब वाटत जाईल.

बाकी 'मध्यमवर्गीय' वर मंगला गोडबोले यांची शार्दुल आणि तो कोण दुसरा ओमकार मला वाटतं.. त्यांनी घेतलेली मुलाखत छान आहे. मंगला गोडबोले मध्यमवर्गीय म्हणजे काय तो बॅड वर्ड नाही हे छान सांगतात.

Pages