कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Submitted by कुमार१ on 29 March, 2021 - 01:19

या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................

31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.

इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.

महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड

या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी

समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.

एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे

१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.

२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.

३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :

सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :

१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर
हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक हायपोथेटिकल सि च्यु एशन
-लस चालली नाही तर प्लॅन बी काय आहे?

अगदी मनातला प्रश्न. पण सध्या तरी उमीद पे टिकी है दुनिया.

@कुमार आणि ब्लॅककॅट - आमच्या आईंना काल संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला. माईल्ड सिंप्टोमॅटिक होत्या त्या. डिस्चार्ज पेपरवर ११ तारखेपर्यंत होम क्वारंटाईन करण्याचा ठप्पा मारला आहे. सात दिवसांची औषधेही लिहून दिली आहेत.
इथे आम्ही स्टाफ क्वार्टर्समधे रहातो तिथे ॲटॅच बाथरुमवाली मास्टर बेडरुम वगैरे नाही. १ बिएचके घर आहे. टॉयलेट बाथरुम घरातच आहेत पण आम्हा चौघांना मिळून एकच सेट आहे. हॉल व्यवस्थित मोठा आहे बाकीच्या खोल्यांच्या पेक्षा (म्हणजे पार्टिशन असत तर एक अर्धी / छोटी बेडरुमच करता आली असती इतका मोठा आहे) त्यामुळे सध्या त्यांची व्यवस्था हॉलमध्येच एका कोपऱ्यात बेडवर केलेय. बाकीही त्यांच्या वस्तू औषधे इत्यादी ठेवायची व्यवस्था बेडच्या बाजुला केली आहे. आम्ही त्या खोलीत फक्त बाहेरुन आलेले दूध ग्रोसरी इत्यादी घ्यायला आणि त्यांना जेवण नाश्ता इत्यादी द्यायला करु बाकी वेळी टाळू शकू. डॉक्टरांनी हे सात दिवस घरातही मास्क लावून रहायला त्यांना सांगितले आहे. त्यांच्या खोलीत (हॉलमध्ये) जाताना आम्हीही मास्क लावतो. हॉलमधले काम झाले की आम्ही साबणाने हात धुतो. त्यांचे कपडे वेगळ्या बादलीत डेटॉल मिश्रीत पाण्यात भिजवून मग धुतो. त्यांच्या आंघोळीसाठीही एक सेपरेट बादली ठेवली आहे. टॉयलेट, नळ कड्या इत्यादी जिथे त्यांचा वावर होतो अशा ठिकाणी डेटॉल किंवा डिसइंफेक्टंट सरफेस स्प्रे मारतो. फरशी मॉपने पुसून घेतो.

इतकी काळजी घेणे पुरेसे आहे का? याव्यतिरिक्त काही काळजी घ्यायला हवी का आम्ही?

धन्यवाद ब्लॅककॅट. अजून एक प्रश्न, आम्ही (म्हणजे अर्थात त्या सोडून आम्ही बाकी दोन मंडळी) घराबाहेर पडलो तर चालेल की तसे न करणे हे इतर लोकांच्या दृष्टीने हिताचे? सध्या ऑफीस सुरु झालेय त्यादृष्टीनेही हा प्रश्न पडलाय (सात दिवस वर्क फ्रॉम होम करु द्यावे अशी रिक्वेस्ट करणार आहे, बघू आता)

-लस चालली नाही तर प्लॅन बी काय आहे?
>>>
प्रश्न काल्पनिक असल्याने मी सुद्धा माझ्या कल्पनेनुसार काही अंदाज व्यक्त करतो.

१. समजा, सध्या एखाद्या लसीचे दोन डोस पुरेसे नाहीत हे लक्षात आल्यानंतर पुढचा प्रयोग चालू झालेला आहे. तो म्हणजे दोन उत्पादकांच्या लसी योग्य त्या अंतराने एकाच व्यक्तीस देणे.

२. समजा, प्रतिबंधात्मक पातळीवर फारसे यश येत नसेल तर उपचारांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. त्या दृष्टीने सध्या प्रतिपिंड-उपचार एका मर्यादित वर्तुळात आहेत, ते व्यापक स्वरूपात उपलब्ध करून द्यावे लागतील.

३. तसेच काही नवनवी प्रथिने/ मूळ पेशी उपचारांसाठी वापरता येतील असा कयास आहे. त्यांच्याही संशोधनाचा वेग वाढवावा लागेल.

४. आशियात आधुनिक वैद्यक वगळता इतर उपचार पद्धतींचा लाभ घेणारे अनेक लोक समाजात आहेत. त्यादृष्टीने त्या पद्धतीचे संशोधन वेगाने व्हावे असे वाटते. “आयुषकडून ज्येष्ठमधाच्या शास्त्रीय चाचण्या सुरु’ अशी बातमी आज वृत्तपत्रात वाचली.

इतके मी सांगू शकतो.

अमेरिकेत फार झपाट्याने लसीकरण चालले आहे . जून जुलैपर्यंत त्यांच्याकडे १००% लसीकरण पूर्ण होईल. मग तिथल्या कंपन्यांच्या लसी आपल्याला आयात करता येतील आणि आपल्याकडे लसीकरणाचा वेग वाढ वता येईल असे एक मत वाचले.

साठच्या वरच्या आणि मग ४५ च्या वरच्या लोकांचे आधी लसीकरण करण्यावरून काही ठिकाणी असंतोष दिसतो आहे. जे लोक बाहेर पडत नाहीत , त्यांना कशाला लस? आम्ही रोज गर्दीतून प्रवास करतो, आम्हांला अधिक गरज आहे .इ,

सप्टेंबरमधल्या एका बातमीनुसार भारतात करोनामुळे मृत झालेल्यांत ५३ % साठच्या वरचे आणि ३५ % ४५-६० या वयोगटातले होते. म्हणजे ८८ % सध्या ज्यांना लस दिली जाते त्या वयोगटातले.
लसीकरणामुळे संसर्ग थांबणार नाहीए, तर आजार होणार नाही किंवा आजाराची तीव्रता कमी होईल हे लोकांना कळत नाहीए/

लसीकरणामुळे संसर्ग थांबणार नाहीए, तर आजार होणार नाही किंवा आजाराची तीव्रता कमी होईल हे लोकांना कळत नाहीए. >>>+१.

https://m.marathi.thewire.in/article/health-efficacy-of-covid-vaccines/1... ह्या लेखात फार छान समजावून सांगितले आहे.

धन्यवाद .
................
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.
एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत. त्याचा हा आढावा.

१. एन ९५ मास्क्स: यांच्या रचनेत आतील हवेचा दाब बाहेरीलपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ते घातलेल्या व्यक्तीस कष्टप्रद श्‍वसन करावे लागते.
२.काम करतानाचे दृष्टीक्षेत्र कमी होते तसेच श्रवण मर्यादाही येतात. यातून शल्यक्रिया करताना बराच तोटा होऊ शकतो.

३. स्पर्श संवेदना कमी होते.
४. पोषाखामुळे उष्णतावाढ आणि शरीरदाह होऊ शकतो.

५. हलक्या दर्जाच्या उपकरणांमुळे अंगावर घट्टे पडणे वगैरे जखमा देखील होतात.
६.या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संबंधिताच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. काम केल्यानंतर प्रचंड शीण जाणवतो.

७.काही जणांना त्या पोशाखाच्या बंदिस्तपणामुळे गुदमरुन भीती देखील वाटते. काही वेळेस डोके हलके पडणे आणि बोटांना मुंग्या येणे हे देखील आढळले आहे.
८.सहकार्‍यांशी आवश्यक संवादावर विपरीत परिणाम होतो. अन्य सहकाऱ्यांना डॉ ची देहबोली समजणे अवघड होते.

९. हातांच्या अशा कौशल्यपूर्ण कामांवर दुष्परिणाम होतो.
१०. अखेरीस संपूर्ण पोषाख चढवणे आणि उतरवणे हेही खूप कटकटीचे काम असते. कित्येकदा पोशाख काढण्याच्या प्रक्रियेतून देखील अनेक डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना जंतूसंसर्ग झालेला आहे.

वर उल्लेख केलेल्या आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :

१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे व मानेचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्त वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.

आमच्याकडे एका शासकीय आस्थापनातील आरोग्य योजनेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडुन त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक संदेश आला आहे. ज्यांना उच्च रक्तचाप किंवा हृदय विकार आहे त्यांनी लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी CRP ही रक्तचाचणी करून घेण्याबाबत. या चाचणीमध्ये CRP पातळी नॉर्मल पेक्षा जास्त आल्यास लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे त्यात सांगितले आहे.

यात तथ्य आहे का?

मानव
दुसऱ्या डोसपूर्वी सर्वांनी CRP करावी अशी अधिकृत माहिती सापडली नाही. ही माहिती वृत्तपत्रे, यु ट्यूब वा ब्लॉग्सवरच फिरत असल्याचे दिसते. ती सुद्धा ‘अलर्जिक’ व्यक्तीसाठी..इ. संदिग्धता आहे.
डोसपूर्वी ताप वगैरे असल्यास डॉ चा सल्ला घेऊन त्यांनी सांगितल्यासच करावी असे वाटते.

निर्मल
तुम्ही rt-pcr चाचणी बद्दल विचारत आहात असे गृहीत धरतो.

ही चाचणी जर विषाणूचा नैसर्गिक संसर्ग झाला तरच पॉझिटिव येते.
त्याचा लस घेण्याची संबंध नाही

>>>> अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे. >>> +786

इथे एक बातमी आहे
https://www.esakal.com/pune/apprentice-resident-doctor-sassoon-and-bj-me...
अत्यंत हीन दर्जाच्या PPE मुळे डॉक्टर्समध्ये संसर्ग वाढतोय

अतिशय सुंदर धागा आहे आणि चर्चा अतिशय उपयुक्त अशी चालू आहे.
लसीकरण, विषाणू, संक्रमण आणि औषधयोजना याबद्दल डॉक्टर कुमार हे अतिशय उत्तम माहिती देत आहेत. मी सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या पातळीवर मला जे समजतंय ते लिहायचा प्रयत्न करणार आहे. जर या प्रतिसादामुळे चर्चेत व्यत्यय येत असेल तर कृपया चार तासाच्या अवधीत कळवावे ही विनंती.

कोविडविरूद्धचे युद्ध म्हणजे काय ?
१. सरकार आणि सरकारी यंत्रणांनी पुकारलेले
२. वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारलेले
याशिवाय तिसरे
३. सामान्यांनी पुकारलेले

आपला रोल क्र. ३ मधे आहे. जर सामान्यांनी हा रोल योग्य प्रकारे निभावला तर पहिल्या दोन वर ताण कमी येईल. फक्त योग्य प्रकारे निभावणे इतकेच अपेक्षित नसून पुढाकार घेऊन उपाययोजनाही करायला हव्यात. यात प्रतिबंधात्मक आणि रूग्णांच्या बाबत अशा दोन पद्धतीच्या असतील.
सामान्य काय करू शकतात ?

अ) कितीही कंटाळा आला तरी त्रिसूत्रीचे पालन करणे म्हणजे हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर राखणे.
सध्या अंतर राखणे अशक्य होत असल्याने ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच थांबावे.
ब) युद्ध राज्य पातळीवर सरकार लढेल. पन शहर, गाव, वॉर्ड, गल्ली, सोसायटी व मजला या स्तरावर नागरीकांनी ते स्वतः लढायचे आहे.
क) सोसायट्यांमधून कोविडच्या तपासणीचे किंवा लसीकरणाचे ड्राईव्ह राबवता आले तर उत्तम. शहरी भागात वॉर्डलेव्हलला अशा सोसायट्यांना तारखा दिल्या गेल्या पाहीजेत. गावपातळीवर ग्रामपंचायत असा ड्राईव्ह राबवू शकते.
ख) वरील ड्राईव्हसाठी स्वयंसेवकांनी आपापल्या सेवा देऊ करणे.
ग) सोसायट्यांतून प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करणे व तिचे पालन करणे. कोविड झालेल्यांना ट्रेस करत राहणे व बाधीत रूग्णांची माहिती ताबडतोब यंत्रणांना कळवणे.
घ) बाधीत रूग्णांच्या घरचा कचरा दहा दिवसांनी उचलला जावा. तो बाहेर ठेवल्यास मावशी येईपर्यंत त्याचे आजूबाजूच्या घरात संक्रमण होते. तसेच मावशींनाही संक्रमण होऊ शकते.
प) सोसायटीच्या आवारातले बसण्याचे बाक काढून टाकणे. ज्येना त्यावर गप्पा मारत बसतात.
फ) सोसायट्यांनी आपापले क्लबहाऊसेस ग्रामपंचायत / मनपा (वॉर्ड) यांचे कडे कोविड रूग्णांच्या बेडसाठी हस्तांतरीत करावेत,
ब) मंगल कार्यालये स्वेच्छेने अथवा सक्तीने ताब्यात घेतली जावीत. अशा ठिकाणी स्थानिक पातळीवर छोटी कोविड केंद्रे उपाब्ध होऊ शकतील. यामुळे मोजक्या रूग्णालयांवरचा ताण कमी होईल. सध्या निरीक्षणाखाली असलेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अत्यवस्थ पेशंट्सना बेड मिळत नाहीत. स्थानिक पातळीवर जर सोय झाली तर अत्यवस्थ रूग्णांची धावपळ कमी होईल. अशा ठिकाणी ऑक्सिजन सिलींडरची व्यवस्था वर्गणी काढून अथवा शासकीय पातळीवर करावी. गणेश मंडळे, सेवाभावी संस्था देखील मदत करू शकतात.

काही उत्साही नागरीकांनी घरी ऑक्सिजन सिलींडर आणून ठेवले आहेत. तर भाड्यानेही ते उपलब्ध आहेत. कुणी पॅनिक होऊ नका म्हणतील. पण परिस्थिती ज्यांनी पाहिली आहे त्यांना ठाऊक आहे. असे उपाय केले तर त्यात हास्यास्पद काहीही नाही. ज्यांच्या घरी ज्येना किंवा गंभीर आजाराचे रूग्ण आहेत त्यांनी या पर्यायाचा विचार केला (जर डॉक्टर ओळखीत असेल ) तर घरच्या घरी लाईफ सपोर्ट सिस्टीम तयार होईल. सलाईन लावणे डॉक्टर करू शकतात. तसेच त्यांनी औषधे पाठवली तर वेळेवर ती घेतली तरी त्याचा उपयोग होईल. जोपर्यंत बेड मिळत नाही तोपर्यंत असे केल्याने रूग्णाला आधार मिळेल.

सध्या इतकेच.

रा भु
एक जागरुक नागरिकाच्या नात्याने तुम्ही लिहिलेला प्रतिसाद आवडला.
सूचना चांगल्या आहेत. त्यांवर साधकबाधक चर्चा करता येईल.
चर्चेत स्वागत आहेच !

भरत,
अमेरिकन लसी आणणं अवघड आहे. एकतर किंमत खूप आहे. आणि स्टोरेज कोल्ड चेन चा मुद्दा आहे. ठराविक तापमान लागतं.
त्यामुळे लसी फक्त श्रीमंत लोकांना परवडतील.

नुकतीच मला महाराष्ट्र कोविड विशेष वैद्यक कृती दलाची रूग्णांसाठीची 23 मार्च 2021 ची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे मिळाली. त्यातील सर्वांना उपयुक्त असा निवडक भाग इथे टप्प्याटप्प्याने देईन.
पहिला तक्ता याप्रमाणे :

covid task force.jpg

उपयोगी आहे ही माहिती.
महाराष्ट्र टाईम्सने सलीकरण केंद्र, बेडसाठी फोन क्रमांक, कोविड टेस्टची केंद्र, औषधांचा तुटवडा असल्यास फोन क्रमांक अशा उपयुक्त माहितीची एक खिशात बाळगता येईल अशी पुस्तिका ऑनलाईन दिलेली आहे. मला ती ईमेल मधे आल्याने लिंक देता येत नाही.
या लिंकवर जाऊन पाहता येईल
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-times-has...

गर्भवती स्त्रियांसाठी काही विशेष मार्गदर्शन सूचना आहेत का? समजा काळजी घेऊनही कोविड झालाच तर काय करावे?
(खूप random आणि vague प्रश्न आहे पण मनात आला म्हणून विचारते आहे )
Dr कुमार, blaackcat आणि सातत्याने चांगले मुद्दे चर्चेसाठी आणणाऱ्या सर्वांचे आभार _/\_

Pages