मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Les Miserables (बेसिक अर्थ होतो गरीब लोक ) बाय व्हिक्टर ह्यूगो . हे गरिबी पैश्याची आहे, धार्मिक नियमांची आहे .
फारच सुंदर पुस्तक आहे. सगळे कॅरेक्टर्स जिवंत केले आहेत. Fantine , Cosette , Jean Valjean .
फ्रेंच राज्यक्रांती, त्यावेळेस चे जीवन 1800 , पॅरिस चे रस्ते, पॅरिसचे sewer हे सगळे आहे या पुस्तकामध्ये.

जाई, घाचर घोचर वाचलं. इकडे इंग्रजी मधलं मिळालं त्यामुळे तेच वाचलं. एकदम छोटंस आहे. आवडलं. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यावाद!

लिमिटेड सिरीज किंवा चित्रपट बनेल अशी तुकड्या तुकड्यात आणि डोळ्यासमोर सहज उभी राहिल अशी कथा आहे. सगळीच पात्रं ग्रे शेड्स मध्ये असल्याने कोरिलेट होत रहातात. चित्रातले काहीच स्ट्रोक मारुन डिटेलिंग न करताही इतकं उत्कृष्ट डिटेलिंग आपल्या मनातच तयार होतं, ते फार आवडलं. कॉफी हाऊस कसं दिसत असेल, जुनं घर त्यातील चार खोल्या, नव्या घरातील रागरंग, ठेंगणा अंगापिंडाने भरलेला करारी चेहेर्‍याचा चिकप्पा असेल असं मनातच तयार होतं.

Find Your Unicorn Space: Reclaim Your Creative Life in a Too-Busy World
पुस्तक वाचायला घेतले आहे. सुरुवात तर मस्त आहे एकदम. की तुमचा नवनवोन्मेष/निर्मितीप्रवण वेळ स्वतःकरता काढा जिला लेखिका नाव देते 'युनिकॉर्न स्पेस'.

पहीलेच उदाहरण एका मुलीचे जिला २ लहान मुले आहेत, जिने नवर्‍याची आजारपणात, ७ वर्षे सेवा केल्यानंतर शेवटी त्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झालेला आहे.
जेसिकाला हे भान नाही आहे की आपल्या बौद्धिक, मानसिक आरोग्याकरता आपल्याला निर्मितीप्रवण वेळ स्वतःकरता काढावा लागतो.
-----------
या इथपर्यंत वाचून झाले, शब्द आणि वाक्यरचनांनी, पुस्तकाच्या मांडणीने भुरळ घातली वगैरे, पण मग लेखिकेचा सूर लागला - तुमच्या पार्टनरला तुमच्या हक्काची जाणिव करुन द्या की घरातील काम दोघांनी मिळून करायचे, अर्धे तू-अर्धे मी. यामुळे तुम्हाला स्वतःकरता वेळ मिळू शकतो.

इथे आला मुद्दा कन्फ्रन्टेशनचा, स्वतःच्या हक्काकरता लढणार्‍या 'मेरी झाशी नही दूंगी' म्हणु शकणार्या सबलांचा. इथे मला तरी ढेपळायला झाले. आपल्या युनिकॉर्न स्पेसकरता लढावं वगैरे लागणार असेल तर ती स्पेस 'परीकथेतच' असो बापडी!! आपल्याला जमणार नाय!!
----------------------------
पण काही उत्तम मुद्दे वेचता यावेत. त्यामुळे चिकाटीने पुढे वाचणे सुरु ठेवलेले आहे. पुस्तकामधुन डोंगर पोखरुन काहीपॉइन्टर्स काही सकारात्मक निघाले तरी पावले.
-------------------------
Give yourself permission to edit and sometimes completely rewrite your story at any age, stage or page of your life
मस्त वाक्य आहे.
What makes you feel the most like you?
----------------------------
'Let go of your shoulds' - मला माझी युनिकॉर्न स्पेस क्लेम करता येणार नाही कारण मला ग्रोसरी केलीच पाहीजे, मलाच तिन्ही ठाव जेवणाचे पहायचे आहे, मलाच घरचा जमाखर्च सांभाळणे भाग आहे- मलाच ..... डॉट डॉट डॉट .....
यामुळे तुम्ही सतत निर्मितीक्षमतेस वळसा घालून पुढे जाता, स्वतःच्या आकांक्षांना मुरड घालता. हे थांबविणे, गिल्ट्फ्री अर्थात स्वतःला करकचुन जबाबदार्‍यांच्या जोखडाला बांधून घेणे थांबवले पाहीजे.

थँक यु मिस्टर ग्लाड वाचले आहे का कोणी.

अनिल बर्वे लेखक आहेत. फार पूर्वी वाचले होते, अक्षरधारा वरून पुस्तक मिळाले म्हणून परत वाचले. फारच सुंदर प्रेसेंटेशन आहे.

त्रिपती, सुरेख आहे पुस्तक! डॉ. अनिल बर्वे यांची डोंगर म्हातारा झाला आणि अकराशे कोटी गॅलन पाणी देखील छान आहेत. डोंगर म्हातारा झाला माझं सगळ्यात आवडतं आहे.

रॉ - भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा - रवि आमले
हे पुस्तक वाचायला घेतलंय. मराठीत या विषयावरचं हे एकमेव किंवा पहिलं पुस्तक असावं.

The Messenger (Shiv Malik)

There are more than two sides to every story - हे या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. आणि अगदी पहिल्या पानापासूनच आपण ही तिसरी बाजू काय असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात करतो.

७ जुलै २००५ यादिवशी लंडनमध्ये चार ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. लंडन पोलीस, इंग्लंडमधली प्रमुख वृत्तपत्रं, न्यूज चॅनल्स या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याच्या मागे होते. या हल्ल्यामागे ब्रिटिश जिहादी नेटवर्कचा (BJN) हात होता, हे स्पष्ट झालं होतं.
शिव मलिक हा इंग्लंडमधला शोधपत्रकार सुरुवातीला मँचेस्टरमध्ये एका दुय्यम असाइनमेंटसाठी या नेटवर्कमधल्या एका सदस्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला. त्याचं नाव - हसन बट्ट. हसन बट्ट इंग्लंडमधल्या वृत्तमाध्यमांमध्ये बर्‍यापैकी माहित असलेला चेहरा होता. BJN तर्फे माध्यमांना मुलाखती देणे, पत्रकारपरिषदेत बोलणे या गोष्टी तो करायचा. त्याचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं.

हसन बट्टशी बोलताना शिव मलिकच्या लक्षात आलं, की तो BJN चा केवळ ‘चमको प्रवक्ता’ नव्हता. त्याची स्वतःची काही तत्वं होती, धर्माचारण म्हणजे नेमकं काय याबद्दल त्याची मतं स्पष्ट होती, आणि तरीही तो विवेकी विचार करणारा होता. तो अगदी कोवळ्या वयात BJN मध्ये सामिल झाला होता. आणि आता १०-१५ वर्षांनी BJN आपल्या उद्दीष्टांपासून दूर होत चाललंय, असं त्याला वाटायला लागलं होतं.

यामुळे शिव मलिकला हसनच्या स्टोरीत रस वाटायला लागला. हसन BJN पासून दूर होत चालला होता आणि त्याला आपले अनुभव शब्दबद्ध करण्याची इच्छा होती. हे कळताच शिव मलिकनं त्याला त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यातल्या भेटीगाठी, गप्पा, फोनकॉल्स वाढायला लागले.

या पुस्तकाचा पहिला दोन तृतियांश भाग म्हणजे हसनची कहाणी काय होती, ती त्यानं शिव मलिकला कशी सांगितली, त्यातून शिव मलिकनं between the lines कोणती निरिक्षणं नोंदवली, याचं सविस्तर वर्णन आहे. आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. परक्या भूमीवर कोणतंही जिहादी नेटवर्क कसं काम करतं, तरुण मुलं त्यात का आणि कशी ओढली जातात, त्यांच्या बारीकसारीक अनुभवांचे-भेदभावांचे ताणेबाणे कोणते असतात, देशा-परदेशात अतिरेकी हल्ला होतो, तेव्हा त्याची पूर्वतयारी कशी होते, सहभागी सदस्यांना कसं आणि कोणतं प्रशिक्षण दिलं जातं (सिनेमात दाखवतात तसं नुसतं सैनिकी पोषाखात हातात बंदूक घेऊन ओरडत पळण्याचा सराव नव्हे) हे सगळं वर्णन बर्‍यापैकी हेलपाटून टाकणारं आहे. ते झपाट्यानं वाचलं गेलं.

पुस्तकाचा उरलेला एक तृतियांश भाग म्हणजे शिव आणि हसनच्या ‘कहानी में, दोस्ती में ट्विस्ट’ आहे. (आणि तो काल्पनिक नाही, खराखुरा घडलेला आहे.) तो ट्विस्ट इथे सांगणे म्हणजे एका परिनं या पुस्तकाचा spoiler ठरेल.
पुस्तकाच्या उपशीर्षकातली तिसरी बाजू इथे समोर येते.
या भागातलं निवेदन मला जरा लांबल्यासारखं वाटलं. पण त्यामागची शिव मलिकची तळमळ खरी वाटते. त्या ट्विस्टमुळे काय खरं, काय खोटं, कोण कुणाच्या हातातलं बाहुलं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही, असे real life प्रश्न पडतात.
मतपरिवर्तनाच्या वाटेवरचा एक तरुण जिहादी आणि त्याच्याच वयोगटातला एक स्थलांतरित पार्श्वभूमीचा तरुण पत्रकार, दोघांच्याही करिअरचे, आयुष्याचे graphs पणाला लागण्याची ही गोष्ट आहे.
काही वेगळं contemporary वाचायला आवडत असल्यास चुकवू नये असं पुस्तक.

(दोन-एक वर्षांपूर्वी लोकसत्ता-बुकमार्क पुरवणीत या पुस्तकाबद्दल वाचलं होतं, तेव्हाच ते विश-लिस्टला टाकून ठेवलं होतं. गेल्या वर्षी कधीतरी किंडल डील्समध्ये अगदी स्वस्तात मिळालं.)

संवादु अनुवादु (उमा कुलकर्णी)

अनुवादाचा प्रवास मांडायला हवा, या भालचंद्र नेमाडेंच्या सूचनेवरून उमा कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहायला घेतल्याचं म्हटलं आहे.
पुस्तकात केवळ अनुवादाचा प्रवासच नव्हे, तर त्यांचा आजवरचा जीवनप्रवासच येतो. त्यामुळे पुस्तक चांगलं घसघशीत आहे.
पुस्तकाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर हे त्यांच्या भोवतीच्या गोतावळ्याचं वर्णन आहे. गोतावळा- माणसांचा आणि पुस्तकांचाही.
बेळगावातलं बालपण, तेव्हाचं घरचं वातावरण, लहानपणीचे सवंगडी, शेजारपाजारी, नातेवाईक, घरातले कुळाचार, लग्नानंतरचे सासरचे नातेवाईक, सासरमाहेरच्या नातेवाईकांचे निवेदनाच्या ओघात येणारे स्वभावविशेष, हे सगळं वाचताना आपल्या शेजारच्या घरातलं एखादं कुटुंब रोज येताजाता दिसत राहतं, तसं वाटतं.

पुस्तकाचा मुख्य भाग उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांचं सहजीवन आणि त्यांतला कानडी-मराठी पुस्तकांचा सहभाग यावर आधारित आहे. दोघांच्या वाचनाच्या सवयी, उमा कुलकर्णी यांची कानडी समजून घेण्याची धडपड, त्यातून अनुवादाच्या कामात त्यांचं सहजगत्या शिरणं, हे अगदी गप्पांच्या ओघात सांगावं तसं त्यांनी लिहिलं आहे. त्या कामाच्या निमित्ताने कारंथ, भैरप्पा यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला, याबद्दल माहिती होतंच.
मला नव्याने समजलं, ते कुलकर्णी पतीपत्नी, अनिल अवचट आणि कमल देसाई यांच्यातल्या मैत्रीबद्दल. या चौकडीचे प्रसंग त्यांनी खूप छान लिहिले आहेत.
पुण्यातलं त्यांचं मॉडेल कॉलनीतलं घर, तिथे त्यांच्या मित्रमंडळींचा असणारा राबता, घराच्या रिडेवलपमेंटची प्रोसेस, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सतत सुरू असलेलं अनुवादाचं काम... त्याबद्दल लिहिताना अधूनमधून अगदी सहज त्या त्यांची अनुवादाची प्रोसेस सांगतात. सगळ्या गोतावळ्यात अनुवादाबद्दलचं त्यांचं म्हणणं वाचकाला ठिकठिकाणी अचानक सापडावं तसं समोर येतं.

अगदी प्रांजळ, घरगुती गप्पांसारखं पुस्तक आहे. जरा पसरट आहे. काही ठिकाणी विस्कळीतही झालं आहे. संपादनाचा आणखी थोडा हात फिरवला जायला हवा होता, असं वाटलं.

मस्तच ललिता-प्रीति!
उमा कुलकर्णींचा एका दिवाळी अंकात आलेला लेख मला फारसा आवडला नव्हता. हे पुस्तक वाचायला पाहिजे. त्यांनी केलेले अनुवाद मला आवडतात.

मस्त ओळख ललिता. कारंथचं कारंत कराल का प्लीज ? त्यांचं आडनाव कारंत आहे. बरेच कानडी/ कर्नाटकातील इतर लोक त इंग्रजीतून लिहिताना th करतात. त्यांच्या सवयीप्रमाणे नुसते t लिहिले तर ते ट उच्चारतात. अनेक कामतांचे कानडी /इंग्रजी/ मराठी अशा प्रवासात कामथ झाले ते अशा ट्रांसलिटरेशनच्या धक्क्यांनीच .

<<थँक यु मिस्टर ग्लाड वाचले आहे का कोणी.>> शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात असताना हे, डोंगर म्हातारा झाला आणि अजून एक वाचले होते. मला तिसऱ्या पुस्तकाचे नाव चांदा आहे असे आठवत होते पण त्या नावाने शोधल्यास तसे कुठलेही पुस्तक सापडले नाही. घोड्यावर आहे ते, चांदा नावाचा घोडा असतो.

सगळीच पुस्तके खूप छान आहेत, आवर्जून वाचण्यासारखी.

थँक यु मिस्टर ग्लाड वाचले आहे का कोणी...... शाळकरी / कॉलेजमध्ये वाचले आहे.छान आहे.कच्छच्या रणाची पार्श्वभूमी असलेले एक पुस्तक आहे.नाव आठवत नाही.तेही सुरेख होते.

उमा kulkrninche अनुवाद सुरेख असतात.

>>मला तिसऱ्या पुस्तकाचे नाव चांदा आहे असे आठवत होते पण त्या नावाने शोधल्यास तसे कुठलेही पुस्तक सापडले नाही. घोड्यावर आहे ते, चांदा नावाचा घोडा असतो.>> स्टडफार्म ! ती दीर्घ कथा पहिल्यांदा दिवाळी अंकात वाचल्याचे आठवतेय. मी तेव्हा हायस्कूलात होते. नंतर पुस्तकात आली. त्यांचे अकरा कोटी गॅलन पाणी आणि स्टडफार्म असे एकत्र आहेत बहूतेक.

गोल्डा : एक अशांत वादळ (वीणा गवाणकर)

गोल्डा मेयर यांच्या आत्मचरित्रावर बेतलेलं पुस्तक (वाटलं मला, कारण अधेमध्ये आत्मचरित्राचे उल्लेख आहेत.)

हे पुस्तकही चरित्रात्मकच आहे.
वाचताना पहिली प्रतिक्रिया होते ती म्हणजे काय जबरदस्त कणखर, करारी, कर्तृत्ववान बाई होती ही!

त्यांचं बालपण अमेरिकेत गेलं, ही माहिती मला नवीन होती. बालपण, तरुण वयातली जडणघडण, इस्रायलच्या निर्मितीपूर्वीपासूनची ज्यूंसाठीची त्यांची धडपड, तळागाळातल्या माणसांचा विचार, त्यांच्याशी मनाने कायम जोडलेलं असणे, पुढे इस्रायलमधलं राजकारण, त्यात अनुभवाने आणि कर्तृत्वाने निर्माण झालेला दरारा, कामगार मंत्री, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधानपद, अरब राष्ट्रांसोबतचे सततचे खटके, युद्धं, कॉफी आणि सिगारेट्सच्या अखंड व्यसनामुळे आलेली आजारपणं, निवृत्ती, मृत्यू... असा दीर्घ, वाचतानाही दमवणारा प्रवास आहे.

त्यांची स्टोरीच मुळात इतकी इव्हेन्टफुल असल्यामुळे पुस्तक कंटाळवाणं झालं नाही हे खरं, तरी ते आणखी चांगलं करता आलं असतं, असं वाटलं.

आणखी एक, म्हणजे किंडल आवृत्तीत प्रचंड typos आहेत Uhoh त्यामुळे फार विरस झाला. त्यापायी मध्ये काही दिवस पुस्तक अर्धवट वाचून बाजूला पडलं होतं. पण शेवटी नेटानं पूर्ण केलं.

धन्यवाद स्वाती२ .
मला ते पुस्तकात वाचल्याचे आठवते आणि अकरा कोटी गॅलन पाणी वाचल्याचे आठवत नाही. माझा काही गोंधळ झाला असण्याचीही शक्यता आहे. परत एकदा ही पुस्तके वाचण्याचा विचार आहे.

१. अकरा कोटी गॅलन पाणी आणि स्टडफार्म असे एकत्र आहेत >>> +१११११
लेखक अनिल बर्वे.
छान पुस्तक. अकरा कोटी गॅलन पाणी चासनाला खाण अपघातावर बेतलेले.

२. थँक यु मिस्टर ग्लाड
>> हे पण लेखक अनिल बर्वे.

३. डोंगर म्हातारा झाला>>
कमराद म्हाताऱ्याची भूमिका कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्यावर बेतलेली.

'गोदान' - मुन्शी प्रेमचंद

हिंदी भाषेतली ही एक 'क्लासिक' कादंबरी मी स्टोरीटेलवर ऐकली. चौदा तासांचं हे अभिवाचन शाश्विता शर्मा या अभिनेत्रीने अतिशय सुंदर प्रकारे केलं आहे.

१९३६ साली प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीचा मुख्य विषय भारतातल्या गरीब शेतकऱ्यांचं कष्टमय आयुष्य हा असला तरी शहरी, उच्चभ्रू वर्गाच्या आयुष्याचंही चित्रण या कादंबरीत आहे. या दोन टोकांच्या मध्ये असलेले गावातले सावकार, पुरोहित असा एक वर्गही आहे.

लखनौ शहर आणि त्याजवळच्या परिसरातलं हे चित्रण आहे.

होरी नावाचा एक गरीब शेतकरी, त्याची बायको धनिया, मुलगा गोबर (गोबर्धन) मुली सोना आणि रूपा, होरीचे दोन भाऊ शोभा आणि हीरा आणि त्यांची कुटुंबं, त्याचबरोबर गावातली अशी अनेक पिचलेली कुटुंबं ही पिळवणुकीच्या व्यवस्थेतली सर्वात खालची पायरी. दातादीन, नोखेराम असे सावकार आणि वसुली अधिकारी अशी मधली पायरी आणि रायसाहब हे जमीनदार, त्यांच्याबरोबर ऊठबस असणारे लखनौमधले उच्चभ्रू लोक ही सर्वात वरची पातळी.

कष्ट करून शेतात पीक पिकवूनही उपाशी दिवस काढायची वेळ शेतकऱ्यांवर येते, एक गाय विकत घेणं हे एखाद्या शेतकऱ्यासाठी आयुष्यभराचं अपूर्ण स्वप्न असतं. त्याला वेळप्रसंगी लागणाऱ्या खर्चासाठी पैसे उसने देऊन, त्यावर अव्वाच्या सवा व्याज आकारणारे सावकार दुष्टपणाच करत असतात, पण त्यांच्याही वर जमीनदार असतात, सरकारी अधिकारी असतात, ज्यांना या कमाईतला वाटा मिळत असतो.

ह्या उच्चवर्गाचेही स्वतःचे वेगळे प्रश्न आहेतच. पिढ्यानपिढ्या चालत आलेला डामडौल पुढे चालू ठेवावा लागतो, प्रतिष्ठा सांभाळावी लागते, पैसा मिळतो तसा खर्चही करावा लागतो. रायसाहब, डॉ. मेहता हे लेखक, इंग्लंडमध्ये शिकून डॉक्टर झालेली मालती, बँकर असलेले खन्ना, त्यांची पत्नी कामिनी, एका वर्तमानपत्राचे संपादक अशी या 'इंडिया' मधली पात्रं आहेत! त्यांचं आयुष्य वेगळं, त्यांचे प्रश्न वेगळे. तेही प्रश्न खरेच आहेत. त्या प्रश्नांच्या निमित्ताने लेखकाने वेळोवेळी तात्विक चर्चा घडवून आणली आहे.
धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असं सरसकटीकरण या कादंबरीत नाही. शेवटी सगळी माणसंच आहेत, गुणदोष सगळ्यांमध्ये आहेत. परिस्थिती माणसाला चांगलं किंवा वाईट वागायला भाग पाडत असते, अशा प्रकारे माणसांच्या बऱ्यावाईट वागणुकीचं चित्रण लेखकाने केलं आहे.

मालती आणि मेहता यांची प्रेमकहाणी मात्र आदर्शवादी वाटते, वास्तववादी नाही. 'रथचक्र' च्या प्रस्तावनेत श्री. ना. पेंडसे यांनी स्वतःच्याच एका अप्रकाशित कादंबरीबद्दल चेष्टेने लिहिलं आहे. त्यातले 'आपल्या या प्राचीन मातृभूमीतील दलितांचा आणि पतितांचा उद्धार कसा होईल याची विवंचना करणारे नायक-नायिका' मला इथे आठवले. मालती आणि मेहतांचा कळवळा खराच आहे, पण त्यांचं 'प्लेटॉनिक लव्ह' पटण्यासारखं वाटत नाही. Happy

शाश्विता शर्माचं अभिवाचन अत्यंत उत्कृष्ट आहे! भरपूर संख्येने असलेल्या पात्रांसाठी तिने आवाजात आणि बोलण्याच्या ढबीत विलक्षण विविधता आणली आहे. आवाजातले प्रसंगानुरूप चढउतार, स्पष्ट शब्दोच्चार, अत्यंत प्रभावी वाचिक अभिनय यामुळे हे अभिवाचन अप्रतिम झालं आहे.

हिंदी कादंबरी वाचण्याचा मी यापूर्वी कधी विचार केलाच नव्हता. ऑडिओबुक असल्यामुळेच ही अभिजात कादंबरी ऐकून झाली. आता अजूनही हिंदी कादंबऱ्या ऐकायला/वाचायला आवडतील असं वाटतंय.

'मास्तरांची सावली' (कृष्णाबाई नारायण सुर्वे)

प्रांजळ, प्रामाणिक आत्मकथन. साधीसुधी, गप्पा मारल्यासारखी भाषा.
सुर्वे दांपत्याचं बालपण, तरुणपणीचा काळ केवढा ओढगस्तीचा होता! मधला काही काळ तर अक्षरशः अन्नान्न दशा होती. ते वाचताना अंगावर काटा येतो.
नारायण सुर्वे शाळाशिक्षक होते, तर कृष्णाबाई एका शाळेत शिपाई होत्या. त्यांना चार मुलं झाली. प्रत्येकाची काही ना काही शोकांतिका झाली. अशातही आनंदी, खेळकर स्वभाव टिकवून ठेवणे, काव्यलेखन, आलागेला-पै पाहुणा, सगळं करणे, याची कमाल वाटते.
त्याकाळची मुंबई पुस्तकात ठिकठिकाणी येते. ती चित्रं मनात उभी करायला मजा आली.

कृष्णाबाईंनी पूर्णपणे स्वत:च्या नजरेतून, स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिलंय. नारायण सुर्वेंच्या कवि म्हणून कारकीर्दीतल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल पुस्तकात केवळ उल्लेख येतात, ते मला आवडलं.
लहानपणापासून कृष्णाबाईंचा स्वभाव विचारी, खमका होता. त्यांच्याजवळ भक्कम आत्मविश्वास होता. मात्र लग्नानंतर त्या नोकरी करत असल्या तरी इतर घराबाहेरची कामं, पैशांचे व्यवहार त्यांनी कधीच केले नाहीत; सुर्व्यांच्या कोणत्याही सत्काराला, सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत; हे वाचून आश्चर्य वाटलं.

नवनव्या आवृत्यांच्या वेळी मजकुरात भर घातली गेली आहे. एका टप्प्यापर्यंत ते अपडेट्स चांगले वाटतात. मात्र शेवटी शेवटी गृहकलहाशिवाय काहीच उरत नाही. पण अर्थात हे आत्मकथन असल्याने त्यांचा दृष्टीकोन आणि प्रस्तावनेत नोंदवलेला पुस्तकाचा उद्देश (मनातलं सगळं बोलून टाकायचं आहे) पाहता ते साहजिक म्हणावं लागेल.

वावे - गोदानचे वर्णन आवडले. त्याबद्दल अनेकदा ऐकले आहे. पण फारशी माहिती नाही. प्रेमचंद यांच्या कथांमधले काही भाग शालेय पुस्तकात असत.

नारायण सुर्व्यांच्या शालेय पुस्तकाबाहेरच्या कविता वाचलेल्या नाहीत. त्यामुळे फारशी माहिती नाही.

नारायण सुर्व्यांच्या शालेय पुस्तकाबाहेरच्या कविता वाचलेल्या नाहीत. त्यामुळे फारशी माहिती नाही.
>>>
मी सुद्धा. (मी मुळातच कवितांपासून चार हात कायम लांब असते.) पण त्यामुळे पुस्तक वाचताना कोणतीही अडचण येत नाही.
हे पुस्तक नारायण सुर्व्यांवरचं नाही. पुस्तकात त्यांचं अस्तित्व सगळीकडे आहे, पण पुस्तक कृष्णाबाईंचं आहे.

Pages