मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'कोसला'चे टण्याने वर दिलेले युट्युबवरचे वाचन मला कंटाळवाणे वाटले. पुस्तक काढून ते वाचावे असे वाटले. पुल, व्यं. माडगूळकर, रामनगरी इ. लेखकांच्याच आवाजातली प्रसिद्ध कथनं वगळता मी अजून एकही पुस्तक 'ऐकलेले' नाही. कोसला ऐकायचा पुन्हा प्रयत्न करीन, कदाचित थोडी सवय झाल्यावर पुढचे आवडेल.

सध्या अरुण खोपकरांचे 'कालकल्लोळ' वाचतोय.
यात अरुण कोलटकर, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, दिलीप पाडगावकर, आर के लक्ष्मण इत्यादींची शब्दचित्रे आहेत.
तसेच 'ये बॉम्बे है मेरे भाय' हा दीर्घलेख म्हणजे साठ-सत्तरच्या दशकातील मुंबईचं अप्रतिम स्मृतिचित्र आहे.
हे सगळं वाचताना खोपकरांच्या जाणिवांची समृद्ध रेंज बघूनच अवाक् व्हायला होतं... चित्रपट, साहित्य,नाटक, संगीत, पेंटींग्ज, सिव्हिल इंजिनिअरिंग,आर्कीटेक्चर अशा विविध विषयांवरचं अत्यंत कसदार तरल लिखाण. लयलूट. मेजवानीच.
खोपकरांची शैली, पोक्त भाषा, त्यातला सच्चा सूर आणि हे सगळं पोहचवण्याची पद्धत कमालीची साधी सरळ असल्यामुळेच हे सगळं उच्च दर्जाचं झालं आहे, असं वाटतं. आपल्याला तर आवडला बुवा हा माणूस .!

अवांतरः
पुण्यात बाजीराव रोडवर अत्रे सभागृहात पुस्तक प्रदर्शन सध्या सुरू आहे. नव्याने बरीच पुस्तके प्रकाशित झालेली दिसत आहेत. डिस्काउंटही चांगला आहे.
अनुवादित मध्ये मार्केझच्या लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा चा अनुवाद, तसेच दुर्गा भागवतांनी केलेला थोरोच्या वॉल्डेन अनुवाद, शिवाय रुथ ओझोकीच्या अ टेल फॉर द टाइम बीईंग चा अनुवाद.. किरण नगरकरांच्या बेडटाईम स्टोरी चा अनुवाद
शिवाय जीएंच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह असलेल्या 'सोनपावले'ची नवीन आवृत्ती आलीय... हे एक बरीच वर्षे आऊट ऑफ प्रिंट होते, ते मिळाले.

A little life अगदी वाचवत नाहीये. एका मागून एक हादरवून टाकणारे दुःखद प्रसंग तसेच तितकेच वाईट फ्लॅशबॅक.

गांधी बिफोर इंडिया मात्र मस्त चाललेय.

शिवाय जीएंच्या अप्रकाशित साहित्याचा संग्रह असलेल्या 'सोनपावले'ची नवीन आवृत्ती आलीय... हे एक बरीच वर्षे आऊट ऑफ प्रिंट होते, ते मिळाले.
>>>
कशाला घेतलेत ते? उगीच नाही जीएंनी त्या कथा अप्रकाशित ठेवल्या होत्या.

@गजानन; स्टोरीटेलवर गिरिश कुलकर्णीच्या आवाजातले कोसला उपलब्ध आहे. मी ऐकलेले नाही, वडिल म्हणाले की चांगले वाचन केले आहे

कशाला घेतलेत ते? उगीच नाही जीएंनी त्या कथा अप्रकाशित ठेवल्या होत्या.>>
का हो? जमल्या नाहीत काय या कथा?? Lol
जीएंचे नाव बघून घेतले..! तुम्ही वाचलेत का ते? मी अजून सुरूवात नाही केली. दोन-तीन पेंडींग आहेत आधीची.

मंगला गोडबोल्यांनी लिहिलेलं 'पुलं' हे पुलंचं चरित्र वाचलं. पुलंनी लिहिलेलं, पुलंवर इतरांनी लिहिलेलं भरपूर वाचलेलं असूनही हे मंगला गोडबोले यांनी लिहिलंय, याच कारणामुळे विकत घेतलं. त्यांची प्रसन्न शैली आणि मोकळा दृष्टिकोन आवडतो म्हणून.
दुसरं म्हणजे प्रास्ताविकात त्यांनीच लिहिल्याप्रमाणे 'सांस्कृतिक इतिहासाची नोंद' व्हावी म्हणूनही त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. हे कारण मला आवडलं.
पुलंची पुस्तकं मी वाचायला लागले, तेव्हा पुलं सार्वजनिक आयुष्यात फारसे सक्रिय राहिलेले नव्हते. माझ्यासारख्या अनेकांना पुलं ऐन भरात असतानाच्या काळाची संपूर्णपणे कल्पना तशी येणारही नाही. शिवाय, पुलंसारख्यांचं अस्तित्व हाच त्या काळाला सांस्कृतिकदृष्टीने डिफाईन करणारा एक घटक होताच. जितक्या वस्तुनिष्ठपणे पुलंसारख्यांचं चरित्र नोंदवलं जाईल, त्या प्रमाणात तो काळही नोंदवला जाईल.

पुस्तक छानच आहे. विविध क्षेत्रांमध्ये पुलंनी गाजवलेल्या कर्तृत्वाचा यथोचित आढावा घेतलेला आहे. त्यापैकी अनेक गोष्टी माहिती असल्या, तरी त्या सगळ्या कालानुक्रमे नीट माहिती होत्या असं नाही.
नाटकांत, चित्रपटात कामं करणारे उमेदवारीच्या काळातले पुलं, 'बटाट्याची चाळ', 'असा मी असामी' सारखे प्रयोग धो धो चालत असतानाचा काळ, तेव्हाचे पुलं, त्यानंतरच्या काळातले, 'एक शून्य मी' सारखे लेख लिहिणारे, आणीबाणीला विरोध करणारे पुलं, नंतर मर्ढेकर, आरती प्रभू, बोरकरांच्या कविता सुनीताबाईंबरोबर वाचणारे पुलं ही पुलंची वेगवेगळ्या काळातली रूपं आहेत. वयानुसार, काळानुसार पुलंच्या लेखनात आणि एकंदरीत व्यक्तिमत्त्वात पडत गेलेला फरक पुस्तकात बघायला मिळाला.

एकूण पुस्तक आवडलं!

एकूण पुस्तक आवडलं! >> हो मी ते कव्हर टू कव्हर वाचलेले नाही. पण मधेच उघडून काही भाग वाचला असे अनेकदा केले आहे आणि आवडले.

गेल्या काही वर्षांत एक जाणवते - ते म्हणजे पुलं वाचणार्‍यांपेक्षा ऐकणारे व बघणारे जास्त झालेत. त्यांच्या कथाकथनाच्या सीडीज, आता उपलब्ध असलेल्या क्लिप्स, तसेच त्यांची काही आता व्हायरल होत असलेली विनोदी भाषणे/मुलाखती व फेबु/व्हॉअ‍ॅ वर फिरत असलेल्या किरकोळ शाब्दिक कोट्या - हेच "मटेरियल" जास्त सहज उपलब्ध आहे लोकांकरता. पुस्तके आहेतच पण ती आवर्जून घेउन वाचणार्‍यांपेक्षा मोबाईल मधून हे सहज मिळणारे पुलं हेच ते पुलं अशी समजून बहुतेकांची होत असावी. त्यातून मग "काय भारी कोटी आहे" पासून ते "काय इतक्या फालतू कोट्या! अगदी ओव्हररेटेड लेखक आहे" अशा प्रतिक्रिया बघायला मिळतात.

पण खरे पुलं हे या सर्वापेक्षा बरेच काही आहेत. खरे म्हणजे मला त्यांच्या शाब्दिक कोट्या हा त्यांचा फार भारी विनोद वाटत नाही. "एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे याला वीट येणे का म्हणतात हे मला तेव्हा कळाले" टाइप कॉमेण्ट्सना पब्लिक इतके का हसते याचे मला आश्चर्य वाटते. म्हणजे बोलण्याच्या ओघात अशा कोट्या करणे हे धमाल आहे (माणिक वर्मांबद्दल काहीतरी विचारल्यावर "नका हो त्यांच्या वर्मावर बोट ठेवू", किंवा लग्नाआधी आणि नंतर एकच आडनाव असलेल्या मुलीने "घराण्याचे नाव राखले" ई). पण पुलंचा खरा विनोद हा त्याच्यापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचा आहे. त्यांच्या समकालीन सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय घटना जितक्या माहीत असतील, व एकूणच संगीत, नाटके, चित्रपट, क्रिकेट, राजकारण पासून ते संतांचे अभंग, कहाण्या, धार्मिक कथा यांचे संदर्भ जितके जास्त माहीत असतील तितके त्यांचे विनोद जास्त चांगले समजतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळेच पुन्हा काही वर्षांनंतर तेच पुस्तक वाचले तरी काही वाक्ये नव्याने कळतात.

कोठेतरी सगुणा या मुलीचा उल्लेख करून कंसात "पुढे दुधाची वाटी आणणारी सगुणा ती हीच" हे लिहीणे, किंवा चिमा हे नाव वापरल्यावर पुढे ती एकटीच राहिल्यावर "एकटीच चिमा काय कामाची" लिहीणे, कोणा बाबाच्या संदर्भात त्यांच्याकडे कसलातरी दृष्टिक्षेप "टाकुनिया बाबा गेला" लिहीणे, कोणत्यातरी क्षेत्रातील एक्स्पर्टने यांचा एक प्रश्न विचारल्यावर "हे म्हणजे तल्यारखानने मला ही एलबीडब्ल्यूची भानगड काय आहे विचारण्यासारखे झाले" ही कॉमेण्ट - ते ते संदर्भ, त्या व्यक्ती माहीत असतील तर जास्त अ‍ॅप्रिशिएट होतात.

तसेच कधीकधी सहजपणे लिहीलेली व त्यामुळेच अनेकदा आधी वाचताना निसटलेली वाक्ये नंतर भेटतात - "त्या काळात आम्ही मॅट्रिकला बसत होतो" सारखी. किंवा गजा खोतच्या मुलाच्या संगीत शिक्षकांचे आकस्मिक निधन झाले हे कळाल्यावर त्या आकस्मिक निधनाचे कारण माझ्यासमोर उभे होते वगैरे.

याशिवाय आवर्जून विनोदी म्हणून न लिहीलेले लेख, प्रस्तावना, भाषणे ही सुद्धा वाचण्यासारखी/ऐकण्यासारखी आहेत. त्यातही एखादा चपखल व सहजपणे आलेला विनोद धमाल असतो. लोकांची तारीफ करताना त्यांचा उमदा स्वभाव दिसतो. (तेव्हाच्या) नव्या गोष्टींबद्दल बहुतांश वेळा एकदम उमद्या पद्धतीने त्या बघून, स्वीकारून लोकांना त्यांची ओळख करून देण्याचे काम त्यांनी अनेकदा केले आहे. अशा लेखांमधे, भाषणांमधे हट्टीपणाने विनोद करण्यापेक्षा दिलखुलासपणा, खुशखुशीतपणे वर्णन करण्याची त्यांची शैली जास्त दिसून येते.

पण हे पुलं समजायला पुस्तके आवर्जून वाचायला हवीत (बाय द वे, त्या कथाकथनांपेक्षाही त्या मूळच्या पुस्तकातील लेखांत जास्त मटेरियल आहे), त्यांच्या विविध पुस्तकांतील प्रस्तावना, विविध भाषणे - जी आवर्जून विनोदी म्हणून केलेली नाहीत ती पण शोधायला हवीत. ती रूढ अर्थाने "अप्रकाशित" नाहीत पण इतक्या सहज उपलब्ध नाहीत.

गणगोत, गुण गाईन आवडी मधे हे पुलं दिसतात, व अगदी नंतर प्रकाशित झालेली मित्रहो, श्रोतेहो सारखी पुस्तके यात त्यातील काही लेख आहेत.

वावे - तुझा तो पुलंवरचा लेख अजून वाचायचा आहे. ते आत्ता आठवले. वाचतो.

पाचपाटील, छान सुचवणी! नावं नोंदवून ठेवली आहेत.
वावे, धन्यवाद! नोंद केली आहे.
फा, अगदी अगदी! पु. लंची पुस्तकं वाचली जात नाहीत हे अगदी खरं आहे. केवळ अभिवाचनं ऐकून पु. लं. आवडते "लेखक" आहेत हे म्हणणारे बरेच जण सापडतील! पु. लंचे विनोद वेळ जातो तसे अधिक appreciate होतात.
मला आजही त्यांच्या पुस्तकात काही तरी नवीन सापडतेच! उदाहरणार्थ, म्हैस मध्ये सकाळच्या वेळी बसमधले लोक जेव्हा झोपेची थकबाकी वसूल करत असतात तेव्हा त्यांच्या माना होय होय नाही नाही अशा डुलत असतात या वाक्यानंतर "म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखे" ही जोडलेली पुस्ती त्या विनोदाला कुठच्या कुठे घेऊन जाते! मला वाटतं की त्यावेळी ज्या घटना घडल्या असतील त्यावर ती टिप्पणी असावी पण आजही ती तशी relevant आहे!
इतक्यात मी वंगचित्रे पुन्हा वाचत होते आणि त्यांच्या गंभीर लिखाणाने आणि सौंदर्यदृष्टीने पुन्हा एकदा भारावून गेले!
आता मी आवर्जून त्यांची नाटकं पुन्हा वाचणार आहे. ती ही फार सुरेख आहेत.

फारएण्ड , संपूर्ण पोस्टला १०१% अनुमोदन!! म्हणजे अगदी मी माझ्याच मनातलं वाचतेय असं वाटलं!
अलीकडे मला जाणवलेली पुलंची अजून एक भारी गोष्ट म्हणजे त्यांच्या संपूर्ण लेखनात, बहुधा कुठलंच कॅरॅक्टर परतपरत येत नाही. म्हणजे असा मी मध्ये असलेले चाळकरी बटाट्याची चाळमधे येत नाहीत. म्हणजे नावं वेगळी असं नाही, तर ती पात्रंच पूर्णपणे वेगवेगळी आहेत. चाळीतले पंत वेगळे आणि असामीतले धोंडोपंत वेगळे. व्यक्ती आणि वल्लीमधलंही कुठलंच पात्र व्यक्तिमत्त्वाने दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात परत भेटत नाही! असं कुठेच होत नाही, की अरे, हा लखू रिसबूडसारखा किंवा नानू सरंजामेसारखा दिसतोय. आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात त्यांचे अंश असलेले लोक भेटतात तो निराळा मुद्दा Happy

जिज्ञासा,
पु. लंचे विनोद वेळ जातो तसे अधिक appreciate होतात.
मला आजही त्यांच्या पुस्तकात काही तरी नवीन सापडतेच!>> हो, अगदी! मी बटाट्याची चाळ आत्ता खूप वर्षांनी परत वाचायला घेतलं. तेव्हा हेच जाणवलं.

नुकतंच सतीश तांबेंचं हळक्षज्ञ हे आपले महानगर मध्ये साधारण २० वर्षांपूर्वीच्या सदरातील निवडक लेखांचं संकलन वाचलं.
चित्रमय पु ल प्रकाशित झालं तेव्हा त्यांनी पु लंवर लिहिलेला श्रीपुलता हा लेख या पुस्तकात आहे. तो वाचून माझ्या भावनांना तीव्र दुखापत झाली.
त्यातले अनेक मुद्दे व्हॅलिड आहेत तरीही.
श्रीपुलता म्हणजे देवत्वाला पोहोचलेली लोकाभिमुखता. त्यांनी पुलं ना श्रेष्ठ साहित्यिक मानायला नकार दिला आहे. त्यांच्या लोकप्रियतेत सादरीकरणाचा भाग अधिक आणि त्यांना कविता , कथा, कादंबर्‍या लिहिल्या नाहीत. प्रवासवर्णन आणि व्यक्तिचित्रण हे विशुद्ध साहित्यप्रकार नव्हेत. पुस्तकांना प्रस्तावना देताना उगीचच्या उगीच स्तुतीसुमनं उधळली आहेत. कोट्या करताना वाहवत गेलेत, इ. त्यांना पुलंनी व्यक्तिशः एक सुख दिलं ते नाच रे मोरा या गाण्याने. पुलंचे चाहते / भक्त म्हणवणा र्‍यांनी त्यांचं गंभीर लेखन वाचलेलं किंवा त्याबद्दल ऐकलेलंही नसतं. पुलंबद्दल लेखात चांगलंही लिहिलं आहे.

याच पुस्तकात तांबेंनी अरुण कोलटकरांच्या एका कवितेचा रसास्वाद केला आहे. श्याम मनोहरांवर "चारित्र्याची मूठ उघडायला लावणारा कोरडाकरडा लेखक आणि आपली वाचनसंस्कृती" हा लेख लिहून वाचकांना त्यांचं लेखन वाचायचा आग्रह केला आहे.

मी कधी सायंदैनिक वाचलेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारचे लेख त्यात छापून यायचे हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. बाकी सामाजिक, राजकीय भाष्ये करणारे आणि रोजच्या जगण्यासंबंधीचे लेख संख्येने अर्थातच अधिक आहेत.
एका मित्राला त्यातला एक लेख पाठवला तर तो म्हणाला की हे फेसबुकी वाटतं. हे सगळं लिखाण फेसबुक पूर्व काळातलं आहे ; हे विशेष.

लोकप्रियता आणि श्रेष्ठ साहित्यिक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकप्रिय लेखक हा श्रेष्ठ असेलच असं नाही, पण लोकप्रिय आहे म्हणून तो श्रेष्ठ नसतो असं नाही!
पुलंचे चाहते म्हणवणाऱ्यांनी त्यांचं गंभीर लेखन वाचलेलं नसतं, विनोदही खोलात जाऊन समजून घेतलेला नसतो हे मान्य आहे, वर फारएण्डनी लिहिलंय तसं.

व्यक्तिचित्रण आणि प्रवासवर्णन हे विशुद्ध साहित्यप्रकार नाहीत आणि पुलंनी कथा-कादंबऱ्या लिहिलेल्या नाहीत हा श्रेष्ठत्वाचा क्रायटेरियाच मला पटत नाही.

पुलंच्या विनोदी लेखानातला मला सर्वात भावणारा प्रकार म्हणजे त्यात मधेच येणारी हि अशी वाक्ये

बाकी चारचौघांपुढं आपण साधे सरळ ओझ्याचे बैल आहोत हे कबूल केलं म्हणजे कसं मोकळं मोकळं वाटतं
जगांत कुणी कुणाचे नाही, सांगून ठेवतो !

ह्यातून पुल अधिक उमगत जातात असे मला वाटले.

वावे,
मंगला गोडबोले यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे? अमेझॉनवर 'चांदणे स्मरणाचे' असं आहे . तेच का? धन्यवाद.

व्यक्तिचित्रण आणि प्रवासवर्णन हे विशुद्ध साहित्यप्रकार नाहीत आणि पुलंनी कथा-कादंबऱ्या लिहिलेल्या नाहीत हा श्रेष्ठत्वाचा क्रायटेरियाच मला पटत नाही. >>> मलाही.

बाकी ते श्रेष्ठ साहित्यिक होते की नव्हते हा वाद आधीपासून आहे. त्यांची काही नाटके मूळ इंग्रजी नाटकांवर बेतलेली आहेत हे ही खरे आहे - ते बहुधा त्यांनी कधी नाकारलेले नव्हते - किंबहुना तसाच उल्लेख केलेला आहे. फुलराणी व तीन पैशाचा तमाशा बद्दल. तुझे आहे तुजपाशी बहुधा ओरिजिनल असावे, पण नक्की माहीत नाही.

मला मुख्य लिहायचे होते ते सध्याच्या काळात सोशल नेटवर्क वरून आपल्यापर्यंत पोहोचणार्‍या मटेरियल पेक्षा त्यांची प्रतिभा व त्यांचे लेखन्/सादरीकरण अजून बरेच मोठे आहे, आणि अनेक लोकांनी ते वाचलेले नाही.

९०ज च्या दशकात पिक्चर्स पाहायला लागणारे लोक हम, अग्निपथ वगैरे वरून बच्चन भारी आहे म्हणतात तसला प्रकार आहे.

काही नवे ग्रहयोगमध्ये वैषम्ययोग आहे तो अशा(पुलं देशपांडे श्रेष्ठ साहित्यिक आहेत की नाहीत हे ठरवण्याची आपली लायकी आहे असं समजणाऱ्या) लोकांना फिट बसतो.
अहो लोकप्रिय गोष्टी याना रुचतच नाहीत , आंबा न आवडणारे हे लोक आहेत- इति पुलं.
नगरपालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात कारकून , महायुद्ध थांबवण्याचा 'एकच' उपाय माहिती असणं- सेम कॅटेगरी.

या वर्षात अनवधानाने दोन महत्वाची, प्रसिद्ध पुस्तकं ऐकून झाली
अमेरिकन पास्तोराल - फिलिप रॉथ आणि ऑन द रोड - जॅक केरोआक .

शा़ळकरी वयात टॉम सॉयर, हक फिनच्या भाषांतरित गोष्टी वाचताना एकंदरीत स्टोरीलाइन कळली तरी भाषेचे बारकावे , वेगवेगळ्या पात्रांचे स्वभावविशेष हे सर्व पुढे अनेक वर्षांनी मूळ इंग्रजीतून पुस्तक वाचल्यावर जास्त भावले होते. त्याही नंतर अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर ही पुस्तके पुन्हा वाचली तेंव्हा त्यात नवीन बरंच काही सापडलं.

ही दोन पुस्तकं वाचताना मनात सतत बरं झालं भाषांतर वाचलं नाही असा विचार येत होता.

अमेरिकन पास्तोरालचा निवेदक नूवार्क , न्यू जर्सी इथे लहानाचा मोठा झालेला नेथन झकरमन*

नेथन आणी त्याचा शाळेतला वर्गमित्र जेरी लव्हॉव एका रीयुनियन मधे भेटतात. तेंव्हा नेथनला जेरीच्या मोठया भावाबद्दल कळते. नेथन आणि जेरी पेक्षा दोन यत्ता पुढे असलेला सेमोर ( स्वीड) दिसायला देखणा, शाळेच्या स्पोर्ट्स टीमचा हिरो. शाळा संपल्यावर मरिन कोअरमधे जातो. युद्ध संपल्यावर तो वडलांचा लेदर ग्लव्ह्स बनवण्याचा कारखाना सांभाळतो. स्वीडचे लग्न एलिझाबेथ इथल्या मिस न्यू जर्सी चा क्राउन जिंकलेल्या डॉन ड्वायरशी होते. त्यांची एकुलती एक मुलगी मेरेडिथ . वरवर पहाता आदर्श कुटुंब - देखणा, व्यवसायात यशस्वी नवरा . मिस न्यू जर्सी झालेली सुदर , हुषार आणि धडाडीची बायको. ती स्वत कॅटल ब्रीडिंग करत असते.

पण त्याची मुलगी १६-१७ वर्षांची असताना व्हिएटनाम युद्धाचा विरोध करणार्‍या गटात सामील होऊन गावच्या पोस्टऑफिस -कम- जनरल स्टोअरमधे बॉम्ब स्फोट करते. त्याचवेळी पोस्टबॉक्समधून आपली पत्रे न्यायला आलेला डॉक्टर त्यात मृत्यु पावतो. मेरी पळून जाते. तिच्या शोधात पोलिस स्वीडच्या घराचा कोपरा न कोपरा उचकतात. त्यांच्यावर पाळत ठेवतात. पुढच्या तीन चार वर्षात डॉन दोन वेळा मेंटल हॉस्पिटलमधे जाऊन येते.

अनेक वर्षांनी मेरेडिथ नूवार्कच्या अत्यंत बकाल भागात रहात असल्याचे स्वीडला कळते. तो तिला भेटायला जातो तेंव्हा तिने जैन धर्म स्वीकारलेला आहे. पहिल्या बॉम्ब स्फोटानंतर अजून तीन बॉंब स्फोट घडवून आणलेत. त्यात अजून माणसं मृत्युमुखी पडलीत. घरातून पळून गेल्यावर लपत छपत रहाताना तिला बर्‍याच कठीण प्रसंगाना तोंड द्यावं लागलंय. ते सगळं तिच्या तोंडून एकताना बापाच्या हृदयाची काय अवस्था होते ! त्याची अगतिकता , हतबलता - ऐकताना सुन्न वाटतं.

१९९८ सालचं पुलित्झर पारितोषिक मिळालेलं पुस्तक आहे. सिनेमा पण आलाय म्हणे- मी पाहिला नाही. १९४५ सालच्या शाळेतल्या मुलांचं चित्रण , १९६० च्या दशकातल्या राजकीय , सामाजिक परिस्थितीचे पडसाद, दंगलींचे परिणाम, ज्युईश लेव्हॉव फॅमिली आणि आयरिश कॅथलिक ड्वायर फॅमिली यांच्यातलं नाट्य, लेदर ग्लव्हज इंडट्री - अमेरिकेतलं मॅन्युफॅक्चरिंग मधली स्थित्यंतर फार बारकाईनं लिहिलंय .

* झकरमन सुद्धा ज्युइश असणार हे तीसेक वर्षांपूर्वी अजिबात कळलं नसतं.

आताचं मी पाहिलेलं नूवार्क म्हणजे ट्रेन स्टेशन, एअरपोर्ट , क्वचित येल्प मधून शोधून गेलो होतो ती रेस्टॉरंट्स आणि एलिझाबेथ म्हणजे फक्त आयकिया ! त्यांच्या शाळेची , इतर ठिकाणांची वर्णनं वाचायला फार मजा वाटते. वेस्टर्न न्यू जर्सी आणि इतर 'रुरल' भागातून ताजी फळे , भाजी पाला नूवार्कपर्यंत आणायला स्पेशल रेलवे लाइन होती म्हणे.

ऑन द रोड वाचायला घेऊन अर्धवट सोडण्याची दोन तीन आवर्तनं झाली. या महिन्यात दुसरं कुठलं ऑडिओ बुक मिळालं नाही तर हे पूर्ण केलं.
जॅक केरोआक म्हणजे अमेरिकेन बीट जनरेशनचे आद्य गुरु - हिपी कल्चरच्याही आधीची पिढी आणि हे पुस्तक फार नावाजलेलं हे ऐकून होते.
बहुतेक इंग्लिश लिट शिकणार्‍या सर्वांना हे पुस्तक अनिवार्य असणार अशी माझी समजूत आहे.

याचा निवेद्क पण न्यू जर्सी मधला - पॅटर्सनमधे रहाणारा सॅल पॅराडाइझ आणि त्याचे मित्र - १९४७ पासून पुढची काही वर्षे न्यू जर्सी पासून डेन्व्हर, सान फ्रान्सिस्को , न्यू ऑर्लीन्स असे फिरतात . कधी खिशात चार पैसे असले तर बसने, एरवी हिच हायकिंग करत फिरतात. एका ट्रिपमधे एका मित्राची गाडी असते. वाटेत भेटणार्‍या हिच हायकर कडून गॅस मनी घेऊन फिरतात. त्यात त्यांना आलेले अनुभव, वेगवेगळ्या राज्यातले रस्ते, नद्या, दर्‍या खोर्‍या यांचं वर्णन फार हृद्य आहे . रॉकी माउंटनची वेगवेगळी रुपं , निरनिराळ्या ठिकाणाचं रात्रीचं आकाश अगदी नेमकं पकडलं आहे.

दिवसाच्या कुठल्याही प्रहरी मिळेल त्या मार्गाने दारू पिणारे , नित्यनेमाने वीड ( टी म्हणत होते त्या काळात ) पिणारे , जिथे जातील तिथे मुली पटवायला पहाणारे मित्र आणि त्यांच्या प्रवासाचे वर्णन आहे. मनी ऑर्डरने येणारे पैसे , बहुतेक शहरांमधलि ट्रॅव्हेल ब्युरो नावाची राइड शेअर टाइप सर्व्हिस , सान फ्रांसिस्को मधल्या जॅझ क्लबची, जॅझ कलाकारांची वर्णने , सेल फोन - इमेल -सोशल मिडिया नसताना हे सर्व मित्र कसे कम्युनिकेट करत होते ते सर्व वाचताना मजा येते फार.

हळाक्षज्ञ लायब्ररीतून आणून वाचले होते. आता समोर नाही. त्यामुळे आठवतंय तसं लिहितो. आठवणीत आणि आकलनात चूभूद्याघ्या.

१. लेखाचं निमित्त चित्रमय स्वगत या पुस्तकाचं प्रकाशन . हे आजकाल ज्याला कॉफीटेबल बुक म्हणतात त्या प्रकारचं आहे ना?
२. यावरून पुलंच्या लोकप्रियतेत /मोठेपणात एक मोठा वाटा त्यांच्या समाजाभिमुखतेचा ( कायम दिसत राहण्याचा ) आणि सादरीकरणाचा आहे. तांबेंनी स्वतःच्या आजोबांचं उदाहरण दिलं आहे. त्यांच्या पुस्तकात त्यांचा फोटो छापू दिला नाही.
३. हा व्यक्तिपूजेचा प्रकार आहे. श्रीपुलता हे लेखाचं शीर्षक त्यासाठी. पुल स्वतः यक्तिपूजेच्या विरोधात होते हे लेखकाने मुद्दाम नोंदवले आहे.
४. लेखातला मोठा भाग पुल चाहत्याशी केलेल्या संभाषणाच्या रूपात. तांबेनी हा फॉर्म अनेक लेखांत वापरला आहे.
तर हा चाहता म्हणजे पुलंचा टिपिकल चाहता. त्यांच्या कोट्यांवर खुष होणारा. त्या जमणं ग्रेट असा समजणारा. कोटिभास्कर ते कोटी बास कर अशी लेखकाची टिप्पण्णी.
५. या चाहत्याने पुलंचं गंभीर लेखन वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ऐकलेलंही नसतं. उदा : लेखकाला वंग चित्रे आवडलं. ते चाहत्याला माहीत नसतं. " यात प्रकाश पडतो, तो लो कांच्या वृत्तीवर , पुलंच्या गुणवत्तेवर नव्हे. " (लेखातून)
६. वर नाटकांबद्दल मुद्दा आलाय. पु लं वर वाङ्मयचौर्याचा आरोप लेखक करत नाही. त्यांची नाटकं ओरिजिनल नाहीत, त्यामुळे ती त्यांना श्रेष्ठ साहित्यिक पद मिळवून देऊ शकत नाहीत.
७. प्रवासवर्णन आणि व्यक्तिचित्रण हे विशुद्ध साहित्यप्रकार न मानलं जाणं हे लेखकाने ठरवलं नसावं.
८. पुल सुनीताबाईंच्या कवितावाचनाच्या प्रयोगांचा चांगल्या प्रकारे उल्लेख आहे.

लेखाच्या शीर्षकातला श्रीपु हा भाग श्रीपुंवर रोख ठेवूनही आहे. त्यांनी त्यांच्या वाङ्मयीन परंपरेची तपासणी करावी असं म्हटलं आहे.

या पुस्तकातले साहित्याबद्दलचे जे लेख आहेत, त्यांचा उद्देश वाचकांना ग्रो व्हायला सांगणं हा आहे असं स्पष्टपणे दिसतं. इथे मला मायबोलीफेम टच्याआले आठवतं. त्या फ्रेजमागचं कारण त्यांच्याकडूनच ऐकलं आहे.

अशाच अर्थाच्या एका लेखाची लिंक (मेघना भुसकुटेंचा?) मायबोलीवर येऊन त्यावर चर्चा झाल्याचं आठवतं.

माझ्या संग्रहात एका लेखकाची सर्वा धिक पुस्तकं पुलंचीच असतील. अनेक वेळा वाचली गेलेली ही त्यांचीच असतील. या चर्चेमुळे पु लं नी लिहिलेलं वाचून मिळणारा माझा आनंद कमी झाला नाही. पण तरीही पु ल श्रेष्ठ साहित्यिक नाहीत हे मत मला टोचलं. विनोदाला आपण कमी लेखतो असंही मला वाटतो.

पुलंचा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा लेखकगुण म्हणजे त्यांची सूक्षमनिरीक्षणशक्ती आणि त्यांना दिसलेलं विनोदाच्या सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून आपल्याला दाखवणं.

अलीकडे वाचन फार कमी झालेय पण नुकतेच राधे श्याम यांचे किंग्डम ऑफ अहमदनगर हे मोठे पुस्तक/संदर्भग्रंथ वाचून झाले. बऱ्याच नव्या गोष्टी कळाल्या आणि माहिती असलेल्या गोष्टींबद्दल विस्ताराने समजले. मागे नेमाडे मलिक अंबरला मराठी साम्राज्यकर्ता का म्हणाले ते लक्षात आले. आफ्रिकेत गुलाम म्हणून जन्मला तरी शुन्यातून आपल्या कर्तबगारीवर इतिहासात स्थान निर्माण केले त्याने. तसा शिवपूर्वकालीन इतिहास आपल्याकडे दुर्लक्षितच आहे म्हणा आणि त्यात तो मुस्लिम असल्यानेही असेल कदाचित दुर्लक्षितच राहिला. त्यावर एखादा सुंदर चित्रपट किंवा मालिका यायला हवी. उद्या औरंगाबादचे नाव बदलले तरी ज्याने ते वसवले त्या "खडकी" या मूळनावानेच ओळखले जावे.

मालिक अंबरवर आणि भारतात आलेल्या अन्य हबशीं (?)बद्दल एक लेख एका दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतं.

भरत., पोस्ट आवडली.
आवडनिवड ही संपूर्णपणे वैयक्तिक आणि त्यामुळे सापेक्ष गोष्ट आहे. मला पुलं आवडतात, त्यामुळे इतरांनाही ते आवडलेच पाहिजेत असं नाही. 'विशुद्ध' साहित्यप्रकारात लेखन न केल्यामुळे आणि रूपांतरित नाटकं जास्त लिहिल्यामुळे त्यांची गणना श्रेष्ठ साहित्यिकांमध्ये कुणी करू इच्छित नसेल तर नसो बापडे!
मलाही पुलंची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, त्यांच्या आयुष्याचा एकंदर आवाका, त्यातलं वैविध्य आणि प्रगल्भता (जी लेखनातून प्रकट होते) आणि अर्थातच उच्च दर्जाचा विनोद या आणि इतर बऱ्याच कारणांमुळे पुलं आवडतात आणि श्रेष्ठ साहित्यिक वाटतात. माणूस म्हणूनही ते ग्रेट होते हा वेगळा मुद्दा.

'ग्रो' होण्याबद्दल-
एखाद्याला फक्त कोट्या आणि बारीकसारीक विनोदांमुळेच पुलं आवडत असतील तर आवडू द्यावेत असं मला वाटतं. त्यापलीकडे असलेल्या पुलंची ओळख करून देण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण त्या व्यक्तीला नसेल समजून घ्यायचं ते, तर आपण जजमेंटल का व्हायचं? एकेकाचा चॉईस. त्यात वावगं काय आहे? उदाहरणार्थ मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. पण मला भीमसेन जोशींची अभंगवाणी ऐकायला आवडते. आता यावर मला समजा कुणीतरी सांगितलं की भीमसेन जोशींचं गाणं यापलीकडे बरंच आहे. ते ऐक. मी प्रयत्न केला शास्त्रीय संगीत ऐकण्याचा, पण मला ते नाही समजलं किंवा आवडलं, किंवा अगदी माझी ते ऐकून बघण्याचीही इच्छा नसेल तर मला अभंगवाणी आनंदाने ऐकू द्यावी आणि अभंगवाणी आवडते म्हणून भीमसेन जोशी मला आवडतात असं म्हणू द्यावं. भले ही आवड informed नसेल, पण ती माझी वैयक्तिक आवड आहे.

पण कुणी असं म्हणायला लागला की भीमसेनांनी फक्त अभंगवाणीच तर गायली, मग त्यांना एवढे श्रेष्ठ गायक का मानायचं? तर मात्र त्याला त्यांचं बाकीचं कर्तृत्व दाखवून दिलंच पाहिजे. हम आणि अग्निपथ बघून कुणाला अमिताभ आवडत असेल तर आवडू द्यावा, पण अमिताभ म्हणजे तेवढंच, असं म्हटलं तर ते बरोबर नाही!

वाचक ग्रो होण्यात त्याचा स्वतः:चा आणि एकंदर वाचनसंस्कृतीचाही फायदा आहे. त्यामुळे बाकी काय वाचण्यासारखं आहे आणि ते का वाचायला हवं हे सांगितलं गेलं पाहिजे.

मायबोलीवर वाचून मी श्याम मनोहरांची पुस्तकं नेटाने वाचली.

पुलंच्या एक शून्य मी या पुस्तकातील त्याच नावाचा लेख माझा खूपच आवडता आहे .
(https://www.maayboli.com/node/69050)
त्या एका लेखावर मी पुलंना मनोमन श्रेष्ठ मानलेले आहे.

बाकी कोट्याबिट्या इतर गोष्टी... त्याच्याकडे मी फारसे लक्ष देत नाही Happy
अर्थात ज्याची त्याची आवड वेगळी.

नक्कीच. पण 'ग्रो व्हा' ह्याचा सूर नाथा कामताच्या 'बाबा रे!' सारखा, समोरच्या माणसाला अगदीच कमी लेखल्यासारखा वाटतो!

भरत - डीटेल्ड पोस्टबद्दल धन्यवाद. वाचायलाच हवे ते पुस्तक.

पण कुणी असं म्हणायला लागला की भीमसेनांनी फक्त अभंगवाणीच तर गायली, मग त्यांना एवढे श्रेष्ठ गायक का मानायचं? तर मात्र त्याला त्यांचं बाकीचं कर्तृत्व दाखवून दिलंच पाहिजे. हम आणि अग्निपथ बघून कुणाला अमिताभ आवडत असेल तर आवडू द्यावा, पण अमिताभ म्हणजे तेवढंच, असं म्हटलं तर ते बरोबर नाही! >>> परफेक्ट!

पुलंच्या राजकीय लेखांमधे खिल्ली मधल्या नंतरच्या आवृत्त्यांत असलेला "एका गांधी टोपीचा प्रवास" हा एक सर्वोत्कृष्ठ लेख आहे. कदाचित काँग्रेसविरोधक तो "बघा काय खेचली आहे काँग्रेसची" म्हणत वाचतील आणि चघळतील. पण तो लेख स्वातंत्र्याला २५ वर्षे झाली तेव्हा लिहीला होता. असाच "गेल्या २५-३० वर्षांत काय बदलले" चा विचार इतर कोणत्याही प्रमुख पक्षाबद्दल (भाजप, सेना ई) केला तर चित्र फारसे वेगळे दिसणार नाही.

अनिल अवचटांचं 'हमीद' हे पुस्तक वाचलं. हे पुस्तक हमीद दलवाईंवर असलं, तरी ते त्यांचं 'चरित्र' नाही. जिवलग मित्राचं, मैत्रीत जेवढं आणि जसं दर्शन झालं, तेवढंच या पुस्तकात आहे. दलवाईंचा, अनपेक्षित नसला, तरी अकाली मृत्यू झाला, त्यानंतरच्या काही दिवसांत लिहून काढलेल्या आणि लगेचच पुस्तकरूपाने छापलेल्या या आठवणी आहेत.
यात हमीद दलवाईंच्या व्यक्तिमत्त्वाची फक्त चांगलीच बाजू दाखवण्याचा अट्टाहास अजिबात केलेला नाही. त्याबरोबरच 'गॉसिप' पातळीवर जाऊन लिहिलेल्या वाईट गोष्टीही नाहीत. जे स्वतःला दिसलं, जाणवलं ते आणि तेवढंच आहे. मुस्लिम समाजसुधारणेचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता ही हमीद दलवाईंची बाजूही अर्थातच यात येते. त्यांचा त्या बाबतीत असलेला व्यासंग, त्यांची कळकळ, धडाडी, निर्भयता, याबरोबरच त्यांच्या मर्यादाही अनिल अवचटांनी लिहिल्या आहेत.
प्रस्तावना विजय तेंडुलकरांची आहे. ती स्वतंत्रपणेही नक्की वाचावी अशी आहे.
(मी हमीद दलवाईंचे दोनतीन लेख आणि एखादी कथा सोडल्यास काहीच वाचलेलं नाही. हे पुस्तक वाचल्यावर हमीद दलवाईंचं लेखन वाचलं पाहिजे असं परत एकदा जाणवलं)

Pages