अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई तुला बोल गं.
अगं मला या आधीपण असा अनुभव मध्यरात्रीच आला होता. पण मी हल्ली काय काहिही निसर्गानुरुप होत नाही म्हणुन दुर्लक्ष केले. जसे यंदा पाऊस आता पडतोय.

त्यारात्री मी माझ्या नवर्यालापण उठविले तो जात होता बघायला पण मीच जाऊन नाही दिले. आमच्या बेडरुमच्या मागे मोकळे मैदान आहे तिथे कचरा वै. असतो म्हणुन तिथे माणसं येत नाहित त्यामुळे माणसांना पाहुन कुत्रे भुंकत नसतील. तसे मला कुत्र्यांचा प्रॉब्लेम नाही कारण ते कधीपण भुंकत असतात पण कावळे.. आणि आम्ही राहतो चौथ्या मजल्यावर त्यामुळे आमच्या डिशवर बसलेल्या कावळ्यांना कसला बर त्रास होत असेल की असे रात्री २-३ वाजता उठुन कावकाव करतात.:खोखो:

असे अनूभव आलेत आम्हाला, पण कावळोबा नाय, दुसरेच पक्षी असतात. कारण रात्री ते झाडान्वर झोपलेले वगैरे असताना मान्जर बिन्जर झाडावर चढुन त्याना मारण्याचा प्रयत्न करत असेल कदाचीत.:अओ: आमच्या साईडला मान्जर, कुत्रे यान्ची बरीच मोठी भटकी जमात आहे. कायम इकडे तिकडे कोकलत हिन्डत असतात रात्री अपरात्री.:खोखो:

अरेरे Rofl

मस्त धागा आहे!विश्वास नाही तरीही अनुभव वाचायला आवडले.कदाचित सुष्ट शक्ती असतात तसेच दुष्ट शक्तीही असतील!

एक शंका आहे.सर्वसाधारणपणे माणसांची भुतेचदिसतात.पण प्राणी-पक्षी यांच्या भुतांचे किस्से वाचनात आले नाहीत.तसेच स्त्रीभुताचा मेकपपण केस सोडलेले (तेही लांब),पांढरी/ हिरवी साडी, बांगड्या इ.असाच ऐकला / वाचला आहे.
हे लिहिताना कोणाचीही टिंगल करण्याचा अजिबातच हेतू नाही.एक वैयक्तिक मत मांडले आहे.

प्राणी-पक्षी यांच्या भुतांचे किस्से वाचनात आले नाहीत<<<

आपले येथील वाचन कमी पडत आहे असा त्याचा अर्थ होतो.

आपले येथील वाचन कमी पडत आहे असा त्याचा अर्थ होतो.>>> असेलही.त्यासाठी संदर्भ देऊ शकाल का?

तुमचा वरील प्रश्न हाच सगळ्यात मोठा संदर्भ आहे.

>>>एक शंका आहे.सर्वसाधारण्पणे माणसांची भुतेचदिसतात.पण प्राणी-पक्षी यांच्या भुतांचे किस्से वाचनात आले नाहीत.<<<

त्यासाठी संदर्भ देऊ शकाल का हे विचारताना प्राणी-पक्षी यांच्या भुतांचे किस्से कोणत्या पुस्तकातून/ लिंकमधून वाचायला मिळतील एवढेच अपेक्षित होते.असो.

च स्त्रीभुताचा मेकपपण केस सोडलेले (तेही लांब),पांढरी/ हिरवी साडी, बांगड्या इ.असाच ऐकला / वाचला आहे.<< कोकणंत स्त्री काय अन पुरूष काय भुताम्च्या मेकपचे अनेक किस्से असतात.

मानकाप्या ऐकलाय का कधी?

मानकाप्या ऐकलाय का कधी? >>>> होऽऽ. गिरगावात खोताच्या वाडीतल्या बोळांतून फिरायचा म्हणे Proud

गिरगावात खोताच्या वाडीतल्या बोळांतून फिरायचा म्हणे >>>> हायला, नशिब मला नाय कंदी दिस्ला!! Proud

गिरगावात खोताच्या वाडीतल्या बोळांतून फिरायचा म्हणे >>>> हो का?? मग तोच पुढे बंबखान्याकडे यायचा का? आम्ही पण ल्हान्पणी बंबखान्याकडे मान्काप्या फिरतो असं ऐकलयं. Happy

हायला, मानकाप्या मुंबईत? आम्हाला सांगितलेले जंगलात नायतर समुद्रकाठी फिरतो म्हणून. पूर्वी भाट्याच्या सुरूबनामध्ये मानकाप्या फिरायचा म्हणे.

आमच्या लहानपणी पुण्यात हाकामारी फिरायची म्हणे....>>>+१११
दारावर फुल्या मारल्या की ती येत नाही असा काहीतरी समज होता.

हाकामारी आम्च्याकडे शिमग्याच्या दिवसांत हमखास येतेच. Proud

आमच्या उद्यमनगरमध्ये एक बाई रात्री अपरात्री रस्त्याने फिरायची, खासकरून अमावस्येला. आम्ही त्या भुतीण बाईला बघायला एका अमावस्र्येला तीन चार जण रात्रभर रस्त्यावरून फिरत होतो. बाई काय दिसली नाहीच. गस्ती घालणार्‍या पोलिसांनी तीनदा पकडलं. एकदा "फ्रेन्डला घरी सोडायला चल्लाव" दुसर्‍यांदा "आता दुसर्‍या फ्रेन्डला घरी सोडताव" आणि तिसर्‍यांदा "मॉर्निंग वॉकला निघलाव" अशी कारणे दिली होती.

पण भूत काय दिसलं नाहीच!!!!

>>मानकाप्या ऐकलाय का कधी?

हा काय प्रकार असतो? म्हणजे ह्याची मान कापलेली असते (पॉटर मुव्हीजमध्ये निअरली हेडलेस निक असतो तसा) का ह्याच्या मार्गात आलं की तो मान कापतो?

>>आमच्या लहानपणी पुण्यात हाकामारी फिरायची म्हणे....

हे तेच भूत ना जे आपल्याला ओळखीच्या माणसाच्या आवाजात हाक मारतं आणि 'ओ' दिली की झपाटतं? माझे आजोबा फॉरेस्ट खात्यात होते. त्यांना घरी यायला बर्‍याचदा रात्री उशीर होत असे. पण त्यांनी ३ वेळा हाक मारल्याशिवाय आजी 'ओ' देत नसे किंवा दरवाजा उघडत नसे.

नमस्कार मंडळी,
मी नवीनच आहे मा. बो. वर. त्यामुळे कालच वाचला हा धागा. पण मस्त आहे एकदम. सगळ्यांचे अनुभव जबरदस्त !! मजा आली वाचायला आणि रात्री भीतीपण वाटली सगळे आठवून.

मला पण दोन अनुभव लिहावेसे वाटतात. ते इथे देतेय, माझे स्वतःचे नाहीत, ऐकीवच आहेत.

१. काळ - १९८० - ८५ दरम्यान, स्थळ - अहमदाबाद.
माझ्या नात्यातला एक जण व्यवसायाने मेडिकल रिप्रेसेन्टेटीव, नुकतीच अहमदाबादला बदली झालेली, घर वगैरे शोधुन स्थिरस्थावर झाल्यावर बाकीची मंडळी येणार होती. मोक्याच्या ठिकाणी एक बंगलेवजा घर, अगदी कमी भाड्याने मिळाले. घर प्रशस्त, हवेशीर आणि अगदी स्वस्त त्यामुळे फार चौकशा न करता घेतले आणि हा रहायला आला. सबंध दिवस तर बाहेरच असे पण रात्री घरी याला काही विचित्र अनुभव येऊ लागले. घरात कोणीतरी वावरत असल्याचा भास होई त्याला, एक्-दोनदा तर एक स्त्री जिन्यावरुन जाता येतासुद्धा दिसली पण याने विशेष मनावर घेतले नाही कि कोणाला काही सांगितले नाही. ठरल्याप्रमाणे इतर कुटुम्बीय आले, त्याची आई, बायको आणि दोन मुली. आई अगदी भक्तिमार्गातली बाई, तिला म्हणे घरात प्रवेश करताच काही जाणवले आणि ही वास्तु प्रसन्न वाटत नाही असे बोलुनही दाखवले तिने, लेकाने मात्र आईला व बायकोला, आलेल्या अनुभवांची खबर लागू दिली नाही. एक- दोन दिवसातच आईने स्वप्नात पाहिले कि एका तरुणीने याच घराच्या गच्चीवरुन उडी मारली आणि ती दचकुन जागी झाली. सकाळी तिने लेकाला व सुनेला स्वप्न सांगितले व घर बदलण्याबद्दल सुचवले, मुलाने मात्र हे सर्व धुडकावुन लावले कारण इतक्या स्वस्तात दुसरे घर मिळणार नव्हते. सासु-सुनेने मात्र शेजार्-पाजारी रहाणार्या गुजराथी माणसांशी ओळख करुन घेतली आणि सहज बोलता बोलता चौकशी चालु केली कि पूर्वी इथे कोण रहात होते व. त्यांना कळलेली माहिती अशी-- या घराचे बांधकाम चालू असताना या घराच्या समोरच असलेल्या घरातील एका तरुण मुलीने काहि कारणावरुन या घराच्या (जे बांधले जात होते) गच्चीवरून उडी मारुन आत्महत्या केली होती. घर पूर्ण झाल्यावर घर मालकाला व त्याच्या घरातील सदस्यांना ती मुलगी घरात दिसत असे व म्हणून ते हे घर सोडुन गेले. हि बातमी आसपास पसरली व कोणीच येथे रहायला तयार होइना. बरेच वर्षांनंतर हा माझा नातलग या ठिकाणी आला आणि याच कारणाने त्याला हे घर इतके स्वस्त मिळाले. हे सर्व ऐकुन त्यानी लगेच घर बदलले.

२. काळ -२००५ च्या आस्पास स्थळ - सेन फ्रान्सिस्को
या भागात माझ्या नत्यातल्या एका दांपत्याने duplex bungalow घेताला, खाली होल, किचन व वर ३ बेडरुम्स असा. रात्री बेडरुम मध्ये असताना त्या दोघाना खाली कुणाचातरी वावर जाणवे. भांडी, काचेचे ग्लास हाताळल्याचा आवाज येत असे तर कधी furniture हलवल्याचा आवाज येई. जमिनीवर टकटक केली असता त्याच तालावर खालुन आवाज येई. खाली गेल्यावर कोणीही कधिही दिसले नाही. मात्र हे जे कोणी होते ते मझ्या मते मवाळ मतवादी होते त्याने स्वतःचे दर्शन कधी कोणाला दिले नाही व त्रासही दिला नाही पण "हम है" हे रोज दाखवुन दिले दोघाना. दोघे घाबरले. भारतात आई-बाबाचे मत घेतले गेले, रामरक्षा, हनुमान चलिसाचे वाचन झाले पण जैसे थे. शेवटी घर बदलण्याचा निर्णय घेतला. Estate agentla contact केला, कसे, घर हवे व.व. झाले. मात्र त्याना हे जाणवले कि आपल्या घरातील हे जे कोणी आहे (मूळ लेखकाच्या शब्दात अमानवीय) त्यास आपण हे घर सोडावे असे मुळीच वाटत नव्हते, कारण जेव्हा कधी Estate agent नवे घर बघायला बोलावीत असे, काहीना काही अडचण येऊन हे जाऊच शकत नसत. उदा. office चे urgent काम येणे, बायकोचे अचानक आजारी पडणे, एकदा तर दोघे निघालेपण आणि garrage मधे जाउन car सुरु करणार तर garrage चे शटरच खाली पडले अचानक आणि याना उघडताच येइना, यात बराच वेळ निघुन गेला आणि भेटिची वेळही टळून गेली. असे अनेकदा झाले आणि शेवटी कंटाळून दोघानी समझोताच केला "त्याच्याशी" कि आपल्याला काहीही त्रास नाही होत ना मग राहु या असेच एकत्र.

आज कित्येक वर्ष यांचे चौकोनी कुटुम्ब + १ (अमानवीय शक्ती) असे सारे joint family सारखे गुण्यागोविन्दाने नांदत आहेत फक्त दिवसातुन एकदा तरी याना आठवन करुन दिली जाते "हम है " याची

Pages