अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसली कळ्वळ कवठिचाफा ? >>>> आरोप झाल्यावर (सहन न झाल्यानं ) मनाची झालेली कळवळ म्हणालो मी, एनी वे मी आता कटाप तुम्ही दोघे भांडा

कचा
किती पोष्टी झाल्या तुझा समजूत काढता काढता ? जाऊ दे ना, कशाला बिनडोक लोकांच्या नादाला लागतोस ? Lol अशा लोकांच्या घरात हजारो काळे आणि दोन चार पांढरे उंदीर सोडून सीसीटीव्ही कॅमे-याने मायबोलीवर लाईव्ह प्रक्षेपण केलं पाहीजे. गूढकथांचं संकलन म्हणे !! तोंड बघा. वरून आम्हाला पण लिहीता येतं असला उद्दामपणा !!! Wink

किरण चे काही चुकले आहे असे मला वाटत नाही त्याने फक्त त्या बाई असा उल्लेक्घ केला होता त्याला नाव आठवत नव्हते लिंकही मिळत नव्हती त्याने फक्त एक शंका व्यक्त केली आरोप नव्हे व तो धागा कुणाचा हेच त्याला माहीत नव्हते मग बिचारा नाव कसे घेईल....असे एकंदर चित्र दिसते आहे (मुळात मयीजींनी स्वतः पुढे येवून "ती मी आहेच !! " (तो मी नव्हेच च्या चालीत ) असे सांगीतले ......नहीतर कोणी लक्षही दिले नसते की तो धागा कुणाचा होता वगैरे वगैरे वगैरे .....

सो.........
मयी यांनी व्यथित होवू नये
किरणने वाद वाढवू नये

तत्पर्य : दोघाना विनंती की हीच उर्जा त्या लेखनचोरांच्या ब्लॉग्स वर दाखवावीत Happy

आपला
"समयोचिततायुक्तकलह"प्रिय
वैवकु

समयसूचकतायुक्त कलहप्रिय Lol
सांगू का हू इज भांडिंग कचाकचा ? आँ Lol
वैवकु - सम फ्रेण्ड ऑफ माईन इज पॉसिबली डूईंग गंम्तवाडी. ( बरोबर आहे का वाक्य ? )

अवांतर - समाप्त.

विशाल कुलकर्णीची `मधुचंद्र' ही कथा अनेक ठिकाणी ढापलेली आहे दोन ठिकाणी त्याचे नांव आहे पण
https://www.facebook.com/MyHorrorExperience/posts/610514338983057 आणि
https://www.facebook.com/groups/ghost.niel/ इथे त्याचे नांव डिलीट केलेले आहे.

काय फालतूगिरी करतात लोक???? ढापाढापी करुन काय मिळते लोकांना???? फेसबूक वर पण अशिच गोष्ट आहे आशुचँप ची......अजुन पण कुठे कुठे असतीलच....मायबोली वरचं लिखाण कॉपी पेस्ट होउ नये या साठी काही उपाय करता येणार नाही का????

आपले लिखाण आपले नाव टाकुन pdf file मध्ये करुन मायबोलीवर चिपकावता येणार नाही का? मला वाटतं की पीडीएफ मध्ये काही बदल करता येत नसतील म्हणून. (मी आय टी मधली जाणकार अजीबात नाही, जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.)

माझ्या वाचनात एक कथा आली होती तीच मी येथे मांडत आहे .

वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .
मस्त गार वारे सुटले होते तरी त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने घड्याळात पहिले. सव्वा बारा, धक्का बसून त्याने पुन्हा घड्याळ पहिले सव्वा बाराच वाजले होते. म्हणजे त्याला तिथं येऊन फक्त पंधराच मिनिटे झाली होती. अजून पाऊन तास त्याला तिथे काढायचा होता.
मित्रांबरोबर पैंज लावली होती त्याने, 'अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात थांबण्याची' आणि त्याला विश्वास होता कि हि पैंज आपण नक्की जिंकणार कारण भुताखेतांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता.
शहरात शिकायला गेला तेथील शिकलेल्या मित्रांच्या सानिध्यात राहून भूतं-खेतं,घुमणारे भगत, देवाचे बळी,करणी, या सर्व लोकांच्या खुळ्या समजुती आहेत. या मताचा तो बनला होता. शहरातील मित्रांबरोबर तो अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखील काम करायचा.म्हणूनच गावात आल्या आल्या त्याने गावातल्या मित्रांबरोबर स्मशानात एक तास एकट्याने काढायचा अशी पैंज लावली होती.
सद्या जरी आधुनिक विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता, तरी लहानपणापासून मनात काही संस्कार ठसलेले होते आणि मेंदूत ते कुठेतरी लपून बसलेले होते.
तो जेव्हा स्मशानात आला तेव्हा एकही विचार त्याच्या मनात नव्हता.आल्या आल्या त्याने एक सिगारेट शिलगावली नि स्मशानभूमीतील शेडच्या खांबाला टेकून मस्त पाय पसरून बसला. सिगारेट संपेपर्यंत त्याला काही वाटले नाही. आणि कसला विचार देखील आला नाही. सिगारेट विझली .. ..... होता नव्हता तेवढा उजेडही संपला, सगळीकडे गच्च अंधार,जीवघेणी शांतता, दूर गाव,पक्षी, वारा सारं जगच झोपलेले. आणि हा एकटाच टक्क जागा. थोड्याच वेळात जे नको तेच घडू पहात होते. लहानपणी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टीतील भुते नि त्यांचे वर्णन केलेले भयानक आकार त्याच्या डोळ्यासमोर यायला लागले होते.तो त्या विचारांना झटकण्याचा प्रयत्न करत होता. तो जेवढा विचार झटकण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कितीतरी पटीने तेच तेच विचार पुन्हा पुन्हा येऊ पहात होते.
भुते नसतातच या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे तो मनाला वारंवार बजावत होता. तर दुसऱ्या मनात लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतील भूतांचे चित्रविचित्र अवयव फेर धरत होते. अतिशय द्विदा मनस्थितीत असतानाच,शांततेचा भंग करत भयंकर कर्कश्य आवाजात टिटवी ओरडत गेली नि अक्षरशा तो हादरूनच गेला छातीचे ठोके वाढले दरदरून घा म आला. कसे बसे मनावर नियंत्रण आणले.छाती अजूनही धडधडत होती. -
खिशातून रुमाल काढून त्याने चेहरा पुसला. घड्याळ पहिले बारा वीस, त्याला धक्का बसला होता. कारण त्याला वाटले होते कि, एक तास पूर्ण व्हायला फार फार तर पाच-सात मिनिटे राहिली असतील. परंतु तास पूर्ण व्हायला अजून चाळीस मिनिटे बाकी होती. आणि त्याचेच दडपण यायला लागले होते. वेळ सरता सरत नव्हता. मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्यासाठी त्याने डोके झटकले नि पुन्हा सिगारेट पेटवली. जरा शांत झाला. उगाच घाबरलो आपण घाबरण्यासारखे काहीच घडले नव्हते.
सिगारेट संपली, पुन्हा तीच अस्वस्थ करणारी शांतता..... त्या गच्च अंधारात एक एक मिनिट एका एका तासाप्रमाणे भासत होता. काहीही कृती न करता बसल्यामुळे पुन्हा मागचेच विचार त्याच्या डोक्यात यायला लागले होते. तो जेवढे विचार थोपवत होता त्याच्या दुप्पट वेगाने तेच विचार पुन्हा पुन्हा येत होते. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आजच का आठवत्तात हे त्याला समजत नव्हते.
विचार करता करता त्याला रंग पहिलवानाचा किस्सा आठवला.
त्याच्या गावाच्या नि शेजारच्या गावाच्या मध्ये डोंगरांची रांग होती दोन्ही गावात ये जा करण्यासाठी रस्ता एका खिंडीतून जात होता. खिंड खूपच अरुंद नि उंच होती. त्याच खिंडीत बर्याच वर्ष्यापुर्वी तीन मुडदे सापडले होते. दोन पुरुष नि एक महिला यांना कोणीतरी मारून टाकले होते. तेव्हापासून त्या खिंडीविषयी नाना प्रकारच्या दंतकथा तयार झाल्या होत्या. काही किस्से घडले होते कि नाही माहित नाही परंतु रंगवून सांगितले जात.
कोणी म्हणे एकदा एक जण (तो एक जण कोण होता कुणालाच माहित नव्हते ) तर तो रात्रीच पलीकडच्या गावातून अलीकडे यायला निघाला त्याच्या पाहुण्यांनी त्याला रात्रीचे निघायला विरोध केला होता. पण पठ्या लयच डेरिंगबाज कोण खातंय बघतो म्हणाला नि निघाला अकरा वाजले होते. झपाझप चालत खिंडीजवळ आला. खिंडीत शिरण्याअगोदर तंबाकू मळून तोंडात टाकली नि शिरला बिनधास्त, निम्मे अंतर गेल्यावर त्याला आवाज आला.
'
ओ पावनं थांबा जरा येउद्या मला.'
दचकून त्याने मागे बघितले एक उंच माणूस झपाझपा चालत येत होता. जवळ येताच तो माणूस म्हणाला
काय घाबरलो होतो राव, बरं झालं तुमची सोबत मिळाली.
कोणत्या गावाचं पावनं
आवो मी लांब कोकणातला हाय.
मग इकडं कुणाकड वाट चुकला
पावनं थोडी तंबाकू द्या राव लय तलाप झालीय मग सांगतो सगळं चालता चालता.
ह्याने तंबाकू काढून दिली, तो मळू लागला
नि ह्याच लक्ष्य त्याच्या तंबाकू मळनार्या हाताकडे गेले नि त्याचे धोतर पिवळे झाले.
तंबाकू मळणारे हात उलटे होते.
तेव्हापासून खिंडीत एक फेटे वाले भूत आहे हे सगळीकडे झाले. त्या किस्स्यानंतर असे किस्से अनेकदा घडत गेले. पाच नंतर त्या खिंडीतून कोणी जायचे धाडस करीना
त्याच खिंडीत रंगा पहिलवान लागीराला होता,
गावाच्या पारावर जेव्हा तो आला तेव्हा त्याची स्थिती खूपच वाईट होती. पूर्ण अंगावर फक्त एक फाटलेली अंडरवेयर होती. अंगावर खूप जखमा होत्या. धावत येऊन तो पारावर निपचित पडला होता. मधूनच उठून मोठ्याने ओरडायचा नि खिंडीकडे हात करून म्हनायचा डोळे पांढरे करून त्याची नि माझी कुस्ती झाली. पण तो लय मोठा होता. त्याचे हात पाय उलटे होते. अशी बडबड करून तो पुन्हा बेशुध्द पडायचा.
आख्ख्या गावाला वाटले नक्कीच खिंडीतल्या भुताने रंगा पहिलवानाला झपाटले असणार
हा लहान असताना रंगा पहिलवानाचा तो अवतार ह्याने स्वतः पाहिला होता.
आणि आज नको असताना त्याला स्मशानातच तो रंगा पहिलवानाचा किस्सा आठवला होता. रंगा पहिलवानाचा तो घाबरलेला नि वाईट अवस्था झालेला चेहरा त्याला आठवला नि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
शहरात शिकायला गेल्यापासून ह्या सर्व गोष्टी तो विसरला होता. नवीन आधुनिक विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता. परंतु आज काय झाले होते कुणास ठाऊक ते नवीन विचार त्याला आठवत नव्हते. लहानपणी ऐकलेल्या लोकांनी रंगवून सांगितलेल्या भुतांच्या गोष्टीच तेवढ्या त्याला आठवत होत्या. आणि जसजश्या त्या आठवत होत्या तसतशी त्याच्या छातीची धडधड वाढत होती.
बारा चाळीस झाले, वातावरणातील भयानकता वाढली. विचार करून करून त्याच्या मेंदूला बधीरपणा यायला लागला होता. त्याला कधी घाम येत होता तर थोड्याच वेळात थंडी वाजत होती. वातावरण नक्की थंड आहे कि गरम हेच काळात नव्हते.
आता अंधार अधिक गडद झाला. हा सुन्नपणे बसून होता. छातीतील धडधड चालूच होती. राहिलेली वीस मिनिटे केव्हा पार पडतात असे त्याला झाले होते.
तेवढ्यात तो बसला तिथे धप्पकन आवाज झाला. नि तो मोठ्याने ओरडला. आवाज कश्याचा आला हे सुध्दा त्याने पहिले नाही. तो जो पळत सुटला, पळता पळता दोन तीन वेळा पडला चांगलाच मार लागला. तरी सुद्धा लागलेल्या माराची परवा न करता त्याने पार गाठला. पारावर आल्या आल्या मित्रांनी गराडा घातला.------------------------
---------------------------------------आणि जो तो त्याला विचारू लागला काय झाले. त्याची अवस्था खरोखर वाईट होती. त्याला खूप धाप लागली होती छाती जोरजोरात वरखाली होत होती. त्याला बोलताच येत नव्हते. तेवढ्यात तेथे निरंजन आला.
निरंजन त्यांचाच मित्रांपैकी एक, वयाने त्यांच्यापेक्ष्या थोडा मोठा तरीपण चांगला मित्र, तो तेथे आल्या आल्या त्याने सर्वांना बाजूला केले. नि म्हणाला - सगळे बाजूला व्हा त्याला मोकळी हवा घेउद्या. राम तू जा पहिले पाणी घेऊन ये रामाकडे पाहून निरंजन म्हणाला.
शिवाला बाजूला घेतले व विचारले काय झाले ----शिवानं सांगायला सुरुवात केली.
काही नाही रे निरंजन भाऊ परवा पोरं पोरं गप्पा मारत बसली होती. गप्पा भुतांविषयी चालल्या होत्या, गवत्याने, नि विठठलनि दोन किस्से सांगितले. सगळी पोरं मन लावून भुताचे किस्से ऐकत होतो. तेवढ्यात हा सदा म्हणाला आरे काय दोस्तांनो जग कुठे चालले आहे नि तुम्ही अजूनही भूता-खेतातच रमताय अरे ह्या सगळ्या खुळ्या समझुती आहेत. भूतं खेतं , अंगात येणे देवीला बळी देणे , भूत लागले म्हणून उतारा टाकणे ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत.
त्यावर सगळी पोरं फिदीफिदी हसली. गवळ्याचा किस्ना म्हणाला -आरं सदा तू शहरात शिकायला गेला म्हणून तू काय लय श्याना झाला काय, वाडवडीलान्पासून भुतांच्या घटना घडतात देवांच्या ग्रंथामधून सुदिक भुतांच्या गोष्टी सांगितल्यात
त्यावर सदा म्हणाला किसन, पुराणांच्या कथा आता खूप जुन्या झाल्यात ते सगळेच खरे होते कि नाही कुणाला माहित, तुम्ही माझे लहानपणापासूनचे मित्र आहात म्हणून मला मनापासून वाटते कि तुम्ही या खुळचट कल्पना सोडून द्या.
तू आमच्यात जास्त शिकलाय तुझ्या बी काही गोष्टी खऱ्या असतील. रामा म्हणाला- पर हिथं आपल्याच गावात भूतांचा अनुभव आलेले कितीतरी सापडतील.
आरे काही नाही रे सगळा मनाचा खेळ असतो. सदा म्हणाला
त्यावर किस्ना म्हणाला हे बघ सदा, तू म्हणतोस ते आम्हाला बी पटतंय पर आम्ही हिथं गावातच राहतो. महिन्यातून एक दोन तरी भुताटकीच्या कथा कानावर पडतात त्यातल्या दहापैकी नऊ खोट्या असतील पर एखाधी तर खरी असलं ना?
ये किस्ना आरं तो सदा शिकलेला हाय तो काय आपल्याला बोलायला ऐकणार नाय त्यापेक्षा असं करू
किस्नाबरोबर बाकीच्या पोरांनी सुद्धा काय म्हणून विचारले.
ह्या सदाचा भूतांवर विस्वास नाय ना?
सदाने नाही म्हणून मान हलवली
मग ह्या सदाने अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात एकट्याने थांबवून दाखवायचे
ह्या गोष्टीला सदा एका पायावर तयार झाला.
पोरं त्याला म्हणाली सुदा कि काय झाले तर होणाऱ्या परिणामाला तुझा तू जबाबदार राहशील त्याने तेही मान्य केले.
आणि आता दोन तासापूर्वी सदा स्मशानात गेला होता तिकडे काय झाले कोणालाच माहित नाही पर लयच घाबरलेला दिसतोय. त्याला नक्कीच भूत दिसलं असणार
असे म्हणून शिवाने सारी हकीकत निरंजनाला सांगितली.
तेवढ्यात रामा पाणी घेऊन आला. पोरांनी सदाला पाणी पाजले थोडं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडले.
त्याला लागलेली धाप आता बरीच कमी झाली होती. डोळ्यातली भीती मात्र तशीच होती.
निरंजनने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. पण सदा घाबरून ओरडला व बाजूला सरू लागला. किस्ना म्हणाला -सदा आरे घाबरू नको आम्ही तुझे मैतर हाये काय झाले, काय दिसलं का तुला घाबरू नको काय झाले ते सांग
सदा बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण तोंडातून शब्द येण्याएवजी त्याचे दात दातावर आपटू लागले थंडी वाजून आली खूपच जोरात थंडी आल्यानंतर पोरांनी त्याला उचलला, उचलतानाही तो खूप घाबरला व किंचाळायला लागला. पण तसाच त्याला उचलून देवळात नेला.
बहूतेक पोरं देवळातच झोपायची सगळी पोरं त्याच्याभोवती कडे करून बसली. थंडी कमी झाल्यावर सदाला चांगलाच ताप आला
सगळी पोरं चिंताग्रस्त झाली होती. पैंज चांगलीच अंगलट आली होती. ती पैंज नव्हतीच पण भूतांवर विश्वास नसणारा सदा भूतं नसतातच हे आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी सदाने हे धाडस केले होते.
सगळ्या पोरांची खात्री झाली होती कि स्मशानात सदा नक्कीच एखादे भूत भेटलं असणार त्याशिवाय सदा एवढा घाबरणार नाही .
त्यानंतरची सारी रात्र सदाने डोळे मिटले नव्हते.व त्याबरोबर त्याची मित्रांनिदेखील .

दुसऱ्या दिवशी आख्या गावात हि बातमी सगळीकडे पसरली. सदाच्या चुलत्याने गावातल्या पोरांच्या नावाने शिव्या घातल्या. कारण सदाला चुलत्यानेच सुट्टीला गावाला आणला होता. सदाचे वडील नको म्हणत असताना चुलता घेऊन आला होता.
दुसऱ्या दिवशीही सदामध्ये काहीच फरक पडलेला नव्हता . चेहऱ्यावरील भीती जराही कमी झाली नव्हती, थंडी -ताप सारखा येतंच होता. शिवाय रात्रीपासून सदाने काही खाल्ले पिले नव्हते .---------------------------------------
--------------------------------------------गावापासून थोड्याच अंतरावर डोंगरांची रांग होती. काही खडकाळ भाग सोडला तर बहुतेक भाग जंगलाने व्यापला होता.गावातले लोक सहसा घनदाट जंगलाच्या बाजूला जात नसत. जंगलाच्या ठराविक भागातच वावर असे. घनदाट भागात जायचं झाले तर चार दोन जण बरोबर असल्याशिवाय कोणी धाडस करीत नसे.
आणि आज अश्याच घनदाट भागातून ते चौघेजण चालले होते. त्यात सदाचा चुलता दिनकरराव, वडील श्यामराव, चुलती सरूबाई आणि सदा, दिनकररावांनी सदाला घट्ट धरले होते. भेदरलेल्या अवस्थेत सदा बिचकत बिचकत चालला होता. एखाद्या पक्ष्याचा ओरडण्याचा आवाज जरी आला तरी सदा घाबरून ओरडायचा व हाताला हिसका मारून पळायचा प्रयत्न करायचा. परंतु दिनकारावांनी त्याला घट्ट धरल्यामुळे त्याला पळता येत नसायचे.
मुलाची अवस्था पाहून श्यामरावांचा धीरच सुटला होता. मुलगा चांगला शहरात शिकत होता गावात आला नि इतर पोरांच्या नादानं नको ती पैंज लावली, नि होत्याचं नव्हतं झालं देवा भैरुबा माझ्या पोराला लवकर या दृष्टचक्रातून बाहेर काढ तुझ्या नावाने शे पाचशे माणसं जेवायला घालीन. असं मनातल्या मनात पुटपुटत ते चालले होते.

दरीमधून वाहणारा तो लहान ओढा त्यांनी पार केला नि मोठ्या दरडीजवळ ते आले. दरडीलालागुनच ते थोडे पुढे गेले तेव्हा त्यांना ते दिसलं
जाळ्याझुडपांनी वेढलेले होते तरी आत जायला 'एकावेळी एका माणसाला' असा रस्ता होता त्या गुहेच्या तोंडातून त्यांनी आत प्रवेश केला थोडावेळ त्यांना काहीच दिसलं नाही सगळा अंधार होता शिवाय ते उन्हातून आले होते . थोड्या वेळाने त्यांची नजर सरावली व त्यांना थोडे थोडे दिसू लागले.
साधारण दहा बाय पंधराची ती गुहा होती. चांगली दोन पुरुष उंची असल्यामुळे गुदमरल्यासारखे होत नव्हते उलट आतमध्ये चांगला गारवा होता.
गुहेच्या अगदी शेवट कडेला तो बसला होता. उघडाबंब पाठीवर मोकळे सोडलेले करडे केस, कपाळावर शेंदराचा मळवट, कानात मोठाल्या बाळ्या, तारवटलेले डोळे तोंडाने कसलेतरी मंत्र पुटपुटत समोरच्या कुंडात काहीतरी फेकत होता. हातातले कसले तरी धान्य कुंडात फेकताच आग तेवढ्यापुरती भडकायची व साऱ्या गुहेत उग्र वास पसरायचा.
तो होता मांत्रिक राघव, गुहा सोडून कधीच बाहेर पडत नसे. फक्त अमावाश्येच्या रात्री स्मशानात जायचा आणि अगदीच एखादी केस हाताबाहेरची गेली असेल तर गावात जायचा. आजूबाजूच्या दहा वीस गावात त्याचा दबदबा होता. सगळे त्याला घाबरून असत.
मांत्रिकाच्या शेजारी उभ्या असलेल्या सेवकाचे लक्ष या चौघांकडे गेले तो त्यांच्याकडे आला नि हळू आवाजात म्हणाला
महाराज सध्या कामात आहे तिकडे बाजूला बसा दहा पंधरा मिनिटात बोलावतो एवढे सांगून तो पुन्हा मांत्रिकाकडे जाऊन उभा राहिला .
हे चौघेही कोपऱ्यात जाऊन बसले. सदाची चुळबुळ चालूच होती, तो तेथून बाहेर पाडण्यासाठी धडपडत होता नि दिनकरराव व सरूबाई या दोघांनीही त्याला घट्ट धरून ठेवले होते. श्यामरावांची मनातल्या मनात देवाची प्रार्थना चालूच होती.
मांत्रिकाचे अनुस्थ्हान संपले त्याचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या चौघांकडे गेले.त्याने सेवकाकडे पहिले. सेवक लगबगीने त्यांच्याकडे गेला नि चला म्हणून त्यांना खुणावले .
सदाला त्यांनी मांत्रीकापुढे बसवला, दिनकररावांनी थोडक्यात सारी हकीकत सांगितली
मांत्रिकाने सदावर आपले भेदक डोळे रोखले. सदा जास्तच चुळबुळ करू लागला. त्याला धरण्यासाठी या दोघांनाही सारी ताकत पणाला लावावी लागली .
मांत्रिकाने कुंडातली राख घेतली व सदाच्या मस्तकावर लावली. घाबरून सदा जोरात ओरडू लागला.
मांत्रिक आता कसलासा मंत्र पुटपुटत होता आणि झोळीतला अंगारा सदावर फेकत होता. सदाचे ओरडणे चालूच होते.
मंत्र पुटपुटने झाल्यावर तो सदाच्या वडिलांना व चुलत्याला म्हणाला -
लय ताकतवान भुताने डाव साधलाय बराच मोठा बंदोबस्त करावा लागणार हाय आणि खर्च बी मोठा हाय.
महाराज कितीबी खर्च होऊद्या पर आमच पोर बर हुईल ना? शामराव म्हणाले
ह्या राघवाने आतापर्यंत लय भूतांना वठणीवर आणलंय ह्या पोराला चारच दिसात मोकळा करतो.
लय उपकार होतील महाराज तुम्ही सांगान ते आणून देतो दिनकरराव म्हणाले.
तुम्ही काय बी आणू नका आणि तुमाला त्या वस्तू मिळणार पण नाय तुम्ही फक्त पाच हजार रुपये दुपारपर्यंत आणून द्या. हा धोंड्या अशा वस्तू आणीन
यांना घरी घालवून लगेच पैसे घेऊन येतो पर पोराला आता काहीतरी गुण द्या महाराज पोराने खानं पिणं टाकलंय ----दिनकरराव काकुळतीने म्हणाले
तो दोन तीन दिवस असाच वागण पर काय बी काळजी करू नका म्या हाय.
असे म्हणून मांत्रिकाने पुन्हा एकदा त्याच्या कपाळावर अंगारा लावला नि यांना या म्हणाला.
चौघांनीही मांत्रिकाला नमस्कार केला नि ते गुहेबाहेर पडले.--------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------दिवस मावळला, नि एक एक जण ती छोटी टेकडी चढून वर माथ्यावर यायला लागला. दिवसभराची कामं आटोपून सायंकाळच्या वेळेत मस्त गप्पा मारायच्या, हास्यविनोदात तास दीड तास घालवायचा असा ह्या मित्रमंडळींचा रोजचाच नियम. त्या नियमाला अनुसरूनच त्या छोट्या टेकडावर एक एक जण जमत होता.
टेकडी छोटीच होती पण तिच्यावर बसले कि सारं गाव दिसायचे. नदी, 'नदीकाठची हिरवीगार शेते पहात गप्पा मारताना दिवसभर केलेल्या कामाचा शीण कुठल्याकुठे पळून जायचा. आल्या आल्या त्यांची थट्टामस्करी चालू व्हायची. पण आज येणारा प्रत्येकजण गंभीर चेहरयानेच येत होता. त्यांचा अल्लडपणा, उत्साह , जोश सारे काही हरवलं होतं गावाला न्याहाळत सारे गप्पच होते.
हि शांतता शिवाला सहन होईना तो म्हणाला - आरं कुणीतरी बोला, आपण काय हिथं मुकसभा का काय म्हणत्यात ते घ्यायला आलो काय?
शिवा, रामा बोलला - आपण काय करून बसलो यार, कुठून बुद्ध्या सुचली नि त्या सदाला मसणात पाठवलं.
त्याला आपण कुठं जा म्हणलो, त्याचा आगाव पणाच त्याला नडलाय शिकल्याली अशीच हुकल्याली असतात.
जरी चूक सदाची होती, तरी गाव आपल्यालाच नावं ठेवतंय -निरंजन म्हणाला.
गावाला नावं ठिवायला काय जातंय त्यांना काय माहितीये आपल्यात काय झालं ते -शिवा चिडून म्हणाला.
मारणाराचा हात धरता येतो पण बोलणाराचे तोंड धरता येत नाही शिवा, सदा आपल्यातच बसत उठत होता म्हणल्यावर गाव आपल्याला जबाबदार धरणारच, आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे निरंजन म्हणाला.
आता आपण रे काय करणार निरंजन भाऊ -रामा म्हणाला.
सदा बरा होण्यासाठी काहीतरी खटपट केली पाहिजे.
पर काय, तो आजारी असता तर आपण त्याला दवाखान्यात घेऊन गेलो असतो. तो झपाटलाय म्हणल्यावर आपण काय करणार -शिवा
त्याला नक्की काय झालंय हे अजून कोणालाच माहित नाही.-निरंजन
अमावाश्येला रात्री बरा वाजता मसणात गेल्यावर काय होतं हे काय सांगायला पाहिजे का?-रामा
आणि आख्ख गाव म्हणतंय सदा लागीरलाय
गावाला बोलायला काय जातंय, ह्याचं त्याचं ऐकूनच नि मनाने त्यात वाढ करूनच गाव अश्या गोष्टी रंगवतंय मला नाही वाटत सदाला भूत वैगेरे दिसले असेल म्हणून.-निरंजन शांतपणे म्हणाला.
मग त्या दिवशी मसनातून तो पळत कशाला आला असता आणि भूत दिसले नसते तर तो एवढा घाबरला का असता -शिवा
आणि त्याचा बाप नि चुलता त्या गुहेतल्या मांत्रिकाकडे घेऊन गेले होते. त्या मांत्रिकाने सांगितलंय कि लय मोठ्या भूतानि झपाटलंय. आणि तो मांत्रिक दोन दिवसात सदाला बरा करणार आहे - आतापर्यंत गप्प बसलेल्या दत्ताने माहिती पुरवली.
मांत्रिकाकडे गेले म्हणल्यावर मांत्रिक त्यांना पाच सहा हजाराला थुका लावणार ......त्यांनी त्याच्याकडे जायला नव्हतं पाहिजे -निरंजन
आरं पर तो मांत्रिक लय पावरबाज हाये म्हणत्यात -रामा.
कसला पावरबाज नि कसलं काय उगाच लोकांना घाबरवून पैसे गोळा करत असतो.-निरंजन
बघू दोन दिवसात कळलंच मांत्रिकाचा गुण नाय आला तर आपणच काही तरी करू -शिवा
यावर सर्वांनी माना डोलावल्या.
जेवणाची वेळ झाली म्हणून ते सर्व टेकडी उतरून आपापल्या घराकडे निघाले.

रात्री बरोबर बरा वाजता श्यामरावांच्या दारावर टकटक झाली. त्या थोड्या आवाजानेही सदा घाबरून ओरडला. घरातले सगळे घाबरून जागे झाले व सदाच्या खोलीकडे धावत सुटले. खोलीमध्ये सदाला दिनकररावांनी पोटाशी धरले होते नि ते त्याला शांत करत होते. घरातले सगळे एकदम घ्ररात शिरले व काय झाले म्हणून विचारू लागले. त्यांच्या गलक्याने सदा अजूनच कावराबावरा झाला. त्याने दिनकररावांना गच्च धरले. त्याची अवस्था पाहून दिनकरराव सगळ्यांच्यावर कातावले.
आरे काय लहान्या पोरांवणी करता सगळे, पोर किती घाबरलय तुमच्या आश्या वागण्याने.
आवो पण काय झालंय ते सांगाना सदाची आई रडत म्हणाली.
वाहिनी काही झालेले नाही दार वाजवतंय कोणीतरी त्या आवाजाने हा घाबरलाय .......
दादा तू जाऊन बघ बर बाहेर कोण हाय ते , श्यामरावांकडे बघत दिनकरराव म्हणाले.
श्यामराव बाहेरून आले व बायांना म्हणाले- तुम्ही पोरांना घेऊन जा बरं आपापल्या खोलीत जरा महत्वाचं काम हाय.
बाया सगळी पोरं घेऊन आत गेल्या.
दिनकररावांनी प्रश्नार्थक नजरेने शामरावांकडे पहिले व काय म्हणून विचारले.
श्यामराव हळू आवाजात सांगू लागले .... राघू महाराजांनी उतारा घेऊन माणूस पाठवलाय.
इतका राच्चा हि काय येळ हाय का ?
हीच येळ हाय म्हणतोय तो -शामराव
बरं बरं ठीक हाय आणा त्याला मी सदाला दारात घेतो.

उतारा टाकून तीन दिवस झाले तरी सदामध्ये काही फरक पडला नाही. फक्त पहिले तो काही खात-पीत नव्हता नि आता बळे बळे चारल्यानंतर चार घास खायचा . बाकी अजून तो काहीच बोलत नव्हता.सारखा घाबरायचा. रात्रीचा घाबरून ओरडायचा व पळत सुटायचा.
दिनकरराव व श्यामराव हतबल झाले होते. मांत्रिकाने पाच हजाराला चुना लावला होता. पाच हजार जावूनही पोरात फरक काही झाला नव्हता. दोघा भावांना काय करावे ते सुचत नव्हते.
दिनकररावांनी सदाच्या कॉलेजला पत्र टाकून सदा आजारी असल्याचे कळवले होते. तो दोन महिने तरी कॉलेजला येणार नाही म्हणून लिहिले होते.

साडे चारची एस टी फाट्यावर थांबली. तिच्यातून तीनचार गावकरी उतरले व त्यांच्या पाठोपाठ ते तिघे तरुण उतरले. त्यांना पाहताच फाट्यावरील सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या. गावात पहिल्यांदाच दिसणारी हि तरुण पोरं कुणाकडे आली असतील हा प्रश्न सर्वांना पडला होता. उत्तरासाठी त्यांना जास्त वाट पाहायला लागली नाही. चहाच्या टपरीवाल्याला ती पोरं विचारात होती.
काका सदाशिव पवार कुठे राहतो.
टपरीवाल्याने त्यांच्याकडे चांगले खालीवर पहिले नि बाजूला पिचकारी टाकली आणि म्हणाला.
ह्या रस्त्याने सरळ जावा गावात शिरल्यानंतर पार लागल तिथं गेल्यावर कुणालाही विचारा बारीक पॉर सुद्धा नेऊन सोडीन तुम्हाला .....एवढं सांगून टपरीवाल्याने विचारले -
कोणच्या गावाचं पाव्हनं
काका आम्ही सदाच्या कॉलेजातले आहोत तो आजारी असल्याचे कळले म्हणून भेटायला आलोत.
बरं बरं जावा हाय घरीच तो.
त्या तिघांनी गावाचा रस्ता धरला

रात्री जेवण झाल्यानंतर सदाच्या खोलीत दिनकरराव, श्यामराव, सदाचे मित्र वैभव, स्वप्नील,आणि हेमंत हे बसले होते. सदाने त्यांना ओळखले नव्हते आपल्या मित्राची अशी अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटले होते. त्यांनी काय झाले हे विचारल्यानंतर दिनकररावांनी सारी हकीकत सांगितली होती.
काका तुम्ही त्याला शहरात घेऊन यायला पाहिजे होते. तिथे आपण चांगल्या डॉक्टरला दाखविले असते -वैभव म्हणाला.
पर बाळा तो काय आजारी नव्हता , डाक्तर क आणून काय झालं असतं तो तर लागीर्लाय नव्ह श्यामराव म्हणाले.
लागीरनं भूतं लागणे हे सर्व खोटे आहे काका, पिढ्यान पिढ्या चाललेल्या ह्या तुमच्या अंधश्रद्धा आहेत.
बघा पोराणु आम्ही अडाणी माणसं हा सदा सुद्धा तुमच्या सारखाच विचार करत होता. आणि त्या पायीच तो मसणात गेला नि हा उद्योग झाला.
ते काहीही असू ध्या काका पण आमचं तुम्ही ऐका त्याला डॉक्टरकडे घेऊन चला हेमंत म्हणाला.
डाक्तर काय करणार हाय असल्या केसला -दिनकरराव
काका नाहीतरी तुमच्या त्या मांत्रिकाने तरी काय फरक पडलाय ......काही नाही तुम्ही त्याला घेऊन आमच्या बरोबर चलाच स्वप्नील म्हणाला.
बरं बाबानु तुम्ही म्हनताय तर पाहू हा पिन उपाय करून

दुसऱ्या दिवशी दहाच्या एस टी सदाला घेऊन ते सर्वजण शहरात गेले-----
शहरात चांगले पाच दिवस उपचार घेऊनही काही फरक न पडल्यामुळे सदाला घेऊन दिनकरराव व श्यामराव परत गावाला आले. नि देवरुशी, भगत , मांत्रिक यांचे उंबरे झिजवू लागले. सगळ्यांनी आपापल्या परीने चांगला पैसा उकळला परंतु सदाला चांगला बरा कोणीच करू शकले नाही. पैसा जाऊनही पोरगं बरं झालं नाही म्हणून सदाचे चुलता व वडील दोघेही हताश झाले. त्यांना काय करावे ते समझेना.
वडील व चूलत्यानंतर सदाची काळजी वाटणारे होते ते म्हणजे सदाचे गावातील मित्र

भर उन्हाचे ते दोघे रस्ता तुडवत होते. त्यांनी गावाचा सपाट शिवार सोडला आणि ते डोंगराच्या बाजूला सरकले. त्यांना आता थोडे बर वाटत होते कारण जंगल चालू झाले होते नि घनदाट झाडीमुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. झऱ्याचे पाणी प्यायल्यानंतर त्यांना बरे वाटले. हाशहुष करत व रुमालाने तोंड पुसत रामाने निरंजनाला विचारले भाऊ सकाळपासून आपण शोधतोय पण सापडणा झालीय कुठं गेली असलं.
रामा इथेच कुठेतरी जंगलात असेल रात्री खूप उशीर झाल्यामुळे इकडे आलो नाही. नाहीतर सापडली असती.या बाजूला ती गेल्याचे विसुभाउणी पाहिलंय.
पर रात्रीतरी घरी यायला पाहिजे होती.ना?
व्यायला झालीय म्हणून काळजी वाटते नाहीतर तिला शोधली सुद्धा नसती आणि आमच्या साऱ्या जनावरात ती गाय खूप गुणी आहे. आतापर्यंत पाच चांगले बैल तिने दिले आहेत शिवाय दूधही खूप देते.
आता आपण एवढं आलोय तर हा जंगलाचा भाग चालूनच काढू बघू सापडतीय का?-रामा
हा चल पटापट पाहून घेऊ तुला उगाच माझ्यामुळे त्रास झाला.
कशाचा त्रास रे भाऊ मैत्रीखात्यात एवढ चालायचंच........ असे म्हणून तो व त्याच्या पाठी झाडांना चुकवत डोंगर चढू लागले.
त्या घनदाट जंगलातून गाईला शोधात फिरताना त्यांना थोडी भीतीदेखील वाटत होती. परंतु एकाला दोघे असल्यामुळे ते जरा बिनधास्त होते. शिवाय निरंजनकडे कुर्हाड आणि रामाकडे मोठी काठी होती.
. . माथ्याचा भाग पाहून झाल्यावर ते एका दरीत उतरले अतिशय दाट झाडी असणाऱ्या या भागांत शक्यतो कोणीही जात नव्हते. जंगली प्राण्यांबरोबर मोठाले साप तेथे होते. त्या घनदाट भागांत शिरावे कि शिरू नये असा प्रश्न दोघांनाही पडला.
आयला भाऊ लयच दाट झाडी हाये रे -रामा
काय करायचे जायचे का नाय आत -निरंजन
बाकी सगळा भाग आपण शोधलाय गाई काय सापडली नाय एखाद्या येळला गाई ह्या दाट भागातच असणार -रामा
मलाही तसंच वाटतंय पण ह्या भागांत शिरायचे म्हणाल्यावर भीती पण वाटती -निरंजन
आपण दोघं हाय शिवाय दोघांकडे हत्यारं बी हाये आत काय फार फार तर एखादं जनवार असल आलं अंगावर तर बघू -रामा
चलायचं म्हणतो मग -निरंजन
चल जाऊ
असं म्हणून ते दोघेही त्या घनदाट भागांत शिरले. दुपारची वेळ असल्यामुळे शुकाशुकात होता. पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचा तेवढा चरचर आवाज येत होता. सावधपने गाईला शोधत ते पुढे पुढे चालले होते.
दरीचा भाग जवळ जवळ त्यांनी पार केला नि ते दुसऱ्या डोंगराच्या जवळ आले. त्या डोंगरावर खडकाचा भाग जास्त होता त्यामुळे झाडी विरळ झाली होती.
तेवढ्यात त्यांच्या पुढून एक ससा निघाला. सश्याला पहिल्याबरोबर ते दोघेही त्याचा पाठलाग करू लागले. सश्याने त्यांना चांगलेच दमवले. तरीही ते दोघे सश्याचा पाठलाग सोडत नव्हते. ससा पळता पळता एका कपारीत घुसला. रामही त्याच्या पाठी जाण्यासाठी कपारीत शिरण्यासाठी वाकला परंतु दुसऱ्याच क्षणी मागे होऊन उभा राहिला. निरंजनने त्याला विचारले काय झाले रे ...
भाऊ हि काय साधी कपार वाटत नाही आत लयच मोठी जागा दिसतेय मला तर वाटते हि गुहाच असणार.
पण आतापर्यंत हि गुहा कोणाला दिसलेली दिसत नाही. कारण गावात ह्या भागात गुहा असलेले कोणी बोलले नाही.
अरे नीट बघ भाऊ आपण कोठे आलोय ह्या भागात गावातले कोणीही आलेले नसणार कधी कसला भयाण भाग वाटतोय हा.
खरंय तुझं निरंजन म्हणाला आपण सश्याच्या नादाने इकडे आलो नाहीतर आपण तरी कशाला असल्या ठिकाणी येतोय चल निघू लगीच .
मला तर वाटतेय भाऊ, आपण आत डोकावून पाहू नवीन गुहेचा शोध लागलाय आत काय हाये ते तरी कळेल.
डोकं बिकं फिरलंय का रामा तुझं, माहित नसलेल्या गुहेत शिरायचं आणि आत एखादं वाघरू बिघरू असलं म्हणजे.
आपल्या शिवारात आतापर्यंत एकही वाघ दिसलेला नाही. आणि दुसरं काय असलं तर तुझ्या हातात कुर्हाड हायेच कि.
बघ बरं नाहीतर दुसराच भलता उद्योग व्हायचा. चल बघू डोकावून पण सावध राहा थोडा जरी धोका वाटला तरी पळायला सावध राहा.
कुर्हाड दे माह्या हातात न तू माझ्या मागून ये.
दोघेही खाली वाकून घुडग्यावर रांगत पुढे सरकू लागले. ते जसे पुढे सरकत राहिले तसतसा उजेड कमी होऊन अंधार वाढू लागला.
थोडे पुढे सरकल्यानंतर त्यांना ती खूप मोठी गुहा दिसली. आणि गुहेत मंद प्रकाश देखील होता . त्यांना प्रश्न पडला कि आतापर्यंत हि माहित नसलेली गुहा नसलेली गुहा होती. आतमध्ये अंधाराच्या एवजी उजेड कसा काय? गुहेत वापर कोणाचा आहे? कोणी चोर दरोडेखोर तर नाहीत न?
निरंजनने रामाला थांबवले व दबक्या आवाजात म्हणाला .
रामा, थांब आत उजेड आहे कोणीतरी असणार इथे.
पण एवढ्या खतरनाक जागेत कोण असल
कोणीही असू शकते चोर दरोडेखोर किंवा अजून कोणी.
त्यांची दबक्या आवाजातील चर्चा चालू असतानाच त्यांना धीरगंभीर आवाजात कोणीतरी मंत्र म्हणाल्याचा आवाज आला . मंत्राचा आवाज आला आणि त्यांच्या मनात असलेली भीती कमी झाली .
दोघेही पुढे सरकले आणि त्यांना दिसले कि एका मृगाजिनावर एक अतिशय तेजपुंज तपस्वी बसलेले आहेत. व ते कसला तरी मंत्र म्हणतात. ते थोडे जवळ येऊन तिथेच थांबले.
थोड्याच वेळात त्या तपस्वींनी डोळे उघडले त्यांच्याकडे पाहून मंद स्मित केले.
निरंजन व रामा या दोघांनीही पुढे होऊन त्यांना नमस्कार केला.त्या तपस्वींनी 'आयुष्यमान भव' म्हणून आशीर्वाद दिला व म्हणाले -आज अकरा वर्षे झाली. दर चैत्र महिन्यात मी इथे वास्तव्यास येत असतो. अतिशय सुंदर, शांत असणारे हे ठिकाण माझे आवडते आहे. परंतु या परिसरातील कोणालाही याजागेबाबत माहिती नाही. तुम्ही कसे पोचला या ठिकाणी .
महाराज, निरंजन नम्रपणे म्हणाला -आम्ही आमची गाय शोधत होतो तेवढ्यात एक ससा दिसला त्याचा पाठलाग करताना आम्हाला या गुहेचा तपास लागला आणि तुमचे दर्शन झाले.आपण कोण आहात कृपा करून सांगाल काय?
या देहाला शिवदास म्हणतात, वर्षातले अकरा महिने आम्ही तीर्थयात्रा करतो व एक महिना या गुहेत येऊन साधना करत असतो.
तुम्ही एवढ्या वर्षे इथे येत असता आणि आमच्या गावाला याचा अजूनदेखील पत्ता नाही हे एक आश्चर्यच म्हणवे लागेल -निरंजन.
मुलांनो हि गुहाच आजवर कोणाला माहित नाही म्हटल्यावर मी कसा माहित पडेन. शिवाय लोकांना जर समझले तर माझ्या एकांतवासात व्यत्यय येईल.
परंतु महाराज आपल्या पवित्र दर्शनाला आमचे गाव मुकले ना?
तुझे खरे आहे बाळ, परंतु योग्य आल्याशिवाय मी लोकांतात येणार नव्हतो. आता ती वेळ आली म्हणूनच तुम्हाला या गुहेचा शोध लागला.
तर महाराज आपण गावात येऊन आमच्या गावातील लोकांना दर्शन द्या खूप चांगला गाव आहे आमचा, तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी निरंजन हात जोडत म्हणाला.
त्यावर शिवदास बाबा म्हणाले. बाळांनो मी नक्कीच गावात येईल परंतु थोडे थांबा चार पाच दिवसात मी गावात येईन.
जशी आपली इच्छा बाबा, परंतु एक विनंती होती. निरंजन म्हणाला.
बोल.
आमचा एक सदा म्हणून मित्र आहे असे म्हणून निरंजन ने सदाची सारी हकीकत सांगितली, व त्याला बरा करण्यासाठी बाबांची विनवणी केली.
ठीक आहे उद्या त्याला घेऊन या परंतु त्याच्याबरोबर जास्तजन येऊ नका. फक्त एक दोघेजण या, आणि या गोष्टीचा कुणाला पत्ता लागू देऊ नका. या तुम्ही आता असे म्हणून शिवदास बाबांनी डोळे मिटले व ते ध्यानस्थ झाले.
दोघांनी त्यांना नमस्कार केला व गुहेबाहेर पडले.

रात्री नऊ वाजता निरंजन व रामा सदाच्या घरी गेले. सदाच्या चुलत्याने त्यांच्याकडे रागाने बघतच घरात घेतले. या पोरानंपायीच आपल्या सदाची हि अवस्था झाली असे सदाच्या घरच्या सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे ते सदाच्या सगळ्या मित्रांना शिव्या घालत होते.
घरात आल्या आल्या दिनकरराव म्हणाले- झाला एवढा खेळ बास झाला, आता आमच्या घरी येऊन नवीन काय वाटोळे करायचं राहिलय
काका तुमचा आम्हा पोरांवर राग आहे हे आम्हाला माहित आहे. जे घडलं ते घडलं पण तेच उगाळून काय होणार आहे त्यापेक्षा तो कसा बरा होईल हे पाहायला पाहिजे.आणि तो आमचा चांगला मित्र आहे. पोरांनी सुरुवातीला पैंज लावली होती हे जरी खरे असले तरी,नंतर त्याला स्मशानात जाऊ नको म्हणून सांगितले होते. जे घडायला नको होते ते घडलेच आहे त्याच्यावर वाद घालीत बसण्यापेक्षा त्याला बरा करण्यासाठी काहीतरी करू.
आम्ही तर सगळं काही करून बसलो. श्यामराव हताशपणे म्हणाले. एवढ सारं करून पोरगं काय हाताला लागणा काय हुणार हाय कुणास ठाऊक?
काका धीर सोडू नका उपाय सापडलाय म्हणून तर इतक्या राच्च आम्ही आलोय.
उपाय सापडला हे शब्द ऐकताच दोघाही भावांच्या चेह-रावर आशेची टवटवी दिसू लागली. दिनकर राव लगेच म्हणाले.
सांगा पोरांनू लगीच, काय बी उपाय असू द्या नि कितीबी खर्च येउद्या पर आमचा सदा तेवढा नीट होऊद्या. रागाच्या भरात बोल्लेलो मनावर घेऊ नका. सदाच्या काळजीने पर डोस्क कामातून गेलय.
त्यानंतर निरंजन ने गुहेत गेल्यापासून सर्व हकीकत सांगितली. व उद्या आपण सदाला घेऊन जाऊ असेही सांगितले.
आपल्या गावात अशी गुहा आहे कि ती आजवर कुणालाच दिसली नाही. हे ऐकून दोघा भावांना आश्चर्य वाटले नि त्या बरोबर सदा नक्कीच बरा होईल हि आशाही.

गुहेत शिरताना सदाने खूपच त्रास दिला मोठ्याने ओरडू लागला नि पळून जायचा प्रयत्न करू लागला. परंतु निरंजन नि रामाने त्याला सोडला नाही. ताकतीचा वापर करूनच त्याला ओढतच त्यांनी आत नेला. दिनकरराव, श्यामराव तर गुहा बघून हबकूनच गेले होते . मांत्रिकाच्या गुहेत आणि या गुहेत खूपच फरक होता. मांत्रिकाच्या गुहेत उग्र वास यायचा व भीती वाटायची त्या उलट इथे आल्या आल्या मनाला एक प्रकारची शांतता लाभल्यासारखे वाटत होते.
ते पाचही जण आत आले व त्यांनी महाराजांना नमस्कार केला. व सदाला पुढे घेतला महाराजांनी त्याच्याकडे पाहून स्मित केले. सदा त्यांच्याकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने पाहत होता.
महाराज म्हणाले
हे पहा मी याला बरा करतो परंतु याला आजच्या दिवस माझ्याजवळ राहूद्या उद्या तुम्ही या आणि सदाला घेऊन जा.
अश्या वाईट अवस्थेत सदाला तिथे एकटे ठेवायला दिनकरराव व श्यामराव यांची मने तयार होईना. ते चुळबुळ करू लागले.
तेव्हा निरंजन महाराजांना म्हणाला- महाराज, आमच्यापैकी कोणी याच्या सोबत राहिले तर नाही का चालणार?
नाही, मला काही विशेष प्रयोग करायचे आहेत. आणि त्या वेळी इथे कोणीही नको आहे. तुम्ही याला घ्यायला उद्या याल तेव्हा हा सर्वांना ओळखत असेल हि खात्री मी देतो.
जशी आपली इच्छा महाराज आम्ही उद्या येतो. असे म्हणून निरंजनने सर्वांना बाहेर काढले.
बाहेर आल्यावर त्याने सदाच्या चुलत्याची व वडिलांची समझुत काढली. व उद्या आपण लवकर येऊ असे म्हणून ते गावाचा रस्ता चालू लागले.

सदा बरा झाल्याची बातमी गावात झपाट्याने पसरली. सदाला बरे करणारे महाराज उद्या आपल्या गावात येणार आहे हे समजल्यानंतर गावातील बहुतेक सगळ्यांनी आपली कामे रद्द करून गावातच महाराजांच्या दर्शनाला थांबायचे ठरवले.
सदाला एवढ्या मोठ्या भुताच्या तावडीतून सोडवणारे महाराज लय पावरबाज हाय अशी चर्चा आख्ख्या गावात चालली होती. त्यांचं दर्शन घेण्यासाठी काहींनी तर शेजारच्या गावात असणाऱ्या नातेवाईकांना देखील बोलावले होते. त्यामुळेच दुसऱ्यादिवशी गावात असणाऱ्या पाराभोवती भली मोठी गर्दी जमा झाली होती. थोड्याच वेळात निरंजन महाराजांना घेऊन आला. ते पारावर टाकलेल्या सतरंजीवर बसताच त्यांच्या दर्शनासाठी लोकं गडबड करू लागली. गोंधळ होऊ नये म्हणून निरंजन सर्वांना म्हणाला.
सर्वांनी शांत बसावे व बसूनच महाराजांना नमस्कार करावा. महाराज जास्त वेळ थांबणार नाहीत तेव्हा प्रत्येकाला वैयक्तिक दर्शन देता येणार नाही. महाराज दहा मिनिटे आपल्याशी बोलणार आहेत. त्यातूनच ते थोडे मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्वांनी शांतता राखावी.
महाराजांनी बोलायला सुरुवात केली. अगोदर ते अध्यात्मावर बोलले. ईश्वर भक्ती सध्याच्या जीवनात किती गरजेची आहे ते त्यांनी लोकांना पटवून दिले. नंतर त्यांनी सदाचा विषय घेतला.ते म्हणाले
तुम्हा सर्वांना वाटले होते कि सदा स्मशानात गेला तिथे त्याला भूतबाधा झाली.आता तो बरा होणार नाही वैगेरे वैगेरे, तुम्हा सर्वांना मी सांगतो कि सदाला कुठलीही भूतबाधा झाली नव्हती. तो फक्त प्रमाणाबाहेर घाबरला होता. त्याचा परिणाम त्याच्या मनावर खोलवर झाला होता. त्यामुळे त्याची अवस्था अशी झाली होती. त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढल्यानंतर मी त्याच्याशी खूप चर्चा केली. त्याचे विचार खूपच चांगले आहेत. आपल्या समाजात खोट्या अंध श्रदधे पायी समाजाची खरोखर अधोगती झाली आहे.
देवाला बळी देणे हि सुद्धा एक प्रकारची अंध श्रद्धा आहे ज्या जीवाला देवाने जन्म दिला त्याच जीवाचा बळी तो देव कश्याला मागेल. देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींवर श्रद्धा हवीच परंतु ती डोळस असायला हवी. कुणाही भगताच्या, मांत्रिकाच्या नदी लागून तुम्ही स्वताचे नुकसान करून घेऊ नका.
महाराज, शिवाने मध्येच प्रश्न केला - भुते-खेटे आहेत का नाहीत भूतांचे असणे आम्ही मानावे कि नाही. कारण ज्या ग्रंथान्मधून देवांचे वर्णन आहे त्याच ग्रंथामध्ये भूतांचाही उल्लेख आहेत.
भुते नाहीत असे मी म्हणत नाही परंतु गैरसमजुतीने व कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी भुताला जन्म देऊ नये. भुतांच्या जेवढ्या घटना सांगितल्या जातात किंवा घडतात त्यापैकी हजारामागे एखादीच खरी असते. परंतु त्या सगळ्याच खऱ्या आहेत असे समझुन आपण मांत्रिकांचे नि भगतांचे खिसे भरत असतो ह्या गोष्टीला माझा विरोध आहे.
मग तुम्ही म्हणता सदा घाबरला पण तो काहीतरी दिसले म्हणूनच घाबरलाना ? मग त्याला दिसणारे भूत असू शकते.
नाही त्याला काय झाले हे पाहण्यासाठी मला माझ्या दिव्य दृष्टीचा वापर करावा लागला . त्यात मला असे दिसून आले कि सदा एक तास भर फक्त भूतांचाच विचार करत होता. त्यामुळे त्याचे भीतीचे प्रमाण वाढत होते. ज्यावेळी तो खूप घाबरला नेमके त्याच वेळी रानमांजराने तिथे उडी मारली. भूतानेच उडी मारली असे सदाला वाटले. नि तो पळत सुटला. एकंदरीत अतिभयाने त्याची अशी अवस्था झाली होती.
महाराज आम्हाला तर आता असा प्रश्न पडतो कि दिव्यदृष्टी, अंतरज्ञान, ह्या ज्या शक्ती आहेत त्यावर तरी कसा विश्वास ठेवावा. निरंजन म्हणाला.
हे पहा ह्या ज्या दिव्य शक्ती आहेत त्या म्हणजे चमत्कार नव्हे, त्या दिव्य विद्या आहेत. त्या प्रकारची खडतर साधना केल्यानंतर त्या प्राप्त होत्यात मला माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने व माझ्या साधनेमुळे काही दिव्य विद्या प्राप्त झाल्या आहेत म्हणून मी सदावर योग्य उपचार केला नि तो त्या भयंकर भीतीच्या भोवरयातून बाहेर पडला.
तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला परंतु श्रद्धा-अंधश्रद्धा यात खूप कमी अंतर आहे ते आम्हा खेडेगावाच्या लोकांना कस कळणार. निरंजन म्हणाला.
डोळसपने जी कृती आपण करतो ती श्रद्धा होय नि सारासार विवेकाचा विचार न करता अंधपणाने केलेली कृती म्हणजे अंधश्रद्धा होय .याच्यावर खूप काही बोलता येईल परंतु मला हिमालयात निघून येण्याचे आदेश आले आहेत वेळ कमी असल्यामुळे या सर्व गोष्टी मी सदाला कालच सांगितल्या आहेत. पुढच्या महिन्यापासून विठ्ठल मंदिरात सदा काही चांगल्या ग्रंथांचे वाचन चालू करणार आहे. वाचत असताना अर्थ सांगताना तो तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा यावर चांगले मार्गदर्शन करेल.

ह्या धाग्यावर अनुभव लिहायचे आहेत की इकडे - तिकडे वाचलेल्या गोष्टी टायपाच्या आहेत ???????
का लिंका द्यायच्या आहेत ???? वाचनाच्या लिंका मी वाचलेले पुस्तक मधे पण देऊ शकतो न.
तुम्ही वाचलेली गोष्ट लेखक आनि पुस्तकाच नाव लिहु शकता ना ????
आशुचँप वर काहीतरी स्पेसिफीक लिह न.. नक्की काय करायच आहे ?????
नाहीतर अजुन १०० लिंका आनि गोष्टी इथे टाकल्या जातील.

इथे तुम्हाला किंवा तुमच्या मित्र मंडळीपैकी, कुटुंबियापैकी कुणाला आलेले अमानविय अनुभव सांगणे अपेक्षीत आहे......
कृपया सांगोवांगीच्या गोष्टी, पुस्तकातल्या कथा आणि आंतरजालावरच्या घटना सांगणे टाळावे....

माझ्या आईला तिच्या लहानपणी आलेला एक विचित्र अनुभव लिहित आहे.

माझी आई कोकणातील एका खेड्यात जन्मली आणि शिकली. ती शाळेत असताना (साधारणत: बारा चौदा वर्षाची असताना) कपडे धुण्यासाठी व्हाळावर (ओढ्यावर) जात होती. बरोबर तिच्याच वयाची आणखी एक मुलगी होती. हा रोजचा कार्यक्रम होता त्यामुळे त्यात नवीन काही नव्हते. पाउलवाटेने जाताना अचानक यांच्या दिशेने दगड येऊ लागले . आई व तिची मैत्रीण दोघीही घाबरल्या. एका बाजूला उंच झाडे होती आणि दुसर्या बाजूला थोडी मोकळी शेत जमीन होती. दगड झाडावरून येत होते. लपायला जागा नव्हती. कोण दगड मारत आहे ते काही दिसत नव्हते. झाडावर कोणीही दिसत नव्हते.

उंचावरून येणारे ते दगड अधिकच जोरात येऊ लागल्यावर आईने हातातील कपड्यांची टोपली टाकली आणि पळायला सुरुवात केली. पण तिची मैत्रीण मात्र तिथेच उभी राहिली. तिने हातातील टोपली खाली ठेवली आणि तिच्या जवळ आलेले दगड झाडावर मारायला सुरुवात केली. ती ओरडत होती, "तो बघ मेलो. दगड मारता."

आई तिला विचारात होती की कोण आहे - तू कोणाला दगड मारते आहेस? पण मैत्रिणीचे पूर्ण भान हरपले होते आणि ती एका मागून एक दगड झाडांवर मारत होती व ओरडत होती - तो बघ गो. तो मेलो दगड मारता. आईला काही 'तो' दिसत नव्हता. पण मैत्रीण मात्र सांगत होती - "तो काय मेलो चिंचेवर आसा. आता रीन्गीवर गेलो." मैत्रिणीला आईने अक्षरश:खेचत परत आणले. आणि घरी आणि आवाटात सगळ्यांना हा प्रकार सांगितला.

मैत्रिणीची आई लगेच दोघींना ग्रामदेवतेच्या देवळात घेऊन गेली. तिथे देवाला साकडे घातले. त्या नंतरही दोन दिवस आईच्या मैत्रिणीला 'तो' जवळपासच्या झाडावर दिसायचा. ती म्हणायची तो एक दाढीवाला खूप खूप उंच माणूस आहे. मैत्रिणीचे वडील दुसर्या गावी गेले होते. ते आठवड्याने परत आले. ते ग्रामदेवतेच्या देवळात गुरव होते. नंतर त्यांनी काही पूजा अर्चा केली आणि हा प्रकार बंद झाला. माझ्या आईला देव गण असल्याने तो दिसत नव्हता असे सांगण्यात आले. अर्थात मैत्रिणीचा त्रास संपेपर्यंत आईला घरातून बाहेर पडायला पूर्ण बंदी होती. समाप्त.

आता धागा परत चालू व्हायला हरकत नाही.

माझ्या आईला देव गण असल्याने तो दिसत नव्हता असे सांगण्यात आले. >>>>>> उलट आहे. देवगणाला दिसते. राक्षसगणाला इल्ले! Happy

हेम, नाही.

देव गणाला दिसत नाही, त्रास ही होत नाही.
राक्षस गणाला दिसतं, त्रास होत नाही
मनुष्य गणाला दिसतं आणि त्रास ही होतो

असं म्हणतात.

मिलिंद हो मी पण असंच ऐकलंय.

रच्याकने एक पीजे मारू का? अजय देवगणला काही भिती नाही मग Proud

सध्या काय अमानवीयांचा संप वगैरे चालु आहे का?

बर्‍याच दिवसांत काही छान वाचायला मिळालेलं नाही!

नुकतेच गावी (कोकणात) गेलो होतो, त्यावेळी नेहमीप्रमाणे गप्पांची गाडी भुतांच्या स्टेशनावर आली. त्यातले काही किस्से.

आमच्या मामाच्या गावी एक साकव आहे. त्यावरुन कोणे एके काळी एक गरोदर बाई तिन्ही सांजा शेतावरुन येत होती. खाली ओढ्याला पूर आला होता. कसे कोण जाणे ती बाई त्या साकवावरुन पडली आणि वाहत गेली.
तेव्हापासुन तिन्ही सांजाच्या वेळी त्याजागी कोणी जात नाही. कोणी त्यावेळी गेले तर धपकन कोणीतरी पाण्यात पडल्याचा आवाज येतो. मी प्रत्यक्ष नाही ऐकला पण माझ्या आईने देखील तो आवाज ऐकल्याचे सांगितले.

मामाच्या घराच्या मागे एक गडगा ओलांडला की एक घर आहे. त्या घरात एक आजीबाई राहतात. मुले-बाळे मुंबईला स्थायिक. गणपतीत आणि मे महिन्यात काय तो घरात राबता असतो. एरवी या आजी एकट्याच.

लोकांचे आंबे, काजू चोरुन आणणे आणि ते विकणे ही या आजींची वाईट सवय आहे. तेवढेच मनिऑर्डरबरोबरचे उत्पन्न म्हणून करत असतील, म्हणून गावात सर्वांना माहिती असुनही कोणी त्यांना काही बोलत नसे.

एकदा माझी आजी रात्रीच्या जेवणाची भांडी घेऊन मागच्या दाराजवळच्या धुण्याच्या जागी गेली, समोरच त्या आजींचे घर होते. समोर बघते ते काय त्या घरावर कोणीतरी उंच माणसाच्या आकाराचे उभे होते, पण त्याची उंची सामान्या माणसाहून खुप उंच वाटत होती. केस विचित्र पण खांद्यापर्यंत दिसत होते. तो प्रकार पाहून आजीने घाबरुन घरातल्या सर्वांना हाका मारल्या. इतर कोणी मागच्या दारी यायच्या आत त्या आकृतीने त्या घराच्या पलीकडे उडी मारली. पण त्या आधी त्या माणसाहून मोठ्या आकृतीचा आकार एका लहान मुलाएवढा झाला आणि मग त्याने उडी मारली.

दुसर्‍या दिवशी त्या घरातल्या आज्जींना हा प्रकार सांगितला तर त्या म्हणाल्या की त्यांना 'कोणी वर चढले आणि असे वरुन उडी टाकून पळाले असते तर आवाज झाला असता ना? मला काहीच जाणवले नाही'

मग दुपारीच त्या परत आल्या आणि सांगू लागल्या की त्यांनी छपरावर ठेवलेल्या काजूच्या बिया गायब झाल्यात. कदाचित कोणी चोर असावा अशी सर्वांची समजूत झाली.

परत रात्री तो प्रकार, ती आकृती, उडी मारुन गायब होणे, सकाळी "त्या" आजींकडले काजू गायब होणे.

तिसर्‍या दिवशी माझी आजी काही घराबाहेर गेली नाही, पण मावशीने त्या आकृतीला पाहिले. बाकी प्रकार तोच. यावेळी मात्र त्या पाठीमागच्या घरातल्या आजींनी घरातच काजू ठेवले होते, ते गायब झाले.

आता मात्र त्या आजी घाबरल्या. त्यांनी "जाणकार" व्यक्तीच्या सल्ल्याने नारळ छपरावर ठेवला. त्या दिवसापासून हा प्रकार बंद झाला.

ती माणसासारखी आकृती म्हणजे "बाईंगी" प्रकारचे भूत होते. हे भूत अनेक लोक आपल्या बागेच्या राखणीसाठी ठेवतात. जर कोणी अश्या बाईंगीच्या बागेतून चोरी केली तर त्या वस्तू परत मूळ मालकाकडे हे पिशाच्च परत नेते आणि त्या चोरी करणार्‍या व्यक्तीला त्रास, धाक देते.
नंतर त्या आज्जींनी देखील कबूली दिली की त्या एका विशिष्ट व्यक्तीच्या बागेतून काजूच्या बिया चोरुन आणत होत्या.

Pages