अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रत्नागिरीला आमच्या गावच्या घराला गेल्यावर्षी रंगकाम केले. आम्ही सगळे एक एक आठवडा आळीपाळीने गावी राहून आलो. सर्वात शेवटी माझे मोठे दीर राहिले होते. गावी अजिबात कावळे नाहीत. मला या गोष्टीचे नेहेमीच आश्चर्य वाटते.
सर्वात शेवटच्या दिवशी अचानक ४/५ कावळे अंगणात आले. घराभोवती चकरा मारल्या. अंगणात बसून खूप वेळ काव काव करत होते. जसे आले तसे अचानक निघून गेले. घरात पेंटर होते ते म्हणाले की तुमचे पुर्वज येऊन घर बघून गेले.

https://www.youtube.com/watch?v=FUQhNGEu2KA

ही शॉर्ट फिल्म बघा........

( कृपया हृदयविकार असलेल्यांनी आणि भित्रा स्वभाव असलेल्यांनी बघु नये प्लिजच)

<<<<<<<पियू | 25 March, 2014 - 04:41
दुसरा अनुभव वाचुन व.पुंची कथा आठवली.>>>>>

वपुंचं नाव काढू नका इथे. तुम्ही वपु वाचता हे कळलं तर माबो वरच्या अ(नेक)-मानवीय शक्ती तुटून पडतील तुमच्यावर Wink

आशिका,

तुमचा सान फ्रान्सिस्कोचा अनुभव इथे इंग्लंडमध्ये खूप जणांना येतो. आमच्या घरातही रात्री कोणीतरी फिरल्याचा भास होतो. ते जे आहे ते फक्त रात्रीच्या वेळी (१२ नंतरच) आम्ही झोपेत असतांना संडास/बाथरूम वापरतं. जास्त काही नाही. त्याचा आम्हाला काहीही त्रास नाही.

आ.न.,
-गा.पै.

हा काय प्रकार असतो? म्हणजे ह्याची मान कापलेली असते (पॉटर मुव्हीजमध्ये निअरली हेडलेस निक असतो तसा) का ह्याच्या मार्गात आलं की तो मान कापतो?>> स्वप्ना दोन्ही!! Happy असं ऐकलं आहे बुवा! मुंडकं तुटलेला माणूस...

आमच्या लहानपणी असल्या खूप सुरस चमत्कारीत कथांची मेजवानी रात्रीच्या जेवणानंतर असायची... मामा, काका असंच कोणीतरी मध्यभागी आणि आजूबाजूला कोंडाळं करून (भिजलेली पाखरं चिकटून गर्दी करून बसतात तसं) चिल्ले पिल्ले. झोप यायची नाहीच त्या रात्री! तर या मानकाप्याबद्दल ऐकलेली गोष्ट हे काका बाजारात रात्रीचे फिरत होते (एवढ्या रात्री बाजारात कशासाठी कोणास ठाऊक! विचारलेलं वाटते एकाने, त्यावर असंच काहीतरी चमत्कारीक उत्तर मिळालेलं, आणि त्या वेळी ती उत्तरं पटायचीपण चक्क :फिदी:) तर हे स्वतःच्या तंद्रीत चालत असताना सावली पडली अंगावर. समोर पाहतात तो काय! मानकाप्या... त्याचं मुंडकं तुटून पाठीवर लोंबतंय... जखम ताजी ओली... हातात ही भलीमोठी कात्री! नी समोर येईल त्याला गवत कापल्यासारखं कापत पुढे जाणारं धूड...! "मग त्याला दिसतं कसं?" एक चिवचिवता निरागस प्रश्न (नक्कीच माझा असणार! त्यावेळीपण प्रश्न लई पडायचे :फिदी:) तर काकाचं उत्तर " छ्या! दिसत नाही काही... पण आपण घाबरलेलो असतो ना... मग पळत सुटतो आणि मागे तो मानकाप्या!!" मग पुन्हा..."मग तुम्ही कसे वाचलात?" हाच तो प्रश्न हीच ती वेळ ढँटडँण!! (जुयेरेगाच्या धाग्यावरून साभार Happy ) असं हास्य पसरायचं काकाच्या चेहर्‍यावर! "अरे मी एक आयडीया केली... त्या मानकाप्याला काय दिसत नाही... मग मी काय केलं... त्याच्या ढांगांतून बाहेर पडलो नी उलटा पळत सुटलो..." Rofl तेव्हा वाटलेलं काय भार्री आयडीया!! आत्ता सांगितलं असतं अस्लं काहीतरी तर म्हटलं असतं, "नो उल्लू बनाविंग!!" पण धम्माल असायची तो काळ म्हणजे... आत्ता वेडगळपणा वाटणारा तो निरागस काळ पुन्हा हवाहवासा वाटतो... Happy

>>भारतात आई-बाबाचे मत घेतले गेले, रामरक्षा, हनुमान चलिसाचे वाचन झाले पण जैसे थे

ते भूत ख्रिश्चन माणसाचं असेल तर त्याला रामरक्षा, हनुमान चलिसा वगैरे ऐकून आपण घाबरायला पाहिजे असं कसं कळणार? हा माझा जेन्युइन प्रश्न आहे. टीव्हीवर A Haunting वगैरे मध्ये घरात भूत आहे हे कळलं की जनता चर्चमध्ये धाव घेते असं दाखवतात. मग प्रिस्टस येऊन holy water वगैरे शिंपडून बायबल वाचून घर ब्लेस करतात. आता ह्या घरात हिंदू माणूस रहात असेल तर? त्याला हे holy water वगैरे माहित नसणार ना. मग तो ख्रिश्चन भूताला कसा घालवणार? बरं घर ख्रिश्चन माणसाचं पण भूत हिंदू असं असेल तरी पंचाईतच ना. मग काय करतात???

आशिका,
दुसरा अनुभव डरावना आहे.

गामा,
ते जे आहे ते फक्त रात्रीच्या वेळी (१२ नंतरच) आम्ही झोपेत असतांना संडास/बाथरूम वापरतं.>>>>>>> काय करतील बिच्चारे! भुतलोक मध्ये जिथे घरं नसतात राहायला (म्हणुन दुसर्यांच्या घरात किंवा अंगात राहतात) तिथे संडास/बाथरूम कुठे असणार? म्हणुन 'ते' बापडे तुमचा संडास/बाथरूम वापरत असतील. वापरु देत फक्त त्यांना सांगा पाणी जरा नीट घाला राव Wink

@ ड्रीमगर्ल : हो ना किती गंडवायचे आपले मोठे आपल्याला आणि तसल्या गोष्टी ऐकुन पण रात्री झोप नाही यायची Rofl

ते भूत ख्रिश्चन माणसाचं असेल तर त्याला रामरक्षा, हनुमान चलिसा वगैरे ऐकून आपण घाबरायला पाहिजे असं कसं कळणार? हा माझा जेन्युइन प्रश्न आहे............ मला पण हाच प्रश्न पडलेला.

आशिकाच्या दुसर्‍या अनुभवाप्रमाणेच मलाही आला आहे बर्‍याचदा अनुभव. आमचं नुकतंच लग्न झालं होतं... मला रात्री बेडरूमच्या कोपर्‍यात काळोखा ढगासारखा आकार दिसे, बर्‍याचदा जाणीव होत असे कोणीतरी टक लावून बघतेय आपल्याकडे! माझा असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने भास असेल बहुतेक असा विचार करून दुर्लक्ष केलं. पण रोजच असा प्रकार घडू लागल्यावर हळूच एकदा नवर्‍याच्या कानावर घातलं. तो तळकोंकणातला...त्याचा या सगळ्या गोष्टींवर ठाम विश्वास! माझा गण विचारून घेतला त्याने. मनुष्यगणाला हा त्रास होतो अशी माहीतीही दिली. पण काही त्रास नव्हता. एकदा आई आलेली तेव्हाही तिला कोणीतरी पुरूष फिरतोय असा भास होत राहीला. पुढे काही कारणांनी ते घर सोडलं... त्यानंतर जवळपास वर्षभराने पुन्हा ते घर मिळालं... तेव्हा ही हेच भास! जरा जास्तच! यावेळी मला स्पष्ट तो माणूस दिसलेला रात्री फिरताना इतका स्पष्ट की अंगकाठी आणि ड्रेस सांगू शकेन. पुढे अर्णव झाला. तो किचनकडे बघून हसायचा. घरी आम्ही दोघंच मी आणि अर्णव. नवरा उशीरा यायचा. मी हॉलचा लाईट ठेऊन बाकीचे बंद करून बसायचे दिवाळी नको म्हणून... पण अर्णव किचनकडे अंधारात बोटं दाखवत खिदळायला लागल्यापासून मात्र सगळे लाईट सुरू करून बसायला लागले. नंतर नंतर तर स्पष्ट नवर्‍याने किंवा अर्णवने हाका मारल्याचा भास व्हायचा. वास्ताविक दोघं लवकर झोपायचे. मी सिरीयल वै. बघत बसायचे. एकदा नवर्‍याने विचारलं कोणाशी बोलत होतीस एकटीच, तर मी म्हणाले अरे आत्ताच नाही का तू बोलवत होतास बास झालं आता झोपा म्हणून... तर तो म्हणाला अगं आत्ताच उठलोय तहान लागली म्हणून..!

एकदोनदा अर्णवही भिंतीच्या त्या विशिष्ट कोपर्‍याकडे हात दाखवून म्हणालेला, तिथला भुवा मला ह्म्म्म्म्म असं करून ओरडला! तोच तो कोपरा जिथे मला सुरूवातीला भास व्हायचे. नवर्‍यालाही एकदा अर्णवशी खेळताना मागून कोणीतरी खांद्यावरून डोकावून बघतेय असा भास झालेला.

या भासांव्यतिरिक्त काहीही त्रास झाला नाही उलट या घरात आमचं चांगलंच झालंय (मुख्य दरवाजा दक्षिणेकडे असून!) नवर्‍याला सिंगापूरला जायचा चान्स आला, रमोशन झालं, नवीन घरातून इथे आल्यावर दुसर्‍याच दिवशी समजलं की (अर्णवच्या वेळी) टेस्ट पॉझिटिव्ह आहे.... त्यामुळे आम्ही सगळेही अजून तरी गुण्यागोविंदाने नांदतोय. घरमालक कधीकाळी हा फ्लॅट विकेल या आशेवर आहोत. प्रेमातच पडलीये मी या फ्लॅटच्या! दुसरं नवीन घर अज्जीबातच लाभलं नव्हतं अतोनात आर्थीक मानसिक नुकसान, त्रास सहन करावा लागलेला. त्यामुळे या घराचेही काही ऋणानुबंध आहेत आमच्याशी असं वाटतंय Happy

dreamgirl __/\__ मी काही अश्या घरात टिकले नसते. सारखं कोणीतरी आपल्याला बघतंय म्हणजे काय.....साला प्रायव्हसी म्हणून नाही की Proud पण ऑन अ सिरियस नोट, मी कधीच घर सोडलं असतं.

आशिका आणी ड्रिमगर्ल काय भन्नाट अनूभव आहेत तुमचे. ड्रिमगर्ल तू महान आहेस. माझी तर ततपप होईल असले काय अनूभवल्यावर. बहुतेक, मी जी तिथुन पळुन गेले असते, ते पुन्हा कधी उगवलेच नसते तसे बघीतल्यावर.

हीच ती वेळ ढँटडँण!! (जुयेरेगाच्या धाग्यावरून साभार >>>>>> हे जुयेरेगा काय आहे?:अओ: तिकडे ती झन्पी पण सान्गेना, विचारले तर. फक्त बेफिकीरना म्हणाली जुयेरेगावर जा.

.

या भासाव्यतिरिक्त ...>>>>

आइशपत्थ्थ ...मला तर भासच पुरेसे आहेत हार्ट अटॅक यायला .

माझा लेक लहान असताना छ्ताकडे नजर लावून बघायचा आणि हसायचा किन्वा कोपर्याकडे बघून खिदळायाचा तर मी जाम घाबरायचे .

नवरा वैतगायचा कारण त्या घरात सासु -सासरे ४० वर्शापासून रहात होते .

आजही मी नविन घरात एकटी असेन तर टीवी चालू ठेवूनच इकडेतिकड फिरत असते . शान्तता असली की मी फार अस्वस्थ होते

बाकी काही त्रास नाहीये ना... बहुदा त्या वास्तूपुरूषाला मोठे आवाज वै. आवडत नसावेत... टिव्ही वगैरे बंद करून चक्क नवर्‍याच्या आवाजात दम देणे म्हणजे... Happy पण ते घर लाभलं हे मात्र खरंच. कदाचित असं वाटतंय की आशिकाच्या दुसर्‍या अनुभवातल्या प्रमाणे आमच्या वास्तुपुरूषालाही आमची सोबत आवडत असावी. नव्या घरात त्रास व्हायला लागल्यावर नवरा हताशपणे कित्येकदा म्हणालेला जुनं घर परत मिळायला हवंय यार! आणि थोड्याच दिवसांमध्ये आमच्या जुन्या शेजारणीने सांगितलं त्या घरी कधी येताय रहायला? तो भाडेकरू गेला कायमसाठी गावी! त्याच्या गावी काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय. आता मुंबईतला नवीन धंद्याचा बसाबसाया सेटअप तडकाफडकी सोडून कायमसाठी तो गावी जातोय काय आणि अचानक पुन्हा आम्हाला ते घर मिळतंय काय!! योग असतात!

एकदा अर्णव किचनकडे बघून हसताना आणि नवर्‍याने सांगितलं मी नव्हतो तुझ्याशी बोलत तेव्हा दोनदा माझी जाम म्हणजे जाम टरकली होती. खोटं कशाला बोला Happy

रश्मी, अगं जुळून येती रेशीमगाठी मध्ये एकीने लिहीलेलं गं हे वाक्य पुढची स्टोरी प्रेडीक्ट करण्यासाठी. मागची पाने चाळ त्या धाग्यावरची Happy

dreamgirl -----^----- साष्टांग दंडवत तुम्हाला.
मला तर वाचुनच अंगावर काट्यांचं झाड आलय.

dreamgirl >> +१ मी पण राहीन असा घरी..वास्तुपुरुष जागृत आहे.. तेच घर विकत घेतलं तर वास्तुशांती करुन घ्या...

ड्रिमे, ____/\____
घर बिर सोडुन जाणं राहू द्या . मला अ‍ॅटॅकच आला असता Uhoh
मागे शाळेत असताना एक गोष्ट वाचलेली भुताची त्यात वाक्य होतं की "तीने एकटेपणा घालवायला रेडिओ लावला. म्हणजे कोणाची तरी सोबत आहे असं वाटावं म्हनून आणि ती चरकली कारण तिला कोणाच्या तरी असण्याचे भास आधीपासुनच होत होते. तिथे कोणी तरी होतंच"

तेंव्हापासून घरात असताना टिव्ही, रेडिओ लावणं अशक्यच! बिग नो! लगेच ते वाक्य आठवतं!
इतके वर्ष झाले तरी नुसतं वाचलेलं आठवुन वाट लागते तर अनुभवल्यावर तर काय होईल माझं Uhoh

१४९९

१५००

Pages