अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर वाचूनच असे वाटायला लागले कि माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे आणि माझ्याकडे बघतेय>> शलाका, अमानवीय धाग्यावर पण असे रोमातले अमानवीय असतीलच की... जे आत्ताही पाहत असतील तुझ्याकडे Happy Light 1

मित्रानो ....
अपेक्षेप्रमाणे मला येणारा अनुभव "सार्वजनिक" आहे हे ऐकून बरे वाटले ...
(आपली Light गेल्यावर वाईट वाटत पण सगळ्या बिल्डींगची गेली असेल तर बर वाटत ---त्या type च बर बर का !!) Happy Happy Happy

मला "मिती" विषयी लिहायचे आहे.... दुसरा धागा सुरु करावा लागेल वाटत... (कसा करतात माहित नाही यार ) ..मिती म्हणजे विंग्रजी मध्ये त्याला Dimention म्हणतात बर का .....

काही शास्त्रज्ञ म्हणतात कि जर आपण राहतो त्या मिती पेक्षा दुसऱ्या मितीमध्ये प्रवेश केला तर एक वेगळ जग अनुभवत येयील .....

(बर तेवढ नवीन धाग्याच सांगा राव ....)

आपण नेहमी प्रमाणे काम करत असताना ...किवा घरी बसलो असताना ....अचानक आपल्याला अस वाटत कि हे जे आता चाललंय हे सगळ आधीच घडून गेलाय ... अगदी तो प्रसंग चालू असताना असाच वाटत राहत>>>>>>> ह्याला डेजा-वु असं म्हणतात बरेचदा तर तुम्ही आता पुढे दोन मिनिटांच्या अंतरात (वेळेत) पुढे कात घडणार आहे किंवा कोण काय बोलेल आणि त्यावर कोण काय उत्तर देईल हे सुद्धा सांगू शकता किंवा हे असच घडेल याबाबत मनात ठाम असता आणि ते तसंच घडतं …. हे त्या क्षणी अतिशय माइंड ब्लोविंग वगैरे वाटत असले तरी डेजा-वु चे किस्से आपल्याला स्वप्नांसारखे लक्षात राहत नाही …. हे सर्व अस घडण्य मागे अतिशय strong असं सायन्स आहे ….

काही शास्त्रज्ञ म्हणतात कि जर आपण राहतो त्या मिती पेक्षा दुसऱ्या मितीमध्ये प्रवेश केला तर एक वेगळ जग अनुभवत येयील >>>>>> माझा Intrest चा विषय पण तेवढाच मला त्रास देणारा … मी बरच वाचलंय या बाबतीत आणि अजूनही अश्या विषयाशी संबंधित पुस्तकांच्या, ब्लॉग अथवा लेखांच्या शोधात असते … तुम्ही नवा बीबी उघडलात कि कळवा नक्की प्लीज

मयी, मी बरच वाचलंय या बाबतीत आणि अजूनही अश्या विषयाशी संबंधित पुस्तकांच्या, ब्लॉग अथवा लेखांच्या शोधात असते …>> तुझ्याकडून या विषयावरील माहीती घ्यायला नक्की आवडेल. अर्थात नवीन धाग्यावर Happy

कॉलेजला पुण्याला असताना मी पेइंग गेस्ट/कॉट बेसिस वर राहायचे. घरमालकांचं कुटुंब खाली राहायचं, वर समोरासमोर दोन खोल्यांमधे आम्ही मुली राहायचो. तशीच खालीपण एक खोली होती, त्यात दोन मुली राहायच्या. एकदा पी. एल. मधे मी रात्री अभ्यास करत बसले होते. रात्रीचा एक वाजला होता. माझी कॉट भिंतीला लागून होती, त्या भिंतीतून अचानक घोरण्याचा आवाज येउ लागला. रूममेट झोपली होती पण ती घोरत नव्हती. समोरच्या रूममधे त्या रात्री कुणीच नव्हतं हे मला माहिती होतं, खालच्या रूममधून आवाज येत असेल असं म्हणून मी पुस्तक बंद करून झोपले. त्यानंतर खूप दिवसांनी एकदा असंच रात्री उशीरापर्यंत आम्ही तिघी जाग्या होतो आणि परत एकदा मला असा भिंतीतून घोरण्याचा आवाज येउ लागला. मी मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांनी आधी मला वेड्यात काढलं पण माझ्या कॉटवर बसून आवाज ऐकल्यावर त्या टरकल्या, कारण त्या दिवशी खालच्या रूममधे कुणीच नव्हतं, हे आम्हाला माहिती होतं । आणि समोरच्या रूममधली मुलगी आमच्याबरोबरच होती. आधीही असा आवाज आल्यामुळे यावेळेस मी ठरवलं की या आवाजाचं मूळ शोधायचं . मी खाली जिन्यात जाउन उभी राहिले आणि मैत्रिणीला सांगितलं की आवाज आला की मला सांग. असं ३-४ वेळा केल्यावर लक्षात अालं की समोरच्या बंगल्यातून हा आवाज येतोय. इतका लांबचा आवाज इतक्या स्पष्टपणे भिंतीतून येताना बघून आम्हाला प्रचंड आश्चर्य वाटलं, पण १००% खात्री झाल्यामुळे आम्ही निर्धास्त झोपलो.

याशिवाय आधीच्या होस्टेलला असताना रात्री अचानक पाण्यची मोटर सुरु होणे, गच्चीवर कुणाच्या तरी पावलांचा आवाज येणे हे प्रकार झाले होते, पण त्यांचा त्या त्या वेळी छडा लावता आला नाही.

मला एक स्वप्न पडल ... मी माज्या मुलीसोबत बागेत खेळत आहे... काही वेळानंतर तिथे घंटा वाजवल्यचा आवाज यायला लागला .... २ मिनिट झाले तरी तो बंद नाही झाला .... वैतागून इकडे तिकडे बघितले .....तर ...........तेवढ्यात जाग आली ... आणि कळल कि स्वप्नात ज्यावेळी घंटा वाजत होती त्याचवेळी इकडे (खरा खुरा) गजर वाजत होता.... आता मला एक काळात नाही स्वप्न आणि सत्य ह्या दोन्हीतील या वेगळ्या गोष्टी लिंक कशा की होतात ....

२) आपण नेहमी प्रमाणे काम करत असताना ...किवा घरी बसलो असताना ....अचानक आपल्याला अस वाटत कि हे जे आता चाललंय हे सगळ आधीच घडून गेलाय ... अगदी तो प्रसंग चालू असताना असाच वाटत राहत... आणि काही सेकंदानंतर ती फिलिंग संपते ... ( हा अनुभव ज्यांना आलाय त्यांना जास्त नीट समजेल मला काय म्हणायचं ) >>>>>>> +१०००००००००
हे अनुभव मला रोजच येत असतात

वावे हॉस्टेलला असे बरेच अनुभव येतातच (काय कारण असेल??)
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलचा अनुभव मी या धाग्यावर आधी लिहीलाय की नाही कोणास ठाऊक? पण कारण काय होतं माहीत नाही पण प्रत्येक सेमिस्टरला कॉलेजमधील कमीत कमी एकातरी मुला/मुलीच्या बाबांचं देहावसान व्हायचं. Sad (मी तिथे असताना एकही सेमिस्टर अशी गेली नाहीय की यावेळेस काही घडलं नाहीय) सगळ्या सेमिस्टर्स आम्ही जीव मुठीत घेऊन काढलेल्या. पुढे त्या कॉलेजच्या कर्मचार्‍याकडून समजलं संस्थापकांनी कमी किमतीत मिळतेय म्हणून स्मशानाची जागा घेतलेली, शांती वै. केली नव्हती... योगायोग काय असेल माहीत नाही...

माझ्या बहीणीने तिच्या हॉस्टेलचा अनुभव सांगितलेला... तिच्या मैत्रीणीच्या रूममध्ये अमानवी भास व्हायचे. तिसरी रूमपार्टनर सतत आजारी असल्याने तिचा बेड रिकामाच असायचा. रात्री तिथे धप्पकन बसल्याचे, बेड करकरल्याचे आवाज येत. परीक्षेच्या काळात मैत्रीण एकटीच होती रूमवर म्हणून तिने बहीणीला सोबतीला बोलावले. तर बहीणीला रात्री खुडबुड आवाज आला... नंतर हातावरून डोक्यावरून काहीतरी खुडबुडत टॅप केल्यासारखं गेलं. झटकन पांघरूण काढून बघायची इच्छा झालेली पण भीतीने तशीच झोपली. दुसर्‍या दिवशी मैत्रीण म्हणाली, तुला घाबरशील म्हणून उठवलं नाही. काल कोणीतरी माझ्या खांद्यावर टॅप करत होतं... मला वाटलं तू असशील, घाबरली असशील म्हणून उठून बघीतलं तर तू पांघरूण डोक्यावरून घेऊन झोपलेलीस... नंतरही थोडे दिवस त्या रूममध्ये दबक्या आवाजात पुटपुटण्याचे, हसण्याचे, बेडवर बसण्याचे, मुसमुसण्याचे आवाज येतच राहीले, रात्री कोणाचीतरी फिरण्याची चाहूल हमखास लागे, एखादीला टॅप करून उठवले जाई... मैत्रीण आणि बहीण धन्य! त्या रूममध्ये एक्झाम्स संपेपर्यंत राहील्या.
ती रूम त्या मुलीने सोडली नंतर आणि बहीणीच्याच रूममध्ये शिफ्ट झाली पण त्या रूममध्ये राहणार्‍या प्रत्येकीला असेच अनुभव आले होते... नंतर नंतर तिथे अगदी नाईलाज झाल्याशिवाय कोणी राहायला तयार नसे.

तुमच्या दोघींचे किस्से ऐकुन मला एक किस्सा आठवला.
किती खरं किती खोटं माहीत नाही.

मी कोचीनमध्ये होते तेंव्हा तिथे एक हॉस्टेल वर माझी टीममेट रहायची. ती आंध्रातली होती. एक दिवशी सकाळी सकाळी ती माझ्याकडे आली आणि रडायला लागली. कारण विचारलं तर म्हणाली मला नाही रहायचं इथे, तुझ्या पीजीवर जागा बघ. मी विचारलं काय झालं त्यावर तीने सांगितलं,
ती रात्री झोपली होती तेंव्हा तीला कोणीतरी टॅप केलं. कोण आहे ते बघायला ती उठली तर तिच्या अगदी शेजारी एक लहान मुलगी उभी होती. साधारण गवंड्यांची मुलगी कशी दिसेल तशी दिसत होती. आता एवढ्या रात्री रूममध्ये कोणी लहान मुलगी बाहेरुन येणं शक्यच नाही. तेंव्हा ती घाबरली आणि रोज रोजात ओरडून शेजारी झोपलेल्या मुलीला उठवायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून आवाजच निघेना. तेंव्हा ती लहान मुलगी जोर जोरात हसायला लागली.आणि तीने हिच्या हातावर ओरखडे उमटवले. आणि तिच्या बेड खाली जाऊन बसली. आता ही पुन्हा जोरात ओरडली तेंव्हा तिची रूममेट उठली आणि काय झालं बघायला लाईट लावले तेंव्हा हिने जे झालं ते सांगितलं . तिच्या रूममेटला वाटलं ली ते स्वप्न असेल म्हणून तिने हिला शांत केलं आणि बेड खाली पाहिलं तर कोणीच नव्हतं.मग त्यांनी स्वप्न असेल असा विचार केला, साईबाबांचा आंगारा लावला आणि झोपुन गेल्या. दुसर्‍या दिवशी इतर मैत्रिणींना तिची रूममेट हे सगळं हसत हसत , टिंगल करत सांगत होती तेंव्हा तिच्या लक्षात आलं की त्या मुलीने हिच्या हातावर ओरखडे उमटवले होते म्हणून त्यांनी सहज म्हणून विचारलं दाखव बरं कुठे... तर खरच त्या मुलीच्या हातावर ताजे रक्ताळलेले ओरखडे होते. मग त्या थोड्या घाबरल्या आणि विचार करायला लागल्या की तिच्याच नखांनी झाले असतील म्हणून तिने नखं दाखवली तर तिला लहानपणापासुन नखं खायची सवय आहे. अशा लोकांनी नखं साधारणतः जितकी आत असतात तितकीच आत आणि लहान हिची नखं होती.
तिच्या बेडवर आणखी कोणीच झोपलेलं नसल्याने शेजारचीची नखं लागली हा युक्तीवाद फोल ठरत होता.
मग मात्र तिच्या रूममेटने सांगितलं की तिनेही लहान मुलीच्या हसण्याचा अंधुकसा आवाज ऐकला होता पण तिला वाटलं बाहेरुन येत असेल किंवा कोणीतरी टिव्ही बघत असेल म्हणुन तिने दुर्लक्ष केलं.
हळू हळू हॉस्टेलवर ही बातमी पसरली आणि अनेकांनी त्या रूममध्ये हा अनुभव घेतल्यानेच रूम बदलून घेतल्याच सांगितलं. अर्थातच मेट्रनने ही गोष्ट धुडकावून लावली. त्या मुलीला नंतर दुसरी रूम दिली आणि काही काळासाठी ती रूम बंद केली.

आमचं हे बोलणं शेजारी बसलेला एकजण ऐकत होता आणि त्याने विचारलं 'तू **** हॅस्टेलमधे रहातेस का?'
ती म्हणाली हो पण तुम्हाला कसं कळालं? त्यावर त्याने उत्तर दिलं ती बिल्डींग बांधली जात असताना तिथे एका लहान मुलीचा मृत्यु झालेला. लोकं म्हणतात की तिच्यावर रेप करून तिला मारुन टाकलेलं पण पुढे काय ते कोणालाच कळालं नाही.ही घटना अनेकांना माहीत आहे म्हणूनच तिथे मल्याळी/ अजुबाजुच्या गावातल्या मुली जास्त नाहीत. सगळ्या नॉन केरळी मुलीच भरल्यात.

माझ्या टीममेटने ते हॉस्टेल सोडलं हे वेसांनल. पण हे कितपत खरंय माहीत नाही कारण ती मुलगी थोडीशी नौटंकी आणि अ‍ॅटेंशन सिकर होती. त्यतच आम्हाला ट्रान्सफर हवी होती म्हणून आम्ही काहीही कारणं सांगयचोत.
खरं काय ते तिलाच माहीत.

माझ्या ऑफीसमध्ये भूत असल्याचे जाणवते आहे,
मार्च च्या प्रेशर मुळे आम्ही रात्री ३ ते ४ वाजेपर्येंत ऑफीसवर असायचो ( मी आणि माझे तीन इंजिनिअर)
साधारण ३ नंतर दोन वेळा विचित्र अनुभव आले आहे.
कोणी भूत पळविणारा ,(बाटलीत बंद करणारा ) ,भूताशी बोलणारा असेल तर कळवा योग्य ती फी दिली जाईल (भोंदू नको) ........................................................

आय याम नॉट जॉकीग ,आय याम शिरियश ,डू शमथींग ........

अनुभव नंतर लिहितो .. सविस्तर

मलाही भिती वाटलेली अगं... ते बाकीचे विचार (पण हे कितपत खरंय माहीत नाही कारण ती मुलगी थोडीशी नौटंकी आणि अ‍ॅटेंशन सिकर होती. त्यतच आम्हाला ट्रान्सफर हवी होती म्हणून आम्ही काहीही कारणं सांगयचोत.
खरं काय ते तिलाच माहीत.
) आत्ता येतात मनात Sad पण तेंव्हा वाट लागलेली.

त्या घोरण्याच्या प्रसंगावरुन आठवलं. मी हे दोन अनुभव कदाचित लिहिले असतील आधी.

१. बी स्कूलमध्ये असताना आमच्या quad मधला टीव्ही २-३ दिवस अचानक चालू व्हायचा. एकदा तर मी संध्याकाळी परत आले आणि माझ्या रुमचं कुलुप काढत असताना चालू झाला. आणि नेमका ''आहट" किंवा तत्सम हॉरर शो चालू होता. मी दचकले होते. माझ्या एका quadmate चा अमानवी शक्तींवर अजिबात विश्वास नव्हता. तिने रिमोटच्या बॅटरीत प्रॉब्लेम आहे म्हणून तो बदलायला हाऊसकिपिंग कडे दिला. मग म्हणाली आताही अचानक टीव्ही चालू झाला तर प्लग काढून बघू. तरीही चालू झाला तर काहीतरी गडबड आहे. आमच्या सुदैवाने तसं काही झालं नाही. प्रॉब्लेम रिमोटमध्येच होता. Happy

२. घरी रात्री झोपलो असताना अचानक गॅलरीतलं विन्ड चाईम वाजायला लागलं. गॅलरीच्या सगळ्या खिडक्या बंद आणि आम्ही सगळे बेडरूममध्ये होतो. नाही म्हटलं तरी टरकलीच. मग धीर करून लाईट लावून गॅलरीत गेलो तर दिवसा कधीतरी उंदीरमामा आलेले होते आणि रात्री तिथे नाचत होते. Happy

रिया काय जबरदस्त भयानक अनुभव! वाचून खरंच दिवसाढवळ्याही काटा आलाय सरसरून अंगावर!! बापरे मी एवढीही धीट नाहीये की अशा एखाद्या हॉस्टेलमध्ये राहू शकेन. मला हार्ट अ‍ॅटॅक आला असता. एकतर घाबरले की मी टोटल पॅरॅलाईज होते ना ओरडता येत ना हलता येत. Sad

देजा वु बद्दलचे माझे वैयक्तिक मत (किंवा अंदाज) - आपला मेंदू कायम आपण पाहत असल्येल्या गोष्टींची साठवलेल्या गोष्टींबरोबर तुलना करत असतो . त्यामुळेच अगदी शाळेतला मित्र काही वर्षांनी बाजारात भेटला तर आपण त्याला ओळखतो. ( कदाचित नाव किंवा संदर्भ आठवणार नाही, पण हा चेहरा ओळखीचा आहे हे कळते )
कदाचित मेंदूच्या या विलक्षण क्षमते मुळे आपल्याला ढगात आकृत्या किंवा पाणी ओघळलेल्या ओल्या भिंतीवर मानवी व इतर चेहरे व आकृत्या दिसतात. आपल्या मेंदूचा हा "सांगड " घालण्याचा हा सततचा प्रयत्न .
माझ्या मते मेंदू हे काम सदा सर्वदा करत असावा. पण हि सांगड कायम खरीच असेल का ?? मेंदूची हि कधी फसगत होवू शकेल का ?? शेवटी हि सांगड एखाद्या संगणकीय प्रोग्राम सारखी बीट-बाय-बीट तुलना करीत नसावी. त्या तुलनेची पद्धत थोडी वेगळी व "सैल" असावी. नाहीतर वेगळी केशरचना केलेला मित्र कसा ओळखता येणार???
शेवटी हि तुलना नेमकी कशी होते हे मला तरी अजून गूढ आहे.
अजून एक , ज्या साठवून ठेवल्येल्या माहिती बरोबर हि तुलना होते ती सर्व सत्यच असायला हवी असे नाही. स्वप्न, कल्पना, विचार यातून जन्मल्येल्या माहिती बरोबर सुद्धा ती होत असावी का??

दैनंदिन जीवनात एखाद्या क्षणी हि सांगड जरा जास्तच जमत असावी. त्यावेळी आपल्याला क्षणभर असे वाटत असावे कि हा प्रसंग (किंवा तो क्षण) आपण पूर्वी पाहिलाय किंवा काल्पिलाय. हाच तो देजा-वु असेल का??

Rajesh K,

देजा वू चं स्पष्टीकरण देण्याचा तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे. बराचसा पटला. मात्र अशा प्रसंगी आगाऊ पूर्वसूचना मिळते, ती कशी?

आ.न.,
-गा.पै.

हा अनुभव पण बऱ्याच जणांना येत असेल ....

आपल्याला जेव्हा एखादी वस्तू (दुचाकी / चारचाकी किवा असाच काही) घ्यायची असेल ..उदा. मला पल्सर घ्याची इच्छा असेल ...किंवा तास मी ठरवलं तर तिथून पुढे काही दिवस मला रस्त्यावरून फक्त पल्सर च दिसते... खर तर ती त्या आधी पण असते पण आपल लक्ष नसते... आणि जेव्हा ती दिसायला सुरुवात होते तेव्हा इतर गाड्या असून पण आपल लक्ष तिकडेच जाते ... (आणि हो काही दिवसांनी जर मॉडेल बदललं तर तसा बदल पण होतो...)

सम-अनुभवी लोकांनी मत प्रदर्शित करावे....

....अचानक आपल्याला अस वाटत कि हे जे आता चाललंय हे सगळ आधीच घडून गेलाय ... अगदी तो प्रसंग चालू असताना असाच वाटत राहत... >>>>
किंवा प्रसंग घडत असताना पुढे काय होणार आहे याची पुसटशी जाणीवपण असते.

Pages