प्रेम तर करायचं असं ठरलंय...
पण अंतर राखायचं असं ठरलंय!
पुढच्यावेळी एकमेकांना दुखावताना...
नंतर हसून ’असूदे’ म्हणायचं असं ठरलंय!
कुशीत अलगद् भल्या पहाटे शिरायचे पण...
उजाडताना सोडवून घ्यायचं असं ठरलंय!
तू सोबत घेऊन पाऊस जरी आलास तरी...
शक्यतोवर कोरडं रहायचं असं ठरलंय!
तुझ्याचसाठी उमलायचं पण मिटता मिटता...
स्वतःसाठी गंध जपायचं असं ठरलंय!
तुझ्याविना मी असणे काही सोसत नाही...
भांडणसुद्धा सोबत न्यायचं असं ठरलंय!
कधी शेवटी तुला-मला हे कळेल तेंव्हा...
रडं उरातील वाहू द्यायचं असं ठरलंय!
पुसू पहातो पुसू शके ना आकाशातिल मेघ दळे
उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे
फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे
घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे
.................... अज्ञात
हुंदक्यांनी लाख केली आर्जवे
सारखे ओठावरी हासू हवे
आसवांचा आडपडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे
रंगलो नाही कधी जागेपणी
कोण देतो रंग स्वप्नांना नवे
छाटल्या फांद्या निराशेच्या किती
एवढेसे सूख आता पालवे
संप दंगा घोषणा झाल्या सुरू
जो इथे खाईल त्याला खवखवे
लोक सारे वाटती आता मला
पारधी निवडून देणारे थवे
लाट प्रेमाची नसे साधीसुधी
बेट प्रेमाचे तिलाही जाणवे
विसरणे असते तसे सोपेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे
....मयुरेश साने
हुंदक्यांनी लाख केली आर्जवे
सारखे ओठावरी आसू हवे
आसवांचा आड पडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे
रंगलो नाही कधी जागेपणी
कोण देतो रंग स्वप्नांना नवे
छाटल्या फांद्या निराशेच्या किती
एवढेसे सूख आता पालवे
संप दंगा घोषणा झाल्या सुरू
जो इथे खाईल त्याला खवखवे
लोक सारे वाटती आता मला
पारधी निवडून देणारे थवे
लाट प्रेमाची नसे साधीसुधी
बेट प्रेमाचे तिलाही जाणवे
विसरणे असते तसे सोप्पेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे
....मयुरेश साने
याच गोष्टीचा मला आधार होतो .
तू दिलेला घाव सल्लागार होतो .
एवढे मजबूत चल नात्यास बनवू,
चंद्र हो तू,मी तुझा अंधार होतो .
एवढे तर जाणतो मी,वेळ येता
बाप आईच्या दुधाची धार होतो.
गाडले शेतात का माझे कलेवर ,
काय तेथे मी पुन्हा उगणार होतो .?
ना कधी येऊ दिले ओठावरी मज ,
मी तिच्यासाठी तिचा होकार होतो…!
नि:शब्द(देव)
माझ्यापरी वाटेल का फुलपाखरा ?
'कोषातला सुरवंट मी होतो बरा !'
आला म्हणेतो हस्त गेला कोरडा
भिजण्यास होती केवढी व्याकुळ धरा !
त्याच्यातले माझ्यातले हे साम्य की...
येता पुढे, माघारही घेतो जरा
कोंडू नको उत्स्फूर्त वेड्या भावना
नाल्यात मिसळाया नको गोडा झरा
अंदाज नाही यायचा वरवर तुला
या काळजाला आतुनी आहे चरा
त्याच्याविना आयुष्य जगते मी असे
कर्जातही शिमगा करावा साजरा !
वात्सल्य का रे आटते आईतले ?
पान्हा फुटे गाईस, बघता वासरा
-सुप्रिया.
घनघोर दाटलेले मेघ
रिते न होता घोंघावत राहतात
रस्त्याच्या कडेला,
अर्धवट जगलेले क्षण फेर धरतात
आठवणी भिरभिरतात,
मोडक्या स्वप्नांचे कपटे,
वाळून भुरभूरीत झालेल्या आशा
धूळ होऊन पिंगा घालतात,
वावटळ उठते!
जमिनीपासून उठाव घेते...
सगळं गरागरा फिरवते..
थोडी पलीकडे जाते...
स्थिरावते..
तिथेच कुठेशी.. मी त्रयस्थ...
डोळ्यांच्या पापण्यांवर,
हाता-पाया, कपड्यांवर.. फक्त धूळ घेऊन उभी...!!
निजलेली वावटळ पाहून ढगांचं बेमालूम पांगणं...
आजही पावसाने कोसळणं टाळलं
हल्ली सोशिक झालाय फार..
तुझे ते बहाणे नको आज आता
मला दे तुझे ते नवे साज आता
नको त्या दुराव्यास ही आज थारा
करू दे नव्यानेच आगाज आता
नको मूक त्या भावनांचा पसारा
तुझे घे तराणे नको लाज आता
बनूदे मला गे तुझे गीत आता
खुळी प्रीत मागे तुझी गाज आता
जरा राहुदे गे तुला भान आता
मला ना स्वत:चाच अंदाज आता
विदर्भातले एक वेदनात्मक सत्य विदर्भाच्याच बोली भाषेत (वऱ्हाडी भाषेत) मांडायचा छोटासा प्रयत्न केलाय ....
सांजेला तीरावरी आले आकाश भरूनं
मन भरले भरले कधी जाईल ढळूनं
नदी मधाळ मधाळ वाहत असे निर्मळ
दिस वियोगाचे काहून नाही जातं भुर्कन
पिकं डोलत डोलत असे उभे वार्यावरी
वाट पाहून सयाची किती पाहू येड्यापरी ...
सूर्य गेला ढगापरी रंग केशरी केशरी
डोळ्यामंदे माह्या लाली जीव आला अधांतरी
शेतकरी माह्या गड्या ईश पिऊन मेलेला
मले रस्त्यावर आणून त्यो जीवानं गेलेला
पोर उघडी बोडकी मीबी बेवारसं झाली
जीवे मरण्याची आता आम्हावर पारी आली
कोणी आणा रं शोधून करा दया आम्हावरी
रोज लढतो
रोज हरतो
रोज जळतो
रोज विझतो
रोज कण्हतो
रोज हसतो
रोज विणतो
रोज तुटतो
रोज मरतो
रोज उरतो