ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा;
देवळांतली घंटा ह्याला उडी मारून मारून
वाजवावी लागायची, कारण हात पोहचायचा नाही.
आणि 'घंटा वाजवल्याशिवाय देवबाप्पाला कळत
नाही की आपण त्याच्या दर्शनाला आलोय', ह्या
थापेवर त्याचा तेव्हा विश्वास बसला होता.
शिवाय लहानपणी ह्याला विठोबाच्या पायी ठेवलं
होतं, तेव्हा एक तुळशीचं पान अचूक ह्याच्या
डोक्यावर पडलं, असंही ह्याच्या आज्जीने
सांगितलेलं.
नंतर थोडा मोठा झाल्यावर कळलं की,
त्या भागात त्या पिढीत जन्मलेल्या बऱ्याच पोरांच्या
डोक्यावर विठोबाकडून तुळशीचं पान पडलं होतं.
सगळ्यांत जास्त काय वाईट?
सवय..!
जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची
बारची वाईन शॉपींची
पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची..
शहर सोडताना अवघड जातं मग
शहर काही वाईट नसतं..
पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू
आणि कळतं की आता जावं लागेल..
त्याच्यापुढं बऱ्याचदा दोन प्रश्र्न असतात.
एक म्हणजे उद्याचं काय? आणि दुसरा म्हणजे पुढं काय?
उद्याचे प्रश्र्न अर्थातच सोपे असल्यामुळे तो बहुतेक वेळेस त्यांनाच चिकटतो...त्यामुळं त्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं... किंवा अस्तित्वाला तात्पुरता अर्थ वगैरे मिळतो असं वाटत असेल कदाचित...
आता तुम्ही म्हणाल की हा अॅप्रोच काही बरोबर नाही..
तर ते असूच द्या... कारण आपल्याला काय करायचंय? हो की नाही??