कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Submitted by कुमार१ on 29 March, 2021 - 01:19

या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................

31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.

इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.

महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड

या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी

समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.

एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे

१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.

२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.

३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :

सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :

१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर
हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशंट संख्या वाढल्यापासून आमच्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांनी झिंक आणि मल्टी व्हिटॅमिन गोळ्या प्रिकोशन म्हणून घ्यायला सुरुवात केली आहे,या गोळ्या घ्यायची गरज आहे का?side effect पण असतील म्हणून मी अजून एकदाही या गोळ्या घेतल्या नाहीत,
घरात लहान मुले आहे 11 आणि 3 वर्षांची,म्हणून काळजी वाटते,गोळ्या सुरू करू की नको

ते घेऊनही शरीरात नीट शोषलं जात नाही असं ऐकलं आहे. बाकी नीट माहिती डॉ सांगतीलच.
हे सर्व योग्य आहार आणि व्यायाम यासह घेतलं तर शरीरात उत्तम शोषलं जातं.
कोव्हिड रुग्णाशी घरात थेट संपर्क आलेल्यांना डॉ लोक झिंक आणि व्हिटामिन सांगत आहेत. बाकीच्यांनी सरसकट घ्यावे की नाही याबद्दल मला शंका आहे.

बाकीच्यांनी सरसकट घ्यावे की नाही याबद्दल मला शंका आहे.>>तेच तर,सहज बोलता बोलता विषय निघाला तेव्हा समजले जवळपास सगळेच घेत आहेत, म्हणून वाटलं आपण न घेऊन बरोबर करतोय की चूक

माझ्या काकूला (वय ७६ वर्ष) रेमडेसिवीरचा ५ इंजेक्शनचा डोस करायला सांगितला आहे.
तिची CT severity ०७/२५ आहे. तिला किडनीचा विकार आहे. इंजेक्शन हे एक दिवसाआड घ्यायचं‌ आहे.
तिला ४/१८ रोजी सरकारी दवाखान्यात ॲडमीट केले आहे.
तिची तब्येत आता सुधारली आहे. तिला जेवण जातं. ती खोकत वगैरे नाही.
तिला इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अजून एकही दिले गेले नाही.

प्रश्न: साधारण परत कोवीड स्वॅब टेस्ट कधी केली जाते?
तिची ४/१७ केली होती जी positive आली आणि mild गटात मोडली गेली.

तिची टेस्ट जर निगेटिव्ह आली आणि तरीही इंजेक्शन उपलब्ध नाही झाले तर तिला तो कोर्स पूर्ण करुनच सोडतील का असंच जाऊ देतील?

धन्यवाद _

<हे सर्व योग्य आहार आणि व्यायाम यासह घेतलं तर शरीरात उत्तम शोषलं जातं.>
पेशंटला देतात या गोळ्या. तो व्यायाम करत नाही. करू शकत नाही. बेडरिडन. तोंडाला चव नसल्याने आहारही धड नाही. त्याच्या शरीरात शोषलं जात असेल की नाही?

आदू,
याचे उत्तर मी आधीच दिलेले आहे :
प्रतिबंध म्हणून या औषधी गोळ्या घेण्याऐवजी आहारामध्ये लिंबू / आवळा आणि उत्तम दर्जाची प्रथिने घेतल्यास नैसर्गिकरित्या आपल्याला फायदा होऊ शकतो.
Submitted by कुमार१ on 18 April, 2021 - 10:29
…………
आजाराचा उपचार म्हणून योग्य.
.............
भोभ,
तुमचा प्रश्न हा व्यक्तिगत सल्ला स्वरूपाचा आहे. त्यावर इथे चर्चा योग्य नाही. तुमच्या डॉ चा सल्ला उत्तम.

डॉ माझी मैत्रीण विलगीकरणात घरीच आहे तिला कुठलाही त्रास नाही. ती आपल्या बंद खोलीत सतत मुखपट्टी घालून असते. ह्याची आवश्यकता आहे का? खूप वेळ मुखपट्टी घालणे (सर्वसामान्यांनी) त्यामुळे त्याचे काही शरीरावर दुष्परिणाम होतील का?
बहीण भारतात आली असताना करोना झाला होता वेळ आली नव्हती हे नशीब. ती परत गेली तिला सहा महिन्यानंतर लसीकरण होईल कारण antibodies तयार झाल्यात. मागच्या प्रश्नाचं उत्तर वाचलं होतं पोच द्यायची राह्यली होती.

तुमचा प्रश्न हा व्यक्तिगत सल्ला स्वरूपाचा आहे. त्यावर इथे चर्चा योग्य नाही. तुमच्या डॉ चा सल्ला उत्तम.>> आलं लक्षात, धन्यवाद पण ढोबळ मानाने एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आली तर किती दिवसांनी परत करतात?

मंजूताई,
जर मोठी सहव्याधी नसेल तर घरात कायम मुखपट्टी लावून वावरण्यात काही अर्थ नाही. (काही विशिष्ट व्याधींसाठी तशी शिफारस आहे). कायम तशी लावल्याने दुष्परिणाम काही नाही; फक्त सतत गुदमरल्याची भावना होऊ शकेल.

भो भ
महाराष्ट्र covid-19 दलाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुन्हा चाचणीचे निकष :

१. सौम्य आणि मध्यम आजार : पुन्हा चाचणीची आवश्यकता नाही.
२. तीव्र आजार ( रुग्णालयात दाखल) >> उपचार झाल्यानंतर सर्व रोग लक्षणे नाहीशी होणे >> मग चाचणी करणे >>> निगेटिव आल्यास घरी पाठवणे.

‘किती दिवसांनी’ असे सरसकट उत्तर नाही.

किमान ३ महिने थांबा.
बाकी आजार कितपत होता त्यानुसार तुमच्या डॉ चा सल्ला घ्यावा.

माझ्या बहिणीला पहिला डोस (कोव्हीशिल्ड) घेतल्यावर दहा दिवसांनी कोव्हीड झाला. होऊन दहा दिवस झाले. सौम्य होता/आहे.
तिने दुसरा डोस केव्हा घेणे इष्ट?

तीन महिने थांबावे म्हटले तर दुसरा डोस पहिल्या डोस नंतर साधारण साडेतीन महिन्यांनी होईल.

मानव,
या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर नसावे.
हा एक संदर्भ :

The CDC also suggests, people who got infected after receiving their first shot may take the second dose on their scheduled date, but only if their quarantine period is over, and they do not have any symptoms.
https://pharmeasy.in/blog/can-you-take-covid-19-shot-after-contracting-t...

( यात बरेच पण, जर ..तर असे राहील. व्यक्तीसापेक्ष निर्णय )

धन्यवाद डॉक्टर.
शक्य तितक्या उशिरा घ्यायला सांगतो मग तिला, कोव्हीशील्ड दुसरा डोस तीन महिन्यांनी घेतला तर चालतो. तो पर्यन्त अडीच महिने झाले असतील कोव्हिड लक्षणे थांबून.

डॉक्टर, एकदा कोव्हीड झाला तर तीन महिने अँटी बॉडीज असतात म्हणून लस उशिरा घ्यावी म्हणतात. पण माझ्या भावाच्या मित्राला दोन महिन्यात दोनदा कोरोना झाला होता. तेव्हा उगा रिस्क नको म्हणून माझ्या मम्मी पप्पांना त्यांना कोव्हीड होऊन गेल्यावर महिन्यानंतर लस घ्यायला लावली आम्ही, तसे लसीकरण केंद्रावर देखील सांगितले होते. तर मला विचारायचे होते की त्याने काही दुष्परिणाम किंवा लसीची उपयुक्तता कमी होणे असे काही होऊ शकते का?

V.b.
तसं काही होणार नाही. त्यात मुद्दा एवढाच आहे :
नैसर्गिक आजार झालेल्या व्यक्तीला तीन महिने सुस्कारा सोडता आला असता, की आता आपल्याजवळ नैसर्गिक प्रतिकार शक्ती आहे.
त्यांच्या बाबतीत लस लवकर घेतली इतकेच. तोटा वगैरे काही नाही

कोविड महासाथ आणि स्त्रियांचे आजार : एक दृष्टिक्षेप

गेल्या दोन वर्षात आपल्या आसपास सतत रोगट वातावरण आहे आणि त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. परिणामी स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्सचा असमतोल होतो. त्यातून मासिक ऋतुचक्रा संबंधीच्या तक्रारीही वाढल्याचे आढळून आले आहे. या तक्रारी मुख्यत्वे अशा आहेत:

• मासिक पाळी अपेक्षेपेक्षा खूप लांबणे. परिणामी ऋतुचक्राची लांबी बरीच वाढते.
• अंगावर जास्त प्रमाणात जाणे
• चिडचिडेपणा आणि वारंवार मूडमधील टोकाचे बदल.

या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचे निरीक्षण आहे. पीसीओएस हा आजार असलेल्या स्त्रियांत कोविड होण्याचा धोका सुमारे ३०% अधिक असतो.

एखाद्या व्यक्तीला कोव्हीड आहे हे चाचणीतून दिसुन येते. मग डॉक्टर त्यांना छातीचा सिटी स्कॅन, CBP, Ferretin, D-Dimer, IL6 वगैरे अजून काही चाचण्या करायला सांगतात आणि पानभर औषधं, त्यात जिवाणू नाशके, इव्हरमेक्टीन, व्हिटॅमिन्स यांचा समावेश असतो.
हे सगळे करून रुग्ण बरा होतो आणि मग सोमीवर आपल्याला काय काय टेस्ट आणि काय काय औषधं घेतली याची माहिती सगळ्यांना देतो. हे सर्व केल्यानेच आपण बरे झालोत, इतरांनाही हे सगळे करावे लागेल असे बऱ्याच जणांना वाटते.
मग कुणी पॉझिटिव्ह आढळलं की मग या चाचण्या केल्या का, सिटीस्कॅन किती स्कोअर आहे , हे औषध कसं नाही दिलं वगैरे चर्चा होतात, आणि मग लोकच आपल्या या चाचण्या झाल्या पाहिजेत, आपण ही ही औषधं घेतली पाहिजेत असं ठरवतात. आपल्या डॉक्टरने सांगितले या चाचणीची गरज नाही, हे औषध कशाला? गरज नाही त्याची तर डॉक्टरांच्या ज्ञानाविषयी शंकाही घेतली जाते.

सरसकट जी कोणी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह येइल मग तिची लक्षणे काही का असेनात, सिटी स्कॅन (हा तर RT PCR चा
निकाल येण्या आधीही सरसकट केल्या जातोय बहुतेकदा), कोव्हीड प्रोफाईक चाचण्या, पॉझिटिव्ह आल्या आल्या , पाच दिवसांनी, दहा दिवसांनी असे पॅकेजेस पण आहेत, ते आणि ही औषधांची यादी असा प्रोटोकॉलच झालाय जणु.

यातील कुठल्या किमान चाचण्या आणि औषधे कुठल्याही कोव्हिड प्रौढ व्यक्तीस आवश्यक आहेत याची माहिती मिळु शकेल का? बाकी कुठल्या चाचण्यांची कुणाला आणि केव्हा आवश्यकता आहे हे त्यांचे डॉक्टर त्यांची लक्षणे आणि त्यांची तीव्रता पाहून सांगतीलंच.

आजाराच्या स्वरूपानुसार या सगळ्याची माहिती असलेला एक तक्ता मी आधी बहुतेक दिलेला आहे.
जरा शोधता का ? मी पण बघतो.
महाराष्ट्र कोविड दलाच्या पुस्तिकेतून मी तो तयार केला होता.

सौम्य आजारासाठी हा आहे
covid task force.jpg

मध्यमचा करतो नंतर.
तीव्र/गंभीरची माहिती इथे नको. ते डॉ च सगळे बघत असतात.

जर पॉझिटिव्ह पेशंट 45, 60 + वय इतर आजार असलेला असेल किंवा साठीपेक्षा जास्त असेल तर सौम्य आजार असला तरी किमान एकदा HRCT करावी अन जर त्यात इन्फेक्शन आले तर त्याचे रँकिंग कीतीही कमी असले तर बरे झाल्यावर त्वरित किंवा दोनेक आठवड्यात एकदा HRCT करावा असे आम्हाला माझ्या मम्मी पप्पांची ज्यांनी ट्रीटमेंट केली त्या डॉक्टरांनी सांगितले होते. , पप्पांची दुसरी टेस्ट नॉर्मल आली तर मम्माला तीन महिन्याचा कोर्स करायला सांगितला,
आम्ही पुण्यात दुसऱ्या एका डॉक्टरांना जे कोव्हीड रुग्ण तपासतात त्यांना दाखविले होते तिला सेकंड ओपिनियन साठी तेव्हा त्यांनीही तेच सांगितले

दुसरीकडे या टेस्ट फक्त पैसे काढण्यासाठी केल्या जातात असंही म्हणणारे भरपूर लोक आहेत.
आर टी पी सी आर टेस्ट निगेटिव्ह पण सीटी स्कॅनमध्ये गंभीर असल्याचे लक्षात आल्याने अनेकांचे प्राण वाचले अशा बातमीवर बहुसंख्य प्रतिक्रिया अशाच आहेत.

भरत होय, त्यामुळे आमचाही जरा गोंधळ झालाय.
RT PCR निगेटिव्ह पण CT Scan केला पाहिजे हे केव्हा ठरवत असतील? रुग्णाला तशी काही लक्षणे त्रास असेल तेव्हा. तेव्हा त्या स्थितीत स्कॅन घेण्याचा निर्णय योग्यच असेल. वर डॉक्टरांनी दिलेल्या तक्त्यात CT Scan नाही, एक्स रे आहे.

सध्या सगळ्याच चाचण्यांसाठी मोठया रांगा आहेत. कोव्हिड रुग्ण, संभावित कोव्हिड रुग्ण आणि इतर रुग्ण सगळे एकाच रांगेत आहेत. तिथल्या कर्मचाऱ्यांवरही ताण आहे. रक्त चाचण्यांचे निकाल मिळायलाही आता तीन चार दिवस वेळ लागत आहे. अशा स्थितीत अनावश्यक चाचण्या टाळलेल्या बऱ्या असे वाटते.
मार्गदर्शक यादी (नवा रोग असल्याने) आणि डॉक्टरांचा सल्ला या दोन्हीमुळे गोंधळ दूर होईल.

धन्यवाद डॉक्टर कुमार.

वर मानव यांनी प्रश्न विचारला आहे म्हणून मध्यम आजारासंबंधीची माहिती पुढील प्रतिसादात देत आहे. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना :

तक्त्यात दिलेली माहिती ही सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे असतात. परंतु पुस्तकीज्ञान आणि प्रत्यक्ष रणभूमीवरचा निर्णय यात बरेचदा अंतर पडते. एकदा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रत्येक रुग्ण ही वेगळी बाब आहे आणि प्रत्येक डॉक्टरचा अनुभव देखील.

तसेच विविध तपासण्या भारतामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध नसतात. एचआरसिटी / IL-6 सारख्या तपासण्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असतात. त्यामुळे, कुठल्या तपासण्या केल्या, कोणते उपचार दिले, यामध्ये स्थलकालभिन्नत्व असते. हा मुद्दा सगळ्यांनी ध्यानात घ्यावा. एकमेकांना दिलेल्या उपचारांची तुलना/ चर्चा शक्यतो टाळावी पण करायचीच असल्यास ती सौम्य आजाराचे उपचार या मर्यादेपर्यंतच असावी.
धन्यवाद !

Pages