हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड१९ हा समाजात उद्भवलेला पूर्ण नवीन आजार आहे. संबंधित रुग्णांचा जागतिक पातळीवर सतत अभ्यास चालू आहे. त्यातून त्याचे स्वरूप हळूहळू उलगडत आहे. त्यानुसार तज्ञांची मते तयार होत आहेत. बऱ्याचदा त्यात एकवाक्यता दिसत नाही.

आजाराचे स्वरूप देखील विविधांगी आहे. या धाग्यात केलेले लेखन हे लिहितेवेळीच्या अधिकृत वैद्यकीय माहितीनुसार केलेले आहे. त्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात याची नोंद घ्यावी. असे काही महत्त्वाचे बदल झाल्यास त्याची दखल नव्या प्रतिसादातून घेईन.

साद,
होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात .त्यातून आजार उद्भवतो.

रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे

मला एक प्रश्न पडलाय. प्राणायाम केल्याने खरेच फुफ्फुसे मजबूत होते असे काही संशोधन झाले आहे का?
आणि नेमके कोणते प्राणायाम फुफ्फुसासाठी चांगले आहेत ?

प्राणायाम >>> याबद्दल संबंधित तज्ञाने मत द्यावे हे बरे.
माझा अभ्यास नाही .

http://www.msn.com/en-us/health/health-news/steroid-dexamethasone-reduce...
एक स्टेरॉइड गंभीर रोग्यांना उपयोगी होत आहे अशी बातमी आहे. आधी HCQ ची सुद्धा वार्ता होती.
एखादे औषध ह्या आजारासाठी वापरावे हे कसे ठरवतात?

vt २२० ,
तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्या नव्या धाग्यावर देत आहे :
कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज
https://www.maayboli.com/node/75123#comment-4523372
...................................................................
पुढील सर्व चर्चा तिकडे करूयात .
धन्यवाद !

आज जागतिक ‘हात स्वच्छता दिन’ आहे.

मला खात्री आहे की आपण सर्वजण आपापल्या हातांची स्वच्छता काटेकोरपणे पाळत आहोत.

सर्वच नागरिक असे करोत, जेणेकरून भविष्यात असा ‘दिन’ ठेवायची गरज न पडो !

आज जागतिक हात स्वच्छता दिन आहे.
आपणा सर्वांना गेली तीन वर्षे लागलेली हात स्वच्छतेची सवय अशीच कायम राहो ही इच्छा !

महत्त्वाची माहिती सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद. सध्या लोक पुन्हा करोनापूर्व वागणूकीकडे झुकाताहेत असे दिसते. बाहेरून आल्यावर हात धुणे इ. कमी होताना दिसते.

धन्यवाद.
क्षणभर आपण करोना हा विषय बाजूला ठेवू. अस्वच्छ हातांनी खाल्ल्यामुळे कितीतरी पचनसंस्थेचे आजार देखील आपण ओढवून घेत असतो. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, ही मूलभूत शालेय शिकवण सुद्धा अनेक सुशिक्षित म्हणवणारे लोक विसरले आहेत. मी कोणाकडे गेलो आणि तिथे खायला मिळणार असल्याचा अंदाज असला, तर मी गेल्या गेल्या त्यांच्या बेसिनकडे जाऊन हात धुवूनच बसतो.

पण हे काही प्रसंग पहा :
१. परवा आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिक आले. आल्यावर त्यांनी दारातच हाताने बुटाचे बंद सोडून मग बूट काढून बसले. खरं तर आमचे बेसिन तिथे जवळच आहे. पण त्यांनी काही हात धुण्याची तसदी घेतली नाही. आम्ही त्यांना खायला दिले तेव्हा त्यांनी खुशाल त्याच हातांनी खाणे पसंत केले.

२. दुकानांतले प्रसंग : बऱ्याच दुकानांमध्ये बरणीत ठेवलेले काजू, बदाम किंवा अन्य काही तेलकट पदार्थ लोक वजनावर मागून घेत असतात. गेल्या दोन वर्षात बऱ्याच दुकानदारांनी कामगारांना स्वच्छतेची शिस्त लावली होती. बरणीतल्या गोष्टी एक तर चमच्याने किंवा हाताला प्लास्टिकचा मोजा लावून उचलण्याची सवय लावली होती.
आता पुन्हा जैसे थे ! ज्या हातांनी नोटांना किंवा इतरत्र हात लावला आहे त्याच हातांनी खाद्यपदार्थ उचलतात. असो.

सार्वजनिक ठिकाणे.
उदा..
हॉटेल्स,रेल्वे स्टेशन,लग्नाचा हॉल.st स्टँड.
ह्या जागेवरील मुतारी हे ठिकाण.
इथे मला एक मूलभूत प्रश्न पडतो.
असंख्य प्रकारची लोक तिथे हात धुतात.
पण हात धुतल्यावर नळ हाताने बंद करतात.
तेव्हा नळावर असणारे असंख्य bacteria परत हाताला चिकटत असतील .
आणि ते पण अनेक प्रकारचे.
ही शंका मला येते.
त्या पेक्षा आपलेच bacteria काय वाईट.

Tya मुळे मी खरेच काही वेळा अशा ठिकाणी हात धुत नाही.

हात न लावता नळ चालू होणे ही system असेल तर काहीच प्रश्न नाही.
पण विमानतळ किंवा मोठी हॉटेल सोडली तर बाकी ठिकाणी ती सुविधा नसते

Pages