माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक बेसन नीट भाजले गेलेले नाही. आता साखर मिसळलेली असल्याने परत भाजले तर साखर जळेल. लाडु फोडून त्याच्या पोळ्या करता येतील.

३ वाटी उकडा तांदूळ : १ वाटी उडीद डाळ (दोन्ही कोरडे) ह्या प्रमाणात इडली रवा दळून आणला. थोड्या कोमट पाण्यात एकदम सकाळी ७ वाजता भिजवला. इडली करायच्या १ तसं आधी दीड टीस्पून इनो, तेल, मीठ घातलं. रात्री ८ वाजता इडली वाफवायला लावली आणि १० मिनिटात वाफेबरोबर रवा उडून यायला लागला.. म्हणून झाकण उघडलं तर सगळं पीठ इडली पात्रात खाली बसलं होतं. इडली लावताना पीठ आंबून आल्याचा वास येत होता तरीही असं का झालं? बर सध्याच्या पुण्याच्याथंड हवेत दिवसभर पीठ नीट आलं नसेल म्हणून थोड्या वेळ तसंच ठेवलं, रात्री फ्रीज मध्ये ठेवून परत सकाळी लवकर बाहेर काढलं तरी तीच तऱ्हा. सगळेप्रकार करताना साबा शेजारी होत्या. (म्हणजे डाळ तांदळाच्या प्रमाणापासून ते रव्यात काटामोड गरम पाणी घालताना सुद्धा) आमचं काय चुकलं? Sad

गायु, इडलीचे पीठ अजूनही उरले आहे का? असल्यास मिक्सरमधून एकदा वाटुन घे. काही वेळेस आम्ही विकतचा इडली रवा आणला तरी उडिद डाळ वाटताना तो रवा पण मिक्सरला वाटुन घेतो. थोडे वाटुन बघ. या दिवसात थन्डीमुळे काही सान्गता येत नाही.

इडली रवा फक्त तांदळाचाच दळून आणायला हवा होता. उडदाची डाळ भिजवून अगदी बारीक वाटावी लागते. त्याशिवाय इडल्या एकसंध राहणार नाही. अजून जर ते पिठ उरले असेल ( कोरडे ) तर असेच भिजवून, वाटून घ्या.
आणि मग आंबवा. त्यानेही इडल्या जमल्या नाहीत तर तो भगरा मिरची कढीपत्त्यावर फोडणीला द्या. एखाद्या झाकणाच्या डब्यात ठेवूनही हे मिश्रण वाफवता येईल.

रश्मी- ओलं पीठ टाकूनच द्यावं लागलं. कोरडं एकत्र (डाळतांदूळ) अजून आहे शिल्लक. आता वाटून घेऊन बघते.
दिनेशदा- चालेल, पुढच्या वेळी करताना उडीद डाळ भिजवून वाटून मिक्स करते. पण रात्रभर भिजवून/ दिवसभर भिजवून रात्री वाटून दुसऱ्या दिवशी वापरावी लागेल का?

Pl take one measure urad dal soak it in water for 3_4 hours and grind it. To this add two measure ready made idli rawa. Ad bit of water and keep this mix overnight. Next day morning pl add two table spoons oil and salt to taste. Then put in idli stand. Steam for 15 minutes.

हिवाळ्यात उडीद डाळ कोमट पाण्यात ३-४ तास भिजवावी. वाटताना पण कोमट पाणी घालावे. इडली रवा ( फक्त तांदळाचा, यात डाळ नसते) देखील थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवून , पाणी निथळून मग वाटलेल्या डाळीत मिसळावा. एकाच दिशेने भरपूर फेटून, झाकून उबदार जागी १०-१२ तास ठेवावे . मस्त फुलून येते पीठ.

धन्स मेधा. मला वाटलं इडली रव्यात आधीच उडीद डाळ आहे तेवढी पुरे म्हणून मी परत नाही घातली. आता परत करेन तेंव्हा घालेन.

गायू - तुम्ही instat इडली पीठ घरी करायचा प्रयत्न केला होता का?
मला तरी अस वाटतंय कि तुम्ही जास्त वेळ भिजवलं असेल किंवा eno जास्त झाला असेल. . जास्त भिजवल्या मुळे पीठ आंबल आधी त्यात तुम्ही eno पण घातलात.
eno कमी घालून , कमी वेळ भिजवून trial error करून बघा .
शेवटी पीठ आंबणे हे हवामानावर , घरातल्या उबे वर अवलंबून असते. १०० % अस काही नसतेच .
आहे त्या पिठात परत डाळ नका घालू त्यात आधीच डाळ तुम्ही घातलेली आहे की . मेधा वेगळ सांगतीये .

मृणाल१, सासूबाईंनी सांगितलेल्या प्रमाणत डाळ तांदूळ दळून आणले होते. जास्त तर नाहीच, कमी वेळ भिजवलं गेलं असं वाटतंय. एवढे पर्याय दिलेत सर्वांनी कि आता परत करेन पुढच्या आठवड्यात. धन्यवाद~

प्रमाण बरोबर वाटतंय .
भिजवण्याचा वेळ कमी नाही वाटत उलट मला जास्त वाटतोय.
चांगले १३ तास भिजवलय कि
आपण जेंव्हा डाळ तांदूळ भिजवतो तेंव्हा ६-७ तास भिजवतो आणि नंतर ६-७ तास fementation साठी ठेवतो.
तुम्ही दळून आणल्यामुळे fementation लवकर सुरु झाल असेल. त्यात eno पण घातला.
तुमच एकदा जमलं कि इथे शेअर करा .

मी परवा व्हेज पुलाव केला पन मिरचीचे तुकडे टाकायला विसरले गडबडीत. तर एकदम टेस्ट लेस झालेला. पुलावात तिखट चव यायला काय करायचं? मी दोन मिरच्या लांब कापून फोडणीत टाकते.
काही बेटर उपाय आहे का? माय डोमेस्टिक प्राइड इज हर्ट.

अमा, वरून टाकायचे तर चिली फ्लेक्स किंवा मिरपूड वापरून पहा. मोकळा करून जरा परतावा लागेल.
एरवी फोडणीत मिरी आणि लवंगा वापरल्यास ( सुक्या मिरच्यांसोबत ) तर चांगली चव येते.

काल मी पालक पनीर केलं होत.. चव नीट होती पण पालक खाल्ल्यावर थोडासा तोठरा / जीभ सोलवटल्यासारखी होत.. असं का?
मी फ्रेश क्रीम पण घातलं होत

सॉरी चनस, पण शंका आहेच. पालकात काही इतर पाने, दोरे वगैरे मिसळले गेले होते का ? नुसत्या पालक पनीर ने जिभेला त्रास व्हायचा नाही. शंका असेल तर खाऊ नका प्लीज.

अरे हो पालकच होता .. मी अगदी व्यवस्थित निवडुन मग वापरला..
अ‍ॅलर्जी >> Uhoh .. असं वाटत नाहीय कारण हॉटेल मधे खातोच कधीतरी तेव्हा असं नाही होत..

तेल व्यवस्थित तापल्यावरच बटाटेवडा तळणीत सोडला तरी तळणीत तळाशी जाऊन चिकटतो, याला काय कारण असावे?

पुलावाला तिखटसर चव यायला फोडणीत लवंगा, दालचिनी, मिरीदाणे असा खडा मसाला घातला तर चांगला स्वाद व तिखटसर चव येते. काहीजण भरड मिरी, लवंग, दालचिनी वगैरेंची पुरचुंडी करून ती पाण्यात सोडतात व ते पाणी उकळवून पुलावासाठी वापरतात. (टोमॅटो सॉस करतानाही बहुतेक अशीच पुरचुंडी घालून सॉस उकळतात.) पुलावात सिमला मिरची वापरली असेल तर त्याचाही तिखटपणा चवीत उतरतो. एवढे करूनही जर मनासारखी तिखट चव आली नाही तर वरून मिरपूड भुरभुरायची व नीट मिसळून घ्यायची. (इतपतच माझा अनुभव)

मोठी कढई आणि त्यात भरपूर तेल घेतले तर नाही चिकटत असे ज्येनांनी मला सांगितले होते. मी बारक्या कढईत किंवा पातेलीत बवडे तळते तर चिकटतात. झार्‍यानं हळुहळु सोडवावे लागतात नाही तर डाग पडतो.

अकु, त्या पुरचुंडीला बुके गार्नी म्हणतात. तसे एक स्टीलचे उपकरणही मिळते. फ्रेंच लोकांना मसाल्याचे उग्र स्वाद सहन होत नाहीत, म्हणून ते असे करतात.

विषय आलाच आहे खड्या मसाल्याचा तर विचारतेच Happy बिर्याणीत किंवा पुलावात खडा मसाला तोंडात आलेला अजिबात आवडत नाही. ते स्टीलचे उपकरण कसे बरं वापरायचे? कुठे मिळेल?

नुसता मसाला उकळूनही स्वाद लागणार नाही. त्यापेक्षा तूपाच्या फोडणीत हे गरम मसाले टाकावेत. ते नीट भाजले गेले कि त्यात पाणी ओतावे त्या पाण्याला उकळी आली कि ते गाळून त्यात भाताला हवे तेवढे पाणी घालावे आणि त्या पाण्याला परत उकळी आली कि त्यात तांदूळ वैरावे. यासाठी स्टीलची गाळणी वापरली तरी चालेल.

Pages