मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार, हा प्रॉब्लेम अलिकडे मायबोलीवर आहे हे आयडेंटीफाय केलेलं आहे. अ‍ॅक्सेप्टही केलेला आहे.आणि उपाय म्हणजे त्यांच्या नादी/तोंडी न लागणं कारण त्यांच्या लेवलवर उतरून त्या भाषेत लिहायची तयारी हवी. ते शक्य नाही. त्यामुळे दुर्लक्ष करणं.

मुळात प्रॉब्लेम आयडेंटीफाय केले आणि त्याही पेक्षा अ‍ॅक्सेप्ट केले तर उपाय शोधायची क्वेस्ट तरी सुरु होते...आणि उपाय नक्की आहेत शोधायला गेलें तर.>>>>> बायस्ड माणसानी बायस्ड प्रॉबलेम उभे केलेत हे दिसत असताना कसली आलीये क्वेस्ट अन कसलं काय? सगळच धुराळा.

मॉडरेटेड platform झाला की संपलं, आजच्या जगात टिकाव धरणं शक्य वाटत नाही. >> मॉडरेट काय करावं त्याचे नियम ठरवता येतील की.
गप्पांची पानं ओपन ठेवता येतील पण इतर लेख मॉडरेट करता येतील. मला पण वाटतं की ओपन प्लॅटफॉर्म अपिलिंग आहे पण तो गप्पांना. कथा / सिरीयस लेख यांच्यावर दुसर्‍याच कमेंट करून धागा हायजॅक करण्यापेक्षा / वैयक्तीक टीका करण्यापेक्षा मॉडरेट करणे आवडेल मला तरी.

मुळात प्रॉब्लेम आयडेंटीफाय केले आणि त्याही पेक्षा अ‍ॅक्सेप्ट केले तर उपाय शोधायची क्वेस्ट तरी सुरु होते...आणि उपाय नक्की आहेत शोधायला गेलें तर. >> +१ प्रॉब्लेम आहे की नाही या पासूनच सुरूवात आहे.

कथा / सिरीयस लेख यांच्यावर दुसर्‍याच कमेंट करून धागा हायजॅक करण्यापेक्षा / वैयक्तीक टीका करण्यापेक्षा मॉडरेट करणे आवडेल मला तरी.>>>> मी तर म्हण्णार होतो की अ‍ॅडमीनांना दुसरी कामं नाहीत का? पण त्यांनी हेही केलेलं आहे. कधी कधी लॉजिस्टकली शक्य होत नाही अगदी वेळच्यावेळी मॉडरेट करणे.

रत्नाकर जोशी, तुम्ही ठेवा त्यावर विश्वास आणि विचारही जरूर करा. इनफॅक्ट ज्यांना ह्या पत्रात काही अर्थ आहे असं वाटतंय त्या सगळ्यांनीच करावा.

कथा इ. ठिकाणी वैयक्तिक टीका फार कमी वाचायला मिळते. रादर कथा, ललित, वैचारिक, गुलमोहर यात मोजकेच प्रतिसाद असतात. सद्य स्थिती इ. वरील धागे तू म्हणतोस त्या रस्त्याने जातात.
बाकी moderation ला बुवा म्हणतात त्याला +१. दुसरं काम नाही का? Happy

Happy

अरेरे, माझ्या आवडीच्या धाग्यांवर काहीच लिहीले नाही?
क्रिकेट - हजारो प्रतिसाद. खेळ व खेळाडूंबद्दल उपयुक्त माहिती व चर्चा - भाऊंची खुसखुषित व्यंगचित्रे.
अमेरिकन निवडणुका, आश्विनि के यांचा जागतिक घडामोडींबद्दल असलेले माहितीपूर्ण सदर
टी पार्टी पार्ले वरील सदस्यांचे "संभाषण"
अश्या अनेक चांगल्या गोष्टी इथेच आहेत.

वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

काळ अनंत आहे, पृथ्वी फार मोठी आहे. वेळ गेलेली नाही, जाणारहि नाही. जितकी जगातली लोकसंख्या वाढेल तितक्या नाना प्रकृति, बर्‍या वाईट, वाढतीलच. नि जर जगात सर्वत्र मराठी लोक पसरले तर त्यांचे प्रतिबिंब इथे दिसेलच.

कधी ना कधी, कुठे ना कुठेतरी प्रत्येकजण अत्त्यंत गंभीरपणे, स्पष्टपणे आपली मते मांडतो/ते. ते समजले की कळते की कुणी वाईट वा वेडे नाहीत, पण प्रत्येक वेळी ते तसे असू शकत नाहीत.

जगातले सगळे काही अगदी सगळ्यांनाच आवडेल असे नसतेच. आपण चांगले दिसले तर दाद द्यावी नाहीतर उगाच काही न भूतो न भविष्यति असे घडत आहे असे समजू नये.

Happy

कॉपरमाईन तुम्ही स्पार्टाकस आहात
असू देत ना! एकदा ड्यू आय डी ची सोय झाल्यावर ती वापरण्यात काय गैर?
तसेहि मी इथे झक्की असलो तरी दुसरीकडे दुसराच कुणि असतो - घरी, कामावर असताना (कुणे एके काळी) वगैरे.

ते असू देत हो झक्की. आणखीनही ते कोण कोण असतील मायबोलीवर. पण उगाच निरागसतेचा आव आणून लिहायची गरज नाही.

मॉडरेटेड platform झाला की संपलं, आजच्या जगात टिकाव धरणं शक्य वाटत नाही. >> मॉडरेट काय करावं त्याचे नियम ठरवता येतील की. >+१ आत्ता मायबोली moderated आहेच कि. moderation चे extent कितपत असावे ह्याबद्दल वाद असला तर काय हरकत आहे ? आज मायबोलीवर इतिहास, राजकारणाचा कुठलाही धागा कोणीही सुरू केला तरी एकाच मार्गाने काही ठराविक आयडींकडून नेला जातो. ज्यांना ह्याच्या काहि मते \सेरिओउस्ल्य मांडायची असतील तर ती बाजूलाच ठेवावी लागतात. इथे फक्त वाचणार्‍यांचा प्रश्न नाही तर ज्यांना प्रामाणिकपणे काही लिहायचे असेल त्यांनाही त्रास होतो हाही भाग आहेच. अ‍ॅडमिन टीम ने त्याबद्दल काही करावे अशी अपेक्षा असली तर काही हरकत नाही. मूळ लेखिकेचा उद्देश काहीही असला तरी ह्या निमित्ताने त्यावर काही घडले तर चांगलेच आहे.

सहमत. अंशतः मॉडरेटेड करण्याशिवाय माझ्याहीकडे काही उत्तर नाही. पण सध्या तेच तर करतो.
याउपर खड्यांना उचलून फेकून देणे. यापुढे नवीन लॉगीन फक्त आणि फक्त फेसबुक, गुगल प्लस, लिंक्ड इन इ. ची क्रेडेन्शिअल्स वापरून करणे भाग पाडणे, हळूहळू सगळ्यांनाच तिकडे मूव्ह करणे इ. उपाय सुचतात.
मूळ लेखात शहाजोगपणाचा आव खटकला. पण त्याकडे दुर्लक्ष करून उपायावर बोलायचं असेल तर नक्की सहभागी व्हायला आवडेल.

फक्त फेसबुक, गुगल प्लस, लिंक्ड इन इ. ची क्रेडेन्शिअल्स वापरून करणे भाग पाडणे, हळूहळू सगळ्यांनाच तिकडे मूव्ह करणे इ. उपाय सुचतात
अरेरे, मग आमचा राम राम.
फेसबुक, गुगल प्लस, लिंक्ड इन हे असले काही आम्ही वापरत नाही. आता काही नोकरी नको आहे, तेंव्हा लिंक्ड इन बंद. बाकी साठी मेल, किंवा फोन. बहुधा मा़झा चेहेरा बघवत नाही लोकांना. त्यांनीच बंद केले वापरणे.
मेल, मायबोली बरे!

तसेहि दोन निरनिराळे इ-मेल आय डी वापरून माझे दोन लिन्क्ड इन आय डी झालेच आहेत. फेस बूक नि स्काईप वर पण प्रत्येकी दोन तीन आय डी आहेत.
फक्त मायबोलीवरच माझे दोन आय डी नाहीत.

Proud

फारच हास्यास्पद लिखाण.

Bw शब्द खटकला हे वाचून फारच हसू आले. गांधीजी , नेहरू , गांधी घराणे , मनमोहन सिंग , पवार यावर चिखलफेक केले तर चालते का ?

कॉपरमाईन यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे पटले. वरच्या ७०-८० पोस्ट्स वाचल्यावर लक्षात आलं की त्या पोस्ट्सनी कॉपरमाईननी मांडलेल्या मुद्द्यांना अ‍ॅक्चुअली सिद्ध करून दाखवलं आहे. एखादा आयडी एखादी गोष्ट मांडतो आहे आणि ती बरोबर असेल तर केवळ तो आयडी डुआयडी वाटतोय या संशयामुळे त्याने मांडलेली गोष्ट चुकीची कशी ठरू शकते? ते मुद्देच चुकीचे आहेत असं असेल तर ते जरूर लिहावं. पण इथे नव्याने आयडीयुद्ध आणि पर्सनल कमेंट्स आणण्याचं प्रयोजन समजलं नाही.

मायबोलीवर अंदाधुंद माजली आहे हे अगदी खरं आहे. बर्‍याच जणांच्या हे लक्षातही आलेलं असणार आहे. केवळ दुर्लक्ष करून हा गदारोळ कमी होईल असं नाही वाटत. तो कमी करण्यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह उपाय केले पाहिजेत. त्यादृष्टिने विचार करायला हवा आहे. मॉडरेशनची गरजही आहेच. पण त्याबाबत सर्वस्वी अ‍ॅडमिनवर अवलंबून राहण्यापेक्षा ते प्रत्येकाने स्वतःवर लागू केलं तरी परिस्थिती सुधारायला खूप मदत होईल. त्याशिवाय ज्यांना खरंच ही मायबोलीची सध्याची स्थिती सुधारावी असं वाटतं त्यांनी कुंपणावर बसण्याची भूमिका सोडून शक्य तिथे चर्चांना अनिष्ट वळणं लागण्यापासून थांबवायचा प्रयत्न करावा, 'बरी करमणूक होते आहे' असं म्हणून पेटण्याचं पोटेन्शिअल असणार्‍या धाग्यांना अजून इंधन आणि/किंवा चूड पुरवून येऊ नये. सुरूवात म्हणून इतकं करायला काय हरकत आहे?

अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर या सर्व गदारोळाची सुरूवात ही हिंदू, ब्राह्मण, संघ, भाजप, सावरकर, इ. द्वेष्ट्या लोकांनी केलेली आहे. त्यांनीच अतिशय तिरकस भाषा चालू केलेली होती, अशाने वाद वाढत गेलेले आहेत. विरोधी विचार मांडूच नयेत असे नाही पण भाषा उगाचच विखारी असू नये.

संयत आणि अभ्यासू भाषेतली चर्चा पहायची असेल तर मिर्ची यांचे आआपचे धागे पहावेत.
व्यक्तिशः मला ते विचार पटत नसले तरी त्यांची तोल जाऊ न देता लिहिण्याची शैली फार चांगली आहे.

अनेकवेळा दोन्ही बाजुच्या लोकांना शांततेचे आवाहन करूनही काही उपयोग झालेला नाही.

रमड, मायबोलीवर सध्या किंवा गेल्या दोन तीन वर्षांपासून काय चालू आहे हे सगळ्यांनाच माहित आहे आणि ते बदलायला हवं ह्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण कॉपरमाईनने मायबोलीत झालेले वाईट बदल ह्या कळकळीतून हे सगळं लिहिलंय असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. एवढी बदलाची इच्छा खरंच असेल तर करावी सुरूवात स्वतःपासून. पण इथे सोंगच जास्त चालली आहेत. शेवटची पोस्ट काय नी काय. हा आयडी गेला तर दुसरे असतील ठेवणीतले. त्यातून चालूच रहातील वार.

विकू

तुमच्या पोस्टकडे दुर्लक्ष करावं अस वाटत होतं. पण तुम्ही एक सेन्सीबल आयडी अस्सल्याने तसं करण्याचं धाडस होत नाही. तुम्ही जे तर्कट इथे वापरू पाहताय तेच पुढे नेऊन जर असं म्हटलं की या कंपूच्या किंवा आयडीच्या तक्रारीवरून ज्या आयडीवर (अन्यायकारक?) कारवाइ झाली त्यांनाही असं खुलं पत्र लिहीण्याची संधी मिळायला हवी, त्यांचेही काही मुद्दे असतीलच ना ? या धाग्याचं जे प्रयोजन आहे तेच प्रतिसादाचंही आहे. किंबहुना कांगाव्याला तर्कशास्त्र चालत नाही, प्रयोजन नसलेले प्रतिसादच लय गुणकारी ठरतात. थोडक्यात व्यावहारीक पोस्ट आहे ती.

बाकी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेकांना मायबोलीवर अंदाधुंद माजल्याचा साक्षात्कार झालेला आहे. यातले काही फेसबुकावर एका कॉमन ग्रुपात आहेत (अनावश्यक असलेला उल्लेख) हा योगायोग समजावा. त्यांच्यासाठी सूचना (आदेश नव्हे) , १ मे २०१४ च्या आधीचे धागे पहावेत आणि प्रधानमंत्री पासून राष्ट्रपतींचा उल्लेख कुठल्या भाषेत केलेला आहे त्याचा अभ्यास करावा. धन्यवाद.

सायो, कॉपरमाईनचा हेतू काहीही असला तरी मुद्दे चुकीचे नाहीत इतकंच माझं म्हणणं आहे. त्यांना बदलाची इच्छा आहे की नाही यावर काथ्याकूट करून मायबोलीच्या परिस्थितीत काहीच बदल होणार नाही. माझ्या परीने मी उपाय सुचवायचा - निदान चर्चेला हातभार लावायचा - प्रयत्न करते आहे

रमड व रार यांच्याशी सहमत. कॉपर माईन ने मांडलेले मुद्दे ते कुणी मांडले आहेत हे बाजूला करून बघितलं तर ?

>>आदरमोद शब्द खटकला हे वाचून फारच हसू आले. गांधीजी , नेहरू , गांधी घराणे , मनमोहन सिंग , पवार यावर चिखलफेक केले तर चालते का ?

"त्यांनी चिखलफेक केलिये ना, मग आम्हीही करणार !" हेच मुळात चुकिचे आहे. Bw सारखे शब्द वापरून आमच्याकडे आता टीका करायला मुद्दे उरलेले नाहीत हेच मान्य करताय.

>>१ मे २०१४ च्या आधीचे धागे पहावेत आणि प्रधानमंत्री पासून राष्ट्रपतींचा उल्लेख कुठल्या भाषेत केलेला आहे त्याचा अभ्यास करावा.

पुन्हा तेच. त्यांनी केले, मग आम्हालाही करू द्या हा हट्ट कशाला ?

वाउ , क्लासिक केस ऑफ सदस्यत्व वापसी.
वातवरण असहिष्णु आहे म्हणून काही लिहू नये म्हणण,त्यावर नॉर्मली भाजपच्या बाजूने असणाऱ्याची पाठराखण
आणी नॉर्मली व्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे , मुळात कॉपरमाइन कसा सन्घिश्ट i d , आणी मुद्दामून हा विषय उकरून काढत आहे या वर हल्ला चढवनार
इकडे लोकांच्या आईदीओ लोजी ची या धाग्यापुरती अदलबदल झालेली दिसत आहे
; )

वाचतोय Wink

Double post

कॉपरमाईन ह्यांनी घेतलेला तटस्थ निरिक्षकाचा पवित्रा रुचला नाही म्हणून त्यांना जे झोडपणे सुरू झाले त्यात कॉपरमाईन ह्यांच्या माबोविरोधकांनी आयतेच हात धुवून घेतले. 'वैयक्तीक प्रतिसाद डोक्यात जातातच' असे म्हणणार्‍यांनी वर आलेल्या काही वैयक्तीक प्रतिसादांबाबत मात्र अवाक्षर काढलेले दिसत नाही आणि त्याच वेळी कॉपरमाईनच्या धाग्यावर दहा दहा प्रतिसाद दिलेले दिसत आहेत. सॉफ्ट टारगेट! कोण चिखलात दगड मारणार, हीच मानसिकता! कॉपरमाईन ह्यांनी संबंधीत संस्थेकडून काय अधिकार मिळवले होते, ते मायबोलीला कळवले होते का वगैरे प्रश्न तर हास्यास्पद आहेत. मुळात कॉपरमाईन ह्यांनी घेतलेला पवित्रा अविश्वासार्ह आहेच आणि त्याचे पुरावे मागणे अजून मजेशीर! त्यांनी 'जाहीर' पत्र ह्या नावाचा धागा काढलेला आहे ह्याचा अर्थच त्या कोणताही सर्व्हे किंवा काहीही करत नव्हत्या हे स्पष्ट आहे.

जो तो आपापली मजा करून घेत आहे. अलिप्तपणे राजकीय गदारोळावर टीकास्पद बोलायला सगळे तयार आहेत. पण जे गदारोळ करत आहेत त्यांना जाहीरपणे चार शब्द ऐकवायची जुन्यांमध्येही इच्छा नाही किंवा धाडस नाही. कारण नेहमीचेच, हे मश्रूम आय डी काय, आज असतील उद्या नसतील, आम्ही कशाला वादात पडू! इथे कॉपरमाईनना जाब विचारायला एरवी फक्त वाहत्या पानांवर बागडणारे सतरा आय डी धावले आहेत, पण अश्लाघ्य उल्लेखांनी धाग्यांची गटारे करणार्‍यांना एक अक्षर समजावून सांगण्याची त्यांची हिम्मत होताना दिसत नाही. कारण तेच, की कॉपरमाईन काही आपल्याला उद्देशून वैयक्तीक लिहिणार नाहीत, 'ते तसले' आय डी लिहितीलसुद्धा! वर असेही म्हणायला मोकळे आहेतच की असे अश्लाघ्य लिहिणार्‍यांना अ‍ॅडमीन बघून घेतील. जे बरोबर आहेच. पण अ‍ॅडमीननी त्यांना दहा दहा वेळा उडवूनही ते कसे काय पुन्हा येतात हे कोणी विचारताना दिसत नाही.

अख्ख्या मायबोलीवर राजकीय धागे किती टक्के निघतात आणि त्यात किती सदस्य अश्या पातळीवर उतरतात हे पाहिले तर ते आकडे फारच नगण्य भासतील. पण तेच लोक फक्त सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात असे का? कारण सिंपल आहे. एरवी ती सगळ्यांसाठी फुकटची एन्तरटेन्मेन्ट असते आणि त्याबाबत धागा निघाला की पांडित्यप्रदर्शनाची सोय होते.

रमड, तुझा हेतू चांगला आहे हे माहित आहे आणि त्याच हेतूने तू पगारे बीबीवर मधे पडलीस हे ही पाहिलेलं आहे. पण मला तरी ह्या आयडीच्या मूळ छुप्या हेतूकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येणार नाही. इथे कुणी दुधखुळं नाही हे इतक्या प्रतिक्रिया वाचून त्यांच्या लक्षात आलंच असेल.

मुद्दे काय आहेत इतकंच ते कोणी मांडलेत याला महत्त्व आहे. कारण जेव्हा कन्क्लूजन वाचतो त्याला काहीच अर्थ नसतो, त्यामागचं मोटिव्ह माहित पाहिजेच. व्ही डब्लू ने इंजिनचे पेपर लिहिले किंवा सनोफी अवेन्थीसने ड्रगचे फक्त रिझल्ट्स दिले तर कोण विश्वास ठेवणार? टेस्ट काय, कुठे कशा केल्या, त्याचे रिझल्ट्स. रीस्क्स इ. आणि बरंच काही हवंच. सायंटिफिक जर्नल मध्येही फंडिंग कुठलं यावर चिकार काथ्याकूट होतो, कारण सरळ आहे. कोण लिहितं याला अनन्यसाधारण महत्त्व आहेच, कारण मोटिव्ह/ हेतू. फेस व्याल्युवर कशी काय कुठलीही गोष्ट घेता येईल? यासाठी या आयडीने सिरीयस बीबी काढल्यावर हा कोण यावर चर्चा झाली तर योग्यच.
बरं या विषयावर गेल्या २ वर्षात किमान ८-१० धागे निघालेत, त्यावर अनेकानेक उपाय सुचवलेत. admin टीमला ते करणं खरंच शक्य आहे का, तर नसावं असं मला वाटतं. तर ते न बघता हा नवा धागा. तरी हा नवा धागा काढून त्यावर चर्चा करायलाही हरकत नाही. तर मी किंवा इतर लोकांनीही उपायही सांगितले आहेतच.
तू बघ्याची भूमिका घेऊ नका म्हणत्येस ते अगदी पटतय. कुंपणावर बसू नका हे मान्य. पगारे यांच्या धाग्यावर तू ठाम भूमिका घेत होतीस तेव्हा मी पाठींबा द्यायला हवा होता असं तेव्हा ही आणि आजही वाटतं पण खरंच नको वाटतं कधीकधी. ते बरोबर नाहीच, कुंपणावर बसण्यात काहीच हशील नाही. यापुढे प्रयत्न करीन.

मोगा तुमची प्रतिक्रिया आवडली नाही.
बेफि, वाचताना जंप करत वाचतो मी. मसल मेमरीत फिल्टर असल्यागत अनेक गोष्टी दिसत नाहीत मला. पेज वरच्या जाहिराती आणि तेल ओतणाऱ्या प्रतिक्रिया. पण यापुढे दिसलं की सोडून देणार नाही. Happy

Pages