ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्क ट्वेन.
सहमत.

त्या यादीत तू नळी, थोपु/चेपु / धन्स हे पण घाला.

आता प्लीज सहमत, +१, + १०००० लिहिल्याबद्दल काही शिक्षा करू नका.
Happy

इन्ना, अगदी अगदी..... मधेच किन्चाळी आरोळी काय चिन्हान्नी लिहीणार ते?

साती, एकदा अर्थच नाकारायचा म्हणल्यावर, हातपायशरिरकातडित्वचा इत्यादिन्ची आपसुक होणारी थरथर कम्प असेल वा रोमान्च, काय फरक पडतो? अन का पडावा? नै का? Wink

गामा, ते माहिते हो, पण अर्थच नाकारला तर साती ताईन्ना पडतो तसा प्रश्न उद्भवतोय.... एका अर्थाने अर्थावरील बन्दी म्हणजेच शब्दावरील बन्दी, नै का?

वरदा, नीरजेने बरोबर ओळखलय बघ.... !

गेल्या पन्नासवर्षात "व्याकरण नको", पुणेरी भटान्ची मराठी प्रमाणभाषा म्हणून नको वगैरे थेर, आता शब्दान्चे अर्थच नकोत इथवर पोहोचली आहेत असे माझे मत बर्का..... अन जर शब्दान्ना अर्थच नको, तर वापरायलाही नकोत....
म्हणजेच बोलायलाही नको.... याचा अतिरेक झाला की माणसे श्वापदान्सारखे आवाज काढून सन्वाद साधायला लागतील... कुणी जरा जास्त उत्साही कल्पनाशक्तिवाला स्वतःस कुत्र्यासारखे शेपुटही लावुन घेईल... हलवत हलवत शब्दाविना सन्वाद साधायला...... अहाहा... काय तो नजारा असेल.
नजरेच्या भाषेतुन सन्वाद साधायचा प्रेमिकान्चा मक्ता नष्ट होऊन कुणीही केवळ नजरेने, भुवयान्च्या तर्हरर्‍हेच्या हालचालिन्नी, पापण्यान्च्या मिटामिटीनी सन्वाद साधू लागेल....
असो. चालुद्यात!

>>>> (इथे मास्तरांनी टेबलावर खाडखाडखाड पट्टी आपटल्याचा आवाज कल्पावा) <<<<< अचूक विश्लेषण मार्कभाई, सहमत आहे.

माचूपिचूच्या देवाला हरणाचा नैवेद्य दाखवलेल्यांना किरमिजी रंग दिसतो बाकीच्यांना नाही. कळ्ळं? >>>> कळलं कळलं... ट्युब पेटली आत्ता... तो महान धागा आठवला Happy

@ वरदा - हो, क्रिमसन/किरमिजी म्हणजे लाल रंगात तपकिरी छटा असंच असावं. (शीर्षकाचा अनुवाद केवळ सोयीसाठी 'माय नेम इज रेड' केला असेल बहुतेक.)

५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.>> जड अंत:करणा वर बंदी घाला.. Happy हलकेच घ्या..

हायला, ह्या धाग्यावर तर धम्मालच सुरूये की...

ही काही घ्या..

कातरवेळी कुणाची तरी सय होणे..
चाफेकळी नाक असणे
ती लाजून चूर झाली... (चूर म्हणजे काय भुगा झाला??)
सूर्य माथ्यावर आला होता...(आपल्याच माथ्यावर बरा येतो?)
सावलीनेही साथ सोडली
मनात हलकल्लोळ माजला होता (आयला हलकल्लोळ या शब्दाचा अर्थ आजपर्यंत उमजला नई)
त्या नाजूक वळणावर तू सोडून गेलीस, याच्यावरही बंदी आणा...
जीवनाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघणेवरही बॅन... बॅन.. बॅन...
काळजाचं पाणी पाणी होणे... (काळजाचं पाणी झालं तर लिव्हर ट्रान्सप्लान्ट करावं लागणार)
हृदयाची धडधड वाढली.
त्याची गाडी आता कुठे रूळावर आली (आतापर्यंत का बांधाबांधाने धावत होती का?)
अलगद हा शब्दच साहित्यातून काढून टाकावा..
अपयश ही यशाची पहिली पायरी
अमूक-तमूकची फिनिक्सभरारी/ गरूडभरारी
त्याने आकाशाला गवसणी घातली
आकाश कवेत घेतल्याचा आभास झाला..
आणि हो.. कोंदण हा शब्द कुठेही वापरायला बंदीच हवी.

तूर्तास एवढे पुरे

स्वाती,
अहो आज तर मुंबईची रक्तवाहिनी, अन्नवाहिनी, श्वसनवाहिनी लोकल रेल्वे सुद्धा विस्कळीत कम ठप्प झाली होती.
आणि तरीही पहिला पाऊस म्हणून लोकांच्या आनंदाला उधाण आले होते.
तरुणाई आणि प्रेमी युगुलांनी (जे भर उन्हाळ्यात पण कुठल्या ना कुठल्या तरी झाडाखाली पडलेलेच असतात) त्यांनीही या वातावरणाचा फायदा उचलत कसले कसले बेत आखले म्हणे.

हे सगळं कथा-कादंब्र्यांबद्दल चाललंय. पण सामाजिक विषयावर लिहायचं किंवा बोलायचं असलं की सुरुवात "आजच्या धकाधकीच्या जीवनात' अशीच करायची असा नियम आहे, तो तोडूनफोडून टाकायला हवा. (धकाधकीच्या जीवनाच्या नावावर कशाच्या नावे काहीही खपवता येतं हा शोध आजच मायबोलीवर पुन्यांदा लागला)

आज स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत... नको नको हे वाक्य. वाचून वाचून बुरशी आली. Sad

Pages