कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.

हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, तुझी कथा मुळात मला आवडली ती त्याच्या संडिग्धतेमुळे. कुठेही कसलंही "वर्णन" येत नाही. सगळा खेळ वाचकाच्या मनामधे होत राहतो.

लिंगनिरपेक्ष आहे हे पुन्हा वाचल्यावर जाणवलं. धन्यवाद!!! लिहीत रहा. Happy

धन्यवाद नंदिनी. Happy

>>> कुठेही कसलंही "वर्णन" येत नाही. सगळा खेळ वाचकाच्या मनामधे होत राहतो. >>>>

बरोबर ओळखलंस. हेच अपेक्षित होतं. त्याचकरता कथाही एका सरळ रेषेत पुढे जाणारी लिहिली नाही. ती गोल गोल वळणं घेत पुढे सरकते. एकदा वर्तमानाबद्दल भाष्य, मग भूतकाळाबद्दल, मग भविष्याबद्दल, पुन्हा वर्तमान .... असं!

मीरा, कथेबद्दलचं विवेचन इंटरेस्टिंग आहे. अनुभवांच्या पल्याड जाऊन अशी काहीतरी अनुभूती कथालेखनाला कारणीभूत ठरणे- हा सारा प्रवासच मस्त.

सतीश तांब्यांची मुलाखत चांगली आहे. मात्र अनेक वाक्ये एकमेकांनाच छेदताहेत असं वाटलं. काही मतंही पटली नाहीत. त्यांच्या फेसबुकवरच्या वावराबद्दलही बरंच काहे बोलता येण्यासारखं आहे, पण ते इथं नको.

पण त्यांच्या मुलाखतीतलं आधी शीर्षक सुचणं आणि मग त्याचा खुंटीसारखा आधार घेऊन कथेचे उभे आडवे धागे रचणं- हे इंटरेस्टिंग आहे. माझंही असं काही वेळा झालं आहे, म्हणूनच नाही, तर शीर्षक सुचणं, आणि त्याचा पक्का आधार आणि आश्वासक सोबत असल्यागत आपलं कल्पनाविश्व आणि अनुभव गुंफणं- या सार्‍यात कथेची गाडी डिरेल होण्याची शक्यता कमी असेल कदाचित.

आधी शेवट सुचण्याबद्दलही असंच. मागच्या पानावर शेवटाची चर्चा वाचली, तेव्हा उलटसुलट विचार करून बघितला. शेवट सुचण्याबद्दल मला अशी शिस्त वगैरे पाळता आली नाही. शेवट कधी अचानक, अनाहूत तर कधी ठरवलेला- असं होत गेलं. पण अनेक वेळा असंही झालं, की ठरलेले शेवट असतानाही लिहिताना, शब्दबद्ध करताना तो बदलला, किमान त्याचा पोत तरी बदलला.

नंतर सहज विचार केला- शेवट नसायला काय हरकत आहे? किंवा कथेचे शेवटचे शब्द म्हणजे शेवट- असंच सरळसरळ प्रकरण मिटवून टाकलं तर? (:फिदी:) पण मनात असलेल्या अनेक अर्धवट कथांचा विचार करत गेलो, तसं असा अधांतरी किंवा नसलेला शेवट दाखवणं हेही तितकं सोपं नाही- हे कळलं.
याच दरम्यान केव्हातरी अनुभवमध्ये गणेश मतकर्‍यांची 'बिनशेवटाच्या कथा' ही मालिका बघितली. आपल्यालाही असा प्रयोग करायचा हक्क आहे- हे जाणवून तो प्रयोग सुरूही केला. http://www.maayboli.com/node/46304
यातून बरंच काही कळेल, शिकायला मिळेल, असं वाटतं.

(असं सरसकट वर्गीकरण शक्य नाही आणि अन्यायकारकही असेल, कारण प्रत्येक लेखकाची थॉटप्रोसेस आणि कथेची प्रोसेस वेगळी. पण नंदिनीची दिवाळी अंकातली कथाही थोडी या प्रकारातली वाटली. शेवट न ठेवणं किंवा शेवट अधांतरी ठेवणं- हे तिनं आधी रंगवलेल्या वातावरण आणि नेपथ्याने संपूर्ण्पणे जस्टिफाय केलं आहे, असं वाटलं.)

माझ्या दिवाळी अंकातल्या कथेबद्दल मी इथेच लिहितेय. ही कथा जर मला "स्वीट होम अलाबामा" हा इंग्रजी चित्रपट पाहताना सुचली असं सांगितलं तर कुणी विश्वास ठेवेल का? Happy
तो चित्रपट कुणी पाहिला असेल अणी माझी कथा वाचली असेल तर काय साम्य शिल्लक राहिलंय ते सांगा बघू.

इंटरेस्टिंग लिंक आहे सिंडरेला. ऑडिओ व्हिज्युअलच्या इलेक्ट्रॉनिक जमान्यात "Here is a confluence of aesthetics of picture painting, singing and narration making for a wholesome treat" हे भारीच.

इथं कावेडिया असं आडनाव व्यापार्‍यांच्यात बघतो नेहमी. ते लोक मुळचे हेच असावेत बहुधा.

काही प्रश्न
१) कथा लिहिताना स्त्री पात्र आणि पुरुष पात्र असे वेगळे भेद करायची गरज असते का

२) स्त्री लेखिकेने रंगवलेल्या पुरुष पात्रामध्ये आणि स्त्री पात्रात फरक असतो का ( असल्यास कसा)

३) हा मुद्दा पुरुष लेखकाच्या बाबतीतही म्हणता येईल

४) एकंदरितच कथा लिहिताना स्त्री पुरुष हा भेद लक्षात घ्यावा की जसा फ्लो येईल तसे लिहित जावे

नीट्से मांडता आले नाही
पटकन आठवल तेव्ध लिहील

कथा लिहिताना स्त्री पात्र आणि पुरुष पात्र असे वेगळे भेद करायची गरज असते का>>> हो. अर्थातच. पात्राचे केवळ लिंगच नव्हे तर प्रत्येक गोष्टीमध्येच भेद होत जातो. एकसारखी दुसरी व्यक्ती नसते. मग, एकाच सारखे दोन्न पात्रे असून कसे चालतील? लिहिताना पात्रांच्या बोलण्या-वागण्याची शैली ही त्या पात्राच्या तबीयतीनुसार बदलणारच. पण ते "स्टीरीओटाईप" असू नये असे माझे मत. (Unless you want it to be a stereotypical)

२ आणी ३ बद्दल कल्पना नाही.

४ बद्दलः हे माझ्या दृष्टीने तरी मला कथा आधी "दिसते" ते पात्र नक्की दिसायला कसं आहे याच एक चित्र मनासमोर पक्कं तयार असतं त्यामुळे स्त्री आहे की पुरूष हे तिथे नक्कीच असतं.

कथा फ्लोमध्ये बर्याचदा लिहून झाल्यावर मी त्या पात्रांची संवाद आणि इतर मांडणी आखून घेते. उदा: रेहान त्याच्या वडलांशी कोकणीमधेय बोलतो, भावाशी उर्दूमध्ये आणि प्रियाशी बोलताना ब्राह्मणी बोलीमध्ये. मी लिहिताना सरळ माझ्या बोलीभाषेमध्ये लिहून घेते आणि नंतर सावकाश त्याचं रूपांतर करते. यामधे पात्राची मानसिकता क्लीअर असल्याने "स्त्री-पुरूष" असे काही वेगळे मात्र नसते.

१. हो...असा भेद करायलाच हवा. प्रत्यक्ष आयुष्यात जशी एखाद्या घटनेवरची स्त्री आणि पुरूषाची प्रतिक्रिया वेगळी असते, एखाद्या प्रसंगाला तोंड देण्याची पद्धत वेगळी असते, तसंच.

२ आणि ३ ला मिळून उत्तर म्हणून एक गंमत -
'ललित' मासिकात एकदा कधीतरी 'लक्षवेधी पुस्तके'मधे एका कथासंग्रहाबद्दल वाचत होते. त्या कथा सगळ्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या होत्या. एका कथेची नायिका १२-१३ वर्षांची, ती वयात येते तो प्रसंग, तो नेमका क्षण लेखकाने अगदी अलंकारिक भाषेत सविस्तर वर्णलेला होता. त्या वर्णनावर फिदा होऊन त्या समीक्षकानं त्याच्या शैलीची तोंडभरून स्तुती केली होती. स्तुतीसोबत त्या वर्णनातली काही वाक्यं उधृत केली होती. ती वाक्यं वाचून मला फुस्स्कन हसूच आलं. (अंतर्मनात स्फोट झाला, सग्ळं डळमळलं आणि एक आंतरिक अनुभूती सर्वांगावर पसरली - या टाईप काय काय होतं :अओ:) आता, त्या कथालेखकाला गाठणं काही शक्य नव्हतं; मग मी त्या समीक्षकालाच सरळ ई-मेल केलं Proud म्हटलं, 'सुरेख, वास्तवदर्शी वर्णन वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या क्षणी असं काही होत नसतं, इन फॅक्ट असा एक क्षण पकडताच येणार नाही. सर्वांगावर पसरणारी अनुभूती वगैरे सगळी पुरूषलेखकांची कल्पना आहे. वास्तवदर्शीपणाच्या नादात लेखकानं आपल्या कल्पनांचाच विस्तार केलेला आहे.'
मुद्दा हा आहे, की थोडा-फार फरक असतो. तो फार ढळढळीतपणे समोर येऊ न देण्याची जबाबदारी त्या-त्या लेखकाची असते.

४ बद्दल नंदिनी +१

अंतर्मनात स्फोट झाला, सग्ळं डळमळलं आणि एक आंतरिक अनुभूती सर्वांगावर पसरली - या टाईप काय काय होतं<<< सीरीयसली??? Lol

या वर्णनात कसलं आलंय वास्तवदर्शी? रीसर्च रे बाबा रीसर्च!!!

ललितादेवी,

>> सर्वांगावर पसरणारी अनुभूती वगैरे सगळी पुरूषलेखकांची कल्पना आहे.

अगदी अगदी! Lol

मराठी साहित्यावरील इंग्लिश रोमँटिसिझमचा प्रभाव स्पष्ट दिसतो! Wink

आ.न.,
-गा.पै.

अनेक पुरूष मराठी साहित्यिकांची ठाम समजूत असते की स्त्रीच्या मनातले आपल्यालाच समजते. आणि ते जे काय लिहित असतात ते फार्च भारी विनोदी असते.

लले..... Lol हे एकदमच येडचॅप आहे.

अनेक पुरूष मराठी साहित्यिकांची ठाम समजूत असते की स्त्रीच्या मनातले आपल्यालाच समजते. आणि ते जे काय लिहित असतात ते फार्च भारी विनोदी असते.
>>> Lol आहेत की डोळ्यापुढे अशी उदाहरणं. खरंच खूपच विनोदी असतं असं लिखाण.

ग्रंथालीनं काही वर्षांपूर्वी 'श्री. पु. भागवत - व्यक्ती आणि संपादक' हे सुरेख पुस्तक प्रकाशित केलं होतं. कथालेखनाला, किंवा लेखनाच्या कोणत्याही प्रकाराला गांभीर्यानं घेणार्‍या आणि लेखन प्रकाशित करणार्‍या प्रत्येकानं हे पुस्तक वाचावंच, असा मी आग्रह करेन.

नाही, हे पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. निदान गेल्या वर्षीपर्यंत नव्हतं. नवी आवृत्ती आली असल्यास बघून सांगतो.

मला परवा साहित्याची निर्मिती प्रक्रिया हे आन्नंद यादवांचे एक चांगले पुस्तक मिळाले. त्यावर लिहायचे आहे, तूर्तात लोकं बाकीची पुस्तकं फाडण्यात मग्न असल्याने त्यावर नंतर लिहेन. Proud

मांडणी, पात्र निवड इ. इ. गोष्टींचा अभ्यास नसल्याने मी फार लिहू शकणार नाही पण काही प्रश्न पडले तर नक्कि विचारेन अभ्यासकानी मोकळेपणाने उत्तरे द्यावीत ही विनंती.

१. आपल्या जगाबाहेरचं जग मांडताना आपल्या जगातली माणसंच तिथेही कळत नकळत नाव बदलून मांडली जातात का?

लिखाण करताना आपल्या मनात डोक्यात लिखाणाचा साचा तयार असतो. सुरुवात , मध्य , शेवट . सामान्यत आपण तसाच लिहितो
पण कधी कोणी आधी शेवट मग सुरुवात , मध्य अस करून लिहील आहे का?
म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट माहीत आहे पण तिची सुरुवात कशी करायची याबाबत गोंधळ आहे अस काहीस ?!

आपल्या जगाबाहेरचं जग मांडताना आपल्या जगातली माणसंच तिथेही कळत नकळत नाव बदलून मांडली जातात का?<<< मी लिहत असताना तर नक्कीच. कित्येकदा तर मी नावं देखील बदलायच्या फंदात पडत नाही. Proud

पण कधी कोणी आधी शेवट मग सुरुवात , मध्य अस करून लिहील आहे का?>>> मी केलंय कितीतरीवेळा.

कालच्या म.टा.च्या पुरवणीत श्याम मनोहरांचा एक छान लेख आला आहे.

तो वाचून इथे आजवर झालेल्या चर्चेची मला आठवण झाली. म्हणून लिंक देत आहे. काही काही मुद्दे फारच पटले.
खासकरून,
'लिखाणाबद्दल'मधला मुद्दा (१), (२)
'वाचनाबद्दल'मधले मुद्दे (१) ते (४)

अवश्य वाचावा आणि विचार करावा असा लेख आहे.

खूपच सुंदर लेख आहे..
काही मुद्दे तर अक्षरशः काळजाला भिडणारे आहेत.. पुन्हा सावकाश वाचतो.. छान चर्चा होऊदेत..

'पूर्ण' आणि 'पुणे' वाला टायपो का. Proud

मटा आहेत ते. त्यांना माफ करा. मनोहर गुर्जींचा लेख छापल्याच्या बदल्यातही माफ करायला हरकत नाही.

पूर्ण' आणि 'पुणे' वाला टायपो का<<<< हो. सेरीयसली ते वाक्य दोन तीनदा वाचले मी. सर्जनचा मराठी इंग्रजी अर्थ घेऊन पण काही फरक पडतो का ते पाहिले!! Lol

Pages