लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय हे.. आज मागचे सत्तरेक प्रतिसाद वाचून काढले आणि हसून पुरेवाट झाली. त्यामुळे 'करुणा' स्टेन चा ताण कमी झाला हो.

IMG-20210605-WA0025.jpg

अर्थात लोकसत्ता!

वावे Happy
नेहमीप्रमाणे हसू का रडू झालं.

मायबोलीवर अर्ध्याच्यावर प्रतिक्रियांंमध्ये 'खूप' ऐवजी 'खुप' वाचल्याने हे तितके खुपले नाही. प्रशक्ती आली वाटते.

कुमार१,
क्ुपया , बालंबाल शब्द असलेली इतर मान्यताप्राप्त मराठी शब्दकोशांच्या लिकां देऊ शकाल का?
तुम्ही‌ आधी दिलेला शब्दकोश हा ईतर काही‌शब्दकोशांचा एकत्रीत केलेला आहे . त्यात व्युत्पत्ती दिलॆली नाही.
.

छापील शब्दरत्नाकर मध्येही बालंबाल हा शब्द दिलेला आहे.
पण व्युत्पत्ति नाही.

इथे (https://archive.org/details/in.ernet.dli.2015.366549/page/n479/mode/2up?...)
पान ४१८ वर तो शब्द आहे.

तुम्ही ज्या पान क्रं ४१८ चा संदर्भ दिलेला आहे, तिथे "बालंबाल" हा शब्द या शब्दकोशाच्या यादीतील एक शब्द म्हणुन नाही, तर "बाल"‌या शब्दाच्या वाक्यात उपयोगाचे उदाहरण म्हणुन आलेला आहे. इथे बाल म्हणजे केस हा सुद्धा मराठी शब्द दिला आहे.
तोच मोल्सवर्थमधे शोधला असता खालील वेगळ्या उच्चाराचा उल्लेख सापडला:
https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/molesworth_query.py?qs=%E0%A4%AC%E...

.
केसांसाठी बाल हा शब्द जर मूळ मराठीत असेल व तो गेल्या ५० एक वर्षांत हिंदीच्या प्रभावामुळॅ ईकडे आलेला नसेल तर बाल बाल हा मूळ हिंदी बालंबालपेक्षा वेगळा शब्द वाटतो . त्यामुळे बालंबाल हा हिंदीच असावा अशी शक्यता जास्त वाटते.

FB_IMG_1622721698454.jpg

हे छापील वर्तमानपत्रात आहे. अपुर्‍या सरावामुळे वर्चस्व गाजवण्यात अडचणी येऊ शकतात हे मान्य आहे. पण 'अपुर्‍या सरावाविना' म्हणजे काय नक्की? म्हणजे नेहमी अपुराच सराव करतात आणि ह्यावेळी तर त्याविनाही वर्चस्व गाजवू - असं काहीतरी म्हणायचंय का?

"रायगड जिल्ह्यातील 'संभाव्य दरडग्रस्त' गावांमधील रहिवाशांचे स्थलांतर सुरू" अशी बातमी मी काल लोकसत्तामध्ये वाचली.
अर्थ पोचतोय. पण असा शब्द खरोखरच आहे का? पूरग्रस्त, चक्रीवादळग्रस्त, दंगलग्रस्त या शब्दांमध्ये पूर, चक्रीवादळ वगैरे दुर्घटना आहेत. दरड ही दुर्घटना नाही, दरड कोसळणे ही दुर्घटना आहे. 'दरडीवर चढून' वगैरे शब्दप्रयोग असतात. मग 'दरडग्रस्त' , तेही संभाव्य, हा शब्दप्रयोग बरोबर आहे का?

दरडपातग्रस्त शब्द बरोबर वाटतो. पण कुठल्याही ग्रस्त आधी संभाव्य हा शब्द बरोबर नाही वाटत. हे म्हणजे कुठे धोक्याच्या ठिकाणाहून लोकांना आधीच हलवून वाचवलं म्हणजे "संभाव्य मृत व्यक्तींना हलवण्यात आलं" असं म्हटल्या सारखं वाटतं.

त्यापेक्षा 'दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांमधील नागरिकांचे स्थलांतर' हे जास्त सोपं होईल.
पुलंच्या 'एक शून्य मी' पुस्तकात 'क्व च भवान् क्व पुलः क्व च सूकरः' नावाचा लेख आहे. 'कोंबड्या पाळणे' ऐवजी कुक्कुटपालन, 'डुक्कर पाळणे' ऐवजी वराहपालन अशा आणि इतर अनेक (त्या काळातल्या) नवीन शब्दप्रयोगांची त्यांनी झकास फिरकी घेतली आहे.

'दरडग्रस्त'साठी 'भुस्खलनग्रस्त' असा चांगला शब्द अस्तित्वात आहे.

पण कुठल्याही ग्रस्त आधी संभाव्य हा शब्द बरोबर नाही वाटत. >>> +१११

घटना घडल्यावरच लोक "ग्रस्त" होतात असे वाटते.

घटना घडल्यावरच लोक "ग्रस्त" होतात असे वाटते.>>>>> +१.
दरडपातग्रस्त म्हणण्यापेक्षा वावेनी सुचवलेले जास्त बरोबर वाटते. किंवा संभाव्य दरडपातीचा धोका असलेल्या लोकांचे स्थलांतर केले असे लिहू शकतो.

Pages