Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
'प्रारब्धाचे भोग' हे देहाला
'प्रारब्धाचे भोग' हे देहाला आहेत, आणि 'मी' म्हणजे 'देह' नाही, हे जाणणे परमार्थाचे 'ध्येय' आहे. देहाला प्रारब्ध भोगून द्यावे,त्याला चांगले-वाईट म्हणू नये... 'मन' मात्र श्रीभगवंताच्या स्मरणाला 'कामी' आणावे... म्हणजे पाप-पुण्याचा हिशोब ठेवायची गरज नाहीशी होईल.>>>> रेखेवर मेख
नमस्कार सावट, धन्यवाद! खुप
नमस्कार सावट,
धन्यवाद! खुप छान वाटते आपले विचार वाचुन. भरकटत असलेल्या विचारांना, प्रश्नांना योग्य दिशा मिळते.
अश्विनीमामी, 'उपवासा'
अश्विनीमामी,
'उपवासा' संबंधीचे श्रीसंताचे मत काय आहे हे पहाणे, आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपंण प.पू.श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज याविषयी काय म्हणतात ते पाहू या....
'श्री' आपल्या उपदेशपर प्रवचनात म्हणतात,
कोणत्याही कृतीत 'हेतू' शुद्ध पाहिजे.
आपल्या शरीराकडून झालेल्या किंवा डोळ्याला सहज दिसणार्या कृतीपेक्षा... त्याकृतीमागच्या, आपल्या डोळ्याला न दिसणार्या अंतस्थ हेतूवरच..ती कृती चांगली का वाईट हे ठरते. म्हणजेच डोळ्याला जे दिसते तेच खरे, असे म्हणता येत नाही. या आतल्या 'हेतू ' नुसारच माणसाचे गुण ठरतात आणि त्यामूळे तशी स्वाभाविक विभागणी ही होते.(न ठरवता).. त्यातल्या गुणाविषयी 'श्री' पुढे म्हणतात..
तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याकारणाने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते.
या अंतस्थ हेतुनुसार जी गुण विभागणी होते.. ती तीन प्रकारे होते... तमोगुण, रजोगुण, आणि सात्विकगुण.
थोडक्यात फरक पहायचा झाल्यास, 'तमोगुणी' माणसाला दुसर्याला दु:ख देण्यात आनंद वाटतो, तर 'रजोगुणी' आपला फायदा असेल तरच काम करतो, शुद्ध सात्विकभाव हा बुद्धी शुद्ध झाल्यावरच प्राप्त होतो. शुद्ध बुद्धी ही सगळीकडे एका परमेश्वराशिवाय दुसरे काही पहात नाही... तीला निसर्गतःच दुसरे काही दिसत नाही.
आपल्या डोळ्याला जे जे दॄष्य्(जड) आहे ते भावते(निसर्गतःच). तमोगुण मुळातच 'जड' स्वरुपाचा असल्यामूळे..त्याचा परिणाम सगळीकडे आपल्याला दिसून येतो. दुसर्याचे वाईट चिंतने.. हा तमोगुण आहे... अशा तमोगुणाचा परिणाम म्हणून जगात दुष्ट बुद्धीचे लोक जास्त दिसतात. मग याला उपाय काय?
'श्री' म्हणतात.... माणसाने आपली.. स्वतःची सगळीकडे श्रीभगवंत न पहाणारी बुद्धी दुष्ट आहे, असे स्वतःच ओळखून.. ती बुद्धी, शुद्ध व्हावी, या अंतस्थ हेतुने श्रीभगवंताचे नामस्मरण करावे. हेतुचे महत्त्व सांगताना श्रीमहाराज म्हणतात...
देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडण्यार्यांना भगवंत लवकर वश झाला असता ! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते.
म्हणूनच श्रीमहाराज 'उपवासाचा' हेतु आणि कृती काय असावी? या विषयी म्हणतात...
आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कष्ट केले तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरता उपवास करणे मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास 'करावा' यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे ? याउलट, आपल्या चित्तांत भगवंताचे नाम नसतांना आपण देहाने पुष्कळ उपवास केले, तरी अशक्तपणा शिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात; त्यांना आपण उपासतापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते; पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून, तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे.
निष्काम कर्माविषयी श्रीमहाराज पुढे म्हणतात...
निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. 'भगवंतासाठी भगवंत हवा' अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर ठाकला, आणि 'तुला काय पाहिजे ?' असे त्याने विचारले, तर 'तुझे नामच मला दे' हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल; आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून, देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्याच्या कृपेशिवाय दुसर्या कशाची गरज नाही...नव्हती, हे ही त्याची कृपा झाल्यावरच कळते.
धन्यवाद!
सावट, खूप सुंदर आणि मनाला
सावट, खूप सुंदर आणि मनाला भिडणारा अर्थ सांगितलाय सद्गुरुंनी
'तुझे नामच मला दे' >>>
माझे तरी काय असे, सर्व तुझेची रे देवा |
तुझे असो तुझ्यापाशी, मीच होय तुझा..मीच होय तुझा ||
सावट सुंदर सांगितलेत.
सावट सुंदर सांगितलेत.
आजच वाचलेले - 'उपासना का
आजच वाचलेले - 'उपासना का करायची? तर आपल्यातले आणि परमतत्त्वातले अंतराय मिटवण्यासाठी'
भारतीताई ठाकूर यांच्या नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा या पुस्तकातून साभार. किती सहज आणि सोप्या पध्दतीने सांगितली आहे उपासनेमागची गरज त्यांनी.
नामाचे महत्व (सौजन्यः अरुंधती
नामाचे महत्व (सौजन्यः अरुंधती कुलकर्णी - चीजांचा धागा)
अजामिळ नावाचा एक भ्रष्ट माणूस होता. अनीतीने वागणारा. कुसंगती असलेला वगैरे वगैरे. एकदा गावात साधु संत आले, त्यांना भोजन करायचे होते. त्यांनी गावातल्या लोकांना विचारले की इथे चांगले आचरण असणारा कोणी माणूस आहे का? गावातील लोकांना खोडी काढायची लहर आली. त्यांनी साधूंना अजामिळाच्या घराचा पत्ता सांगितला. साधू तिथे गेल्यावर अजामिळाने त्यांना सरळ सांगितले की मी चांगल्या वागणुकीचा माणूस नाही. आणि माझी बायको काही तुमच्यासाठी भोजन बनवणार नाही. तेव्हा साधू म्हणाले, ठीक आहे, काही हरकतनाही, आम्हाला सामग्री दे, आम्ही स्वतःच बनवून खाऊ. त्याप्रमाणे साधूंनी स्वतःच भोजन बनवले व खाल्ले. जाताना अजामिळाचे कल्याण करावे म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला व सांगितले की तुझी स्त्री गर्भवती आहे, तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू नारायण ठेव. अजामिळाने गंमत म्हणून खरेच स्वतःच्या पुत्राचे नाव नारायण ठेवले. नारायणावर अजामिळाचे खूप प्रेम होते. उठता बसता नारायणाला हाका मारत असे, तोंडी सदा त्याचे नाव असे. करता करता तो म्हातारा झाला व एक दिवस अजामिळाची मृत्यूघटिका जवळ आली. यमदूत आले. घाबरून अजामिळाने आपल्या पुत्राला हाक मारली, ''नारायण, नारायण''. आणि त्याची साद ऐकून भगवान विष्णूच धावत आले.
आम्हाला मुलगी झाली.. आता नाव
आम्हाला मुलगी झाली.. आता नाव काय ठेवायचं? म्हणजे आम्हालाही मरताना सद्गती मिळेल
सद्गती असेच ठेवा, किंवा
सद्गती असेच ठेवा, किंवा मुक्ती.
'ज्ञान-जिज्ञासा' असणे चांगलेच
'ज्ञान-जिज्ञासा' असणे चांगलेच आहे, पण त्यात संदिग्धता व प्रयोजन पाहीजे... म्हणजे काय?
जिथे जाणून घ्यायची इच्छा नाही तिथे उपदेशही संभवत नाही.
हे एका उदाहरणाने समजावून घेऊ...
समजा स्वच्छ सुर्यप्रकाशात सर्वाना मातीचा घडा दिसतो आहे, अशा परिस्थित... जे दिसते आहे ते काय आहे? अशी 'संदिग्धता' नसतेच... आणि अशावेळी जर कोणी.. 'तो मातीचा घडा आहे', असे सांगू लागले तर सांगण्याचे 'प्रयोजन' ते काय?
म्हणजेच संदिग्धता आणि प्रयोजन असल्याशिवाय उपदेश संभवत नाही... ही महत्त्वाची गोष्ट आहे.
स्वतःच्या शरीरापासून, आपणच कमावलेल्या पैशापासून.. आपल्याच मूलापासून इ. त्रास होऊ लागतो त्यावेळी आपण एकदम त्याचा त्याग करतो.. याचा सरळसरळ अर्थच असा आहे की वरील गोष्टीत 'सुख' नाही. आपण आपणच आपल्याला जेवढे आवडतो, तेवढे जगात आपल्याला काहीच प्रिय नाही.शरीर,पैसा,मुलगा इ. आपल्याला प्रिय काय आहे, तर स्वतःचे स्वरुप... हे विचाराने सहज कळते.... त्यामूळे येथे उपदेशाची गरज नाही.
अशाच प्रकारे जर 'मी' म्हणताच स्वतःचे 'आत्मस्वरुप 'आकळत असेल तर अर्थातच उपदेशाची गरज नाही. जर 'मी' म्हणजे माझा हात नाही, पाय नाही, डोके नाही, हृदय नाही,... तसेच मी म्हणजे माझे मन नाही, माझी बुद्धी नाही... तर मग काय?अशी संदिग्धता असेल तरच श्रीसंताच्या उपदेशाचे प्रयोजन आहे.. अन्यथा नाही.
पण या आत्मस्वरुपाचे खरे स्वरुप काय? याच्याविषयी स्वतःलाच जर संदिग्धता जाणवली.. तर निश्चितपणे आपणच ओळखावे की आपल्याला उपदेशाची गरज आहे.
हे अजून एका उदाहरणाने पाहू....
समजा मला स्वर्गाची इच्छा आहे... पण त्याचे 'सामान्य' ज्ञान असून फायदा नाही.. जसे सप्त पाताळे..सप्त स्वर्ग,... देवांचा राजा इंद्र, श्रीशनिमहाराज अमुक अमुक करतात वैगरे.. हे सगळे सामान्यज्ञान झाले.. त्यात गोंधळच फार. पण्...जर स्वर्गाची प्राप्ती कशी होईल? अशी संदिग्धता असेल.. तर उपदेशाचे प्रयोजन आहे.
अशा वेळी 'विधी' उपदेश करते...की स्वर्गाची इच्छा असणार्याने 'यज्ञ' करावा. या ज्ञानाला 'विशेष' ज्ञान म्हणतात. म्हणजेच 'विशेष' ज्ञानासाठी विधी संभवतो... 'सामान्य' ज्ञानासाठी नाही. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे.
आता या उदाहरणातील अजून एक उदाहरण पाहू....
'मी' म्हणजे काय? तर... मी म्हणजे अहंकार, 'मी' पणा, हे 'सामान्य'ज्ञान सगळ्यानाच असते.त्यासाठी अजून उपदेशाची..विधीची जरूरत नाही... कारण मुळात जिथे संदिग्धताच नाही.. तिथे प्रयोजन ते काय... पुढचा विषय बोलायची गरज नाही.
पण जर का लक्षात आले की.. 'मी' चे स्वरूप अहंकारापेक्षा भिन्न आहे.. तर ते कोणते? अशी संदिग्धता असेल तर आपल्याला 'विशेष' ज्ञानाची गरज आहे हे नक्की... त्याच प्रकारे ते स्वरुप स्वतः जाणण्यासाठी.. विधीचीही जरूरी आहे हे पण...!
म्हणूनच श्रीसंत म्हणतात त्याप्रमाणे.. जर आपल्याला स्वतःचे आत्मस्वरुप जाणण्याची निकड भासू लागली असेल तर अगोदर, ''निर्गुणाची' ओळख करून घ्यावी'.. म्हणजे विशेषज्ञान होईल.. मग त्याचा विधीहि जाणून घ्यावा.. त्याचा अभ्यास करावा. तो विधि आहे.. 'सगुणाचा आधार घ्यावा, म्हणजे निर्गुणाचेही ज्ञान आपोआप होईल'... म्हणजे सगुण-निर्गुणस्वरुपी.. 'मी' या आत्मस्वरुपाची प्राप्ती होईल.:)
म्हणूनच श्रीभगवंतही.. श्रीपंडुसुताला उपदेश करताना म्हणतात...
अर्जुनपणा न घेता | मी ऐसे जे पंडुसुता |
उठे तेचि तत्त्वतः | स्वरुप माझे ||
अर्जुनाचा .. अर्जुनपणा... मी 'अर्जुन्'आहे, हे सामान्यज्ञान आहे... पण 'जर का तो अर्जुनपणा सोडला, मग जे उरते ते तत्त्वतः अर्जुनाचे खरे 'आत्मस्वरुप' आहे...आणि तेच ..उरणारे श्रीभगवंताचेही 'आत्मस्वरुप' आहे,' हे झाले विशेषज्ञान. मग यासाठी... आपला ही 'अर्जुनपणा' सोडायचा असेल तर अर्थात विधीची..विशेष पद्धतीची जरूरी आहे.
काय गंमत आहे नाही... पुरुषाला आपला 'पुरुषपणा' सोडता आला... स्त्रीला आपला 'स्त्रीपणा' सोडता आला तर जर रहाते ते स्वाभाविकपणे 'आत्मस्वरुप' उरते... असे श्रीभगवंत सांगत आहेत. आपण खरे प्रत्यक्षात काय करतो... पुरूष आपला स्वाभाविक पुरुषी अभिमान अजून 'पक्का'करत जातो..तर'स्त्री' आपला स्रीपणा सोडायला तयार होत नाही... सोडणे म्हणजे दुसर्यासारखे होणे नव्हे, 'दुसर्या सारखे होणे' हा तर गोंधळातल्या गोंधळासम आहे... एक सोडायचे आहे तर दुसरे होऊन चालेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर उत्तरात संदिग्धता असेल... तर उपदेशाची जरूरी.. प्रयोजन आहेच आहे.
धन्यवाद!
जा'मोहन'प्या.. मुलीच्या नावाचे काय ठरविले?मुलीचा फोटो असेल तर पेस्टवा की!
गौरी आपणही... !:) हार्दिक अभिनंदन!
धन्यवाद!
सावट _/\_ फारा दिवसांनी
सावट _/\_
फारा दिवसांनी ज्ञानामृत मिळाले. आपले वरचे लिखाण वाचताना नकळत अंतर्यामी डोकावत होतो आणि मी म्हणजे हे नाही ते नाही असे पडताळून पहात होतो, तरी देखील अजुनही ते अंतिम सत्य, स्वस्वरूप कळते आहे पण हस्तामलक न्यायाने आकळत नाहीये. आजकाल कधीतरी असे वाटते की गुरूची आवश्यकता आहे, पण कोण, कुठे, कसे, केव्हा ते माहित नाही.
मुलीचे नाव गार्गी ठेवले.. मी
मुलीचे नाव गार्गी ठेवले.. मी तिला मेरी म्हणतो.
सावट, _/\_ 'सगुणाचा आधार
सावट, _/\_
'सगुणाचा आधार घ्यावा, म्हणजे निर्गुणाचेही ज्ञान आपोआप होईल'... म्हणजे सगुण-निर्गुणस्वरुपी.. 'मी' या आत्मस्वरुपाची प्राप्ती होईल.>>>
पूजक जेथवर साकारु | देहधारीच आवश्यक गुरु |
निराकारास निराकारु | हा निर्धारु शास्त्राचा || १० ||
न करितां सगुणाचे ध्याना | भक्तिभाव कदा प्रकटेना |
आण सप्रेम जंव भक्ति घडेना | कळी उघडेना मनाची || ११ ||
ते उमलल्याविण कांही | केवळ कर्णिकेस गंध नाहीं |
ना मकरंद ना भ्रमर पाहीं | तेथ राहील क्षणभरी || १२ ||
सगुण तेंचि साकार | निर्गुण तें निराकार |
भिन्न नाहीं परस्पर | साकार निराकार एकचि || १३ ||
थिजले तरी तें घृतचि संचलें | विघुरलें तंही घृतचि म्हणितलें |
सगुण निर्गुण एकचि भरलें | समरसलें विश्वरुपें || १४ ||
जयाचिये संगती | प्रेमवार्ता करुं येती |
जयासी पूजूं ये गंधाक्षतीं | म्हणूनि आकृति पाहिजे || १६ ||
निर्गुणाहूनि सगुणाचें | आकलन बहु सुकर साचें |
दृढावल्या प्रेम सगुणाचें | निर्गुणाचे बोधन तें || १७ || (श्रीसाईसच्चरित अध्याय ११वा - रुद्राध्याय)
जामोप्या, अभिनंदन
सावट नमस्कार. काही प्रश्नः १.
सावट नमस्कार.
काही प्रश्नः
१. अशा वेळी 'विधी' उपदेश करते >> या वाक्यात विधीचा अर्थ काय?
२. पुरुषाला आपला 'पुरुषपणा' सोडता आला... स्त्रीला आपला 'स्त्रीपणा' सोडता आला >> इतरही बरच काही सोडावे लागेल - आई/बाबापणा, मालक्/नोकरपणा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणूसपणा (माणूसकी नव्हे). पण 'मी' (आपण नेहमी गृहीत धरतो तो मी नाही तर खराखुरा मी) म्हणून काहितरी उरेलच ना? मग नक्की काय सोडायचे आणि काय ठेवायचे की आत्मरुप आकळेल?
माधव, माणसाला चिकटलेल्या सर्व
माधव, माणसाला चिकटलेल्या सर्व उपाधी सोडायच्या असतील कारण ती बाह्य आवरणे आहेत.
महेश, _/\_ >>>आजकाल कधीतरी
महेश, _/\_
>>>आजकाल कधीतरी असे वाटते की गुरूची आवश्यकता आहे, पण कोण, कुठे, कसे, केव्हा ते माहित नाही.
मग पुढच्या जन्मी प्रथितयश गायक व्हायच्या इच्छेचे काय करणार?:) असो...
शेवटी अशातर्हेने गाडी रुळावर आली तर... आता श्रीगुरुभेटीसाठी शास्त्रात दिलेल्या मार्गाचे अवलंबन करा...! धन्यवाद!
अश्विनी, _/\_
फार सुंदर सांगितलत...:) धन्यवाद!
पूजक जेथवर साकारु | देहधारीच आवश्यक गुरु |
निराकारास निराकारु | हा निर्धारु शास्त्राचा || १० ||
न करितां सगुणाचे ध्याना | भक्तिभाव कदा प्रकटेना |
आण सप्रेम जंव भक्ति घडेना | कळी उघडेना मनाची || ११ ||
ते उमलल्याविण कांही | केवळ कर्णिकेस गंध नाहीं |
ना मकरंद ना भ्रमर पाहीं | तेथ राहील क्षणभरी || १२ ||
सगुण तेंचि साकार | निर्गुण तें निराकार |
भिन्न नाहीं परस्पर | साकार निराकार एकचि || १३ ||
>>> सप्रेम जंव भक्ति घडेना | कळी उघडेना मनाची || ही रेखेवरची मेख आहे...:)
म्हणजेच, 'प्रेमासहीत-भक्ती' पाहीजे तर! म्हणजे नुसतेच 'प्रेम' ही भक्ती नाहीतर! आणि 'प्रेमारहीत-भक्ती' ही पण खरी भक्ती नाहीच आहे तर!
'प्रेम आणि भक्ती', दोन्हीही पाहीजे... आणि 'प्रेम' हे जबरदस्तीने आणता येत नाही...! ते सहवासाने वृद्धींगत होते. हे फार महत्त्वाचे आहे.
मनाचा 'मनपणा'( वरच्या.. अर्जुनपणा सारखा) जर सुटायचा असेल.. तर 'सप्रेम भक्ती' शिवाय दुसर्या कशाचाही उपयोग होणार नाही... हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
जा'मोहन'प्या,
छान नाव आहे. फोटो असेल तर तोही इथेच पेस्ट करा.. खरी ओळख 'नाव आणि रुप' दोन्हीही माहीत झाल्यावरच होते...हो ना! आणि नावे अनेक असू शकतात.. तरीही 'रुपडे' तेच रहाते. धन्यवाद!
माधव, नमस्कार!
>>>१. अशा वेळी 'विधी' उपदेश करते >> या वाक्यात विधीचा अर्थ काय?
विधी, हरि आणि हर.. या त्रिगुणातील 'रजोगुणात्मक' विधी.. हाच अर्थ आहे...:)
२. पुरुषाला आपला 'पुरुषपणा' सोडता आला... स्त्रीला आपला 'स्त्रीपणा' सोडता आला >> इतरही बरच काही सोडावे लागेल - आई/बाबापणा, मालक्/नोकरपणा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणूसपणा (माणूसकी नव्हे). पण 'मी' (आपण नेहमी गृहीत धरतो तो मी नाही तर खराखुरा मी) म्हणून काहितरी उरेलच ना? मग नक्की काय सोडायचे आणि काय ठेवायचे की आत्मरुप आकळेल?
एका उदाहरणाने पाहू...
जसे..दह्यामध्ये लोणी आहे हे माहित आहे.. पण कसे वेगळे करायचे या विधीची माहिती नसेल तर.. 'लोणी' वेगळे करता येणार नाही. म्हणजे नुसतेच विशेषज्ञान असून भागत नाही.. तर विधीही माहीत पाहीजे.
आता समजा लोणी वेगळे करायची हातोटी साधली... ताक आणि लोणी वेगवेगळे झाले., मग लोणी चांगले रहावे म्हणून परत ताकातच ठेवले तर परत एकत्र होईल का?( लोणी काढल्यावर, परत ते ताकातच ठेवायची पद्धत आहे.) तर अर्थातच परत त्याचे दही होणार नाही. पण लोणी आणि ताक, दह्यापासूनच बनले आहे हे नक्कीच... मग नक्की काय सोडले आणि काय ठेवले?
पहील्यांदा व्यतिरेक ज्ञानाने.. निर्गुणाची ओळख करुन घ्यावी.. मग शेवटी अन्वयाने ते एकच आहे असे ज्ञान होते. उलट प्रक्रिया संभवत नाही.
धन्यवाद!
हसरी, कशा आहात? >>>कर्म कसे
हसरी, कशा आहात?:)
>>>कर्म कसे घडते?
आपणच करतो कि आपल्याकडुन केले जाते?
'श्रीराम' हेच 'कर्ता' आहेत, हे लक्षात ठेवा. हे आपले नसलेले कर्तेपण... आपल्याकडे घेण्यानेच.. आणि मग झालेल्या कर्मानेच, कर्मफळ आपल्यावर लादले जाते. म्हणूनच म्हणतात... जीव 'कर्म' करताना स्वतंत्र आहे, पण त्याचे फळ भोगताना पुर्णपणे परतंत्र आहे. ज्यावेळी भोगताना 'सुख' होते त्यावेळी जीव.. आपल्याच नावाचा डंका वाजवत फिरतो... आणि जरा का दु:ख झाले की दोष द्यायला दुसरा कोण भेटतो हे पाहतो. चांगले माझ्यामुळे झाले आणि वाईट झाले की नशिबा.. सहीत इतर कारणे शोधतो.
एकदा का 'श्रीराम' हेच कर्ता आहेत.. आणि आपण त्यांना आवडेल असेच वागले पाहीजे हे कळाले आणि तसे वागले..तर 'श्रीराम' ही कर्त्याप्रमाणे खरेच आपला सर्वप्रकारे सांभाळ करतात.. पण त्यांच्या प्रकारे(आपल्या मनाला वाटले तसे नाही)... आणि त्यांना आपले भले कशात आहे.. हे आपल्या पेक्षा जास्त कळते.. नाही काय? असो...
श्रीस्वामींच्यावर पुर्ण भरोसा आणि स्मरण ठेवा.. श्रीस्वामी कर्तेपणा घ्यायला बसलेत.. आपण तो खर्या अर्थाने देत नाही... ! आपल्या बुद्धीप्रमाणे योग्य प्रयत्न करावाच लागेल(यात पळवाट नाही).. पण कर्तेपणा श्री स्वामीकडे देऊन.. म्हणजे..आपल्याला अमूक एक फळ पाहीजे हे न मागता...आपल्या पेक्षा श्रीस्वामींना जास्त कळते... या भावनेने फळाचे काय करायचे याचा निर्णय त्यांच्यावर सोडून, आपण निवांत(स्मरणात) असावे.
धन्यवाद!
पहील्यांदा व्यतिरेक
पहील्यांदा व्यतिरेक ज्ञानाने.. निर्गुणाची ओळख करुन घ्यावी.. मग शेवटी अन्वयाने ते एकच आहे असे ज्ञान होते. उलट प्रक्रिया संभवत नाही. >> एकदम सहज स्पष्ट
माधव, अध्यात्म मार्गाचा
माधव,
अध्यात्म मार्गाचा प्रवास करताना खरा मार्ग कोणता याविषयी मनामध्ये संशय असणे स्वाभाविक आहे. अगदी.. सर्व दर्शनकार हे सर्वज्ञ असतानाही, विविध दर्शनांचे स्वरुप हे खंडन-मंडनात्मक आहे... ते तसे का असावे?..याचा तर्क केला.. तरीही समजू शकेल.त्यामध्ये शाब्दपांडीत्याचा कल्पनाविलास आहे.या मार्गात अनेक वाद-प्रवाद..तर्क-कुतर्क आहेत्...अनेक चित्र-विचित्र कल्पना आहेत. नैय्यायिक,सांख्य,चार्वाक,जैमिनी मताचे मिमांसक, अर्हंत(जैन), बौद्ध,वैशेषिक,पांच्रात्रानुयायी, माहेश्वर्,नाकुल वगैरे अनेक मते(view points) आहेत.... द्वैत, विशिष्ट द्वैत, विशिष्ट अद्वैत... आणि अद्वैत असा क्रमकल्पनाविलास आहे.
पण आपण कायम लक्षात ठेवायला हवे की हा फक्त शब्दांचा विलास आहे. नुसत्या अन्नाच्या वासाने कोणाचे पोट कधी भरलेले ऐकीवात आहे का? म्हणुनच जर अनुभवच घ्यायचा असेल तर श्रीसंताच्या मार्गानेच जावे लागेल... याची पक्की खुणगाठ आपण मनाशी बांधायला हवी. अध्यात्म शास्त्र हे अनुभवांचे शास्त्र आहे...! हे शब्दारण्य महाभयंकर आहे, त्यात हरवले जाण्याचीच भिती सर्वाधिक आहे. एका वैदिक शाखेचे जर 'ज्ञान' करून घ्यायचे असेल तर कमीतकमी १२ वर्षाचा कालावधी लागतो. मग आपल्या एवढ्याशा आयुष्यात मीच माझ्या बुद्धीने सर्व जाणुन घेईन आणि नंतर मग ठरवेन.. असा 'बुद्धीवाद' अर्थातच उपयोगी ठरत नाही.
मोक्ष म्हणजे काय? हे पहाताना आपली समजूत काय आहे, यावर भरोसा ठेऊन सुरुवात करता येत नाही.
आपली बंधनात..मर्यादेत(मठाकाश) काम करणारी बुद्धी, अर्थातच त्या मर्यादेत राहूनच उत्तरे शोधणार... आणि ही आपल्याच मलिन बुद्धीने शोधलेली उत्तरे अर्थातच 'साध्या' पर्यंत घेऊन जायला असमर्थ ठरणार. 'साध्य' काय आहे याविषयी मनात संशय असेल.. आणि त्या संशयभावासहीत... श्रद्धेसहीत, जर आपलाच भाव खरा, असा मायेमूळे निश्चय झाल्यामूळे... केलेला प्रवास भलत्याच ठिकाणी होऊ शकतो.. कारण, 'जसा भाव तसा देव' असा सिंद्धांत आहे.
म्हणूनच श्री संतांच्या मार्गाने जावे हेच श्रेयस्कर.. आपल्याला दिसत नाही असे लक्षात आल्यावर जो डोळस आहे त्याच्यावरच भरोसा ठेवावा लागतो... नाहीतर एक आंधळा दुसर्या आंधळ्याला 'प्रकाश' म्हणजे काय याचा उपदेश करीत असल्यासारखी अंध-अवस्था निर्माण होते..आणि त्यात आपली अवस्था .. 'जवळच आहे पण दिसत नाही' अशी नाजूक असते.... असो.
या बीबी च्या पहील्याच पानावर असलेली श्रीसमर्थवचने परत एकदा पाहूयात.
'श्री' समर्थ म्हणतात,
आधीं अध्यात्मश्रवण | मग सद्गुरुपादसेवन |
पुढें आत्मनिवेदन | सद्गुरुप्रसादें ||४०||
ज्याची कोणाची, हा मार्ग कसा आहे, याची जिज्ञासा जागली असेल त्याने एक करावे. अगोदर अध्यात्मश्रवण करावे. म्हणजे काय करावे? तर शास्त्र-श्रीसंत काय म्हणतात ते पहावे. मग(नंतर) शास्त्राने सांगितल्यानुसार.. सद्गुरुची प्राप्ती करून घ्यावी, त्यांची चरण सेवा करून त्यांची कृपा(प्रसाद) संपादन करावी, आणि त्यामूळे... पुढें म्हणजे साधनारुपी यत्न-पौरुष केल्यानंतरच.. आत्मनिवेदनापर्यंत जाता येईल.
आत्मनिवेदनाउपरी | निखळ वस्तु निरंतरी |
आपण आत्मा हा अंतरीं | बोध जाहला ||४१||
एकदा का आत्मनिवेदन झाले की मग... त्यानंतर, ज्या 'निखळ' वस्तूच्या शोधात आपण आहोत.. ती आत्मवस्तू आपल्याच 'अंतरी,' आहे असा 'बोध'.... प्रत्यक्ष अनुभव होतो.
त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला | संसारखेद तो उडाला |
देह प्रारब्धीं टाकिला | सावकाश ||४२||
असा आत्मबोध.. ब्रह्मबोध झाल्यानंतर... आपण स्वतःच ब्रह्म आहोत.. अशा 'अभेद' ज्ञानाने मिळालेल्या नवीन दृष्टीमूळे.. तो आत्मज्ञानी संसाराच्या सुख-दु:खातून पार होतो... मग त्यानंतर आपोआपच त्याचा देह प्रारब्धावर टाकला जातो.
यासि म्हणिजे आत्मज्ञान | येणें पाविजे समाधान |
परब्रह्मीं अभिन्न | भक्तचि जाहला ||४३||
श्री समर्थ म्हणतात... आत्मज्ञानाच्या ह्याच पायर्या आहेत. असा प्रवास घडला तरच 'समाधान' लाभेल... मगच परब्रह्माशी अभिन्न असणारा... असा जो तो 'भक्त' होता येईल.
आतां होणार तें होईना कां | आणि जाणार तें जाईना कां |
तुटली मनांतील आशंका | जन्ममृत्यूची ||४४||
असा अनुभवाने जो 'भक्त' होतो त्याच्या मनातील भूत-वर्तमान-भविष्य इ... काल,स्थिती,वस्तू सापेक्ष भेद मावळतील, त्याच्या मागे लागलेला जन्म-मृत्यूरुपी मन-संसार आशंका, तुटून जातील.
संसारीं पुंडावें चुकलें | देवां भक्तां ऐक्य झालें |
मुख्य देवासि ओळखिलें | सत्संगेंकरूनी ||४५||
त्याच्या मागे लागलेला संसार.. देव-भक्ताचे ऐक्य झाल्यामुळे चुकेल. अशा प्रकारे शास्त्रविचाराने... श्रीसंताच्या उपदेशरुपी सत-संगाच्या प्रभावामुळे... योग्य अशी साधना..प्रयत्न..अभ्यास केल्यानेच... सद्गुरुप्राप्ती होते.. आत्मज्ञानी पुरुषाची भेट होते. मग(त्यानंतर) त्यांच्या उपदेशामुळे... आत्मप्रचिती होते. म्हणजेच शास्त्रप्रचिती.. श्रीगुरुप्रचिती आणि त्यामुळे आत्मप्रचिती यांचे ऐक्य होते... मग ही ओळख पुर्ण होते. अर्थात आत्मप्रचितीशिवाय ही ओळख परेड अपुर्ण आहे. म्हणूनच सत्संगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.:)
(जन्ममरण परंपरेला कारणीभूत असणार्या गुणांची 'संख्या' कारण मिमांसेसहीत निर्धारीत करणार्या शास्त्राच्या शाखेला 'सांख्ययोग' असे नामकरण आहे. 'प्रकृती आणि पुरुष' हा चिद्विलास ही सांख्यांची 'देन' आहे... :))
धन्यवाद!
सावट, नेहमीप्रमाणेच सुंदर
सावट, नेहमीप्रमाणेच सुंदर पोस्ट
परमार्थ आणि प्रपंच या दोन्हींची सुरेख सांगड सांख्य तत्वज्ञानात आहे असं वाचलं आहे. आपण हे अजून विस्ताराने सांगाल तर बरं होईल.
सावट धन्यवाद. सांख्य
सावट धन्यवाद. सांख्य तत्वज्ञानाबद्दल अजून विस्ताराने वाचायला आवडेल.
माधव, धन्यवाद! हसरी यांनी
माधव, धन्यवाद!
हसरी यांनी खालील प्रश्न विचारला होता...
>>>
प्रश्न-कर्म कसे घडते?
आपणच करतो कि आपल्याकडुन केले जाते?
यावर आपण असे उत्तर दिलेत की...
उत्तर->>>हसरी कर्म नेहमी 'मी'च करतो.
पण जो पर्यंत खर्या मी ची ओळख पटत नाही तोपर्यंत मला कर्तेपणा न घेण्याची साधना करावी लागते. 'मी'ची ओळख पटल्यावर आपसूकच फक्त साक्षीभाव उरतो.
श्री गजाननविजय मध्ये दोन सुंदर उपमा वापरल्या आहेत हे कळण्यासाठी - पाण्यात रहाणारी गार (दगड) आणी कमलपत्र. दोघांच्या प्रारब्धाने त्यांना पाण्यात रहावे लागते पण दोघेही पाण्यापासून अलिप्तच असतात.
हे उत्तर कृपया समजावून सांगा.
धन्यवाद.
सावट, मला समजले आहे तेवढे
सावट, मला समजले आहे तेवढे सांगतो.
जिवनात (पाण्यात) जीवन फुलवायचे सामर्थ्य आहे पण हेच पाणी जीवन संपवू शकते, कुजवू शकते. त्यामुळे पाणी कसे वापरायचे याचा विचार प्रत्येक जीवाने करायचा असतो. कमलपत्रे आणि गार (दगड) पाण्यात जरी रहात असले तरी पाणी शीरू देत नाहीत आणि म्हणूनच ते तगतात.
तसेच आपण ह्या मायेच्या जगात जन्मलो आहोत हे आपले प्रारब्ध. ही माया आदिमाया म्हणून पुजली जाते तर तीच मोहमायादेखील आहे. तिला कोणत्या रुपात बघायचे हा प्रत्येक जीवाचा प्रश्न. पण एक मात्र नक्की या मायेच्या जगात आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म हे करावेच लागते. कर्म करण्यासाठी प्रत्येक जीवाला एक शरीर मिळाले असते. फक्त शरीर वापरून कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग. तसे केल्याने जीव मायेच्या सागरावर तरंगतो. पण शरिराला षट्रीपूंनी छीद्रे पाडली असतील तर कर्म आत झीरपते आणि मग जीवन बुडायला लागते, कुजायला लागते आणि वेळ यायच्या आधीच संपून जाते. मग परत जन्म, कर्म आणि मृत्यू हे चक्र चालूच रहाते.
पण कर्म आत न झीरपू देणारा जीव हळूहळू सुकत जातो. पूर्ण सुकल्यावर तो या मायेच्या वृक्षापासून गळून पडतो - सुकलेल्या काकडीसारखा. मग मागे काहीच उरत नाही.
एक खूप सुंदर रुपक कथा इथे
एक खूप सुंदर रुपक कथा इथे वाचा.
अश्विनी धन्यवाद! >>>पण कर्म
अश्विनी धन्यवाद!
>>>पण कर्म आत न झीरपू देणारा जीव हळूहळू सुकत जातो. पूर्ण सुकल्यावर तो या मायेच्या वृक्षापासून गळून पडतो - सुकलेल्या काकडीसारखा. मग मागे काहीच उरत नाही.
यावर आपले मत काय आहे?
धन्यवाद माधव,
कथाही छान आहे.
'खरा-मी' आणि 'खोटा-मी' यांचा संबंध पाण्यातील... कमलपत्र आणि गार यांच्याशी कसा लावायचा? कारण तुम्ही सांगितल्यानुसार दोघेही अलिप्त.
धन्यवाद!
पण कर्म आत न झीरपू देणारा जीव
पण कर्म आत न झीरपू देणारा जीव हळूहळू सुकत जातो. पूर्ण सुकल्यावर तो या मायेच्या वृक्षापासून गळून पडतो - सुकलेल्या काकडीसारखा. मग मागे काहीच उरत नाही.
यावर आपले मत काय आहे?
>>> मायेच्या सागरावर तरंगणारा जीव, ज्याने षड्रिपूंवर बर्यापैकी मात केली आहे (भगवंताच्याच सहाय्याने) हा कर्माच्या अटळ सिद्धांतामुळे येणार्या प्रारब्धापासून अलिप्त होतो. प्रारब्ध निर्माण व्हायला कारणच उरत न गेल्यामुळे देहाची आवश्यकताही उरत नाही. म्हणजे जन्म्-मरण्-जन्म या चक्रातून मोकळीक व्हायला लागते. या देहामुळेच तो मोहमायेशी जोडलेला असतो ती नाळच सुकून जाते आणि मायेमुळे येणारे आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अनुभव यांपासून दूर जातो. मोहमायेपासून दूर म्हणजेच आदिमायेच्या जास्तीतजास्त जवळ. उदा. वसुदेव देवकीसोडून इतर लोकांवर आदिमायेने मोहमाया बनून आच्छादन घातले व श्रीकृष्ण तुरुंगातून निसटून गेले. पण हेच मोहमायेचे आच्छादन वसुदेव देवकींवर काहीच परिणाम करु शकले नाही. त्यांना सत्य तेच दिसत होते. त्यांना ती आदिमाता/ आदिमाया नंदिनी महालक्ष्मीच्या रुपात दिसू शकली आणि इतर पहारेकरी मात्र निद्रिस्त झाले, शृंखला गळून पडल्या, यमुनेने वाट करुन दिली
आत्ता घाईघाईत लिहितेय त्यामुळे इतकेच सुचले
माधव, मला अगम्य चिह्न
माधव, मला अगम्य चिह्न दिसताहेत. कुठलासा फाँट उतरवावा लागेल की काय?
आ.न.,
-गा.पै.
गामा जुन्या मायबोलीवर आहे ती
गामा जुन्या मायबोलीवर आहे ती कथा - इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये बघा.
'खरा-मी' आणि 'खोटा-मी' यांचा
'खरा-मी' आणि 'खोटा-मी' यांचा संबंध पाण्यातील... कमलपत्र आणि गार यांच्याशी कसा लावायचा? >> मी हा एकच असतो - कायम खरा. तो कायम मायेपासून अलिप्तच असतो.तो मी म्हणजेच आत्मा किंवा चेतना.
पण पंच ज्ञानेंद्रियांद्वारे मिळणार्या माहितीमुळे जिवाची दिशाभूल होऊन 'मी' बद्दल चुकीची प्रतिमा उभी रहाते. ती प्रतिमा म्हणजे खोटा मी. हा मी आहे म्हणजे जिव काही अंशी तरी मायेत लिप्त आहे.
गणेश जयंतीच्या शुभेच्छा
गणेश जयंतीच्या शुभेच्छा सगळ्यांना..(आमच्याकडे अजून २६ :))
Pages