उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या डोंगरारुपी कामाचे.... व्यवहारातले एखादे उदाहरण सांगाल काय? >>> बरीच आहेत पण ती पर्सनल असल्याने ओपन फोरम वर सांगू इच्छित नाही Happy
--------------
हे श्रीभगवंताने आणि तुमची टीम बनवून केलेले काम समजा आजच संपले... तर मग आता पुढे काय? >>>> सावट, तुम्ही मला वाटतं व्यवहारतलंच एखादं काम गृहित धरुन चालला आहात. ऑफिसमधलं एखादं टेंडर अथवा एखादि डेडलाईन वगैरे असं काम मला म्हणायचं नाहिये. ह्या प्रपंचात प्रत्येक क्षणाला जे काही आपण करत आहोत त्या प्रत्येक क्षणासाठी मला भगवंत सांगाती म्हणून लागतो. अगदी नुसतं स्तब्ध बसायचं असेल तरी तो लागतो. त्यामुळे पुढे काय? हा प्रश्नच उरत नाही.
--------------
आता पुढे प्रारब्धाचे रोपटे उगवणार नाही हे मला कसे कळेल? का त्याची जरूरी नाही... आता आईच सगळे करते म्हंटल्यावर, आपल्याला कळले काय नाही कळले काय फरक काय पडणार? आपले काम काय उरते ? का फक्त बिया नसलेले मऊ फळ गिळने हेच महत्त्वाचे काम उरते...! >>>> माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर त्या स्पेक्ट्रमच्या मध्ये कुठेतरी ग्रे शेड मध्ये असेन मी. त्यामुळे प्रारब्धाचं रोपटं उगवू लागतच असेल अधून मधून. आपल्या हातून होणार्‍या छोट्या मोठ्या चुका आपल्याला कळत असतात बहुतेक वेळा. त्या मनाशीच मान्य असतील तर सुधारायला वाव असतो आणि श्रेयस/प्रेयस बद्दल थोडीतरी चाड निर्माण झालेली असेल तर आपण आपल्याला अत्यंत आवडणारी गोष्ट जर प्रेयस असेल तर ती टाळण्याचा प्रयास करतोच. पण ह्या आतल्या द्वंद्वामध्ये भगवंत माझ्या बरोबर आहेच हे मला माहित असेल तर नुसत्या चुका झाल्या म्हणून आयुष्यभर स्वतःला कोसत न राहता जिथे आहोत तिथूनच आपण पुन्हा नव्याने सुरुवात करु शकतो. दुसरे टोक असते की माझ्या चुका कधी झाल्याच नाहीत आणि झाल्यातरी माझं कोण काय वाकडं करणार? मी अस्साच्/अश्शीच वागणार असे मानून चालणे.... त्याबद्दल नो कॉमेंट्स Happy

आणि बाळ बर्‍यापैकी शहाणं असेल तर आईने दिलेलं मऊ फळ नुसतं गिळायचं काम नाही करणार, आई काय सांगते ते ऐकायचं/आचरणात आणायचंही बघेलच की Happy "उत्तम भक्त" टाईप बाळ असेल तर आईला सांगायची वेळच आणणार नाही. बाकीची "मध्यम भक्त", "अधम भक्त" टाईप बाळं मऊ केलेल्या फळाबरोबर आईचे फटकेपण खाणारच की. पण जर आपण तिचे बाळ असू तर ती आपली आई आहेच. बाळ अगदी "रावण" टाईप झालं तरच ती पुन्हा पुन्हा सुधारायची संधी दिल्यानंतरही त्याने रावणगिरी न सोडल्यास त्याला टाकत असेल. नाहीतर ती तिचं "पतित पावन" नाम कसे सिद्ध करेल? Happy

अमुक एक गोष्ट म्हणजे आईने मऊ करुन दिलेले फळ आहे हे जसे जाणता आले पाहिजे तसेच तमुक एक गोष्ट म्हणजे आईने मला दिलेला फटका, उपटलेला कान आहे हे पण मला जाणता आले पाहिजे.
---------------

भगवंत भाव भक्तीचा भुकेला आहे... म्हणजे नक्की काय करायला हवे? >>> Uhoh भगवंतावर प्रेम. प्रेमातूनच तर भगवंताशी कनेक्शन जुळते. काम्य भक्तीच्या पलिकडे जाता आलं तर उत्तमच. आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात जसे दोन व्यक्तींमध्ये बाँड्स आहेत म्हणतो म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. इथे भगवंताला त्यानेच घडवलेल्या विश्वाबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असणारच आणि आपणही त्याचीच निर्मिती आहोत म्हटल्यावर आपणही त्याला प्रिय असणारच. पण आपल्याही मनात त्याच्या काही अंशानेतरी जे प्रेम उत्पन्न होईल त्याला तो भुलतो, त्याची भूक भागते. नाहीतर त्या वर्षानुवर्षे त्याची वाट बघणार्‍या वनचरी शबरीच्या उष्ट्या बोरांसाठी कशाला हो तो वनातली त्याची वाट वाकडी करुन जाईल? आणि का दुर्योधनाच्या महालातही स्वतःच जाऊन देखिल त्या श्रीहरि रुपावरचं प्रेम तर सोडाच, माणुसकीच्या रुपातील साधीसुधी निर्मळ भावनाही न दिसल्याने त्याला हात हलवत परत जावं लागलं? हावरा हा भक्तीप्रेमा, विके कवडी मोला!
----------

तुम्ही म्हणता तशी भक्ती म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण Happy भक्तीचं बीज जर हृदयात असेल तर आपल्याला गाईडन्स द्यायला आहेत ना सद्गुरुंची चरित्रं... कुठलंही घ्या! श्रीसाईसच्चरित, श्रीगजानजविजय, श्रीगुरुचरित्र, गुरुलीलामृत... कितीतरी आहेत. पण ती नुसती रट्टे मारुन पारायण म्हणून न वाचता, त्या कथांमधून जसे सद्गुरुतत्व समजून घ्यायचे तसाच शिष्य अथवा भक्तांची आचरितं समजून घ्यायचा प्रयास केला तर भक्ती कशी असावी, कशी करावी हे नक्कीच समजू शकते.

खरं सांगू, मोक्ष, मुक्ती वगैरेची मी अपेक्षाही करत नाही. आहे तिथून ४ पावलं पुढे जाता आलं तरी चांगलं, चालवणारा तोच Happy

भक्तीमार्गात, 'तो' जे देईल ते आनंदाने स्विकारणे एवढेच माहित असते. कुठल्याही संतांनी मोक्ष मिळावा हा हेतू मनात ठेवून भक्ती केली नाही. ते प्रेम झालं, आपोआप वाढत गेलं आणि वाढता वाढता ही संत मंडळी परमात्म्याच्या चरणांशी प्रेमाने जखडली गेली. संतमंडळींचं हे असं, तर आपली (म्हणजे माझी..) काय कथा घेऊन बसलात? त्यामुळे काय सुलभ आणि काय कठीण ह्याचा मी विचारच करत नाही. अत्यंत सामान्य आहे मी.

ज्ञान किंवा योग किंवा कर्म मार्गात मोक्ष मिळवणे हा हेतू असतो आणि त्या दिशेनेच फोकस्ड होऊन वाटचाल चालू असते.

जो पर्यंत देवाला बघितलं नाही, बघितलं तरी तो इतरांना प्रूफ म्हणून दाखवता आला नाही तो पर्यंत "देव" हा स्वतःच एक कल्पना म्हणून गणला जातोय, मग तो साध्या लेमॅनच्या भाषेत/हृदयाच्या भाषेत सांगायला जा अथवा कठीणात कठीण पुस्तकातल्या भाषेत सांगायला जा Happy
----------------
मी जे फील करते त्या नुसत्या कल्पनाच आहेत असे वाटत असेल तर मी काही उत्तर न देणे, कॉमेंट्स न करणे योग्य ठरेल असं मला वाटतं Happy

धन्यवाद Happy

अश्विनी,
छान,धन्यवाद! Happy
अहो, कल्पना असत्या तर आम्हाला एवढ छान कस वाचायला मिळाले असते! असो काळजी नको!
परत एकदा मनापासून धन्यवाद!

saavat , अश्विनी, परब्रम्हजी,
खुपच छान चर्चा चालु आहे. वाचुन ज्ञाना भर पड्ते आहे. सर्वांचे मनापासुन आभार

परब्रम्ह,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> मला एक सांगा, काय मी हा माझा अनुभव म्हणुन सांगितली आहे ?

तुम्हाला अनुभव आला असल्यास वाचायला आवडेल. नसल्यास प्रश्नच नाही.

२.
>> ही गोष्ट ह्या धाग्यावर कश्यासाठी लिहिली मी, हे ज्ञात झाले का ?

नाही. या गोष्टीमुळे उपासना कशी करावी याचा उलगडा होत नाही. कृपया सविस्तर समजावून सांगावे.

३.
>> मी तुमच्या एव्हढा शास्त्रज्ञ नाही, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे असते ते अगदी सरळ भाषेत कळवावे.

सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया गोड मानून घ्यावा.

४.
>> माझी कोणाबाबत काय धारणा होते वा बनते हे सर्वतोपरी त्या-त्या मनुष्याच्या हातात असते, तेव्हा मला
>> जेव्हा अशी काही प्रतिसादात्मक उत्तरे मिळतात, कि परब्रम्ह तुमचा काही गैरसमज झाला आहे इ. त्याचे
>> कारण ही तोच स्वतः असतो, मी कोणाच्याही बाबत काहीही धारणा स्वतः हुन बनवित नाही, मला त्याची
>> काहिच आवश्यकता नाही आणी गरजही नाही.

न विचारता स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. माझा गैरसमज झालेला नाहीये. मात्र तुमच्या धारणांबद्दल कुतूहल जरूर आहे.

५.
>> राहाता राहिली माझ्या अनुभवांबद्दल, ते तर मी नेहेमी
>> विदित करतच असतो, पण कोणाला उमजतात कोणाला नाही,

लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण एक सुचवू का? तुमचे अनुभव ज्या लोकांना उमजतात अशांसाठी तुम्हाला योग्य व्यासपीठ शोधावे लागेल. माझ्यासारख्या पामरांना काही थांग लागत नाही.

आ.न.,
-गा.पै.

प.पू.जगद्गुरु श्रीतुकाराम महाराजांचा एक अभंग पाहू....

गुळ सांडुनि गोडी घ्यावी | मीठ सांडुनि चवि चाखावी || १ ||
ऐसा प्रपंच सांडुनि द्यावा | मग परमार्थ जोडावा || २ ||
साकरेचा नव्हे ऊंस | आम्हां कैंसा गर्भवास || ३ ||
बीज भाजुनि केली लाही | जन्ममरण आम्हां नाही || ४ ||
आकारासी कैंचा ठाव | देह प्रत्यक्ष झाला वाव || ५ ||
तुका म्हणे अवघें जग | सर्वां घटीं पांडुरंग || ६ || श्री तु.गा.

ज्याला जीवनाचा 'परमार्थ' जाणून घ्यायची 'जिज्ञासा' उत्पन्न झाली आहे त्याने श्री संताना शरण जावे... मी कोण? कोठून आलो? कोठे जायचे आहे? इ. प्रश्नांचे उत्तर श्रीसंत उपदेशात आहे.

श्रीमहाराज म्हणतात...

जसे गुळाचे 'गुळपण' जोवर सांडले जात नाही तोवर त्यातील गोडपणा कळत नाही, मीठाचे 'मीठपण' सांडले जात नाही तोवर त्यातील चव चाखता येत नाही अगदि तसेच जोवर प्रपंचाचे 'प्रपंचपण' जाणून सांडले जात नाही... तोवर 'परमार्थ' जोडता येत नाही.

(महत्त्वाची लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे, श्रीमहाराज कोठेही 'सोडून' असा शब्द प्रयोग न करता 'सांडून' असा करतात. कारण ही कृपेने होणारी गोष्ट आहे, स्वप्रयत्नाने नाही. मग प्रयत्नाचे महत्त्व काय? तर कृपेने होणारी गोष्ट आहे हे जाणून, श्रीहरीकृपा, श्रीसंतकृपा व्हावी यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी.)

'श्री' पुढे म्हणतात...

जसे ऊसाची एकदा साखर झाल्यावर, साखरेचा परत ऊस करता येत नाही, तसे आमची 'वासना' च नष्ट झाल्यामुळे... आम्हांला आता परत 'गर्भवास' नाही.

'वासनेचे बीज' च भाजले गेल्यामुळे, वासनेमुळे पाठीमागे लागलेली 'जन्म आणि पाठोपाठ मरण' ही 'भय' परंपरा आता थांबली आहे.आम्हाला आता परत 'जन्ममरण' नाही. आमचे 'देहपण'च सरल्यामुळे आता 'आकाराला' वावच राहीला नाही. मीच 'देह' असे मानल्यामुळे, देहाचा आकार म्हणजेच माझा आकार, ही उभारलेली कल्पनाच आता मिथ्या झाली.

माझा स्वतःचाच आकार 'श्रीकृपेने' नाहीसा झाल्यामुळे, आता अवघ्या जगाचे 'जगपण' सांडले आहे आणि त्याच्या ठिकाणचा मूळ 'श्रीपांडुरंग' प्रकट झाला आहे.

धन्यवाद!

नमस्कार!

प.पू. श्रीतुकोबांनी... आपल्या सगुण भक्तीमुळे ... आता लाभलेली, अगोदर नसलेली ... भक्तियुक्त, भक्तिमय,भक्तिरुप स्थिती स्पष्टपणे सांगितली आहे. आपली आता, स्वतःच्याच अनंत वासनेमुळे.. मिंळालेल्या स्वाभाविक बंधनापासून सुटका झाल्याचा.. मुक्तता झाल्याचा.. मोक्ष मिळाल्याचा.. स्पष्ट अनुभव.. श्रीमहाराज अगदि रोखठोकपणे सांगत आहेत. आम्हाला आता परत 'गर्भवास' नाही याची श्रींना खात्री पटली आहे... तसा साक्षात, अपरोक्ष.. प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला आहे.

प्रत्येक भक्तांने, या श्रींच्या प्रत्यक्ष अनुभवाचे, तद्नंतर केलेल्या मौलिक उपदेशाचे, विवेक रुपाने, आपल्या बुद्धीने ग्रहण करावे आणि याची जन्मी, याची डोळा आपल्यालाही तसाच अनुभव यावा म्हणून, आपले 'ध्येय'... आपापल्या 'बुद्धिची निष्ठा' पक्की करून त्यासाठी 'उदंड' प्रयत्न करावेत.

आपल्या बुद्धिची अजून खात्री पटावी, आपलाच 'विवेक' पक्का व्हावा, या अतंस्थ हेतूने श्रीमहाराजांची हा 'अनुभव' प्राप्त होण्यापुर्वी काय स्थिती होती हे त्यांच्याच परमपावन... अत्यंत मंगल शब्दात पाहूया...

'श्री' आपल्या एका अभंगात म्हणतात...

बहु जन्मांतरे फेरे | केले येरे सोडवी || १ ||
आळवितो करुणाकरे | विश्वंभरे दयाळे || २ ||
वाहवितो मायापुरी | येथे करी कुडावा || ३ ||
तुका म्हणे दुजा कोण | ऐसा सिण निवारी || श्री तु.गा. २५७८.४ ||

'श्रीमहाराज' ... श्रीभगवंतास म्हणतात..

हे 'देवा'.. करुणाकरा... दयाळा... विश्वंभरा.. मी मागचे अनंतजन्म.. मायेच्या या महापुरात... 'आसरा' न सापडल्यामुळे वहावत चाललो आहे. माझ्याच एका जन्मातून उगम पावलेल्या.. पुढच्या अनंत जन्माचा पसारा.. माझ्या आता हाताबाहेर गेला आहे. अगोदर कळत नव्हते.. आता या महामायेच्या भयंकर प्रवाहाचा शाब्दिक अंदाज आला आहे.. पण त्यामुळे प्रवाह कमी न होता आपल्याच असहाय्यतेची स्पष्ट जाणिव आता मला झाली आहे.. म्हणूनच हे 'मायाधिपती', तुझ्या शिवाय आता मला या माया प्रवाहातून बाजूला काढणारा, माझा 'शिण' निवारणारा, मला 'विश्रांती' देणारा दयाळू दाता 'दुसरा' कोणीही दिसत नाही. हे 'ज्ञान' झाल्यामुळे मी आता 'अन्य' आश्रयांचा त्याग केला आहे.. नाही नाही, त्याशिवाय आता माझ्यासमोर दुसरा पर्यायच नाही... म्हणून हे निर्गुणा.. तु आता कृपा कर आणि आता मला 'गुणांच्या' प्रवाहातून.. परिणामातून बाहेर काढ... माझे 'जन्म-मरण' थांबव.

धन्यवाद!

सावट,
नमस्कार,
वरील तुमचा प्रतिसाद दि. ३० जुलै, श्रींचे अभंगाबद्दल, आभारी आहोत, अचुक बोललात.
आत्तापर्यंत गा.पै. बहुतेक ह्या व्यासपीठावर येण्यास ईच्छुक झाले असतील अशी आशा आहे.

आनंद झाला ते निरुपण वाचुन अभंगाचे. खरच छान लिहिले आहे.
असे काही वाचले वा ऐकले कि वाटते आपल्या जवळचे कोणी आहे.

प्रणाम,

श्रीसंत सोयराबाई महाराजांचा एक अभंग पाहू....

'श्री' महाराज... परमार्थातील थोर अधिकारी असून... त्या श्रीसंत चोखामेळा महाराजांच्या पत्नी होत! आपल्या अनुभवाविषयी सांगताना त्या म्हणतात..

नाहीं उरली वासना |
तुम्हां नारायणा पाहतां || १ ||
उरला नाहीं भेदाभेद |
झालें शुद्ध अंतर || २ ||
विटाळाचें होते जाळें |
तुटलें बळें नामाच्या || ३ ||
चौदेहांची तुटली दोरी |
म्हणे चोख्याची महारी || ४ ||

परमार्थाचा 'अनुभव' येणे म्हणजे काय? आणि तो कशामुळे येतो? याचे शास्त्रशुद्ध कथन करताना 'श्री' महाराज म्हणतात...

हे बा नारायणा! तुमचे 'यथार्थ' दर्शन झाल्यामुळे.... आपल्या.. परमपावन करणार्‍या कृपेमुळे... माझ्या अंतःकरणात आता वासनाच शिल्लक राहील्या नाहीत. आजवरच्या अनंत जन्माचे फलीत म्हणून असलेल्या, 'संस्कार' रुपाने... 'संचित' रुपाने साठलेल्या, 'अनंत' वासना आता जळून शुद्ध झाल्या आहेत.

त्यामुळे.. अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे, वासनारहित झाल्यामुळे.. आता याचा सहज, स्वाभाविक परिणाम म्हणून.. आजवर माझ्या दृष्टीला, जो भेदाभेद भासता होता तो समूळ... वासनारुपी कारणासहीत संपला आहे. 'अगोदर' बुद्धीने अतोनात प्रयत्न करूनही.. जो भेदाभेद संपत नव्हता, तोच अगोदरचा भेदाभेद... आता आपल्या दर्शनामुळे, पहायचे असे ठरवूनही दिसत नाही. भेदाभेद पहाणारी बुद्धीच आता नष्ट झाली.

जे अशुद्धाचे, अमंगळाचे, विटाळाचे वासनामय जाळे माझ्या अंतःकरणाला व्यापून होते, ते केवळ श्रीसद्गुरुप्रदत्त नामाच्या स्वाभाविक बळामुळे, आता तुटले आहे.

'स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण', अशा चार देहांना अखंड एकत्र धरून ठेवणारी महाप्रबळ वासनारुपी दोरी, श्रीनामाच्या कृपाबळाने तुटली आहे आणि त्यामुळे... वासनेमुळे पाठीमागे लागलेल्या 'जन्ममरण' रुपी महाबंधातून आता आमची सुटका झाली आहे...!आमचा 'गर्भवास' संपला आहे.

धन्यवाद!

प.पू. श्रीसद्गुरु ज्ञानेश्वरमहाराजांच्या भगिनी, श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा एक अभंग पाहू...

श्रीसंताना मनुष्य जन्माचे 'ध्येय' कळालेले असते, आणि त्या ध्येयाचा 'अखंड ध्यास' लागल्याने.. त्यांच्या 'ध्यानमय' अवस्थेतील प्रकटलेले शब्द... साधकासाठी 'शास्त्रच' असते. ज्याला याच जन्मात परमेश्वर प्राप्तिची 'तळमळ' लागली आहे, त्यांनी श्रीसंताच्या उपदेशाचे 'सतत'.. मनन करावे... कारण इतर कोणत्याही उपायाने.. संगाने परमेश्वर प्राप्ति होणार नाही.

साक्षात् ब्रह्मविद्या असणार्‍या श्रीमुक्ताई म्हणतात...

आधी तूं मुक्तचि होतासी रे प्राणिया |
परि वासनें पापिणीया नाडिलासी |
आधींचे आठवीं मग घेई परी |
हरिनाम जिव्हारीं मंत्रसार || १ ||
आदि मध्य हरि ऊर्ध्व पै वैकुंठ |
जाईल वासना हरि होईल प्रकट || ध्रु. ||
एकतत्व धरी हरिनाम गोड |
येर ते काबाड विषय ओठी |
नाम पैं सांडी वासना पापिणी |
एका नारायणीं चाड धरी || २ ||
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना |
मुक्तामुक्ती राणा हरिपाठें |
नामाचेनि घोटें जळती पापराशी |
न येसी गर्भवासी अरे जना || स.सं.१.५.३ ||

'श्री', आपल्या नावाप्रमाणेच 'मुक्त' असण्याचे, आपल्या मोक्षाचे 'रहस्य' उघड करताना म्हणतात....

अरे मनुष्य प्राण्या..तू आधी मुक्तच होतास. पण आता 'वासना' नावाच्या पापिणीच्या संगती मुळे एवढा नाडला गेला आहेस... की तू अगोदर कोण होतास याचेच तुला पुर्ण विस्मरण झाले आहे. तुझे आधीचे मुक्तस्वरुप श्रीसंताकडून समजावून घे, त्याचाच आठव कर, त्याचेच चिंतन कर. त्या चिंतनामुळे, जर, या पापिणीच्या संगातून सुटावे हा 'हेतू' तुझ्या मनात आला असेल तर.. या वासनेतून सोडविणार्‍या सर्व मंत्राचे 'सार' असे 'श्रीहरिनाम' तुझ्या हृदयात धारण कर, ते अखंड तुझ्या जिव्हेवर धारण कर.

लक्षात घे, जर वासना समूळ.. कारणासहीत नष्ट झाल्या तर आणि तरच, आदि, मध्य, शेवटी, वर आणि खाली असे सतत अखंड असलेले श्रीहरि तुझ्यासमोर प्रकट होतील. (अन्यथा नाही..)

हे होण्यासाठी, श्रीहरींचे अवीट गोडीचे नाम, हे एकमेव 'तत्त्व' धरून ठेव. हे न करता जर इतर विषयाकडे तुझे धावणे झाले तर सगळेच व्यर्थ होईल. केवळ श्रीनामानेच या 'वासना' पापिणीचा संग सांडता येईल... केवळ श्रीहरी प्राप्तीचीच इच्छा ठेवून.. त्यासाठी त्यांच्याच नामाचा आश्रय घे. ( अन्य आश्रयांचा त्याग कर.)

श्रीसद्गुरुंच्या कृपेमुळे मिळालेले नामसाधन केले असता, वासनेचा नाश होऊन, मुळच्या 'मुक्त' स्थितीचा परत अनुभव येतो. 'मग' हरिपाठी स्थिरावून हरिमयता येते. (... अगोदर नाही.)

नामस्मरणामुळेच... सर्व पापांच्या राशी जळून जातील, वासना संपतील .. मग तुझे वासनेमुळे असलेले 'जन्ममरण' चक्र थांबेल. अरे 'जीवा' केवळ नामानेच तुझे 'गर्भवास' चुकतील आणि मगच तुला 'श्रीहरिमय' होता येईल, हे चांगले समजून घे.

( परमार्थात 'कार्य-कारण' हा 'भाव' समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे... कारण त्यामुळेच आपल्या मनातल्या भावांचे स्थित्यंतर होते.. भावात बदल होतो. हे फार महत्त्वाचे आहे... कारण जसा 'भाव' तसा 'देव' .. असा सिध्दांत आहे. जसा 'संग' तसा 'भाव', जसा 'भाव.. तसे 'ध्येय', जसे 'ध्येय' तसे 'प्रयत्न', जसे 'प्रयत्न' तसे 'ध्यान'.. ध्यास.. निदिध्यासन, जसे 'निदिध्यासन' तशी 'प्राप्ति' असे 'सुत्र' आहे.)

धन्यवाद!

काय सुरेख आहे हा धागा! एकेक प्रतिसाद अत्युच्च पातळीवरचे आहेत.
वाचुन मनन करण्यास वेळ लागेल म्हणुन वर काढतेय. Happy

आर्या, लाख लाख धन्यवाद __/\__
मी काहीवेळा शोधायचा प्रयत्न केला होता, पण Sad
सावट या आयडीचा पण काहीच थांगपत्ता नाहीये. Sad

चर्चा संपली वाटतं .... मांसाहार आणि अध्यात्म याची सांगड कशी घालाल म्हणजे एखादा कालीचा भक्त मासे खाऊन पण तिची भक्ती करतो किंवा थंड प्रदेशात राहणारे लोक देव भक्त असून देखील मांसाहार करतात याला काय म्हणायचे

भुत्याभाऊ, मुळात मांसाहार करू नये. पण जे रोज मांसाहार करतात, त्यांच्यासाठी पुराणात सांगितले आहे की तुम्ही अमावास्येच्या दिवशी कालीला नैवैद्य दाखवून मांसाहार करू शकतात. केलाच पाहिजे असे नाही, पण हे त्यांच्यासाठी एक regulation आहे. त्यांना जर सरळसरळ बंद करायला सांगितले, तर ते काहीच करणार नाहीत.
जसे एखाद्याची दारू सोडवायची असेल, तर एका दिवसात शक्य नाही.....

,

नमस्कार

मला हरतालिकेच्या व्रताविषयी विचारायचे आहे. हरतालिकेचा उपवास करणे बंद करायचा असेल तर काय करावे लागेल. म्हणजे भटाकडे जाऊन काही करावे लागेल का?

धन्यवाद

दक्षा

मला अध्यात्माची खूप आवड आहे पण बोलायला कुणी नाही व्व्हत अप्प वर बोलता येईल काग्रूुप बनवून sorry I am usually in reading mode from 10 years on Maayboli. But really wanted to do this. I need a spiritual friend to talk to
Asmita

खूपच छान धागा आहे. अतिशय सुरेख.
_______
वामांगीचा लास्यविलासु! जो हा जगद्रुपाआभासु|
तो तांडवमिसे कळासु|दाविसी तू|

शंकराच्या नृत्याला तांडव आणि पार्वतीच्या नृत्याला लास्य म्हणतात. नृत्यामध्ये लय आणि सुसंवाद असतो. माणसाला आनंद झाला की तो स्वाभाविकपणे नाचतोच पण दु:ख , वियोग, संहार इत्यादि अनुभवही नृत्यकलेमधून तो दाखवितो. म्हणजे त्या त्या भावांचे आभास निर्माण करण्याची शक्ती नृत्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जगदरूपी आभास हे पार्वतीचे (मायेचे) लास्य आहेत. हे लास्य गणपतीच्या साक्षीने चाललेले आहेत. इतकेच नव्हे तर हे गुरो, हे गणपती, मायेच्या नृत्यातील जगदाभास दाखविण्याचे कौशल्य तू आपल्या नृत्यकलेच्या द्वारे दाखवितोस. पार्वतीचे लास्य जसे गणपतीच्या साक्षीने चालतात, तसे शिष्याचे जीवन सद्गुरुंच्या साक्षीने चाललेले असते. आणि शिष्य जर या जगदाभासात रमू लागला, तर हा साक्षीभाव सोडून तांडवनृत्य करून ते तो आभास दूर करतात.

फार पूर्वी हे विवेचन एका स्क्रिबडी वरील मराठी ग्रंथामध्ये वाचलेले होते. ती डॉक्युमेन्ट आत्ता तरी उघडत नाहीये.
____________
आदिश्री अजुनही तुम्ही जर, फेसबुक अथवा व्हॉटसॅप शेअर करण्याकरता इच्छुक असाल तर प्लीज मला इमेल करा. मला तुम्हाला अ‍ॅड करायला आवडेल.

खूप माहितीपूर्ण धागा आहे.
अजून वाचतोच आहे प्रतिसाद.
वर काढण्यासाठी प्रतिसाद दिलाय.
हल्ली अश्विनी, सावट, महेश दिसत नाहीत का माबोकर.

बरं झालं झकासा... हा धागा वर काढला ते.
गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद आश्रमातुन खुप पुर्वी 'रुद्र' नावाचे पुस्तक घेतले होते. त्यात दिलेली नितांत सुंदर शिव आरती खाली देत आहेत. छान ताल-ठेक्यावर आहे. संपुर्ण अर्थ कोणी सांगितला तर बरे होईल.

चाल: ओम जय जगदीश हरे सारखी

|| शिव आरती ||

ओम जय गंगाधर हर| शिव जय गिरिजाधीश, शिव जय गौरीनाथ|
त्वं मां पालय नित्यं, त्वं मां पालय शंभो, कृपया जगदीश| ओम हर हर हर महादेव || धृ ||

कैलासे गिरिशिखरे कल्पद्रुमविपिने, शिव कल्पद्रुमविपिने, गुंजति मधुकर पुंजे (२),कुंजवने गहने|
कोकिल कूजति खेलति हंसावलिललिता, शिव हंसा वलिललिता| रचयति कलाकलापं (२), नृत्यति मुदसहिता, ओम हर हर हर महादेव || १||

तस्मिंल्ललितसुदेशे शालामणिरचिता, शिव शालामणिरचिता| तन्मध्ये हरनिकटे (२), गौरीमुदसहिता|
क्रीडां रचयति भूषां रंजितनिजमीशं, शिव रंजितनिजमीशं| इन्द्रादिक सुरसेवित, ब्रम्हादिक सुरसेवित (२) प्रणमति ते शीर्षम, ओम हर हर हर महादेव|| २||

विबुधवधूर्बहु नृत्यति हृदये मुदसहिता, शिव हृदये मुदसहिता| किन्नरगानं कुरुते (२), सप्तस्वरसहिता| धिनकत थै थै धिनकत मृदंग वादयते, शिव मृदंग वादयते| क्वण क्वण ललिता वेणु (२), र्मधुरं नादयते,
ओम हर हर हर महादेव|| ३||

रुणु रुणु चरणे रचयति नूपुरमुज्वलितं, शिव नूपुरमुज्वलितं| चक्रावर्ते भ्रमयति (२), कुरुते तां धिक ताम|
तां तां लुपचुप तालं नादयते, शिव तालं नादयते| अंगुष्ठांगुलिनादं (२), लास्यकतां कुरुते,
ओम हर हर हर महादेव|| ४||

कर्पुरद्युतिगौरं पंचाननसहितं, शिव पंचाननसहितं| त्रिनयनशशिधरमौलि: (२),विषधरंकण्ठयुतम| सुन्दरजटाकलापं पावकयुतभालं शिव पावकयुतभालं| डमरुत्रिशुलपिनाकं (२), करधृतनृकपालं,
ओम हर हर हर महादेव || ५||

शंखनिनादं कृत्वा झल्लरि नादयते, शिव झल्लरि नादयते| नीराजयते ब्रम्हा, नीराजयते विष्णुर्वेदऋचां पठते| इति मृदुचरणसरोजं हृत्कमले धृत्वा, शिव हृत्कमले धृत्वा| अवलोकयति महेशं, अवलोकयति सुरेशं, ईशम अभिनत्वा| ओम हर हर हर महादेव|| ६||

रुण्डै: रचयति मालां पन्नगमुपवीतं, शिव पन्नगमुपवीतं| वामविभागे गिरिजा, वामविभागे गौरी रुपमतिललितम| सुन्दरसकलशरीरे कृतभस्माभरणं, शिवकृतभस्माभरणं| इति वृषभध्वजरुपं, हरशिवशंकररुपं, तापत्रयहरणं, ओम हर हर हर महादेव || ७||

ध्यानं आरति समये हृदये इति कृत्वा, शिव हृदये इति कृत्वा| रामं त्रिजटानाथं (२), ईशम अभिनत्वा| संगीतमेवं प्रतिदिनपठनं यः कुरुते, शिव पठनं यः कुरुते| शिवसायुज्यं गच्छति (२), भक्त्या यः श्रुणुते|
ओम हर हर हर महादेव || ८||

ओम जय गंगाधर हर, शिव जय गिरिजाधीश, शिव जय गौरीनाथ| त्वं मां पालय नित्यं, त्वं मां पालय शम्भो, कृपया जगदीश| ओम हर हर हर महादेव ||

<<आर्या तू मुक्तानंदांचे "चितशक्तीविलास" वाचलेले आहेस का?<< पुर्वी वाचले असेल, कॉलेजला असतांना. पण निलेश्वरी मासिक यायचे दर महिन्याला घरी.
आमचे बाबा कराय्चे गुरुमाईंच., त्यांचा सिद्धयोग ना! धुळ्याला घरी वरती बाबांनी छोटेसे ध्यान मंदिर बांधले होते. रोज पहाटे साडेतीनला उठुन ध्यानधारणा कराय्चे बाबा. आम्हीही पुर्वी दर सुट्टीत ४-५ दिवस गणेशपुरी आश्रमात जायचो. नंतर गुरुमाई युएसला गेल्या मग राहीले.

बीअर बायसेप्स मध्ये दशमहाविद्यांबद्दल बरीच माहीती आहे. मला यातील काहीच माहीत नव्हते. कोणी या कोण्या देवतांची उपासना करते का इथे? त्यांचा काय अनुभव? बंगालमध्ये तांत्रिक पुजोपचार जास्त चालतात.
मी ऐकले आहे त्याप्रमाणे दैवज्ञ ब्राह्मण म्हणजे सोनार यांनाही बरीच माहीती असते. अर्थात हे ऐकिव आहे. माझ्या सासूबाई सोनार होत्या व त्यांची देवीची बरीच भक्ती होती. त्याच्याकडे एकदा त्यांचे कोणी परिचित आले होते. मी ऑफिसमधुन आले तर ते घरात चहा घेत होते. ते नवार्ण मंत्राचा सतत जप करत असे ते म्हणाले. इतका की रात्री झोपेतून जागे झाले तरी होत असे वगैरे वगैरे. त्यांनी एक सोन्याची चेन घेउन मला फक्त डोळ्यांच्या हालचालीनी तिला हेलकावे देता येतात का ते पाहीले वगैरे.
आईंनी माझ्या नणदेला 'नीलसरस्वती' स्तोत्र म्हण असे सांगीतलेले होते. अन्यही अनेक सुंदर सुंदर स्तोत्रे दिलेली पण हे मातंगी (नीलसरस्वती) स्तोत्र त्यात होते. आणखीही काही प्रायव्हेट किस्से आहेत. शंका आहेत पण इथे सांगता येणार नाहीत.

Pages