आमचे ते लिंबू. राफेलचे ते कडूलिंबू?
भारत सरकारने देशाचे संरक्षण करायला राफेल विकत घेतले.
आणि मग त्या राफेलचे रक्षण करायला काही लिंबू विकत घेतले.
सोशलसाईटवर या प्रतापाची फारच खिल्ली उडवली जात आहे. आणि अर्थात ते स्वाभाविकच आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक असतो तिथे या श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, शोभत नसल्याने उठून दिसतात. भले खिल्ली उडवणारे स्वत:च्या दाराखिडक्यांना लिंबाचे तोरणच का लावत असेना, ट्रोलिंगच्या या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुवून घेतात. त्यातही जर प्रकरणाला राजकीय झालर असेल तर विचारायलाच नको. समर्थनार्थ दुसरी पार्टीही उतरते आणि तुंबळ ट्रोलयुद्ध पेटते.