गुन्हा कोणता झाला माझा जाता जाता टाक सांगुनी एवढेच कर
काय मिळाले सांग मलाही..तुला आपला खेळ मोडुनी एवढेच कर...
या दुनियेच्या शर्यतीत जर तुला जिंकणे अगदी अवघड असेल वाटत
तुझ्यासोबतीच्या लोकांना पाड धरेवर पाय घालुनी एवढेच कर...
प्रेमाच्या बदल्यात तुला जर मरण मला द्यायचेच आहे हरकत नाही
हवा तिथे सर्रास सुरा चालव तू माझी पाठ सोडुनी एवढेच कर...
जन्म कुण्या जातीत कुण्या मातीत ,नसू दे छत माझ्या डोक्यावर आई
तुझी कूस दे जन्मोजन्मी ठेव सुरक्षित नाळ बांधुनी एवढेच कर...
प्रिये भेटल्यावरती भीती तुला वाटते जरका माझ्या व्रात्यपणाची
खुले केस मोगरा ओठ अन डोळ्यांना तू ठेव झाकुनी एवढेच कर...
ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा
शेजार कधी पक्ष्यांचा होता किलबिल किलबिल
रात्रीस सोबती तारे होते झिलमिल झिलमिल
खिडकीत डहाळी आता वाकत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
प्राजक्त अंगणी गंध प्रितीचे सांडत होता
तो चाफा राजस रंग उषेचे माळत होता
आता दगडांतुन अंकुर हासत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
मी दूर दूरच्या नवीन देशी जावे म्हणतो
आवडते गाणे विसरुन दुसरे गावे म्हणतो
ह्या सुरांत आता रंगत वाटत नाही मित्रा
"अनेकदा हे सुचले होते
पण ना कधीच जमले होते
तुला सांगणे मनातले मी
ठरले होते, फसले होते
आज मात्र मी लिहिले आहे सगळे काही
आवडले ना तुला तरीही पर्वा नाही
तू वाचावे म्हणून आहे लिहिले सारे आज सविस्तर
मनात भीती वाटत आहे तरी वाच तू हे लवलेटर -
तुला पाहिले
जेव्हापासुन
मनास नाही
मुळीच थारा
असतोही मी
मी नसतोही
चालत असतो
पोचत नाही
कुणास ठाउक
काय हरवले
शोधत आहे
काय इथे मी
उगाच वाटे
मलाच माझे
तुझ्याचपाशी
आहे बहुधा
जे मी शोधत
आहे येथे
सांग मला तू
पहिल्या वेळी
पाहिलेस ना
तेव्हा काही
त्या नजरेने
ह्या नजरेचे
दिले-घेतले
होते असले
जाणवले का ?
असेल किंवा
मनातले मी
कवितेमधुनी
मांडत असतो
असे सांगतो
जरी तुम्हाला
मलाच माहित
हे तर आहे
केवळ वरवर
आवड आहे
एकच मजला
प्रस्थापितता
मोडुन काढुन
बंड करावे
म्हणून लिहितो
जे जे दिसते
लोकमान्य अन्
पारंपारिक
ते ते सगळे
चूकच आहे
असे म्हणावे
म्हणजे येते
नजरेमध्ये
तेव्हढेच तर
मला पाहिजे
मला म्हणा हो
नव्या पिढीचा
कारण आहे
बंडखोर मी !
लिहितो केवळ
ठरण्यासाठी
बंडखोर मी..
....रसप....
४ जुलै २०१३
कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा
जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे
खिन्न मनाला सुन्न क्षणी हा सुचतो चाळा
एक दिवस जेव्हा सुटली नोकरी अचानक
छोट्या शिक्षा करणारी आठवली शाळा
जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?
एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..
अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
खेळातून मला ह्या देवा कृपया गाळा
एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा
शेर विठ्ठलाबद्दल होता, त्याचा नव्हता
तरी 'जितू' लोकांस दिसे माझ्यातच 'काळा'
मी आल्या, गेल्या, केल्या अन् झाल्याचा
झटकून निराशा हिशेब जेव्हा करतो
छोट्यातुन मोठी शून्ये उमलत जाती
मी पुन्हा एकदा माझ्यासोबत नसतो
ओठांना तृष्णा शब्दांची मग असते
हृदयास शांतता हवीहवीशी थोडी
ही द्विधा अशी की संचित विसरुन जावे
गुंते ना सुटती, पडती नवीन कोडी
जो समोर असतो रस्ता, समुद्र बनतो
गाड्यांच्या अगणित लाटांमागुन लाटा
दृष्टीस किनारा ना कुठलाही जवळी
संतत आवाजाचा असतो सन्नाटा
ही शून्य स्थिती ना उदास ना आनंदी
मी माझ्यापासुन मुक्त, नसे मी बंदी
मी समोर माझ्या क्षण असतो मग नसतो
जणु दुरून कोणी गाभाऱ्याला वंदी..
....रसप....
०६ मे २०१३
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग -
भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने
दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे
हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते
धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते
मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती
गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते
नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते
ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले
भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे
डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते
लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते
चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला