ओल्या वाळूतल्या पाऊलखुणा
चिरंतन प्रश्नांची निरंतर कोडी,
हळूहळू उलगडत — थोडी थोडी.
कधी काळ थांबतो आरशातल्या नजरेत,
क्षणभर प्रश्नच उत्तरासारखा वाटतो तिथेच.
कितीही जपलं तरी ते निसटतंच,
मन मात्र त्याला कायमचं चिकटतं.
हसण्यामागची शांत सावली अजून ओळखीची आहे,
जुनं दुःखही आता थोडंसं आपुलकीचं आहे.
जुन्या आठवणींचे रेशमी शामियाने खुणावतात,
त्यांच्या उबदार मखमाली बिछान्यात मनं विसावतात.
आठवणी शब्द न वापरता बोलतात,
मनाच्या कप्प्यात अलगद उतरतात.
तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी शरीराने खूप वेगळे आहोत,
आम्हा दोघांची विश्व वेगळी ,तरी आम्ही एकाच आहोत.