मराठी गझल

उत्तरे सापडायची पुर्वी

Submitted by बेफ़िकीर on 21 November, 2011 - 06:52

उत्तरे सापडायची पुर्वी
माणसे उलगडायची पुर्वी

जात होत्या मिठीमधे रात्री
काय थंडी पडायची पुर्वी

हासते ती कसेनुसे आता
चांदणे शिंपडायची पुर्वी

ओळखेनात एकमेकांना
जी मुले हुंदडायची पुर्वी

सासरी लेक जायची तेव्हा
पूर्ण वस्ती रडायची पुर्वी

भेटुनी नाचली जुनी झाडे
काय नाती जडायची पुर्वी

वाट बदलून लाजुनी जाते
पोर जी बागडायची पुर्वी

वाटली जायची घरामध्ये
वेदना परवडायची पुर्वी

त्रासुनी द्यायची शिवी आजी
आणि ओवी झडायची पुर्वी

मी तिला आज भावतो आहे
ती मला आवडायची पुर्वी

गुलमोहर: 

मुर्दाड जीवनाला माझी दया न आली

Submitted by रसप on 21 November, 2011 - 00:55

मयुरेशच्या गझलेतील "मुर्दाड जीवनाला माझी दया न आली" ह्या मिसऱ्यावरून काही सुचलं -

मुर्दाड जीवनाला माझी दया न आली
मी हार मानुनीही केल्या कितीक चाली

माझ्यासमोर गेली वस्ती जळून सारी
त्यानेच जाळले अन् बनला स्वत:च वाली

अंधार सांडलेला वाटेवरी कधीचा
माझीच सावलीही आता फितूर झाली

मी ऐकला पुन्हा तो हुंकार ओळखीचा
आनंद शोधताना ही वेदना मिळाली

पूर्वी इथेच होती छाया निवांत थोडी
आता जमीनही का अंगार तप्त व्याली ?

....रसप....
२१ नोव्हेंबर २०११

गुलमोहर: 

नाते मजला विणावयाचे आहे

Submitted by निशिकांत on 20 November, 2011 - 23:55

आकाशाशी नाते मजला, विणावयाचे आहे
पंख लावुनी मला जरासे उडावयाचे आहे

प्रेम कसे हे ! परवान्याला जळावयाचे आहे
शमा म्हणे, तो जळण्याआधी, विझावयाचे आहे

वास करावा क्षितिजावरती, मनी जागली आशा
नभास धरती कुठे भटते, बघावयाचे आहे

नैवेद्याच्या ताटामधले देव कधी का खातो?
तेच जेवुनी पोट भुकेले, भरावयाचे आहे

लज्जित आहे, दुसर्‍यांसाठी कांही केले नाही
मलाच माझ्यापासुन थोडे दडावयाचे आहे

पानगळीचा मोसम येता, उदास मी का व्हावे?
नवी पालवी फुटण्यासाठी, गळावयाचे आहे

खूप जमवले सभोवताली, जीवन जगता जगता
कोण आपुले, कोण पराये, ठरवायाचे आहे

भोग कधी का कुणास टळले, होम हवन करण्याने?

गुलमोहर: 

मिसरा कसा असावा मिसरा कसा नसावा

Submitted by मयुरेश साने on 20 November, 2011 - 03:01

मी श्वास श्वास माझे केले तुझ्या हवाली
मुर्दाड जीवनाला माझी दया न आली

का वस्त्रहरण चाले सामान्य माणसाचे
जे फेडतात त्यांना मिळतात रोज शाली

मी पुण्यवान किंवा पापी म्हणा हवे तर
करवून तोच घेतो माझ्यात हालचाली

कोणी नसे कुणाचे पण सोबती हजारो
मधुनीच घेत जातो माझीच मी खुशाली

ओठात नाम देवा जेव्हा फुलून आले
काट्या - कुट्यातुनी ही अपसूक वाट झाली

हा आरसा बिलोरी वाटे मला नकोसा
तू लाज लाजता मी बघतो मलाच गाली

हासून वेदनेचे पचवा जहर सुखाने
गाऊ नका कधीही रडक्या उदास चाली

मिसरा कसा असावा मिसरा कसा नसावा
साधीच ओळ व्हावी संवेदनेस वाली

गुलमोहर: 

पुरे जाहला हा खटाटोप आता.

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2011 - 06:18

===============================

हा दोष नगण्यत्वाचा कोणाच्या माथी मारू
अस्तित्व टिकवण्यासाठी हे लिहितो मी बाजारू

===============================

पुरे जाहला हा खटाटोप आता
पहा झोपले जग जरा झोप आता

उभा जन्म हा एक मिसरा असावा
करावा प्रभावी समारोप आता

स्वतःऐवजी पाहतो हा जगाचे
असा एक व्हावाच आरोप आता

फुका सावलीच्या अपेक्षेत होतो
कधी व्हायचे झाड हे रोप आता

मिळालास माझ्या प्रयत्नांमुळे तू
नशीबा न व्हावा तुझा कोप आता

-'बेफिकीर'!

===============================

गुलमोहर: 

तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता........तरही

Submitted by सुहासिनी on 17 November, 2011 - 02:03

जरी तू वायदा दोघातला धुडकावला होता,
तुझ्या पत्रातला मजकुर का ओलावला होता.

किती रे वार केले तू मनावरती सख्या माझ्या,
तुझ्यासाठी तरी का जीव हा नादावला होता.

नभाला भाव भिडले सर्व वस्तूंचे तरी सुध्दा,
कळेना माणसांचा भाव का मंदावला होता.

विरह का गोंदला माझ्या तुझ्या भाळीच दैवाने,
नभीचा चंद्रही ते पाहुनी पाणावला होता.

मना मध्ये तुझ्या जेव्हा वसंताची वसे चाहुल,
ॠतू तेव्हाच प्रेमाचा कसा थंडावला होता.

...........सुहासिनी सुरेश.

गुलमोहर: 

तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता ? (तरही)

Submitted by इस्रो on 16 November, 2011 - 09:30

वियोगाने उन्हाळाही जरा पाणावला होता
तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता ?

कुणाला हे हवे आहे कुणाला ते हवे आहे
हजारो मागण्यांनी देवही भंडावला होता

कळाले ते मला सारे, तुझ्या ओठी न आले जे
निरागस चेहरा जेव्हा तुझा भांबावला होता

सरकला काल वार्‍याने, तुझा घुंगट जरासा अन्
तुझा बघण्यास मुखडा, चंद्रही डोकावला होता

कशी रे आरतीची लावुनी सीडी तुझी पूजा !
अशाने देव का "नाहिद" कुणाला पावला होता?

-नाहिद नालबंद
(मो. ९९२१ १०४ ६३०)

गुलमोहर: 

सत्त्य मानले आभासाला

Submitted by निशिकांत on 16 November, 2011 - 01:13

सत्त्य मानले आभासाला
दु:ख जरासे विसरायाला

नजरेमधले आर्जव बघुनी
स्वप्नी येई सहवासाला

रडवेला का असा चेहरा?
जीवन नाही कण्हावयाला

दु:खाविन का कधी झळाळी
लाभत असते मधुमासाला?

सावलीसही माझ्या कळले
दूर पाहिजे असावयाला

आत्मचरित्रा विराम देतो
काय राहिले लिहावयाला?

मला कशाला जागे केले?
किती तडे हे विश्वासाला !

गांधीवादी जरी मुखवटे
आशिर्वचने विध्वंसाला

आम्ही केले आज, उद्याच्या
किती कलंकित इतिहासाला !

"निशिकांता"ला आज कळाले
अपुले होते म्हणावयाला.

गुलमोहर: 

विचार आहे

Submitted by निशिकांत on 14 November, 2011 - 01:46

इतिहासाला पुसून थोडे, जगावयाचा विचार आहे
पुराण पोथ्या नकोत, नवखे लिहावयाचा विचार आहे

जुनीच मोनालिसा टांगली, तेच रूप अन् हास्य तेच ते
सौंदर्याची नवीन व्याख्या, करावयाचा विचार आहे

मिळावयाला अवघड जे जे, हवे हवेसे तेच मनाला
आकाशाला कवेत माझ्या, धरावयाचा विचार आहे

देव कशाला? छनी हतोडा, धरून हाती आत्मबलाने
कोरुन भाळी नशीब अपुले, लिहावयचा विचार आहे

नाव राखण्या, मनास मुरडुन, धोपट मार्गी चालत आलो
प्रवास थोडा, पाय घसरण्या,करावयाचा विचार आहे

पुरे जाहले लब्धप्रतिष्ठित, रटाळ जगणे फिके फिकेसे
रंगबिरंगी गरिबीसंगे, जुडावयाचा विचार आहे

गुलमोहर: 

माझ्याच वेदनेला ठरवून जोक गेले

Submitted by मयुरेश साने on 13 November, 2011 - 01:48

माझ्याच सांत्वनाला गाऊन श्लोक गेले
डोक्यास आठवांची देऊन खोक गेले

प्रेता परीच माझे जगणे जिवंत होते
मेल्यावरीच का मज जाळून लोक गेले

कवटाळतोय ज्यांना मानून फक्त माझे
हलकेच काळजाला पाडून भोक गेले

जगण्यास आज माझ्या भलतीच धार आहे
आभार मानतो जे काढून टोक गेले

हसण्या शिवाय आता आहे उपाय कुठला ?
माझ्याच वेदनेला ठरवून जोक गेले

मयुरेश साने

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल