'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) ए सर्टिफिकेटचा बी ग्रेड चित्रपट

Submitted by अतुल. on 5 January, 2024 - 13:11

मजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये Lol

कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.

झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?

हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.

ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!

बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?

भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.

तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.

संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.

अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)

जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. ‎IMDb वर 6.8 रेटिंग आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप इंटरेस्टिंग चर्चा आहे. वाचतोय.

सलीम-जावेद नी ७०ज मधे गुन्हेगार नायक "विजय" उभा केला पण त्यांचे सादरीकरण फार चतुर/क्लेव्हर होते. People loved him "in spite of" his bad things, not "because of" his bad things. Also, he never hurt good/innocent people. त्यामुळे लोकांना त्याच्या कॅरेक्टरला "रूट" करायला काही वावगे वाटले नाही. तो चोरी/स्मगलिंग वगैरे करत असे. त्याबाबतीत तो गुन्हेगार होता. पण त्या व्यतिरिक्त त्याचे वागणे एखाद्या हीरोसारखेच असे. दुसरे म्हणजे त्या काळातील लीड कॅरेक्टर्स जर चोर, डाकू, स्मगलर्स असतील तर ते काहीतरी "ऑनर कोड" असलेले असत. ड्रग्ज चा व्यापार करणार नाही. उगाच कोणाला त्रास देणार नाही टाइप. त्यांचा वाइटपणा हा त्यांच्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्यापर्यंतच असे. तसेच त्यांच्या वाईट सवयींचे ग्लोरिफिकेशन फार क्वचित दाखवले जाई.

अशा कॅरेक्टर्सचा ते सिनेमे बघणार्‍यांवर परिणाम होतो असे मलातरी वाटते. मुंबईच्या भाई लोकांवर जे पिक्चर्स आलेत त्या ते बहुतांश काहीतरी ऑनर कोड असलेले दाखवलेत. प्रत्यक्षातले माहीत नाही. बाकी मर्द बघून सुरीने स्वतःच्या छातीवर मर्द लिहून घेणारे वगैरे नग असतात. सिनेमातील एखाद्या प्रचंड लोकप्रिय व्यक्तिरेखेमधे आकंठ बुडून आपले सगळे वागणे त्याच्यासारखे करू पाहणारे लोक प्रत्यक्षात बघितले आहेत.

सिनेमातील एखाद्या प्रचंड लोकप्रिय व्यक्तिरेखेमधे आकंठ बुडून आपले सगळे वागणे त्याच्यासारखे करू पाहणारे लोक प्रत्यक्षात बघितले आहेत >>>

बिग बी किंवा मिथुनदा सारखी केशरचना, काका सारखा नाच, जग्गू दादा सारखी भाषा एक ना अनेक सॉफ्ट उदाहरणे तर आहेतच पण हातावर (नसलेल्या) प्रेयसीचे नाव लिहिणे (झिंगाट गाण्यात सुद्धा याचा उल्लेख आहे), रक्ताने प्रेमपत्र लिहिणे (भलेही ते रक्त मानवाचे नसेल), भीतीवर आणि गडकिल्ल्यावर नाव लिहिणे असे व इतर त्रासदायक प्रकार हि लोकांनी केल्याची उदाहरणे आहेत.

अस्मिता & मी अनू चे मुद्दे & पोस्ट्स पटल्या.
कोणी मान्य करा वा नका करू..एखादा जरी बाळ्या ह्या अशा हिंसाचाराने/विकृत वागणुकीने जी स्क्रीन वर दाखवली आहे त्याने प्रभावित होत असेल आणि दुर्दैवाने तोच बाळ्या आपल्या मुली/बहिणी/नातेवाईक मुली च्या नशिबी आला तर काय घ्या? किंवा अगदी शेजारच्या मुली ला ही असा एखादा पढा लि‍खा पण एझीली प्रभावित होणारा माणूस मिळाला आणि त्याने अशी समजूत करून घेतली, की पोरींना तर रनबीर/शाहिद खूपच आवडतो, मग मी पण मारतो एखादी चापट, आवडेलच तिला ही Wink आवडतात काहिंना रफ टफ रोमँस वाले Sad

होतयं का थोडं सं रीलेट? १% ही चान्स असेल प्रभावित होण्याचा तर अशांना धारेवर धरलेच पाहिजे. बंदी नको कारण समाजा पर्यंत पोहोचणार नाही की काय चुकीचे आहे.

चर्चा वाचतो आहे. घटना नोंदवल्या गेल्याचं प्रमाण वाढलं असावं - हा मुद्दा पटला नाही. अश्या अनेक घटनांत गुन्हेगारांनी अमुक एका चित्रपटावरून प्रेरित होऊन हे कृत्य केल्याचं स्वतःहून मान्य केलंय> https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/10-...

इथे घटना वाढल्या का किंवा नोंदवल्या जाणं वाढलं का हा प्रश्न नाहीये. कथेवरून प्रेरित होऊन गुन्हे घडले ही वस्तुस्थिती आहे.

दुसरा मुद्दा: 'हा केवळ एक सिनेमा म्हणून बघा' - हे तुम्ही त्या गुन्हेगारांना (गुन्हा करण्याच्या अगोदर) जाऊन सांगा.

हपा धन्यवाद.
एक दूजे के लिये आल्यानंतर आमच्याच कॉलनीत एका मुलीने बिल्डींगवरून उडी मारली होती. तेव्हां तिने का उडी मारली हे समजत नव्हते. पण दुपारच्या वेळात बायकांच्या चर्चा चालायच्या त्यावरून हे लोण अनेक ठिकाणी आलेले आहे असा सूर असायचा. अगदी गावोगावच्या नातेवाईकांचा सूर हाच होता. एकीने विष पिऊन आत्महत्या केली. थोड्या दूर असलेल्या कॉलनीत जोडप्याने रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली. या आधी या घटना बघण्यात / ऐकण्यात नव्हत्या. त्या वेळी या आईवडील सिनेमाला मुलींना जाऊ देत नसत हे पण आठवणीत आहे.

चित्रपटांचा प्रभाव यावर एक वेगळी शक्यता मांडतो .. (वांगा रेड्डीची वर चर्चेत आलेली मतं अर्थातच मान्य नाहीयेत)
ह्या अशा नायकांचा केवळ मुलांवरच (Boys, Men) परिणाम होतो का..?
मुलींबाबत :
१.. अशा प्रवृत्तीची व्यक्ती माझ्या आयुष्यात आली : सुरुवातीची ओळख झाली आणि अशा लक्षणांची पहिली झलक दिसली तर पुढील वाढत्या लक्षणांची कल्पना असल्यामुळे ते नातं तिथल्यातिथे तोडणं किंवा पुढे न जाणं ह्या पर्यायनिवडीला मदत मिळेल का..?
२.. सगळ्यात महत्वाचं.. हे माझ्याबाबत प्रत्यक्ष घडणं खरोखर भयंकर आहे, अशा प्रवृत्तींमुळे मला कधीच त्रास होऊ नये म्हणून आत्मसंरक्षणाचं शिक्षण घेणं, मी ह्याला प्रतिकार करीनच.. ही भावना मनात बाळगणं, असा सकारात्मक विचारही मुलींच्या मनात यायला अशा चित्रपटामुळे घडू शकेल का..?

हो फिबां, हे मोठ्यांच्या तोंडून कानावर पडलेले.. एक दुजे के लिए बघून जोडपी हात बांधून पुण्याच्या एका कालव्यात सुसाईड करत होते...

सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाचा प्रभाव पडतो हे मान्य केलेले आहे. तो पडत नाही असे मानणे हे भाबडेपण आहे.
चित्रपटाशी संबंधित लोक हे मान्य करणार नाहीत कारण त्यांचा तो पोटापाण्याचा धंदा आहे. त्याविषयी त्यांना हवा तसा नरेटिव्ह ते सेट करतातच.

जय संतोषी मा चे उदाहरण ढळढळीत आहे.

मृणाली धन्यवाद.

यात एक '३' पण आहे.सर्व रेड फ्लॅग दिसत असताना 'कबीर सिंग आणि अनिमल मध्ये कसा तो हिरो सुधारला, नंतर उत्कटतेने प्रेम करायला लागला, सगळं ठीक झालं, तसंच आमचं पण होईल' म्हणून बेधडकपणे नात्यात पुढे जाणे.

चित्रपटावर बंदी नको हा रॅशनल थॉट म्हणून मी त्याची नोंंद घेतो. सहमती पण देतो. पण व्यवहारात मी कोणत्या समाजात आहे, तिथे कशाचे काय परिणाम होतात हे माहिती असताना एखादा सिनेमा दंगल घडवून आणेल ही शक्यता असताना त्याच्यावरची बंदी उठवा असे मी म्हणणार नाही. '

समाजाच्या जातीय, धार्मिक, लैंगिक अस्मितांचे व्यवस्थापन होईल, त्या नियंत्रणात असतील त्या वेळी चित्रपटावर बंदी नको याचा मी हिरीरीने पुरस्कार करीन. पंचतंत्र कि इसापनीतीतल्या प्राण्याची हाडे पाहून त्याला जिवंत करणार्‍या तीन विद्वानांची इथे आठवण होते.

घटना प्रेरित आहेत हे कळतंय, पण म्हणून चित्रपटावर बंदी/ बहिष्कार असावा का? - माहीत नाही. वरती सामो यांनी काढलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पण आहेच. मला जो चित्रपट वस्तुस्थिती दर्शवणारा वाटतो, तो एखाद्याला गुन्हेगारीचं उदात्तीकरण वाटेल. सेन्सॉरने पारित केला आहे ह्याचा अर्थ निदान कायद्याने त्यावर बंदी नाही. शिवाय चित्रपट जाऊ द्या, पण ओटीटीवर सेन्सॉर नाही. तोही कंटेंट बिनबोभाट सगळीकडे पोहोच्तोच आहे आणि त्यावर नियंत्रण शक्य नाही. अशा वेळी काय उपाययोजना करायला हव्यात हा प्रश्नच आहे. गुन्हा करण्यास प्रवृत्त होण्यास हे चित्रपट कारणीभूत नसणार, फक्त मोडस ऑपरंडी तिकडून मिलत असावी. मूळ कारणं जी काही आहेत - गरीबी, अन्याय, टोकाची विषमता, सर्वसमावेशकता (ह्यात एकमेकांविषयीचा आदर - त्यांच्या धर्म/जात/लिंग/वर्ण निरपेक्ष) नीट शिकवलेली नसणे किंवा केवळ पुस्तकी शिकवलेली असणे - न बिंबवता, मूल्यांचा वा त्या प्रकारच्या शिक्षणाचा अभाव (अ‍ॅनिमलमध्ये हे कारण आहे का - माहीत नाही, मी चित्रपट पाहिला नाही), जीवनावश्यक साधनांना / सुविधांना / सेवांना अ‍ॅक्सेस नसणे - इत्यादी गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. चित्रपट नसले तरी कुठून ना कुठून गुन्ह्यांच्या कल्पना मिळूच शकतात. मुळात गुन्हाच करावासा न वाटणे हे गरजेचे आहे.

चित्रपटावर बंदी नसावी आणि हॅश टॅग करू बॉयकॉटची झुंडशाहीही नसावी. माध्यमांतून नेमके मुद्दे आणि त्यांचे कसे उदात्तीकरण केले आहे आणि त्याचे समाजावर झालेले / होऊ शकणारे परिणाम अभ्यासपूर्ण रीतीने मांडून चर्चा व्हावी. ट्रोल्स दुर्लक्ष करावे.
शेवटले वाक्य सर्व लिखित/दृश्य माध्यमांना लागु.

माझे म्हणणे अ‍ॅनिमल संदर्भात नाही.
दंगली घडवण्यास कारणीभूत होणार्‍या बातम्या, टीव्ही चॅनेल्स आणि सिनेमा या विषयी आहे. मला जसा दंगलीत माणसे मारली जाण्याविषयी कन्सर्न आहे तसा महिलांना मुली बाळी सुरक्षित असण्याबद्दल कन्सर्न वाटत असणार. मला त्या जाणिवा नाहीत म्हणून मी त्यांचे म्हणणे खोडून काढू नये. ज्या वेळी माझी मुलगी मोठी होईल त्या वेळीच मला ते जाणवणार असेल तर चुकीचंच आहे.

मी अ‍ॅनिमल या पर्टिक्युलर चित्रपटाविषयी बोलत नाही. पण महिलांना कस्पटासमान वागणूक देणारे पात्र हिट असेल तर ती चिंतेची बाब आहे. प्रयत्नपूर्वक काय चूक आहे काय बरोबर आहे या गोष्टी पालक ठसवत असतात. त्यातल्या ज्या चुकीच्या असतील त्या सोडून द्या. पण मुलींवर मर्दानगी गाजवण्यात खरी मर्दुमकी नाही हे ठसवले जाते. तिथे काही मुलांचा पुरूषी इगो, गंड अशा चित्रपटाने कुरवाळला जात असेल तर ते चिंताजनक आहे. असे नमुने थोडे असले तरी ते सर्वत्र असणार. ज्यामुळे मुली बाळींबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक वाटते. ननायकामुळे होणारे परिणाम माझ्या घरापर्यंत येत नाहीत. पण अल्फा मेलच्या उदात्तीकरणाने घराघराल्या मुलींना बाहेर कधी,कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल सांगता येत नाही.

वरती अस्मिताचा मुद्दा हाच आहे.

निव्वळ तत्त्व म्हणून सरसकट बंदी नसावी या म्हणण्याला अर्थ नाही. व्यवहार पण बघितला पाहीजे. तात्विक मुद्दा मांडून जबाबदारी काहीच नसेल तर त्याला अर्थ नाही.
त्याच वेळी फक्त घरातल्या मुलीचा मुद्दा आहे म्हणून बंदीचे समर्थन एव्हढेच नसावे. दंगलीत गरीबांचे जीव जातात. त्यांना "से" नसतो.त्यांच्या वतीने कुणीतरी बोलले पाहिजे. फटाक्याच्या दुकानाजवळ फटाके पेटवायला बंदी घालावी लागते तसे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदीचे पाऊल उचलायला हरकत नाही. ती एव्हढ्या तेव्हढ्या कारणाने नसावी हे ही खरे. न्यायालये चुकतात म्हणून न्यायालयेच नसावीत असे म्हणता येईल का ? सेन्सॉर बोर्ड पण चुकेल पण व्यवस्था म्हणून ते भारतासारख्या ठिकाणी आवश्यक आहे.

अभ्यासपूर्ण चर्चांचे परिणाम जेव्हां जाणवायला लागतील तेव्हां बंदीची आवश्यकता नाही. वरच्या एका पोस्टमधे ते येऊन गेलेले आहे. सध्या तरी व्हॉट्स अ‍ॅप फॊर्वर्डच्या जमान्यात हे शक्य दिसत नाही.
इथे या विषयावर मी थांबतो.

इकडे कोटी कोटी चर्चा करुन अश्या मुव्हिजचे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही आणि ते कोटी कोटी खर्च करुन पुन्हा त्यापटीत कोटी कोटी कमवत राहतात. तेजस सारख्या कंगनाच्या मुव्हीज रेकॉर्ड ब्रेक गल्ला जमवू शकत नाही जेवढे ऍनिमल सारखे सहजरित्या करुन दाखवतात. समाज मनाचा आरसा बदलणे शक्य नाही म्हणून सरसकट बंदीचा पर्याय वापरत तो आरसा फोडून टाकत सुधारणा घडवायचा प्रयत्न म्हणजे अजून एक एनिमल जन्मास घालणे !!

हपा, मानव +१
बंदी अजिबात नको. एक दुजे बघून लोक मेले तर त्यांचा ती विचार होताच, हे एक निमित्त झालं. बस! आणि तारतम्य नसलेला समाज असेल तर सर सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट! सिनेमा बघून समाज बदलत नाही. इन्फ्लुअन्स होतो. तो पुस्तके वाचून ही होतो.

उगा प्रत्येक झळ आमच्या मुलाला, मुलीला म्हणणारे कशालाही विरोध करू शकतील. बहीण- भाऊ इंसेस्ट दिसलं... कर विरोध! आमचं गॉट S1,E1 लाच बोंबललं! Wink

एका तमिळ चित्रपटात राम मांसाहारी होता अस़ं दाखवल्याने सुपर सेन्सॉरने तो मागे घ्यायला लावला.

बंदी नकोच
आज एका गटाला एक आवडणार नाही, उद्या दुसऱ्या गटाला दुसरं आवडणार नाही. ज्यानी त्यानी आपली आवड जपावी, सगळे सिनेमे सगळ्यांनी बघण्यासाठी नसतात.
तसंच 'आधी पहा मग बोला' यातही तथ्य नाही. आजच्या काळात प्रोमो कंटेंट पाहून अंदाज येतो, विविध ठिकाणी परीक्षण वाचून / पाहून पहिला अंदाज तपासून पहाता येतो.

त्यामुळे जे आपल्याला रुचेल ते पहावं, नाही ते इग्नोर मारावं. हिट होतंय म्हणजे छान असेल अन् फ्लॉप होतंय म्हणजे वाईट असं ही नाही. सगळं शेवटी सापेक्ष आहे.

आपल्याला पटत नाही म्हणजे इतरांना ही पटू नये अन् आपल्याला पटलं म्हणजे इतरांनाही पटावंच हा जुलूम मात्र नसावा.

आपल्याला पटत नाही म्हणजे इतरांना ही पटू नये अन् आपल्याला पटलं म्हणजे इतरांनाही पटावंच हा जुलूम मात्र नसावा. >> जुलूम ??? काहीच्या काही. Lol
चालू द्या.

आणि तारतम्य नसलेला समाज असेल तर सर सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट! >>> सर्व्हायल ऑफ द फिटेस्ट ही अपेक्षा मान्य होण्यासारखी नाही.
बंदी असावी नसावी याबद्दल वेगवेगळी मतं असतील, पण त्यावरून टोकाला जाऊन जंगल राजचं समर्थन ?

इथे तेच होतं आणि आहे. ते उफाळून येऊ नये म्हणून जे मेजर्स घ्यावे लागतात त्यात काही अंशी बंदी समर्थनीय आहे. राजस्थानात एका चित्रपटामुळे जाट लोक जाळपोळीची भाषा करू लागले होते. आयबीच्या रिपोर्टवरून तो बंद करावा लागला. जाट आंदोलनाच्या दरम्यान त्यांना चिथावणारा चित्रपट होता. हे जर चालत असेल तर माझं काहीही म्हणणं नाही. यावर मत देण्यास मी इथे तितका सक्षम नाही.

पूर्ण पिक्चरवर बंदी घालायची गरज सहसा नसते. सेन्सॉर ठराविक सीन्सना कात्री लावू शकतात. आता पिक्चरची थीमच समाजात दंगे घडवण्याची असेल तर गोष्ट वेगळी - फिबांनी २-३ पाने आधी एक उदाहरण दिले होते बहुधा एका समाजाला टार्गेट करण्याचे. त्यावर बंदीच हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अपवाद सगळीकडेच असतात. भारतातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन पिक्चरमधे काय दाखवणे धोकादायक आहे याबद्दल गाइडलाइन्स ठरवून त्या सीन्सना बंदी करणे जास्त बरोबर वाटते.

सरकार हे करेल असे नाही पण विविध सामाजिक गटातील व विविध मते असलेल्या लोकांनी एकत्र येउन अशा गाइडलाइन्स ठरवल्या, की मग त्या सब्जेक्टिव्ह होत नाहीत.

माबोवर याआधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या चर्चा "सादरीकरणातून होणारे लोकांचे/ऐतिहासिक महापुरूषांचे/धार्मिक श्रद्धास्थानांचे अपमान" या कॅटेगरीतील होत्या आणि तेथे अशा बंदीला विरोधच राहील.

फारएण्ड, अपमान,अस्मिता मधून बंदी हा पूर्ण वेगळा विषय आहे.

अखलाखची हत्या झाली ती स्थानिक चॅनेल वर चालवलेल्या बातम्यांमुळे. त्याने गोमांस खाल्ल्याच्या बातम्या त्या स्थानिक चॅनेलवर दिल्या होत्या. त्यानंतर टिव्ही चॅनेल्स ने सुद्धा बातम्या दिल्या. हत्या झाल्यानंतर पण हत्या झाली याबद्द्ल वाईट वाटलेच नाही. गोमांस होते कि नाही हे फ्रीज उघडून पाहिले गेले.

भांडूपला दंगे झाले तेव्हां मी तिथे होतो. स्थानिक चॅनेलवर लहान मुलाची जीभ आणि कान कापल्याच्या बातम्या सांगितल्या जात होत्या. मामाने आम्हाला रात्रीत पोलिसांच्या गाडीत बसवून पुण्याला पाठवले होते आणि थोड्याच वेळात दंगे झाले.

हे लोक सिनेमे बनवताना कसे बनवतील यावर नियंत्रण नको का ?
सीन कापून प्रश्न सुटत असेल तर हरकत नाही. ती ही सेन्सॉरशिपच आहे.

जर सेन्सॉर बोर्ड आहे आणि ते निर्णय घ्यायला अ‍ॅथॉरिटी असेल तर या गटाने मागणी केली म्हणून त्या गटाला पण खूष करा असे व्हायला नाही पाहिजे. सहसा होतही नाही. सिनेमा, सीन चा उद्देश, त्याचे परिणाम पाहून सेन्सॉर बोर्ड निकाल देईल. तो पटला नाही तर सरकार आहे, त्यावर कोर्ट आहे.

विनाकारण बंदी फक्त राजकारण म्हणून होऊ शकते ज्याचा यात विचार केलेला नाही. ते तर कशातही होत असते. म्हणून घातक परिणाम रोखूच नये हे म्हणणे पटण्यासारखे नाही.

एका तमिळ चित्रपटात राम मांसाहारी होता अस़ं दाखवल्याने सुपर सेन्सॉरने तो मागे घ्यायला लावला.
नवीन Submitted by भरत. on 11 January, 2024 - 2

तसं नाहीये ते. त्या चित्रपटात तामिळ ब्राम्हण नायिका आहे जी aspiring chef आहे. ती बिर्याणी बनवण्याआधी पूर्ण मुस्लिम कपडे, हिजाब वगैरे घालून नमाज अदा करते असा सीन होता. कारण एका मुस्लिम बाईने तिला सांगितलेलं असतं की असं केलं तरच बिर्याणी चांगली बनते. मायबोलीवर अनेक बायका आणि काही पुरुष नियमितपणे बिर्याणी बनवत असतील. त्या माऊल्या काळा बुरखा घालून नमाज पढतात का आधी? तरच बिर्याणी चांगली होते का? त्या सीनबद्दल लोकांनी बोलायला सुरुवात केली आणि कोणितरी fir केला तेव्हा नेटफलिक्सने चित्रपट तात्पुरता हटवला आहे. रिव्ह्यू करण्यासाठी.

हास्यास्पद मुद्दे आणणार्‍यांकडे दुर्लक्ष करावं. असे लोक सगळ्या चर्चांचा चोथा करतात.
भावना दुखावल्या म्हणून बंदीची मागणी हा विषय बाजूला ठेवूयात. अखलाखची ह त्या हे एक उदाहरण आहे. बाळासाहेबांच्या भाषणाने दंगली झाल्या हे आयोग सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने दृक श्राव्य माध्यम प्रभावी असल्याने सेन्सॉरशिप असावे असे म्हटलेले आहे. हे पटते.

मुलीबाळींची सुरक्षितता, छोटे समूह यांची सुरक्षितता धोक्यात येत असेल तर बंदी,सेन्सॉरशिप असावी कि नसावी यावर नेमके बोलूयात.

मुलीबाळींची सुरक्षितता, छोटे समूह यांची सुरक्षितता धोक्यात येत असेल तर बंदी,सेन्सॉरशिप असावी कि नसावी यावर नेमके बोलूयात. >>> हो असावी. वरती तेच म्हणत होतो.

फारएण्ड, अपमान,अस्मिता मधून बंदी हा पूर्ण वेगळा विषय आहे. >>> हो. त्याचा उल्लेख केला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सिलेक्टिव्ह नाही हे सांगायला.

हो. सेंसॉरशिप असावी, आणि सेंसॉर जे सांगेल ते करावे. त्यात अपिलची सोय असावी.
ते सोडून बाकी कोणालाही बंदीचा अधिकार नसावा. न्यायालय जर सेंसॉरच्या वर असेल तर ते असेलच. बाकी कुणाला ढवळाढवळ करू देऊ नये.

Pages