श्रावण आणि पुरण!

Submitted by सांज on 10 August, 2021 - 00:31

श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात ‘पुरणाचा स्वयंपाक!’ आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र ‘पुरणाचा स्वयंपाक’ अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ.

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा... ++
उगीच काय प्रत्येक प्रथेचं उदत्तीकरण करायचं......!!
सगळे खायचे चोचले.....!! तेही एकवेळ परवडेल..पण त्यात पुन्हा सोवळं ओवळं, नियम, बाकी सगळे पदार्थ-तळण, कढी आमटी........ ही काय जबरदस्ती!!
हरभरा डाळीच्या पुरणात मला नाही वाटत फार न्यूट्रियंट असतात! एकतर पावसाळी हवेत आधीच पचन शक्ती मंदावलेली, त्यात हरभर्‍याचे वातूळ पदार्थ खाऊन अजूनच पोटाचे प्रॉब्लेम्स होतात खरे तर! आणि गोड सुद्धा वाईटच तब्येतीला......!!
आपली जुनी प्रत्येकच गोष्ट अगदी भारी होती असे काही नाही....! Uhoh

Submitted by सस्मित on 12 August, 2021 - 10:55

>>>>> १०० % अनुमोदन , ते वड्या सोडून Wink

कुठचं कुठं-कुठं घेऊन गेले लोक्स Lol

अनुच्या सगळ्याच पोस्टी पटल्या.
हे 'ज्यांना आवडतं त्यांनी करा' वर रहात नाही. आपल्या परंपरा किती ग्रेट आणि सुंदर. त्यामागे निसर्गाचा, ऋतुंचा कित्ती कित्ती विचार झाला आहे, त्या पाळल्या तर आहार विहार कसा छान रहातो! बापरे! हा सरळ सरळ सापळा आहे. प्लीज ह्या सगळ्याला स्युडो सायन्सचा वळसा देऊ नका. हा रॅशनलतेकडे झुकणार्‍या व्यक्तींच्या मार्गातील अडथळा बनतो. मनाच्या ठाम नसलेल्या ९९% व्यक्तींपैकी ज्या बदलू इच्छितांत त्यांना या अशा प्रथांत कसं शास्त्र (अ‍ॅज इन विज्ञानवालं शास्त्र) दडलेलं आहे असले भाकड दाखले ऐकवुन मागे खेचलं जातं. लोक पुराणातील विज्ञानावर पुस्तकं लिहुन त्याची विक्री करतात. ही परंपरा आहे आणि ती पाळली पाहिजे हे वाचण कितीतरी बरं! यात विज्ञानाला आणू नका ही कळकळीची विनंती.

पुरण हा नवं मॅजिक फुड बनलंय का? मग बाहेरुन आणलेल्या पुपोतही तेच मॅजिक असेल ना? आणि एकाच दिवशी वर वर्णन केलेला स्वयंपाक खाल्ला तर त्यांच्यातील पोषणमूल्यांची ही भली मोठी भेळ बनेल, आणि पोटाचं काय होईल? हे असं अचानक श्रावणात शुक्रवारी त्यातील फक्त पोषणमूल्ये बघुन सोवळ्याने, सकाळपासून खपुन घरातील स्त्रीयांनीच (बाहेरचं नाही, आधी दोन दिवस करुन ठेवलेलं ही नाही) करायला परंपरेने ठरवलं कारण फक्त पोषणमूल्ये? अजब आहे.

बाकी पुपो खायला आणि अगदी पुरण वाटून मागचं आवराआवरी पर्यंत करायला ही आवडते. ती आनंद भरपूर देते. पण श्रावणात पोषणमूल्ये देते हे जरा जास्त झालं. पुपो करताना त्यातील एका उंड्यांत भरतात ते पुरण नुसतं खा. आणि मग किती गोड खाल्लं याचा गिल्ट येतो ते पहा. त्यातील फक्त फोलेट आणि आयर्न आणि फॉस्फरस दिसत असेल तर मग फरसाण पण हेल्थ फुड ठरेल.
अगेन भाज्या, कोशिंबीरी चांगल्या यात काही वाद नाहीच. पण ते रोजच करतो आणि खातो. सणाला तळण आणि गोड .. धाग्याचं शीर्षक श्रावण आणि खमंग काकडी नाही ना?
केक-पिझ्झा आणि सोवळ्याच्या स्वयंपाकाची तुलना एकदम स्टॉमन. त्यावर काही बोलण्यासारखं नाही.

>>>>>एकाच दिवशी वर वर्णन केलेला स्वयंपाक खाल्ला
हाहाहा हा मुद्दा लक्षातच आला नव्हता.

अमितव, +११११
संपूर्ण प्रतिसाद आवडला.
ज्यांना जमतंय, आवडतंय त्यांनी अगदी साग्रसंगीत करावं सगळं. नसेल जमत तर तसं जाहीर करून त्यातून बाजूला व्हावं हाच उपाय दिसतोय. अर्थात पीयर प्रेशर, देवाच्या अवकृपेची धास्ती/ भीती, मोठ्यांचा अनादर वगैरे सगळं tactfully पार करावं लागणार हे आलंच.

मी अनु, सगळ्याच पोस्ट्स पटल्या.
>> पुरणातून प्रचंड प्रमाणात फायबर, फोलेट, विट ए, बी, डी.. इ.इ. मिळतं.. पुरणपोळी ही सगळ्या स्वीट्समध्ये सर्वात अधिक पोषक मनाली जाते.>> ही नवीनच माहिती कळतेय. आपला कोणताही (मिट्ट) गोड पदार्थ पोषक असू शकत नाही. पूर्वीची लाईफस्टाईल वेगळी होती आणि गोड पदार्थ घरातही कधीही केले जात नसत तेव्हा वर्षातून एखाद दोन वेळा प्रमाणात काहीही खाणं तेव्हाही आणि आजही वाईट नाही.
>> पिझ्झा, केक आरोग्यासाठी उपकारक असतात असं कोणी कधी म्हटल्याचं ऐकिवात नाही!>> आठवड्यातून एकदोन वेळा हे कितीही क्वांटिटीमध्ये खाणं होत असेल तर योग्य नाहीच पण दोनेक आठवड्यातून एकदा एखाद स्लाईस खात असाल तर अपायकारक नाही माझ्यामते.
अमितशी सहमत.

नवीनच माहिती??
फॅक्ट्स, फॅक्ट्स असतात!

असो, आता हे सगळं विरोधासाठी विरोध कॅटेगरीकडे जात आहे अशी शंका येतेय!

सांज तुम्ही उचकला नाहीत शांतपणे व धीराने, मुद्दे समजावुन घेतलेत, समजावलेत याचे कौतुक आहे. आपल्यावरती वैयक्तिक आकस माझा १००% नाही. इन फॅक्ट छान संयम व धीर दाखवलायत तुम्ही या धाग्यावरती. असो. राहावले नाही म्हणुन सांगीतले.

>>> नवीनच माहिती??
>>> फॅक्ट्स, फॅक्ट्स असतात!

या फॅक्ट्सच्या पुष्ट्यर्थ काही सायंटिफिक माहिती देऊ शकाल का?

आवड असेल तरच करा, जमत असेल तरच करा हा सूर हळूहळू पुरणपोळी सर्वात न्यूट्रिशियस स्वीट "मानली गेली आहे"पर्यंत कसा आला? कोणी मानली आणि कशावरून?
आवड असेल तर खा महिन्यातून दहा वेळा, पण नीट माहितीशिवाय निदान न्यूट्रिशनबद्दल दावे नाही केले तर नाही चालणार का?

खरंतर सांज यांचे आभार मला निराळ्याच कारणासाठी मानावेसे वाटत आहेत. ज्या कारणांसाठी अशा लेखांना विरोध करावासा वाटतो ती कारणं त्यांनी स्वतःच त्यांच्या सगळ्या प्रतिसादांतून ठळक केली आहेत.

या विषयावर उपरोधिक आणि विनोदी लिहिता येणं हीसुद्धा एक पायरी आहे, ती ओलांडल्याबद्दल तुमचं अभिनंदन. >>> +१०० लेख वाचला तेव्हा तो उपरोध पोहोचला. त्यातही पहिली दोन वाक्ये वाचली आणि नेहमी या काळात पेपर्स मधे श्रावण व स्त्रियांबद्दल जे पारंपारिक स्टाइलने वर्षानुवर्षे लिहून येत आहे ("स्त्रियांना हा काळ म्हणजे आनंदाची पर्वणीच" वगैरे) त्यापेक्षा काहीतरी वेगळे वाचत आहोत हे लक्षात आले.

धागा वादावर गेलाच आहे तर माझीही दोन पॉलिटिकली इन्करेक्ट निरीक्षणे Happy
- आपल्याकडच्या बहुतांश नॉस्टॅल्जिक आठवणी, किंवा "आमच्याघरी आलेला माणूस जेवल्याशिवाय परत जात नाही" छाप विधाने ही घरच्या स्त्रियांनी सगळे करण्याच्या जोरावर केलेली असतात. अशा घरांमधे त्या पाहुण्याची खातिरदारी पुरूष करत आहेत असे क्वचितच दिसते. किंबहुना आदरातिथ्याच्या वल्गना आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल त्या घरातील आधुनिकता याचे प्रमाण व्यस्त असते.
- सणवार पाळण्याबाबत महाराष्ट्राच्या पश्चिम भागात (त्यातही कोकण, पुणे, मुंबई भागात) सुटसुटीत पणे व अनेक जुन्या प्रथा सहज बदलत, सोप्या करत गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदल होत आहेत. पण जितके तेथून पूर्वेला जाउ तितके अजूनही मोठा स्वयंपाक, त्यात बदल करायची तयारी नसणे, खाण्यापिण्याचे आग्रह, त्यात मुख्यतः स्त्रियांचा सहभाग असणे हे प्रकार अजूनही जास्त आहेत.

हे अ‍ॅनेक्डोटल आहे. चुकीची असतील तर ही मते बदलायला मला काहीही अडचण नाही.

मला सणवार, या प्रथा प्रचंड आवडतात. पण त्याला लागणारी सगळी कामे घरातील सर्वांनी करून मग कितीही प्रमाणात साजरे करायला हरकत नाही.

काहींना हे मनापासून करायला आवडते - इतर अनेक कौशल्यांसारखे स्वयंपाक हे ही एक कौशल्य आहे. हाताला चव असणे, या कामाचा एक उरक असणे जे म्हणतात, प्रचंड मल्टिटास्किंग, सिक्वेंसिंग हे उपजत असल्यासारखे आपोआप जमणे हे असलेल्या स्त्रिया पाहिलेल्या आहेत. असे कौशल्य असले की त्याची आवडही अनेकदा साहजिकपणे येते. अनेक स्त्रिया दैनंदिन स्वयंपाकातही हे करतात. इव्हन काही पुरूषांनाही हे करताना पाहिले आहे. एक काश्मिरी मित्र जबरी झपाट्याने हे करतो. डिश आपल्यापुढे धरून आपण खायला सुरूवात करेपर्यंत त्या स्वयंपाकाचे नामोनिशाण तेथे राहिलेले नसते - सगळ्या गोष्टी जागेवर, सगळा कचरा साफ. अशा लोकांना बहुधा याचा कंटाळा येत नसावा. तरी सकाळपासून दुपारी ३ पर्यंत त्यांची हेच करत राहावे का हा प्रश्न राहतोच.

>>> सणवार पाळण्याबाबत महाराष्ट्राच्या पश्चिम भागात (त्यातही कोकण, पुणे, मुंबई भागात) सुटसुटीत पणे व अनेक जुन्या प्रथा सहज बदलत, सोप्या करत गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदल होत आहेत. पण जितके तेथून पूर्वेला जाउ तितके

असं नाही, कोकणस्थ व्हर्सेस देशस्थ म्हणायचं. Proud

हो ते ही म्हणता येइल Wink पण त्यातही पुण्यामुंबईतील देशस्थ व इतर ठिकाणचे यात बराच फरक पडलेला असावा Happy

सांज, विरोधाकरता विरोध नाही पण माझ्याकरता ही माहिती नवीन आहे खरंच. वर म्हटल्याप्रमाणे आपल्याकडचा कोणताही गोड पदार्थ पौष्टिक आहे ह्यावर माझा विश्वास नाही.

विरोधासाठी विरोध असं का म्हणता. मी तर पुरणपोळीच्या त्या १६ पदार्थांच्या थाळीलाही वाईट म्हणणार नाही. तसंच कुणी तरी वर म्हटलेय त्या परदेशातल्या गेट टुगेदर अन मोठ्या पार्ट्यांनाही. खाणे, खिलवणे हा हौशीचा भाग झाला. पण वाईट काय असेल तर सोवळ्यात करावे लागते या नावाखाली एकट्या दुकट्या बाईने ते सग्गळे खपून करणे. हा त्या सोवळ्यातल्या पुरणात आणि सर्व घराने एकत्र काम करून होस्ट केलेल्या पार्ट्यांमधला फरक आहे.
बाकी अमित च्या पोस्ट ला अन न्यूट्रिशन / विज्ञानाला यात ओढू नका याला +१११!

ज्या शहरी सुशिक्षित स्त्रियांना हे सक्तीने, भीतीमुळे किंवा दडपणाखाली करावं लागतंय, त्यांना मी सांत्वनपर असं एकच सांगू शकेन की बायांनो तुम्ही एकट्या नाही आहात. महाराष्ट्रात, देशात कोट्यवधी म्हणजे बहुसंख्य स्त्रिया ह्या घरीच असतात. शेतीची, रोजमजुरीची काबाडकष्टी कामे केली तरी त्या चार भिंतीच्या आतलं नि:शब्द आयुष्यच जगतात. तेव्हा सध्या जरी तुम्ही तुमची मते मांडू शकत नसलात तरी जेव्हा केव्हा तुमच्या हातात सत्ता येईल तेव्हा हा वारसा पुढे नेऊ नका. देवधर्म कुलाचार न पाळणारीच्या सामूहिक टिंगल टवाळीत सामील होऊ नका. तुम्हीच एक उदाहरण बना. हळू हळू हजारों लाखों स्त्रियांपर्यंत हे लोण पोचेलच आणि सुरुवातीच्या आघाडीवर तुम्ही असाल.
हा भाबडेपणा किंवा स्वप्नाळू काव्यमय आशावाद नाही. किंवा तुम्हीच दीप व्हा असे शब्दबंबाळ प्रवचनही नाही.. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात फिरताना स्त्रियांच्या ह्या निम्म्या लोकसंख्येकडे बघून जीव तुटतो. धैर्य, जागृती इथे कधी दिसेल असे वाटते. त्या क्षणांची स्वगते इथे प्रगट केली आहेत.

तेव्हा सध्या जरी तुम्ही तुमची मते मांडू शकत नसलात तरी जेव्हा केव्हा तुमच्या हातात सत्ता येईल तेव्हा हा वारसा पुढे नेऊ नका. >>> +१ हीरा , हे वाक्य जरा खूप समाजशास्त्रीय अभ्यास केल्याच्या थाटात वाटेल पण एकूणच अन्याय सहन करून वर आलेल्या, हातात सत्ता आलेल्या वर्गाचे "affiliation" हे अन्याय करणार्‍या लोकांकडे जाते व अजूनही ते अन्याय सहन करत असलेल्या वर्गाबद्दल त्यांना सहानुभूती राहात नाही. असेच सहसा दिसते. शाळेत असताना रेल्वेच्या डब्याच्या आतले व आत शिरू पाहणारे यांच्याबद्दल एक धडा होता. तो आठवतो. आत शिरू पाहणार्‍याला आतील लोकांचा विरोध होतो. तो ही त्यातून कसाबसा आत शिरला की तो "आतला" होतो - असे काहीतरी होते.

हीरा , अगदी छान आशावाद व्यक्त केलात.
किंबहुना तुम्हाला खरी परिस्थिती आणि त्या स्त्रियांचं आयुष्य माहिती असल्याने अधिक समर्पक! अन्यथा.. 'पटत नसेल तर नका करू'..म्हणणे अगदीच सोपे आहे!

घरातील मूर्तीत देवत्व येणार असेल तेव्हा बाजूला बसणे, कुणाला स्पर्ष न करणे हे शहरात 'आई' लोकांच्या पिढीने मोडले. पण तीच आई पिढी आजच्या सुनेला पिरिएड्स असतील तर गोळ्या घ्यायला कदाचित नाही सांगणार, पण नैवेद्याचा स्वयंपाक करू नको सांगते. सकाळी किती घाईत पोरांचा डबा करुन एकीकडे नैवेद्याचा स्वयंपाक करायचा असला तरी आंघोळ करुन स्वयंपाक करायला लावते. तसं नाही केलं तर तेव्हा काही न बोलता नंतर पॅसिव्ह अग्रेसिव्हली टोमणा मारते हे प्रत्यक्ष बघितले आहे. परत पुरुषांनी पारोसं नारळ खरवडुन दिलेला चालतो, किती मदत करतोय हो असा कौतुक-कम-टोमणा वर असतोच.
थोडक्यात >>हातात सत्ता येईल तेव्हा हा वारसा पुढे नेऊ नका.>> हे दुर्दैवाने होतच नाही.

बाई आवडीने करत असेल तर तुमचा का विरोध असे प्रश्न विचारणार्‍यांसाठी - वर्षातून एखादे वेळी बाई आवडीने करत असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारायची वेळ येत नाही. कौटुंबिक सुखासाठी असे क्षण निर्माण करणे गरजेचेच असते हे मान्य आहे. पण जेव्हा समूहाने महिनो महिने अशा प्रकारे वेळ घालवला जातो, अन्न खर्ची होते तेव्हा खरंच विचारायची वेळ येते की ही आवड आली कुठून?

आज ही करोनामुळे घडलेल्या सामाजिक उलथा-पालथीतून लोकं बाहेर पडले नाहीत. चार पोळ्या चार दिवस गरीबाला लाटून देणे, किंवा संसाराला हातभार लागेल असे केटरिंग इ व्यवसाय करणे किंवा जिम मध्ये नियमित जाणे इ (ही केवळ उदाहरणे झाली - हेच करा नि तेच करा आग्रह नाही.) तत्सम इतर सामाजिक, आर्थिक, शारिरीक इ "सेव्हन डोमेन्स ऑफ वेल-बिईंग" सांभाळले जाईल अशी कार्ये सोडून बायकांना चारी ठाव पुरणाचा सैपाक करावा वाटतो .... विचार करायची वेळ आहे.

(सास-बहू सिरीयल सुरू झाली तेव्हा गुजरातेत कुठे भूकंप झाला, हजारो लोकं मेली, बेघर झाली. बायांच्या डोळ्यात टिपूस नाही पण मिहीर विरानी मेला तर चॅनलला पत्रावर पत्र, घराघरात गंगा... मिस्प्लेजड प्रायॉरिटीज आहेत का हा प्रश्न विचारावासा वाटणारच!! "आम्हाला असंच जगायचं" हे उत्तर दिले तरी आदरच आहे, माझा विरोध कशालाच नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छिते.)

सांज, दिवेकर बाईंनी एकंदरीतच भारतीय मिठाया चांगल्या टाइपचे विधान केले आहे. ही टाळ्या घेणारी वाक्ये असतात.
त्यांचं पुस्तक वाचलं की मग त्यात महिन्यातून एकदा अमुक वेळेला एक गुलाब जाम किंवा चतकोर पुरण पोळी खाऊ शकता, पण मग (त्या अतिरिक्त कॅलरीज काढण्यास) अमुक तमुक करावं वगैरे लिहिलं असतं.
त्या लेखात चना डाळीत व्हिटॅमिन डी असतं असं चुकीचं लिहिलंय असे मला वाटते. तसेच व्हिटॅमिन A खास उल्लेख न करण्या इतक्या प्रमाणात असावे.

गुळ रिफाईंड साखरेच्या तुलनेत चांगला, त्यात आयर्न आणि इतर काही मिनरल्स थोड्या प्रमाणात असतात जी रिफाईंड साखरेत नसतात. पण त्यात शुगर भरपूर असतेच.

पण जेव्हा समूहाने महिनो महिने अशा प्रकारे वेळ घालवला जातो, अन्न खर्ची होते तेव्हा खरंच विचारायची वेळ येते की ही आवड आली कुठून?
>>>

बहुतांश बायकांना नटायचीही आवड जास्त असते. छानछान फॅशनेबल कपडे घालायची आणि दागदागिने घालायची आणि या सर्वांची खरेदी करायचीही आवड जास्त असते.
तेव्हाही हाच प्रश्न पडायला हवा हि आवड कुठून आली.. आणि तो प्रश्न पडल्यावर त्याचे उत्तर काय असेल?

अमितव + १
फार एणड, सहमत. विशेषत: आम्ही मुंबईकर मुंबईत येणाऱ्या
लोंढयामुळे मुंबईत बजबजपुरी माजली आहे असे तावातावाने बोलतो तेव्हा आम्ही खूप आधी येऊन सोयीसुविधा मिळवून बसलो आहोत आणि आता त्यात आम्हांला कोणी वाटेकरी नको आहेत असेच कथन करीत असतो.

तेव्हाही हाच प्रश्न पडायला हवा हि आवड कुठून आली.. आणि तो प्रश्न पडल्यावर त्याचे उत्तर काय असेल? >> त्यावर धागा काढला कुणी तर उत्तर देईन तिथे Wink Happy

वृत्तपत्रांतला चमकदार मजकूर तुम्ही न्यूट्रीशन फॅक्ट्स म्हणून वाचत असाल आणि त्याउप्पर 'good source of fiber...'चं भाषांतर मनोमन 'प्रचंड प्रमाणात फायबर इ.' असं करत असाल तर मग मी या चर्चेतून पोषणाचा चॅप्टर माझ्यापुरता ऑप्शनला टाकते.

Pages