लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.loksatta.com/desh-videsh/who-chief-tedros-ghebreyesus-advise...

टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार “मे महिन्यात मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्यापासून समोर आलेल्या प्रकरणांपैकी ९८ टक्के प्रकरणांमध्ये समलिंगी, उभयलिंगी आणि पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचा समावेश आहे”.

हे वाचताना गोंधळायला झालं.
एकदा समलिंगी म्हटल्यानंतर पुन्हा शेवटचे पालूपद कशासाठी आहे ?

आज अनेक वृत्तपत्रात ही बातमी आली आहे:

आयसीएमआरने (ICMR) स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे की, 'भारतात प्रथमच राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (NIV) मंकीपॉक्स विषाणूला नमुन्यांमधून वेगळं केलं आहे.

यातील "विषाणूला वेगळं केलं आहे" हे निर्बुद्ध भाषांतर झालेले आहे. Happy
योग्य वैज्ञानिक वाक्यरचना अशी हवी:

" रुग्णाच्या नमुन्यांमधून विषाणूला शोधून त्याला प्रयोगशाळेत वाढवण्यात यश आलेले आहे. (कल्चर).

इंग्रजी बातमीतही तसंच म्हटलं आहे
The WHO director general, Tedros Adhanom Ghebreyesus, said 98% of the monkeypox cases detected since the outbreaks emerged in May had been among gay, bisexual and other men who have sex with men.
https://www.theguardian.com/world/2022/jul/27/monkeypox-who-chief-advise...

मी WHO director general यांचं तसं विधान शोधायचा प्रयत्न केला. यात तरी तसं काही ऐकू आलं नाही
https://twitter.com/DrTedros/status/1552382934300200960

....... स्पष्टच बोलले
अलीकडे अनेक वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्तींमध्ये (गेल्या अनेक दिवसांत छापिल आवृत्ती वाचलीच नाही) वरील शीर्षकाच्या बातम्या असतात.
स्पष्ट बोलण्याचा बातमीशी काय संबंध?

आजच्या लोकसत्ता मुंबई वृत्तांतात - केळींची आवक घटली , केळींच्या दरात वाढ.

सामान्यरूप बादच करून टाका.
कुकरी शोमध्ये साखरचा पाक ऐकलंय.

माझी मुलगी पण असंच बोलते
आम्ही इतके, आणि इतकं मराठी बोलणारे मेम्बर घरात असून.मला रोज नव्याने मोठ्याने ओरडून 'अरे धातुसाधित ही कल्पना तुमच्या पिढीने भंगारात विकली का' असं ओरडावं वाटतं.जमेल तेव्हा उच्चार बरोबर करते.

गोवा में चं शब्दशः मराठी गोवात (गोव्यात)
हे आजच्या लोकसत्ता मध्ये होतं. बातमीसुद्धा वाचावीशी वाटली नाही.

छान, व्हिडिओ भारी आहे!
ह ह पु वा Happy

आपल्या सर्वांच्या सहभागातूनच धाग्याची वाटचाल चालू आहे...

"हे मोठे फायदे ऐकूण तुम्ही लिंबूचे साल फेकून देणं बंद कराल....
लिंबू हा घराघरात नक्कीच आढळतो. काही दिवसांपूर्वी वाढलेल्या किंमतीमुळे लिंबूवरुन..."

https://zeenews.india.com/marathi/health/you-will-stop-throwing-away-lem...
>>
लिंबू पुल्लिंगी कधीपासून झाले ?

वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांवर कुठून तरी उचलून चिकटवलेलं लेखन असतं त्यात सगळेच पुल्लिंगी असतात.
अभिनेत्रीसुद्धा

ऋण, धाबे( दणाणते ते)
आणि लिंबूचे, अळूचे. लिंबाचे किंवा अळवाचे नाही. सामान्य रूप बाद.

अचानक आलाय तर अचानक आलाय हे न समजता शतपावली करायला आलाय असं समजावं का Lol
बिबट्या घराची बेल दाबून जात नाही तर काय आधी फोन करून कळवतो की काय, भन्नाट आहे हे Lol

बाथरूम मध्ये पडून बरे वाईट होऊन स्मशानात फुकट जळण्यापेक्षा बिबट्याचे अन्न बनलेले काय वाईट असा संदेश द्यायचा आहे लेखकाला.

२७ जुलै २०२२ रोजी वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात प्रत्येकी ५० षटकांचा सामना खेळला गेला.
भारत पहिला डाव खेळत असताना वारंवार पावसाचा व्यत्यय येत होता. अखेर या डावात भारताला ३६ षटकेच फलंदाजी करता आली.

षटके कमी केल्यामुळे दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या वेस्ट इंडिजसाठी डकवर्थ-लुईस नियमानुसार २५८ धावांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. पण वेस्ट इंडिजचा डाव जेमतेम २६ षटकांत १३६ धावांतच संपुष्टात आला.
हा भारताचा दणदणीत विजय होता परंतु लोकसत्ताने कसे दिशाभूल करणारे शीर्षक दिले होते :

."..डकवर्थ-लुईस नियमाने केला यजमानांचा घात"

या शीर्षकाचा खरपूस समाचार घेणारा आणि सुंदर विश्लेषण करणारा लेख इथे:
https://www.aksharnama.com/client/article_detail/6327

लोकसत्तेला चटपटीत, श्लेष आणि अनुप्रास साधलेली शीर्षके द्यायची चटक लागली आहे.
गेल्या आठवड्यात छापील पेपरात द्या दोन ढळढळीत चुका.
मुंबईतला एक उड्डाणपूल नव्याने बांधला जाणार आहे. बातमी तील चौकटीत त्या पुलाची वैशिष्ट्ये दिली , त्यात दुसऱ्या एका बातमीचे शीर्षकही दिले.
img_1_1663950861626.jpg (265.39 KB)

एके दिवशी मुख्य पेपरात आलेली एक बातमी दुसऱ्या दिवशी जशीच्या तशी मुंबई वृत्तान्तात.

लोकसत्ताने आज फोटो ओळ चुकीने हेडिंग म्हणून छापलीय

परतीचा फटका मारताना भारताचा आर्यन शहा

हे चार कॉलम बातमीचे हेडिंग कसं असू शकेल अशी शंका एकालाही आली नसेल?

बाथरूम मध्ये पडून बरे वाईट होऊन स्मशानात फुकट जळण्यापेक्षा बिबट्याचे अन्न बनलेले काय वाईट असा संदेश द्यायचा आहे लेखकाला>>>>

लेखकाशी सहमत.

ताटात अन्न टाकु नये चळवळीच्या पुरस्कर्त्यांनी तरी हा विषय गांभिर्याने घ्यावा आणि कोणाचेतरी अन्न असे सजवुन, खांद्यावरुन मिरवत नेऊन जाळुन न टाकता योग्य त्या जागी अन्नदान करावे. Happy

किती ती फेकाफेकी !!
याचा एक नमुना :
https://pudhari.news/features/334496/coconut-water-does-not-work-for-eve...

लो ब्‍लड प्रेळशच्‍या रुग्‍णांनी घ्‍यावी काळजी

उपाशी पोटी नारळ पाणी पिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब कमी होण्‍यास मदत होते. त्‍यामुळे ज्‍यांना लो ब्‍लड प्रेशरचा त्रास आहे त्‍यांना डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानेच नारळ पाण्‍याचे सेवन करावे, कारण कमी झालेला रक्‍तदाबही आरोग्‍य हानीकारक ठरतो.

???????

प्रेळश!‌‌ Happy

बाकी एकीकडे अमुक तमुक याचे फायदे म्हणून अमुक तमुक करा आणि दुसरी कडे यामुळे असे नुकसान होते हे करू नका तज्ज्ञांचा सल्ला घ्या याचा भडिमार सुरू असतो.
सकाळी मिसळ, दुपारी पिझा आणि संध्याकाळी दोन वडापाव खाऊन चौपाटीवर जाता जाता लोक मध्ये तज्ज्ञांकडे जाऊन मी आता चौपाटीवर जात आहे तर तिथे नारळ पाणी प्याले तर चालेल का असे विचारायला गेले तर आश्चर्य वाटू नये.

हे पहा .....
झोपेतून उठवणार का उचलून नेणार ??
https://www.maharashtranama.com/business-tourism/irctc-railway-ticket-bo...

"या सुविधेचा फायदा कोणी घेऊ शकतो. यामध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी वीस मिनिटे आधी तुम्हाला उचलून नेण्यात येणार आहे. यासाठी फक्त तीन रुपये मोजावे लागतील"

(ते फोन करून वीस मिनिट आधी आपल्याला झोपेतून उठवणार आहेत !)
Happy Happy

Lol
सगळाच मजकूर भयाण आहे.
गुगल ट्रान्सलेट आणि ऑटो फीड असावं.

ऑटो फीड म्हणजे?
>>> हे असले की बघण्यासाठी माणूस लागतच नाही का ?

Pages