लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

01443999-7580-4C73-9467-86FBB36DB10E.jpeg

पहिल्या पानावर !

ह पा
यावर मागच्या पानांवर चर्चा झाली आहे त्यातला सारांश असा:

अशा घोडचुकांबद्दल ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. तिथल्या सुनावणीत वृत्तपत्राकडून झालेली चूक ही चूकच आहे की हलगर्जीपणा हे पहातात. त्या बरोबरच त्या चुकीमुळे अथवा हलगर्जीपणामुळे कोणाचे/कितीजणांचे काय आणि किती नुकसान झाले यानुसार ग्राहक न्यायालयात न्याय/समाधान/नुकसानभरपाई मिळणे हे अवलंबून असते.

कुमार, क्षमस्व, मीच तो प्रश्न पुन्हा विचारला. फक्त ह्या वेळी मी 'संभाव्यता' ह्या अर्थाने विचारत होतो. म्हणजे 'कुणी कारवाई करेल का, तुम्हाला काय वाटतं' अश्या अर्थाने.

मयुरी कानगो गूगलची इंडिया इंडस्ट्री हेड आहे.
'माझा' दिवाळी अंकात तिचा 'बॉलिवूड ते गूगल' नावाचा लेख आलाय. मी अजून वाचला नाही सगळा.
उद्योगद्वेषाची कमान? Lol
@विकु हा कुठला पेपर म्हणे?

उद्योगद्वेषाची कमान >>> Hatred of the industry curve असं आलं, मी उलट गुगलले. Lol

योग्य भाषा वापरण्याबाबत असलेली उदासीनता/आग्रहाचा, भाषेवरील प्रेमाचा अभाव/ पुढे जाण्याची अहमहमिका/ मराठी शाळांचा र्‍हास ही व अशी अनेक कारणे ह्या सर्व दुःखांचे मूळ आहे. (मी काही करत नाही यासाठी पण ) अवनती बघून फार वाईट वाटतं कधीकधी !!

सामना:
Screenshot_20211126-170056_Dailyhunt.jpg

अजून एक घोळदार बातमी :
https://jalgaonlive.news/work-from-home-to-earn-subsidized-lpg/

दहा लाखांच्या वर उत्पन्न असल्यास एलपीजीचे अनुदान आहे की नाही ? काही पत्ताच लागत नाही.

https://www.loksatta.com/mumbai/rajesh-tope-first-reaction-after-first-c...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “जनतेने घाबरून जाण्याचं शून्य टक्के देखील कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेत मृत्यू दर नाही. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचंही प्रमाण नाही,”

….असं असलं तरी घाबरण्याचं शून्य टक्के कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेचा पूर्ण अभ्यास केला तरी तिथंही मृत्यू दर नाही
..........

…. या सगळ्याकडे आपण शून्य टक्के दुर्लक्ष करावे काय ? Happy
जाम सुधरेना भाषा ही.

डॉक्टर, इथे मात्र त्यांनी राजेश टोपे ह्यांचीच वाक्यं उद्धृत केली आहेत. आता राजेश टोपेच तसे बोलले असतील, तर पत्रकार काय करणार? त्यातल्या त्यात असंदिग्धता टाळण्यासाठी त्यांना नक्की काय म्हणायचं होतं हे बातमीत सांगायला पाहिजे होतं, इतकंच मी म्हणेन. पण त्यांचे शब्द वेगळे असतील आणि बातमीदाराने विपर्यास केला असेल, तर मात्र निषेध.

अन्य भाषेतले शब्द मराठीत आले व त्यांनी मराठी समृद्ध केली तर चांगलेच आहे. पण हिंदी शब्दाचे मराठी अर्थ वेगळे असतानाही ते घुसडणे हा भाषांतर्‍या वृत्तपत्रीय बातमीलेखकांचा आळशीपणा. हरकत, हैराण, अंदाज यांचे हिंदी व मराठी अर्थ वेगवेगळे आहेत. ऐन निवडणूकीच्या सीझन मध्ये " पहा माधुरी दिक्षित चा नवा अंदाज" वाचून उत्सुकतेने क्लिक केले कि तिने भाजपाला किती जागा दिल्या आहेत व काँग्रेस ला किती. आता हे शब्द आपल्याला नाईलाजाने चालवून घ्यावे लागणार !

" सरकारचे कठोर पाऊल :
रेल्वे प्रवाशांना लसीचे दोन डोळे घेतले असतील तरच तिकीट मिळणार आहे."
https://ejanshakti.com/220365-2/

डोसचे पार डोळे करून टाकले !

बातमी कितपत विश्वासार्ह आहे ?
केंद्र सरकार की राज्य सरकार तोही उल्लेख नाही...

Pages