मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जब्बार पटेल फक्त सामाजिक जड विषयांवर चित्रपट काढत असले तरी त्यांचा मुक्ता सिनेमा छान होता. बॅकड्रॉप म्हणून नामांतर चळवळ , नारकरांचा अभिनय आणि सुंदर गाणी यामुळे चित्रपट चांगला झाला होता. जब्बार पटेल डायरेक्टर,गीते ना.धो.महानोर , संगित आनंद मोडक आणि गायला रविंद्र साठे असे ते चौकुट होतं.

'तू तलम अग्नीची पात', 'जाईजुईचा गंध मातीला'..
कसली भारीयेत ही दोन्हीही गाणी. दोन्हीही बहुतेक मल्लिका अमरशेख यांची आहेत. ही गाणी सोडता चित्रपट एवढा आवडला नाही. सोकूल खुप नवखी वाटते. आणखी डिटेलींगला खूप स्कोप होता असे वाटते.
संपादन- जाईजुईचा गंध महानोरांचं आहे.

सोकूल खुप नवखी वाटते.>>> तिचा पहिलाच सिनेमा आहे बहुतेक तो..
जब्बारनी जे जे विषय हाताळले ते इतक्या उघडपणे आता कुठलाच निर्माता-दिग्दर्शक मांडू शकणार नाही हे नक्की..

जब्बारनी जे जे विषय हाताळले ते इतक्या उघडपणे आता कुठलाच निर्माता-दिग्दर्शक मांडू शकणार नाही हे नक्की..>>>>
सहमत.

मुक्ता थोडासाच पाहिलाय. युट्युबवर आहे का ते बघायला हवे.

लहानपणी टिव्हीबर मोलकरीण नावाचा सिनेमा बघितला होता. कोकणातल्या मुलाने शहरात येऊन , शिकून , प्रेमविवाह केलेला असतो. बायकोला धोतर पगडीतले खेडवळ लोक आवडत नाहीत त्यामुळे तो आई वडिलांशी संपर्क ठेवत नाही. त्यांना ओळख दाखवत नाही. त्या धक्क्याने वडिल मरतात. विधवा आई मुलाच्या घरी मोलकरीण बनून रहाते. नातू सांभाळते. पुढे मग सुनेने हाकलणे, नातू आजारी, मुलाला पश्चाताप इ.इ.
त्यातले देव जरी मज कधी भेटला हे गाणे छान आहे.

पूर्वीचे सिनेमे एसडी वर शूट होत असत आणि आता एचडी वगैरे असे काहीही नाहीये.
एसडी वा एचडी हे डिजिटलचे फॉर्मॅट आहेत.
डिजिटलच्याआधी अ‍ॅनालॉग म्हणजे फिल्मवर शूट केले जाई. त्याची क्वालिटी, डेप्थ ऑफ फिल्ड वगैरे सगळे एचडीच्यापेक्षा बरेच वरचे असते.
पूर्वीच्या फिल्म्स युट्यूब किंवा तत्सम ठिकाणी चांगल्या दिसत नाहीत याचे कारण त्यांच्या डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेमधे आहे.
अ‍ॅनलॉगवरून डिजिटलवर येताना खूप कॉम्प्रेस होऊन आलेला डेटा आहे. अ‍ॅनलॉग मधली रंगप्रक्रिया, प्रणाली यांबरहुकूम डिजिटलमधे आणतानाची प्रक्रिया वेगळी असायला हवी. ही तंत्रे विकसित न झालेल्या काळातले डिजिटलायझेशन आहे ते. अनेक सिनेमांचे त्यांच्या प्रिंटसवरून न करता व्हिएचएसवरून केलेले आहे डिजिटलायझेशन (जे युट्युबावर फुकटात उपलब्ध आहे त्यापैकी. कारण त्यातले बरेचसे ऑथेंटिक सोर्सेसमधून केलेले डिजिटलायझेशन नाही. व्हिएचएस वरून डिजिटल करणे हे फार सोपे आहे त्यामुळे चोरीमारीला फुल स्कोप आहे.) त्यात परत जुन्या सिनेमांचे हक्क हा प्रकार आहे. तेव्हा या हक्कांची कल्पनाही कुणी केली नव्हती आणि आता त्यांचे हक्क नक्की कुणाकडे याचे तिढे आहेत.

अर्काइव्हजमधे हाय एण्ड डिजिटलायझेशनचा खूप मोठा प्रकल्प आता चालू आहे.

>> गिरीश कुलकर्णीचा "मसाला (२०१२)". सहज एकदा मित्राकडे टीव्हीवर बघितला. इतका आवडला कि नंतर डीव्हीडी घेऊन घरी दोनवेळा पाहिला. खूपच सुंदर आणि अफलातून कॉमेडी. >>>>११११ comedy बरोबर कथानक पन खूप सुंदर मांडल आहे. सामान्य माणूस पन जिद्दी न धडाडीने नवनवीन उद्योग करतो भले अपयश येउदे परंतु निराश न होता नविन उद्योग. हे खुप भावल मला.

अगदी खरं आहे. तो सत्यकथनावर आधारित आहे असे वाचले होते (बहुतेक "प्रवीण मसाले" च्या मालकाची कथा). पण खरंच पाहण्यासारखा आहे. गिकु बरोबर अमृता सुभाषने सुद्धा खूपच सहजसुंदर काम केले आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे तो गिकुचा मित्र म्हणून काम केलेला ह्रषिकेश जोशी एक नंबर! Biggrin

पहिल्याच दृश्यात गिकु साडी विक्रेत्याचे काम करताना दाखवलाय. खेड्यापाड्यात सायकलवरून साडी विकत फिरणारा. बोलण्याची पद्धत बॉडी लॅंग्वेज अगदी हुबेहूब. रती अग्निहोत्रीचा उच्चार "रक्ती अग्निहोत्री" करतो. सुरवातीलाच हसून हसून पडलो होतो बघताना Lol विशेषकरून ग्रामीण भागाशी ज्यांचा परिचय आहे त्यांना फार भिडतो हा चित्रपट.

https://www.hotstar.com/movies/masala/1000014536/watch

हो. सुलोचना ना मोलकरीण मधे?
हे सिनेमे लहान वयात बघताना आवडले होते. आता अगदीच पीळ वाटतात.
तसंच सध्याचा पीळ चित्रपट नटसम्राट.

चौकोनी आकाराचे चित्र - तेव्हाच्या फिल्म्सचा (सिनेमे नाही.. ज्यावर शूट् होई ती फिल्म) तो आस्पेक्ट रेश्यो आहे. ४:३
तसे असणे ही काही चित्रातली गडबड नव्हे.

>> Submitted by नीधप on 11 August, 2018 - 12:22

+१११ ... म्हणूनच ज्यांची रासायनिक फिल्मची (पूर्वीच्या काळातली) प्रिंट चांगली जोपासलेली आहे (भले ती कृष्णधवल का असेना) त्यांचा आताच्या तंत्रज्ञानाने डिजिटल एचडी रुपांतर केलेला दर्जा खासच आहे. धाग्याच्या विषयात उल्लेख केलेला अंगाई असो किंवा राज कपूरचे सुद्धा अनेक चित्रपट/गाणी अप्रतिम क्वालिटी दिसते आहे.

सुलोचना ना मोलकरीण मधे? >> हो
हे सिनेमे लहान वयात बघताना आवडले होते. आता अगदीच पीळ वाटतात. तसंच सध्याचा पीळ चित्रपट नटसम्राट. >>>> अगदी. नटसम्राट तर फारच पीळ आहे. पूर्ण बघवलाही नाही.

नीधप चांगली माहिती, धन्यवाद.

मागे दाक्षिणात्य नृत्य, गाणी व वैजयंती, रागिणी, त्यांचे कोरिओग्राफर यांचे योगदान यावरच्या एका ब्लॉगशी ओळख झाली. त्यात हे digitalisation प्रकरण पहिल्यांदा कळले. त्या ब्लॉगवर अमुक तमुकाने खूप प्रयत्नाने अमुक भाग digitalise करून टाकलाय वगैरे वाचले तेव्हा कळले यात किती मेहनत आहे.

मी मोबाईलवर विडिओ रेकॉर्ड करून माझ्या यु ट्यूब चॅनेलवर टाकायचे तेव्हा मोबाईलवर व्यवस्थित दिसणारा व्हिडीओ यु ट्यूबवर बाजूला काळी पट्टी व मध्ये विडिओ असा दिसायचा. हे असे का याची शोधाशोध केली तेव्हा आस्पेक्ट रेशो प्रकरण कळले. आता लँडस्केप मोडमध्ये विडिओ रेकॉर्ड करते, त्याचा आस्पेक्ट रेशो युट्युबशी मॅच होतो. Happy Happy

>> लहानपणी टिव्हीबर मोलकरीण नावाचा सिनेमा बघितला होता. ... विधवा आई मुलाच्या घरी मोलकरीण बनून रहाते....

आहे हा चित्रपट यू ट्यूब वर. सर्व नाही पाहिला. पण अधुनमधून स्क्रोल करून पाहिली काही काही दृश्ये. बापरे! काही वर्षापूर्वीच बघितलेय असे उदाहरण. आजच्या काळात सुद्धा घरी मोलकरीण बनून राहिली होती आई. Sad छे छे जाऊ दे! नकोच जास्त बोलायला त्यावर...

राजश्री प्रोडक्शनने बरेच जुने पिक्चर उच्च digitalisation करून यु ट्यूबवर टाकलेत.

काही लोकांचे फसलेले digitalisation सुदधा पाहिलेय. सगळी चित्रे आडवी खेचली गेलेली पाहिलीत. त्यामुळे हिरो हिरवीन सगळे आडवे सुटल्यासारखे दिसतात Happy Happy

आईचा म्हणून घरी लावायला विकत फोटो आणतात तो नेमका सुलोचनाचाच चांगल्या दिवसातला असतो हे सुदधा यातलेच का?

गाणी मात्र नितांतसुंदर, श्राव्य आहेत. परत परत ऐकली तरी गोडवा कमी होत नाही.

एकटी या चित्रपटाची कथाही थोडीफार अशीच आहे. शहरात जाऊन आईला विसरणार्या मुलाची. त्यातलीही गाणी अवीट गोडीची आहेत.

लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू... खूप आवडते.

हो एकटी सुद्धा याच पठडीतला आहे. पाहिला आहे लहानपणी. हे गाणे लिंबलोण फार रडायला यायचे ते बघताना. शिलाई मशीन घेऊन बसलेली आई असे यातले दृश्य आठवते. शेवटी ती मरते आणि त्यानंतर त्याला पश्चात्ताप होऊन बायकोवर जाळच काढतो असे काहीतरी आहे.

कुणी हऱ्या नाऱ्या जिंदाबाद पाहिलाय काय? मस्त फुलटू कॉमेडी आहे. मी बालपणी पाहिलेला त्यात मावशीचे भूत शेवटी यांची सुटका करते हे बघितले होते. भूत विहिरीतून पाणी काढताना हात लांब करून थेट कळशी बुडवून पाणी उपसतेय हे दृश्य बघितल्यानंतर भुतांबद्दलच्या कल्पनाना प्रत्यक्ष रूप मिळाल्यासारखे वाटले होते. हल्लीच यु ट्युबवर अर्धा पाहिलाय, उरलेला अर्धा बघायचाय.

दादांचे चित्रपट शोधत होते, थोडे आहेत पण प्रिंट खूप खराब. खरखर आवाजामुळे संवाद ऐकू येईनात. शेवटी नाद सोडला.

हऱ्या नाऱ्या जिंदाबाद खूप ऐकले होते. बरी आठवण केलीत. पाहतो. दादांचे चित्रपट यु ट्यूब वर प्रिंट खूप खराब आहे कारण त्यांच्या वारसदारांत फिल्मच्या हक्कांवरून सुरु असलेला वाद अजून मिटलेला नाही. म्हणून त्या सर्व फिल्मचे अधिकृत डिजिटलायजेशनचे काम अद्याप झालेले नाही अशी माहिती वाचनात आली आहे.

वर लिहीलेय ह-या ना-या झिंदाबाद बद्दल. लहान असताना टीव्हीवर आला होता. निळू फुले चांगलेच तरूण आहेत. हा सिनेमा पुण्यातील एका सत्य घटनेवर आधारीत आहे अशी चर्चा त्या वेळी होती. अलिकडेच यूट्यूब वर पाहण्यात आला.

निळू फुले हे मराठीतले आजवरचे सर्वोत्कृष्ट सहज अभिनय करणारे कलाकार होते ..

पुढचं पाऊल या सिनेमात निळू फुलें नी जो अगतिक बाप उभा केला आहे त्याला तोड नाही. नाजुका सिरीयल मधला त्यांचा अभिनय निव्वळ अप्रतिम. हुबेहूब पात्र उभे केलेले आहे.

आजच्या काळात सुद्धा घरी मोलकरीण बनून राहिली होती आई. >> ओह Sad सिनेमात मुलाला माहित नसतंं की आईच मोलकरीण आहे. ती मुलासमोर कधीच येत नाही. त्याच्या अपरोक्ष काम करत राहते. सुनेने सासूला कधीच बघितलेलं नसल्याने तिला ती खरोखर कामवाली समजून काम देते.

आईचा म्हणून घरी लावायला विकत फोटो आणतात तो नेमका सुलोचनाचाच चांगल्या दिवसातला असतो हे सुदधा यातलेच का? >> आता आठवत नाही पण बहुतेक नसावं.

आईचा म्हणून घरी लावायला विकत फोटो आणतात तो नेमका सुलोचनाचाच चांगल्या दिवसातला असतो हे सुदधा यातलेच का? <<
पण मोलकरीण बनून राह्यलेल्या बाईचे चांगल्या दिवसातले फोटो बाहेर विकायला का असतात?

दादा कोंडकेंचे सिनेमे अगदी ८-९-१०-१२ वर्षांची अस्ताना बघितलेत.
आंधळा मारतोय डोळा, राम राम गंगाराम, आगे की सोच, पांडु हवालदार हे सिनेमे आमच्या एरियात पडद्यावर लावले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या १०० व्या जयंतीनिमित्त मोठा जंगी उत्सव होता तेव्हा.
तेव्हा काही हा चावटपणा कळण्याचं वय नव्हतं. पण नंतर मोठ्यांच्या गप्पा-चर्चांतुन दादांच्या सिनेम्यांबद्दल कळत गेलं. जोक्स कळले. पण मी कळत्या वयात एकही सिनेमा स्वतः पाहिला नाहीये. बघायला पाहिजेत. पण साधना म्हणतेय तशा खराब प्रिंट्स असतील तर फार वाईट. नीट डोक्युमेंटेशन हवंय ह्या सगळ्याच सिनेमांचं.

पळवापळवी या सिनेमाचं मूळ नाव डेंजर होतं. वाद झाले होते. दादा कोंडके म्हणाले , तुम्हाला वंगाळच अर्थ का दिसतो. माझ्या मनात सुद्धा आला नव्हता हा अर्थ.

मुक्ता थोडासाच पाहिलाय. युट्युबवर आहे का ते बघायला हवे.
नवीन Submitted by साधना on 11 August, 2018 - 01:57
YouTube वर दोन पार्ट आहेत. पुर्ण नाही.

रिंगा रिंगा मलापण बोर झाला होता. चेकमेट नंतर अपेक्षा वाढल्या होत्या संजय जाधव कडून, अगदीच फुसका बार निघाला रिंगा.
चेकमेट खूप वेळा पाहिलाय ते पण टॉकीज मध्ये जाऊन, लेक्चर्स बंक करून.

Pages