माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यापुढे नेहेमीचा गहन प्रश्न आहे. मला मुळात भाताची आवड नाही ( म्हणजे जेवणात भात एखादेवेळी नसला तरी चालतो) त्यामुळे होते काय की मसालेभात करा नाहीतर व्हेजीटेबल पुलाव करा. माझा भात अतीशय मिळमिळीत होतो. ना त्याला मसाल्याची चव लागते ना तिखटाची.

मी दोन प्रकारे करुन बघीतला.

१) तांदूळ धुवुन आधी भात शिजवला, भाज्या वेगळ्या ( तेलात परतुन, मसाला घालुन वगैरे ) परतुन मग तो भात भाज्यात परतुन वगैरे.

२ ) भाज्या आधी शिजवुन त्या तेलात परतुन मग मसाला घालुन किंवा तेलात आधी निथळलेले तांदूळ परतुन, मसाला व भाज्या त्यात घालुन ( त्यात आधणाचे गरम पाणी घालुन) मग शिजवले तरी या दोन्ही प्रकारे तो फसतोच. त्याला हॉटेल वा घरी आपण पार्टीला मागवतो त्या पुलावाची किंवा मसालेभाताची चव येतच नाही, एकदम फिका होतो आणी मसाला तोंडात जाणवतो. मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरते. मी खडा मसाला कमी वापरते.

पुर्वी मी कुकरमध्ये करीत होते तो बरा व्हायचा पण आता कढईत मनासारखा होतच नाही. माझे काय चुकते?

पोस्ट बरीच मोठी आहे त्याबद्दल क्षमस्व.:अरेरे:

तांदूळ कुठला, तो फार चोळून चोळून धुतला जातो का ? भातातले पाणी काढून टाकले जाते का ?
शिजताना झाकण ठेवले जात नाही का ?

या तिन्ही प्रकारे भात बेचव होऊ शकतो.

हॉटेलमधे खुपदा भात, स्टॉक मधे शिजवतात. त्यासाठी बटाट्याच्या साली, गाजर, फ्लॉवरचे मधले दांडे, कोबीचा मधला भाग, काही ठेवलेले वेलचीचे व मिरीचे दाणे, एखादे तमालपत्र असे पाण्यात ( कूकरमधे ही चालेल ) शिजवायचे. भाज्या गळून गेल्या पाहिजेत. मग पाणी तसेच ठेवून, वरचे नितळ पाणी घ्यायचे आणि त्यात भात शिजवायचा.

किंवा भात शिजवतानाच, साजूक तूपाची फोडणी करुन त्यात वेलची, मिरे, दालचिनि जरा ठेचून घालायचे. मग त्यावर पाणी ओतायचे ( तांदळाच्या दुप्पट ) पाण्याला उकळी आली कि त्यात तांदूळ वैरायचे आणि शिजवायचे.
दोन्ही प्रकाराने भात चवदार होतो.

टुनटुन , मायबोलीवर सायोची मसाले भाताची रेस्पी आहे, http://www.maayboli.com/node/३०११८

अंजलीची व्हेज बिर्याणी रेस्पी आहे
http://www.maayboli.com/node/16224

- दोन्ही प्रकारे अगदी मस्त होतो भात.
मिपावर पेठकर काकांनी रेस्पी पण भारी वाटतेय, मी अजुन ट्राय केली नाही पण .

टुनटुन, तांदूळ कुठला वापरता हा कळीचा प्रश्न आहे. मसालेभात, पुलावाकरता शक्यतोवर बासमती वापरा. तो मोकळा होईल तुम्हांला हवा तसा.
वर मेधाने लिंक दिली आहे मसालेभाताची. माझा तरी त्या पद्धतीने केलेला कधीच बिघडला नाहीये.

दिनेशजी, मेधा आणी सायो खरच खूप धन्यवाद. मी बासमतीच वापरते, पण तो कदाचीत जास्त चोळला जात असावा.
सायो तुमची मसालेभाताची रेसेपी मला खूप आवडली आणी दिनेशजींचा व्हेज पुलाव पण. दोन्ही प्रकारे करुन बघीन.

आतापर्यंत भात विषेश नावडीचा असल्याने ( फोडणीचा आणी लेमन राईस सोपा म्हणून आवडतो ) कदाचीत मनापासुन केला गेला नसावा, पण तुमच्या सुचना लक्षात ठेवते.

मेधा अंजलीची व्हेज बिर्याणी छान आहे. पण आधी मला हे पुलावाचे बेसिक जमले की बिर्याणी करता येईल. धन्यवाद चांगल्या लिंक दिल्याबद्दल.

टुनटुन, माझ्या काही टिप्स..... तुम्ही तांदुळ चाळणीत घालुन धुवा. म्हणजे त्यातले पुर्ण पाणी निथळुन जाईल. ते तसेच २०-३० मिनीटे ठेवा. नंतर भात करा. दुप्पट पाण्यापेक्षा कमी पाणी घालुन पाहा. पुलाव होत आला कि वरुन २-३ चमचे साजुक तुप सोडा. पुलाव्/बिर्याणी करताना भाज्या घातल्या तर्..टोमॅटो, कांदा,वांगी.....ज्यांना पाणी सुटते अशा वेळी भात करताना पाणी कमी घालावे.

टुनटुन विद्याक ला अनुमोदन.
तांदूळ नुसते पाण्यात वैरून तसेच भिजत अर्धा तास ठेवून, नंतर पाणि काढून टाकून १० मिनिटांनी पुलाव वगैरे फोडणीस टाकलं तर त्या तांदुळांना शिजायला एकतर पाणि कमी लागतं, कमी वेळात शिजतो शिवाय सुरेख मोकळा होतो. बाकी चविच्या बाबतीत मी फार काही सांगू शकणार नाही, पण लवंग, मिरिदाणे, दालचिनी, सुकं खोबरं.. असं थोडं जास्ती वापरलंस तर कदाचित खमंगपणा वाढेल त्याचा.. बाकी जाणकार सांगतीलच.

विद्याक आणी दक्षिणा नव्या टिप्स बद्दल धन्यवाद, सेव्ह केल्यात. मी प्रत्येक वेळी तोंडली, गाजर, फरसबी वगैरे जास्तच आणुन ठेवते, म्हणजे ते उरलेले थोडे मसालेभात, पुलाव वगैरेत वापरायला छान वाटते, आणी भाज्या ही खाल्ल्ल्या जातात. आणी नवीन सरावाला बर्‍या पडतात.

माझे पुरण छान होते पण, बरेचदा सैल होते, पोळीला लागते तसे घट्ट पुरण कसे करतात?>>>> पुरण शिजवताना त्यात डाव खुपसून उभा करावा. तो सरळ उभा राहिला न पडता तर योग्य कन्सिस्टंसी आली आहे पुरणाला असे समजावे. Happy
जर पुरण फार सैल झाले असेल तर अजून एक चटका देऊन पहावे नाहीतर मावेतून काढावे. नाहीतर चक्क चमचाभर तांदूळ घालावेत पुरणात आणि परत शिजवावे जरा वेळ. किंवा पुरण थंड करून फ्रिजमध्ये ठेवावे आणि दुसर्‍या दिवशी वापरावे.

प्राचीच्या सूचनात फक्त एक भर. पुरण चक्का बांधतो तसे, बांधून ठेवायचे. अतिरिक्त पाणी / ओलावा शोषला जातो.
किंवा थोडे बेसन, भाजून मिसळावे.

पुरणपोळी करायच्या आधी पुरण दहा सेकंद मावेमधून काढावे. चांगले घट्ट होते आनि पोळ्या लाटताना बाहेर येत नाही.

ह्या वर्षी बेसनाचे लाडू करताना बेसन कमी भाजलं गेलय (हात खूपच भरुन आल्यामुळे केलेला आळस नडलाय :अरेरे:) त्यामुळे नेहमीचा रंग व चव नाही आली आहे. साखर मिक्स करुन झाली आहे आता काही करता येइल का?

मला नका हाणु..
मी तिथेही विचारला..

इथे थोडी गर्दी होती म्हणुन इथेही विचारला..
विपु बघ..

ह्या वर्षी बेसनाचे लाडू करताना बेसन कमी भाजलं गेलय (हात खूपच भरुन आल्यामुळे केलेला आळस नडलाय ) त्यामुळे नेहमीचा रंग व चव नाही आली आहे. साखर मिक्स करुन झाली आहे आता काही करता येइल का?
>>>>>> नॉनस्टिक पॅनमधे दोन लाडू कुस्करुन परत भाजून पाहिले कलर बदलतो आहे आणि चवही सुधारली आहे आता असे थोडे थोडे करुनच भाजावे लागेल की सगळं एकत्रच भाजल तर चालेल.

विनार्च, विपू केलीय... तरीपण इथे लिहितो. साखर मिसळलेले बेसन भाजताना साखर जळण्याची / पाकावर जायची शक्यता आहे. जर थोड्या थोड्या मिश्रणावर प्रयोग यशस्वी होत असेल, तर तसेच केले पाहिजे.

चिवडा हा प्रकार मला फारसा आवडत नसल्याने मी करत नव्हते. पण नवर्याला आणि मुलींना आवडतो म्हणून आत्ता पातळ पोह्यांचा चिवडा करावा लागला. पोह्यांना ऊन दाखवणं जमला नाही म्हणून थोडे थोडे पोहे जाड बुडाच्या कढईत टाकून गरम केले. पण पोहे जसे कुरकुरीत होणे अपेक्षित होते तसे झाले नाहीत. पोहे गरम केल्यावर जरासे वळले होते. माझं नक्की काय चुकलं?

आणि हमखास चांगला चिवडा (पातळ पोह्यांचा) करण्यासाठी काय करायला हवे?

मनस्विता, थोडे तेल टाकून गरम करायला हवेत. नाहीतर आक्रसतात.

तेलाची फोडणी करुन, त्यात पोहे परतले तरी चालतात. कढई मोठी घ्यायची. कुरकुरीत होईपर्यंत परतायचे.

सीताफळ मिल्कशेक किंवा तत्सम काही करताना बियांपासून गर सेपरेट करायची काहि सोपी युक्ती आहे का?
काल एक बी चुकून फुटली आणि सगळं कडूजार झालं.

मनस्विता .. पातळ पोह्यांना उन दाखवायला वगैरे वेळ नसेल .. उन नसेल.. तर पोहे भाजून घेण्या पेक्षा मायक्रोवेव्ह मध्ये डिह्युमिडीफाय करावे एक मिनिटा साठी. सुक्या भेळीसाठी किंवा भडंग करताना देखील कुरमुरे असे केल्याने मस्त कुर्कुरीत होतात. एल जी च्या कन्व्हेक्शन मोड वाल्या मावे ला होतं हे सेटींग. Happy

एकदम अर्धा किलो ( चिवट उन न दाखवलेल्या )पोह्यांचा चिवडा केलास तरीही चालेल. आणि खायला देण्या आधी एकेका बॅच मध्ये मोठ्या बोल मध्ये चिवडा ठेउन डिह्युमिडीफाय करुन घेतला तरीही चांगला लागतो. पोहे अजिबात चुरत नाहीत.

Pages