माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापैकी अर्धा, घट्ट झाकणाच्या डब्यात घालून तो शक्य तितका मोडून घ्यायचा. त्यावर गरम दूध शिंपडायचे. मग कूकरमधे ठेवून ५ मिनिटे वाफवायचे (झाकण घट्ट लावायचे.) बाहेर काढल्यावर त्याचे लाडू होतील असे वाटतेय. पण आधी थोड्याच मिश्रणावर प्रयोग करायचा.

हेच मिश्रण, इंन्स्टंट शिरा म्हणून वापरता येईल. आयत्यावेळी गरम दूधात घालून शिजवायचे.

थोडा कच्चा पाक करुन घालुन मिश्रण एकजीव करावे व लाडू वळावे.

जेंव्हा पाक कच्चा राहतो. तेंव्हा पक्का पाक घालुन लाडू वळता येतात.

मात्र दोन्ही परिस्थितीत साखरेचे प्रमाण थोडे वाढते आणि लाडू थोडा गोड होतो.

सध्या धान्यात ठेवायचे एक जाळीच यंत्र मिळतय.. रोल केलेली जाळी आहे.. त्यात म्हणे सगळे पोरकिडे जमा होतात धान्यात ठेवल्यावर...

बोरिक पावडर ही हानिकारक आहे.. पण ते प्रमाणावर अवलंबून आहे.. उगाच ढिगभर लावली तर त्रास होईलच पण कमी प्रमाणावर वापरली तर प्रॉब्लेम येणार नाही..

पारस केमिकल्सची बोरिक पावडर मिळते तीच वापरा. ती मान्यताप्राप्त आहे.. पांढर्‍या रंगाचे डबे मिळतात आणि फक्त मेडिकलच्या दुकानातच मिळतात..

२०० ग्रम मिल्क पावडर व थोडेसे दूध टाकून गरम कर व लगेच वळ. दिनेशदा म्हणतात अर्ध्या भागावर प्रयोग करावा अर्थात मिल्क पावडरचे प्रमाण अर्धे करावे लागेल हेवेसांनल. मी ह्या लाडवाचा पाक दुधातच करते. असो!

धन्यवाद सगळ्यांनाच . सध्या हा दगड तसाच्या तसाच उचलुन आडव्या [पोळीच्या] डब्यात ठेवलाय. पण तो भुसभुशीत दगड असल्यामुळे नवर्‍याने आणि लेकाने तसाच तुकडे करुन खायला सुरुवात केली आहे, आवडलाय त्यांना त्यामुळे आता आकार डझंट मॅटर. Happy आता आणखी काही प्रयोग करु नकोस यावर आहे तसेच खातो अशी नवर्‍याची प्रेमळ सुचना आहे Proud जी मी शिरसावंद्य मानली आहे Proud

अगो, मी म्हणेन की मश्रूम्सचं असं काही करायच्या नादाला लागूच नये सरळ नूडल्समध्ये वगैरे घालून संपवावेत
>> सायो, हा चक्क पळपुटेपणा झाला Proud
नवनवीन प्रयोग फसतात म्हणून ते करायचेच नाहीत असे जर जर म्हटले तर अणुशास्त्र आणि पाकशास्त्र यांची प्रगती कषी होणार? आं? तसेच असेल तर कशाला सगळ्याच फन्दात पडावे? सरळ कच्ची गहू खावेत, कच्च्या भाज्या खाव्यात. कंदमुळे खावीत. शिकार करून कच्ची मांस खावे इत्यादी इत्यादी. Proud

http://www.maayboli.com/node/12513 पाहून नानकटाई केली.

१. पीठ कणकेसारखे झाले नाही , गिट्सचे गुलाबजाम करताना मऊसूत पीठ व्हायच्या अगोदरची जी पायरी असते तसे काहीतरी झाले . ( कसं सांगू ..? म्हणजे ओलसर खव्यासारखं साधारण)

२.बेपा चमचाभर घातलेली , पण नानकटाई ची वाईन बिस्किट झाली .

बर्यापैकी खुस्खुशित आणि चविला एक्दम फक्कड .. पण फुलली नाहीत .

ही साघारण रुपयाच्या आकारची आहेत .

2012-07-29 20.06.21.jpg

काय चुकलं ? परत प्रयत्न करावा म्हणतेय , पण आता वेगळं काय करु ?

बेपा चमचाभर घातलेली>>>

स्वस्ति, त्या पाककृतीत लिहिलंय की मैदा वापरला तर फक्त पाव चमचा बेकिंग सोडा घालावा लागेल आणि सेल्फ रेझिंग फ्लार वापरलं तर बेकिंग पावडार/ बेकिंग सोडा काहीही वापरावं लागणार नाही.

आता वेगळं म्हणजे बेकिंग पावडर वापरू नका.

साठवणीच्या तांदळासाठी- तमालपत्रे, लवंगा मिसळुन ठेवणे.प्लास्तिकच्या मोठ्या पिशवित थेवणे.(२५ किलोचे तयार पेकिंग मिळ्ते.) १५ दिवसांसाठी लागतील तेवढे बाजुला काढुन पिशवि नीट बंद करुन ठेवणे.
अजिबात किडे,अळ्या होत नाहित.अनुभवावरुन.

मी चुकून जास्तीचे तांदूळ आणलेत. टोटल ४ किलो असतील. मी भात फारतर आठवड्यातून एकदा खाते, त्यामुळे हे ४ किलो तांदूळ मी खराब होऊ नयेत म्हणून काय करू? पैकी २ किलो बासमती कणी आहे आणि २ किलो आंबेमोहोर आहेत. मिक्स पण करू शकत नाही ना?

ह्या वर्षी घरी अळु लावला. कौतुकाने, गेल्या आठवड्यात अळुची भाजी केली. त्यात चिंच जास्त झाली. म्हणुन काल वड्या करताना चिंच जरा कमी घातली. तर वड्या खाल्यानंतर घसा जरासा खाजायला लागला. लिंबु सरबत घेतल्यावर बरे वाटले. पण आता अजुन १ उंडा वाफवलेला राहीला आहे. आता त्याच्या वड्या तळतांना लिंबुरस टाकु का? आणि चिंचेचा अंदाज कसा घ्यावा? मी ५ पानांसाठी १ चहाचा चमचा एवढा दाट चिंचेचा (विकतचा) कोळ घेतलेला. खुप आंबट झाले तर काय करावे?

दक्षे, मी तर सरळ तांदूळ जास्त खा, असा सल्ला देईन. गहू आणि तांदूळ यांच्याच श्रेष्ठ कनिष्ठ
असे काही नाही. तांदूळ खाताना सोबत भरपूर प्रथिने खावीत म्हणजे ते चांगले असते.
वरणभात, आमटीभात, पिठले भात हे उत्तम संयोग आहेत. बिर्याणी पण चांगली पण त्यामानाने
पुलाव, कमी दर्ज्याचा. खिचडी तर उत्तमच.

भाताने माणूस जाड होतो, हेही खरे नाही. कोकणे कुठे स्थूल असतात ?
आता तांदूळ कसा खायचा, त्याचे काही उपाय बघ. पिठाची भाकरी तूला रुचणार नाही. (सवय नसल्याने)
पण तरी थोड्या आंबेमोहोर तांदळाचे पिठ करुन ठेव. अनेक प्रकारे वापरता येते. उकड काढता येते,
चपात्या करताना, वरुन लावता येते. कापं वगैरे तळताना, वरुन लावता येते.

काही तांदूळ धुवून सावलीत वाळवून ठेव. आणि मग कढईत मंद आचेवर भाजून ठेव. याचा जाडसर
रवा काढून ठेव. या रव्यापासून कदंबम हा रुचकर प्रकार करता येतो.
आपल्याला हव्या त्या भाज्या (गाजर, फ़रसबी, मका, घेवडा, वाटाणे ) हिंग, जिरे, मिरची च्या फ़ोडणीवर
तेलावर परतून घ्यायच्या. त्यात पाणी ओतायचे. व थोडे तूप आणि ताक टाकायचे. चवीला मीठ टाकून
भाज्या शिजल्या कि हा रवा टाकायचा. हा रवा लगेच शिजतो. हा प्रकार रुचकर तर लागतोच पण
पचायलाही हलका असतो.

सकाळी तांदूळ भिजत घालून रात्री ते वाटायचे. मग त्यात मीठ, हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक
चिरलेली साधी किंवा सिमला मिरची टाकायची. मग हे मिश्रण नॉन स्टीक तव्यावर ओतायचे. याला
ओतलेली भाकरी असेच नाव आहे. दोन्ही बाजूने गुलाबी भाजायची. हि भाकरी करायला सोपी आहेच
पण खुप चवदार लागते.

कारवार कडे बहुतेक पदार्थ तांदूळ वापरूनच करतात. पाहुणे बघून तांदूळ भिजत घालायची प्रथा आहे.
तांदळा बरोबर चण्याची, मुगाची, तुरीची डाळ भिजत घालून (त्यात थोडी मेथीही) सगळे एकत्र वाटून
त्याचे डोसे करता येतात. हे आंबवायची गरज नसते. चपात्यापेक्षा कमी श्रमात होते हे. मिक्सरच्याच
भांड्यातून तव्यात ओतायचे, म्हणजे भांडी पण कमी लागतात.

धन्यवाद लोला! मी आता वाचली अवल ची रसपात्रा भाजी. चांगली वाटली कृती. पण वड्या त्या वड्या नाही का? लिंबु रस टाकुन थोड्या वड्या करुन बघते ,नाही तर मग नारळाच्या दुधातली अळुवडी करेन.

>>madhuragodbole | 15 August, 2012 - 21:14 नवीन
दिनेशदा, तुमची पोस्ट म्हणजे mini-cookbooks च असतात....दरवेळी असं वाटतं की कामधाम सोडुन स्वयंपाकच करावा!!
<<

सुंदर काँप्लिमेंट आहे.
दिनेशदा, काँप्लिमेंटांच्या बाबतीत लै श्रीमंत बगा तुमी!

इब्लिस, अगदी बरोबर आहे तुमचे! दिनेशदा, खंरच या बाबतीत श्रीमंत आहेत. आणि ही श्रीमंती सहजासहजी त्यांना मिळाली नाही हे ही तितकेच सत्य आहे.
दिनेशदा, जागु, अवल, लोला, चकली, सायो, लाजो... असे सर्व स्वंयपाकघरातले रथि-महारथिं आपल्याला मिळाले. हे आपले भाग्यच म्हणायचे. यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेकजणींची किती सोय झाली आहे. या सर्व किचन किंग ना माझा त्रिवार मुजरा!!!

आधी वापरलेत तेच मूग नेहमीप्रमाणे मोड काढले पण उसळ कडवट का लागली? त्यातलेअच थोडे मूग बाजुला काढले होते ते नुस्ते उकडवले तर तेही कडसरच Sad
यावेळी खरं तर इथं गरमी जास्त होती त्यामुळे मोड छान आणि नेहमीपेक्षा लवकर पण आले होते.

दिनेशदा, जागु, अवल, लोला, चकली, सायो, लाजो... असे सर्व स्वंयपाकघरातले रथि-महारथिं<<< कस्स्..कस्स...

दिनेशदा, जागु, अवल, लोला, चकली, सायो<< हे तर ग्रेटच आहेत!

धन्यवाद लोला! मी आता वाचली अवल ची रसपात्रा भाजी<< लोला नाही लाजो Happy

तांदूळ- अक्षता.. वॉव आत्ता अक्षतांचा अर्थ बरोब्बर लागला..
दिनेशदा, तुमची पोस्ट म्हणजे mini-cookbooks च असतात... +१०००० Happy

दिनेशदा, तुमची पोस्ट म्हणजे mini-cookbooks च असतात....दरवेळी असं वाटतं की कामधाम सोडुन स्वयंपाकच करावा!! >> मुग्धाला शंभर लाडू Happy

दिनेश, अप्रतिम पोस्ट आहे. नक्की करीन हे सगळं. Happy

मंजुताई ,
मी मैदा वापरला , मग बेपा घालावी लागेल ना ?
नाहीतर मग त्या बेकड शंकरपाळ्या नाही का होणार ??? ( माझी बाबो शंका ... आतापर्यंत मी कधी शंकरपाळ्याचे पीठ बनवले नाही , फक्त लाटल्या आणि तळ्ल्या आहेत )

स्वस्तिताई, पाककृतीमधे व्यवस्थित लिहिलंय की 'मैदा वापरला तर त्यात पाव टिस्पून बेकिंग सोडा घालावा लागेल. सेल्फ रेझिंग फ्लावर घेतल्यास सोडा घालायची आवश्यकता नाही.'

sorry लाजो, तुला लोला केल्याबद्दल. मी शेवटी त्या वड्या तळतांना भरपुर लिंबाचा रस टाकला मग नाही घशाला त्रास झाला.

परवा पालक कबाब केले होते..
शॅलो फ्राय करताना तेलाला भरपूर फेस येत होता.. मा.का.चु????

Pages