माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी क्वचित कौतुकाने केलेली कोणतीही वाटणाच्या रस्श्याची भाजी थोडीतरी ब्राम्हणी चवीचीच होते.>>>> माझं एक्झॅक्टली उलटं होतं. काहीही करा.. तवंग येतोच भाजीला - झाकण ठेवा नका ठेवू, कांदा घाला, नका घालू... Sad बरं मी तेल कमी वापरते, यावरून नेहेमीच दोन्ही आयांची बोलणी खाते. काय चुकत असेल?

धारा.. तिखट (मिरची पावडर) आणि काळा मसाला/गरम मसाला पावडर फोडणीत घातले की तसा तवंग येतो. भाजी शिजत आल्यावर घातले तर नाही येणार. दक्षिणा बहुतेक उलट करत असेल. ( अंधेरे मे तीर Wink ) आणि दक्षिणा, तो मसाल्याचाही फरक असेल.

सुमेधा, Happy आमच्याकडे येण्याचे आमंत्रण आतापासून घेऊन ठेव. Happy

नताशा, अंदाज बरोबर आहे तुमचा... मला तिखट/मसाला वरून टाकलेला आवडत नाही, असं वाटतं की ते शिजणार नाही/रश्श्यात वर तरंगेल. त्यामुळे मी नेहेमीच फोडणीत भाजी/पाणी टाकायच्या अर्धा मि आधी टाकते, म्हणजे ते जळत नाही. आज तुमच्या म्हणण्यानुसार करून बघते आणि इथे सांगते.

ज्यांची डोकी 'गरम' असतात त्यांच्या भाजीला तवंग येतो म्हणतात.... खखोदेजा
>>
बर्रोब्बर आहे लाजो Proud

धारा, कांदा, टोमॅटो परतत असताना तेलात मसाला घातला की तवंग येतोच तेलाचा. ज्यांना असा तवंग आवडतो त्यांच्यासाठी ही टीप: कांदा, टोमॅटो तेलात परतुन झाल्यावर मध्ये तेलाची छोटीशी विहीर करायची आणी त्यात लाल मसाला परतायचा. मस्त तवंग येतो भाजीवर.

ज्यांची डोकी 'गरम' असतात त्यांच्या भाजीला तवंग येतो म्हणतात.... खखोदेजा
>>>> १००% बरोबर. माझ्याइतकं भडक डोकं मीच अजून पाहिलं नाहीये. Uhoh

असो. नताशा, तवंग आलाच... हिरवी मिरची घालून केलेली भाजी तरी. आज सोयाबीनची टोमॅटो-कांदा रस्सा भाजी आहे. तेव्हा नक्की सांगते.

दक्षिणा, बरोबर आहे मग. ओगले आजींप्रमाणे केल्यास त्याला ब्राम्हणी चव येणारच. Happy पुढच्या वेळी फोडणीत कांदा-टो-लसूण वगैरे घालून मग तिखट, मसाला, वाटलेला काही मसाला अस्ल्यास तो, इ. घाल. थोडं परतून मग भाजी घाल. शिवाय गूळ्-साखर नको घालूस. मग बहुतेक झणझणीत लागेल तुला हवी तशी.
धारा, मसाला घातला असशील नं तेलात? त्यामुळे झालं असेल तसं. मी स्वतःच खरं म्हणजे novice आहे, त्यात तुम्हाला सल्ले देतेय. पण बघा काही फरक पडला तर सांगा इथे म्हणजे आपण सगळ्याच शिकू त्यातून Happy

स्वाद चा parboiled long grain rice इडली-डोसाकरिता म्हणून आणला. पण नेहमीच्या जॅस्मिन वगैरे तांदळाने होतात तसे डोसा/इडली होत नाहीये. काय चुकतंय कळत नाही.
हा तांदुळ इडलीकरिता वापरायचा नसतो का? नसेल तर काय करता येइल?

ज्ञाती
पण नेहमीच्या जॅस्मिन वगैरे तांदळाने होतात तसे डोसा/इडली होत नाहीये. >>>
म्हणजे नक्की काय, पीठ फुगत नाही, जाळी पडत नाही.
डाळ तांदळाचे प्रमाणे काय घेतेस? माझ्या सासरी कोकणात हे प्रमाण घेतात
डाळ - साधा तांदूळ - १:२ प्रमाण
डाळ - बॉइल्ड तांदूळ - १:३ प्रमाण.

मी डोसा साठी तांदूळ : डाळ ४:१ आणि इडलीसाठी ३:१ असे प्रमाण घेते.
पीठ फुगते, आंबते. इड्ली होत नाही. म्हणजे शिजत नाही. कितीही वाफवले तरी कच्चे ओलसर पीठच राहते.

हम्म्म.
पुढच्यावेळी इडली लावतांना कुकरमधले पाणी आधी पूर्ण उकळले की मगच इडली स्टँड ठेवून मग १२-१५ मिनीट इडली वाफव (असे आधीपासूनच करत नसलीस तर). मला नक्की माहित नाही हा उपाय चालेल की नाही ते पण करून पहा.

मी पेसरट्टु डोसा करण्यासाठी मूग रात्रभर पाण्यात भिजवले, सकाळी त्याच पाण्यात वाटून एका तासानंतर करायला घेतले. डोसा अजिबात जमला नाही. तव्यावर पीठ घतलं की सगळं पीठ गोळा होत होतं. पीठ पातळ करून बघितलं काही उपयोग झाला नाही. पीठात फक्त मूग आणि मीठ घातलं होतं. माझं काय चुकलं?
माझ्याकडे जे मूग आहेत ते भाजून ठेवलेले आहेत, कीड लागू नये म्हणून. त्यातलेच वापरले होते. त्याने काहि बिघडले का?

नुसत्या वाटलेल्या मूगाचे डोसे माझेही फसले होते. त्यात तांदूळ पीठी आणि/ किंवा डाळीचे पीठ घालावेच लागते पसरण्यासाठी, नाहीतर गोळा होतो (झाला होता).

मोड आलेल्या मूगाचे डोसे मी एकदा टी व्ही वर पाहिले होते. ते अगदी छोटे केले होते त्यांनी (याच कारणासाठी असेल बहुतेक). पुरीच्या आकाराचे.

त्या पिठात थोडे तांदळाचे पिठ किंवा रवा किंवा कणीक घालायची. मग मस्त जमतात. शिवाय पिठ फार
पातळ करायचे नाही, चांगलेच घट्ट ठेवायचे.

पीठ फुगते, आंबते. इड्ली होत नाही. म्हणजे शिजत नाही. कितीही वाफवले तरी कच्चे ओलसर पीठच राहते. >>>> गुळगुळीत वाटतेस ना? अन साध्या वरणाइतक घट्ट ठेवायचे.

तांदूळ जास्त वाटू नकोस ज्ञाती. जरा रवाळ ठेवून बघ. उडद डाळ जास्त वेळ भिजवली जात नाहीये ना? त्यानेही जरा बुळबुळीत होते डाळ, मग इडल्या बिघडतात. माझ्या मागच्या वेळेच्या इडल्या अश्याच फसल्या चक्क. Sad तेव्हा सा इं शेजारणीने हा सल्ला दिला होता.

मुगाच्या दोशांची कृती बहुतेक मृणने इथे लिहीली होती. पाककृती विभागात नसल्यास माझ्या इनबॉक्समध्ये असणार Wink

मी पेसरट्टूकरता अख्खे मूग न घेता हिरव्या सालीसकट मूगडाळ घेते. थोडा वेळ भिजवून मग वाटते. वाटताना त्यात मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, कढिपत्ता वगैरे घालते. वाटलेल्या मिश्रणात तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ वगैरे घालून मग डोसे घालते.

मला प्लीज मदत करा. ४०० ग्रॅम क्रीम घेतले आणि त्यात पिठी साखर आणि वनिला च्या काड्यांमधून एक्स्ट्रॅक्ट काढून घातला. जवळ्जवळ १३ मिनिटे हँड मिक्सी फिरवली तरी कन्सिस्टन्सी नीट होत नवती. आणि आता चोथापाणी दिसतय. काय करू प्लीज सांगा....

मी केलेल्या इडल्या फुटत होत्या :(, इकडे थंडी आहे त्यामुळे बराचं वेळ - जवळजवळ १ दिवस आणि १ रात्र - ठेवूनही पीठ आंबलं नव्हतं - हा माझा अंदाज कारण लेव्हल वर नव्हती आली - म्हणून सोडा घातला पीठात , तर काही बर्‍या झाल्या , काही फुटल्या.
१. शनिवारी पाहुणे येणार आहेत म्हणून मी गुरुवारी संध्याकाळी इडली रवा - तांदूळ भिजत घातलयं, शुक्रवारी सकाळी वाटून घ्यावं ना ?
२. कोणीतरी लिहिल्याप्रमाणे ह्या वेळी ओव्हनमधे ठेवणारे पीठ, ते किती वेळ ठेवावं ?
३. इडल्या फुटू नयेत म्हणून काय करावं ?

प्राजक्ता, माझ्यामते, पीठ पुरेसं आंबलं होतं, (फक्त थंडीमुळे फुगून वर आलं नव्हतं) सोडा घातल्यामुळे अति फसफसलं आणि हसलं म्हणजे इडल्या फुटल्या Happy

आता शनिवारी इडल्या करशील तेव्हा सोडा घालायच्या आधी चार इडल्या वाफवून बघ. त्या चांगल्या झाल्या नाहीत तरच आवश्यकतेप्रमाणे सोडा घाल.

सोडा नुसता न घालता चमचाभर तेलात सोडा फेसून घालावा. इडली हलकी होते.

पीठाची लेव्हल जास्त वर आली नसली तरीही पीठात लहानलहान बुडबुडे (अगदी मोहरीएवढे दिसतात.) दिसत असतील तर पीठ आंबले आहे असे ओळखावे. डावात थोडे पीठ घेऊन नीट बघितले असता बुडबुडे दिसतात.

अगदी थंडी असेल तेंव्हा इडलीचे पीठ ओव्हनमधे ठेवताना त्याच्या जोडीने एका भांड्यात २-३ कप पाणी उकळून ते भांडं पण ओव्हन मधे ठेवते. शक्य असल्यास दर दोन तासांनी असं गरम पाणी ठेवलं तर ६-८ तासात अगदी मस्त आंबून येतं पीठ.

Pages