"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला....
स्व.जो. नामक थुलथुलीत मैद्याचे पोते बाजीराव ???
घोड्यावर बसलं का ते ? आणि समजा बसलचं तर कस दिसेल..घोड्यावर पांढरा तुप्पकट मैद्याचा गोळा बशविला असं !! सई-पुई मस्तानी [डोके गरगरणारा स्माईली] ???? मस्तानी दांड-पट्टा चालवायची म्हणजे काय ती आड्-दांड होती असा अर्थ घेतला की काय तुम्ही Lol

बघितला. फार काही आवडला नाही. रणवीर आणि तन्वी आझमी आवडले. बुंदेलखंडाची लढाई आवडली. दीपिका वैतागवाणी आहे. फक्त समशेरला वाचवायला तलवारीने लढते तेवढाच सीन आवडला. प्रिया़ंका १४-१५ वर्षांची दाखवायची असली तरी सासूच्या मांडीवर उडी मारुन बसायला मोठीच की. हे उडी मारणं प्रकरण जास्तीतजास्त ७-८ वर्षं वयाला शोभेल. आणि त्याकाळी तर अशक्यच वाटतं.

बाकी पिंगा अनावश्यक वाटला. त्या आधीच्या सीनमध्ये काशीबाई दीपिकाला साडी देते आणि "ये लो साडी" वगैरे म्हणते तेव्हा "ये लो लुगडं" म्हणाली असती तर मजा आली असती. त्या सीनचा पिंग्याने कचरा केला. मल्हारी डान्स एक डान्स म्हणून छान वाटला. पण "वाट लावली" ने तो पेशवाईतला आनंदोत्सव न वाटता एक स्टेज शो असल्यासारखं वाटलं.

बाकी इतर पात्रं ठिक ठाक. अभिनयाला फारसा वावच नाही बाकिच्यांना. शाहू राजे झालेले महेश मांजरेकर अख्ख्या सिनेमात बोदल्यासारखे बसून राहिले होते. एकदाही उठले नाहीत.

नर्मदेतला शेवटसा सीन चांगला घेतला आहे. काशीबाई नर्मदेकडे जाताना हातात गंगेचा गडू दिसतो तेव्हा जरा चर्र झालं.

काल बघितला .
बाजीराव म्हणून रणवीर मस्त ! खूपच आवडला !!
मस्तानी म्हणून दीपिका नाही आवडली . का कुणास ठावूक पण बाजीरावनी एवढा जीव ओवाळून टाकावा अस काही दिसलच नाही त्या भूमिकेत पण आणि दिपिकात पण
काशीबाईच पात्र उभ करण्यात काहीतरी चुकलाय पण प्रियांकानी काम मस्तच केलंय.
एका प्रसंगात मस्तानीला कुंकू लावून ओटी भरायची कारण माझ्या नवरा तुझ्यावर प्रेम करतो. पण तुझा माझा काही संबंध नाही . नंतर लगेच एकत्र नाचायच .
आणि बर नवर्याची एवढी काळजी , प्रेम तर तो युद्धावर जाताना त्याला ओवाळायचं पण नाही. सणाच्या दिवशी दिवे विझवायचे, पण एकीकडे मस्तानी पहिल्यांदा घरी येते म्हणून पण दारात औक्षण करायला येते. का तर घरातील मोठी सून, पेशवीण म्हणून .
टोटल गडबड

शाहू राजे झालेले महेश मांजरेकर अख्ख्या सिनेमात बोदल्यासारखे बसून राहिले होते. एकदाही उठले नाहीत.
<<<
Rofl

मोगा, त्या मैत्रिणीच्या नवर्‍याचा अस्थीकलश मोठा होता. हा मला गंगेच्या गडूसारखा वाटला. पण कदाचित असेलही अस्थीकलश. ती मैत्रिण काशीबाईंना शाप देवून जाते आणि कलश ठेवून जाते. तो कलश बाजीरावांच्या मृत्यूनंतर नर्मदेत काशीबाई विसर्जन करणार असतील. पण अश्या कठिण प्रसंगी पुण्याहून तो कलश घेवून रावेरखेडीला जायचं बरं सुचलं काशीबाईंना.

शाहू राजे झालेले महेश मांजरेकर अख्ख्या सिनेमात बोदल्यासारखे बसून राहिले होते. एकदाही उठले नाहीत.>> हे वाक्य कहर आहे. Rofl

ते प्रतिकात्मक सिनेम्याटिक आहे.

नेमका त्या क्षणी गंगा गडुही नसेल वा कलशही.

पहिला सीन व शेवटचा सीन यातली लिंक जोडताना मला तो कलश वाटला.

शाहू राजे झालेले महेश मांजरेकर अख्ख्या सिनेमात बोदल्यासारखे बसून राहिले होते. एकदाही उठले नाहीत.>>

याचा अर्थ आपण सिनेमा नीट पाहिलेला नाही.

अय्या! कधी उठले होते? Uhoh

आणि माझं लक्ष सारखं त्यांच्या सिंहासनाच्या हँडरेस्टवर ठेवलेल्या हाताच्या पंजाच्या हलणार्‍या बोटांकडेच जात होतं Sad मी घरातल्यांना म्हटलंही की हे सारखे बोटं का हलवतायत.

Rofl कुठल्याही 'मांजरे'करांना 'सिंसनावर बसल्यावर कसे उठावेसे वाटेल.. Proud

बसलेल्या मांजरेकरांसाठी का होईना चित्रपट पाहतोच एकदा.. !

मी घरातल्यांना म्हटलंही की हे सारखे बोटं का हलवतायत. >>> तू तुझ्या घरातल्यांना विचारलंस ना? च्च! शाहू महाराजांच्या घरातल्यांना विचारायला हवं होतंस.

च्च! शाहू महाराज्यांच्या घरातल्यांना विचारायला हवं होतंस.>>>> "चला! सातार्‍याला" असं रणवीर झोकात म्हणाला तेव्हा त्याच्याबरोबर जायला हवं होतं निमित्त करुन Wink

आठवलं !

चला! सातार्‍याला" असं रणवीर झोकात म्हणाला तेव्हा त्याच्याबरोबर जायला हवं होतं निमित्त करुन डोळा मारा >>>>>

त्यानंतर , छत्रपती , बाजीरावाला तलवार भेट देतात , शस्त्रागारात Happy

या इथल्या प्रतिसादांकरिता का होईना बाजीराव-मस्तानी चित्रपट पहावा म्हणतो एकदा.
सगळे टक्के टोपणे जरुर आठवतील चित्रपट बघताना.

बादवे : मांजरेकर साहेबांना छत्रपति बनायची लै हौस, त्या " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" मधे ही महाराजांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आणी आयबॅग्ज लोंबलेल्या ! (इथे त्या दिसण्यावर एक जबर्दस्त कॉमेंट करायचा विचार होता पण "शिवाजी महाराज" हा विषय म्हणुन नाही लिहीत)

Pages