"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

# ध चा मा - 2015
मूळ मेसेज असा होता -

बाजीराव मस्तानी "चित्रपट पाहू नये"

आनंदीबाईनी तो असा फॉरवर्ड केला

"चित्रपट पाहून ये"

रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे>>>

नेल्ड ईट! अगदी अचुक विश्लेषण!

बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे /// बाजीराव आहेत, बाण तर पकड़नारच ना!
थोडक्यात आढावा आवडला +१

तेच तर तिथे रजनिकांत ताशी ३६०० किमी वेगाने येत असलेली बंदुकीची गोळी हाताने पकडतो ते चालते आपला बाजीराव नुसता ताशी १५ ते २२ किमी वेगाने येत असलेला बाण पकडतो ते मात्र चालत नाही.

व्वा व्वा

Saw Bajirao Mastani. It is not a romantic historical period drama, but an unintentional comedy. Deepika was miscast and hence, predictably terrible - Bundelkhandi Rajput-Muslim princess who spoke Hindi/Urdu with her usual, strange accent and danced very, very badly.
They should have taken a trained classical dancer who spoke fluently, with good diction.
Ranveer Singh's Puneri Hindi accent started from the city and then took a long walk, eventually getting lost somewhere. :प

And finally, their judaai-ka-dard scenes were just hilarious.

फेसबुकवर एकीची प्रतिक्रीया....

आ-ताच पाहिला. खुप आवडला. पेशव्यांचा अपमान होईल असे काहिच नाही चित्रपटात. रणवीरने बाजीराव मस्त साकारलाय. सगळेच आपापल्या भुमिकेत छान वाटलेत.

अगदि एपिक नाहि म्हणता येणार, पण भंसाळीच्या रेप्युटेशनला जागणार चित्रण आहे, असं म्हणु शकतो. एकदा पहायला हरकत नाहि.

मांजरेकरने आता फक्त छ. संभाजी महाराजांचा रोल पडद्यावर साकारावा, तिन्ही छत्रपती पडद्यावर साकारल्याचा रेकॉर्ड होउन जाईल... Happy

मी बाजीराव मस्तानी या नाटकाबद्दल बोलत होतो, पण या चर्चेवरुन आता त्यात बाजीरावाची भुमिका कोण करत होतो, त्याबद्दल माझ्याच मनात संभ्रम निर्माण झालाय. हे नाट्क पहिल्यांदा रविराज तू, मी रोहिणी या नावाने आले होते, त्यात सुहास जोशी ( हो राधाक्का सुहास जोशी ), मस्तानीची भुमिका करत असत. त्या कथ्थक जाणतात

पण मी बघितलेल्या प्रयोगात नृत्यसमशेर माया जाधव मस्तानीच्या भुमिकेत होती. त्या नाटकातही मस्तानीबद्दल ज्या दंतकथा प्रचलित होत्या त्याचा समाचार घेतला होता. त्यातली मस्तानी म्हणते, गळ्यातून उतरणारी पिंक दिसायला, मस्तानीला काय पंडूरोग झाला होता का ?

मनात सहजच विचार आला, कि जी कथा आपण इतिहास मानतोय, त्यात तरी किती सत्य आहे ? बखरकारांनी जे लिहिलेय तेच सत्य मानत आलोय आपण.
मग त्याच न्यायाने जर रामायणाला कणभर तरी इतिहासाचा आधार असेल तर रावणाच्या दहा तोंडापासून मारुतीच्या अवतारापर्यंत सगळे कल्पनाविलासच आहेत कि !

मला इथे इमिटेशन गेम्स या चित्रपटाची आठवण होतेय ( सविस्तर लिहितो नंतर ) चित्रपटासाठी इतिहासातील अनेक घटनांना वेगळे रुप दिले असले तरी त्यातील कथेचा गाभा मात्र जपलाय.

फर्स्ट हाफ ३०० चे हिंदी वर्जन. दुसरा हाफ शनिवारवाडा इन अ‍ॅलिस इन वन्डरलँड.
बेंब्या दाखवणार्‍या नववार्‍या बघवत नाहीत.

मस्तानीचा गळा अनब्रेकेबल ग्लासचा होता.
किंवा त्याकाळी एफआरपी तंत्रज्ञान होते असं सिद्ध होतंय या दंतकथेतून.

हो दिनेशदा ते नाटक मी टीव्हीवर बघितलं, हा डायलॉगपण आठवला. माया जाधव आठवली पण बाजीराव आठवत नाहीयेत. आठवेल कदाचित नंतर.

वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. >>> काहीशी नाही बरीचशी. भले उथळता व्यक्तीसापेक्ष असली तरी माझ्यासारख्या वाह्यात मुलालाही त्याचे चाळे रुचले नाहीत यातच सारे आले.

बाकी त्याचा अभिनय चांगला असला तरी त्यात तो एक्स फॅक्टर नाही जो एका अभिनेत्याला स्टार वा सुपर्रस्टार बनवतो.

मला बाजीराव-मस्तानी खरे तर बघायची उत्सुकता आहे, कारण इतिहास शालेय अभ्यासक्रमात होता तेवढाच माहीत. भन्सालींनी त्यापेक्षा जास्त दाखवला असावा ही अपेक्षा. मात्र एवढा वेळ भले दिपिका प्रियांका असल्या तरी रणवीरसिंगला सहन करणे जरा अवघडच वाटल्याने मोबाईलवर बघणेचा उत्तम. तिथे पुढे ढकलायची सोय असते Happy

चित्रपट बरा आहे. दिलवाले सारखा बिनडोक नक्कीच नाही. ते "वाट लावली" गाणे सोडले तर objectionable काही नाही वाटले (ते बेंबीखाली नौवारी इथे वाचेपर्यंत लक्षात आले नव्हते Happy )

भन्साली संगीताबद्दल कंजुषी का करतोय? स्वतः संगीत द्यायचा अट्टाहास का? हम दिल दे चुके सनम च्या चाली कधीपर्यंत Recycle करणार..त्याने "अलबेला सजन" पण रीपीट केले "राग" बदलुन.. आधीचा "अहिर भैरव" होता..नवीन कुठला कोणाला माहित आहे का?

राहुन राहुन वाटते हा चित्रपट सुबोध भावेने मराठीत काढला तर?

नवीन अलबेला सजन ... देसकार राग वाटतो.

मोहे रंग दो आज ,.. पुरिया कल्याण वाटतो. अगदी सांज ये गोकुळी स्टाइल... यमन कल्याण व शेवटी हलका कोमल रे... ( बरोबर ? )

काल नाशिकच्या एका कलादिगदर्शिकेबद्दल लोकसत्ता मधे वाचले. सोबत जो फोटो होता, त्या वाड्यातल्या रांगोळ्या काही मला पटल्या नाहीत. तश्या आ़कृत्या, तसे रंग एवढेच नव्हे तर रांगोळी काढताना बसायची तशी तर्‍हा पण त्या काळातली वाटत नाही. चित्रपट बघताना असे लक्ष देत बसलो तर नाही बघू शकणार, पण ते सगळे विचार बाजूला ठेवून नक्कीच बघेन.

वाड्यातली मोठी रांगोळी खडूने काढल्यासारखी वाटते. इन फॅक्ट एक बाई मधेच रंग भरत बसली आहे तिच्या आजूबाजूला उरलेली रांगोळी खडूने काढल्यासारखी दिसलीसुद्धा.

ती रांगोळी पेंटेडच आहे, काशीबाई पहिल्याच सीन मधे त्यावरून चालत जाते , काही होत नाही Happy
नंतर अल्बेला सजन ला त्याच जुन्या रांगोळीत बायका रंग भरताना दाखवल्यायेत !

रांगोळीत रंग भरायची पद्धत आपल्याकडे खुप नंतर आली असणार. चैत्रांगण, गोपद्म वगैरे अवश्य काढले जात आणि त्यावर हळद कुंकू टाकतही असत ( नुसती पांढरी ठेवायची नाही हा दंडक ) इतर रंग नक्कीच नव्हते.. पण असो ( Wink ) जर दृष्य म्ह्णून ते छान दिसत असेल तर, चालवून घेऊ.

पाहिला बाजीराव मस्तानी, एकदा बघायला ठिक आहे पण ट्रेलरमधे दिसतो तितका एंटरटेनिंग नाही वाटला !
स्पॉयलर
आवडलेल्या गोष्टी :
रणवीर : पूर्ण सिनेमा रणवीरचा आहे , एंट्री पासून प्रत्येक सीन मधे बाजी मारलीये त्यानी !
फक्त मराठी अ‍ॅक्सेंटच नाही तर वाट्याला आलेले सगळे मराठी वन लायनर्सही उत्तम बोललाय , युध्दाच्या सीन्स मधला रफ अँड टफ बाजीराव पण झकास !
दिसतो तर कमालीचा देखणा .. आधी बिन मिशीचा तरुण बाजीराव ते मिड एज मधला बाजीराव , माशाअल्लाह... मस्तानी फिदा नसती झाली तर नवल :).
तन्वी आझमी : ही सिनेमा मधे सर्वात अस्सल !!
बाजीरवांच्या आईच्या सगळ्या शेड्स कमाल साकारल्यायेत !
वैभव तत्त्ववादी : चिमाजी अतिशय ऑथेंटीक पेशवाई दिसतो , एरवी जास्त लांब दिसणारं नाक इथे अगदी शोभून दिसतं ,
अ‍भिनय पण मस्तं !
यतिन कार्येकर त्याच्या भूमिकेत एकदम फिट्ट !
मिलिंद सोमण देखणा दिसतो !
दीपिका : तिच्या परीनी प्रयत्न केलाय पण तिचे तलवार बाजी रफ अँड टफ अ‍ॅक्शन सीन्स , तन्वी आझमी बरोबर आणि पेशव्यांशी करारी संघर्ष सीन्स फक्त आवडले !
पण तितकेच नृत्त्य , हळुवार प्रेम सीन्स जाम फसलेत आणि दिसण्यात कुठेच मस्तानी नाही तर सुपरमॉडेल कायम आणि हिंदी अ‍ॅक्सेंट नेहेमीची दीपिका!
डॉयलॉग्ज्स :
आवडले बरेचसे संवाद , मराठी वाक्यही उगीच फेकल्यासारखी नाही वाटत , सिनेमात चांगली ब्लेंड झालीयेत !
प्रियांका फक्त एका सीन मधे आवडली, मस्तानीला शिवलेली नौव्वारी द्यायला येते तेंव्हा हळदी कु़कु लावताना , '
हं, घ्या, लावा अता (ंमलाही) " , म्हणताना Happy
वाट्याला आलेली मराठी वाक्यं बरीच शुध्द बोललीये प्रियांका !
बाकी सेट्स वगैरे ग्रँड असणारच होते , पहिल्या डिस्क्लेमर नंतर शनिवार वाड्यात मुघल स्टाइल शीश्महल का वगैरे अचाट आणि अतर्क्य गोष्टीं बद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही !
काय खटकलं .........................
सगळ्यात मिसफिट प्रियांका !!
काशीबाई दिसते आणि वागतेही वेड्या सारखी , उडी मारून सासूच्या मांडिवर बसते तो सीन कहर विनोदी आहे !
मैत्रेयीने लिहिलं होतं तसं भन्सालीनी पायाऐवजी डोक्याने अधु दाखवलीये बहुदा !
कथानक :
भन्साली लव्ह स्टोरी दाखवताना फसलाय असं माझं मत !
मुळात बाजीरव मस्तानी प्रेमकहाणी इमोशन्स काही दिसले नाहीत, एक कट्यार दिली बाजीरावानी आणि बुन्देलखंड परंपरेनुसार आली ती पुण्यात, बराच काळ पेशव्यांनी लांब ठेवलं तिला कारस्थानानी , भेटुच दिलं नाही बाजीरावला तर इतकं प्रेम बसलं कधी बाजीरावाचं नक्की , हे मलाच समजलं नाही बहुदा , तिच्यावर इंप्रेस होतो तिची स्किल्स पाहून हे फक्तं पोचलं !
प्रेमात डारयेक्ट संघर्ष, यातना दिसल्या ? डिड आय मिस समथिंग ??
युध्दाचे सीन्स :
दिसायला छान दिसतात पण फारच रजनीकान्त स्टाइल झालेत, बाहुबलीच्या भव्यतेशी कुठेही मॅच नाही !
अर्थत इथे बाजीरव इतिहासात इतक्या सगळ्या लढाया खरोखर जिंकलाय त्यामुळे रजनीकान्त फॅक्टर माफ करु शकतो आपण Happy
बाजीराव शूर होता हे वाचलय पण एक कमालीचा अचाट सीन म्हणजे समशेर बहाद्दुरच्या जन्माच्या वेळी मस्तानीला कोणी दाइ मदतीला जात नाही म्हणून बाजीराव स्वतः डिलिव्हरी करतो Uhoh
अजुन एक विनोदी सीन : बाजुला पालतु कुत्त्याला बसवावं तसा निजाम वाघाला घेउन बसलेला दाखवलाय Proud
कॉस्च्युम्स :
ह्युज डिसपॉइंटमेंट !!
काशीबाईच्या सगळ्याच साड्या शिवलेल्या पटियाला सलवार सारख्या दिसतात, त्यावर मिसमॅच वेल्वेटची ब्लाउजेस .. अगदीच बेक्कार !
मस्तानीच्या 'दिवानी मस्त्नानी ' गाण्यातल्या ड्रेसचे कलर केवळ शीशमहल इंटीरिअर ला मॅच करायचे म्हणून इतके डल ???
अगदीच मळका रंग !
मेकअप पण फसलाय , दीपिका खूप अ‍ॅनिमिक दिसते , आय मेअकप इज मिसिंग !!!
मस्तानी ऐवजी ते काजळ मिलिंद सोमणच्या डोळ्यात का टाकलं कळलं नाही Proud
पेशव्यांचा कपडेपट मात्रं आवडला !
सिनेमातली पात्रं कधी 'पूना' कधी 'पुणे' असं वाटेल ते म्हणतात , कन्सिस्टन्सी नाही !
संगीत :
चक्क यावेळी गाणी नाही फारशी आवडली, ओके आहेत पण नो मॅच टु रामलीला - देवदास्स- हम दिल !
इथे अजय अतुल ला का नाही घेतलं ???
गाण्याच्या सिच्युएशन्स :
पिंगा : इतिहासाशी प्रामाणिक नाही हे भन्सालीनी आधीच लिहिल्यानी अता मंगळागौरीच्या गाण्यावर लावणी आणि कथ्थक बद्दल काही लिहित नाही पण मुळात गाण्याच्या आधीच्या सीनला दोघींचे संवाद काहीप फार प्रेमळ नाहीत त्यामुळे प्रेमानी एकत्रं नाचणे , बात कुछ जमी नही !
डोला रे डोला नाही खटकलं कारण तिथे पारो चन्द्रमुखी खरच चांगल्या मैत्रीणी बनल्यायेत !
असो, बाकी मल्हारीचे शब्द खटकले असले तरी बाजीरवांचं नाचणं मला तरी नाही खटकलं!
तर हे सगळं असून एकदा बघायला हरकत नाही कॅटॅगरीतला :).
मस्तानी म्हणून हम दिल च्या काळातली ऐश्वर्या आणि काशीबाई म्हणून तरुण विद्या बालन किंवा राधिका आपटे असती तर जास्तं आवडला असता !

बाजीराव मात्रं फक्त रणवीर !!

काशीबाईच्या सगळ्याच साड्या शिवलेल्या पटियाला सलवार सारख्या दिसतात, >> काशीच्या नौवारपेक्षा कृती सनोनची "मनमा इमोसन" मधली प्यांट जास्त नौवार वाटते. अ‍ॅक्ट्रेस आणि कपडेपट मास्टर ह्यांना पदर आणि मिस वर्ल्डचा सॅश ह्यातला फरक समजवून देणारा क्लॉज कॉन्ट्रॅक्ट मध्येच घालावा.

>>
तेच तर तिथे रजनिकांत ताशी ३६०० किमी वेगाने येत असलेली बंदुकीची गोळी हाताने पकडतो ते चालते आपला बाजीराव नुसता ताशी १५ ते २२ किमी वेगाने येत असलेला बाण पकडतो ते मात्र चालत नाही.

व्वा व्वा
<<
रजनीकांतने आचरटपणा केलेला चालतो म्हणजे काय? त्याच्यावरही शेरेबाजी होतेच की. अतर्क्य आणि अचाट अशी संभावना होतेच की त्याची. आणि कुठल्यातरी पूर्णपणे काल्पनिक सिनेमात जो धुडगूस घालायचाय तो घाला पण जेव्हा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीवर जेव्हा सिनेमा बनतो तेव्हा दाखवले जाणारे प्रसंग जास्त मोजून मापून पाहिले जातात.
धरमवीर सारख्या कृतक ऐतिहासिक सिनेमात धर्मिंदर लांडी चड्डी घालून झीनत अमानच्या मागे "ओ मेरी मेहबूबा" अशी गाणी म्हणतो आणि तो लोकांना चालतो म्हणून बाजीरावनेही तसे केले तरी हरकत नाही असे तर्कट कुणी मांडले तर मला तरी ते तर्कदुष्ट वाटेल.

बाजीराव शूर होता हे वाचलय पण एक कमालीचा अचाट सीन म्हणजे समशेर बहाद्दुरच्या जन्माच्या वेळी मस्तानीला कोणी दाइ मदतीला जात नाही म्हणून बाजीराव स्वतः डिलिव्हरी करतो>>

हो हा सीन फार विनोदी वाटला. रणवीर दिपिकाला म्हणतो हा अब सास लो.. ऐसा लो.. सगळे प्रेक्षक तेंव्हा हसत होते. तो सीन काहीच्या काही वाटला. तसेच त्याचे गाणे 'वाट लागली..' हे गाणे पण नको होते सिनेमात.

मला सर्वात जास्त अभिनय तन्वी आझमी आणि मिलिंद सोमण ह्यांचा आवडला.

दीपांजली, जे पेशवे होते ते 'पुणे' म्हणत आणि जे मुस्लिम होते ते पूना म्हणत होते.

Pages