'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

सगळ्या समाजाची गरज आहे असा प्रश्न ज्यात आहे त्या लेखाच्या शोधात आहे, कोणाला सापडला तर जरुर सांगा.

<समलैंगीकत्व समुपदेशनाने किंवा इतर घटकांनी प्रभावित होऊन बदलवले जाऊ शकत असेल तर पूर्ण धाग्यातील मध्यवर्ती संकल्पना उभी राहात नाही.>

बेफिकीर,
पुन्हा एकदा. Happy

आयसीडी-१० ही यादी बघा.
त्यात 'समलैंगिकता' आहे का, हे बघा.
ती नाही.
त्यामुळे तो आजार नाही.
त्यामुळे तो डॉक्टर बरा करू शकत नाहीत.

हे सगळं आधी लिहिलं आहे.

हेही एकदा वाचून बघा - http://www.mibba.com/Articles/Science/3627/You-Cant-Cure-Homosexuality-A...

बेफिकीर,
पुन्हा एकदा. स्मित

आयसीडी-१० ही यादी बघा.
त्यात 'समलैंगिकता' आहे का, हे बघा.
ती नाही.
त्यामुळे तो आजार नाही.
त्यामुळे तो डॉक्टर बरा करू शकत नाहीत.

हे सगळं आधी लिहिलं आहे.<<<

चिनूक्स, तुमचा हा प्रतिसाद त्या प्रतिसादाचे उत्तर होऊ शकेल जर मी असे म्हणालो असेन की समलैंगीकता एक आजार आहे. तुम्ही सरमिसळ का करत आहात हे समजत नाही आहे. समलैंगीकता समलिंगींसाठी नैसर्गीक व भिन्नलिंगींसाठी अनैसर्गीक असू शकते / आहे / असते हे मान्य करायला नेमका प्रॉब्लेम काय आहे?

आजार कोण म्हणतंय तिला?

मग आजार म्हणत नसाल, तर समलैंगिकता डॉक्टर समुपदेशनाने बरी करू शकतात, हा मुद्दा संयत चर्चेनं दाबून टाकला, हे वरच्या पोस्टीत तुम्हीच लिहिलं आहे. Happy

मी 'समुपदेशन किंवा इतर घटक' असे लिहीत आलो आहे.

समजा एकजण जन्मत: समलिंगी आहे, बाकीचे लोक भिन्नलिंगी असतात हे त्याला ज्ञात आहे पण त्याला एक समलिंगी साथीदार मिळालेला असून तो आनंदाने जगत आहे.

उद्या जरः

१. एखाद्या दुसर्‍या समलिंगीने किंवा त्याच साथीदाराने भयानक किंवा किळसवाणे (म्हणजे समलैंगीकतेलाच नैसर्गीक मानणार्‍याच्याही मते भयानक किंवा किळसवाणे) शारीरिक वर्तन केल्यामुळे त्याला भिन्नलैंगीकता आवडू लागली तर?

२. चुकून भिन्नलिंगी संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातील आनंद हा खूपच वेगळा, अधिक समाधानदायी असतो असे वाटल्याने लैंगीकता बदलली तर?

की असे म्हणणे आहे की समलिंगी हे भिन्नलिंगी होऊच शकत नाही व भिन्नलिंगी हे समलिंगी होऊच शकत नाहीत? (आणि मग दोन्ही प्रकारचे संबंध ठेवणारे कोण?)

<समलैंगीकता समलिंगींसाठी नैसर्गीक व भिन्नलिंगींसाठी अनैसर्गीक असू शकते / आहे / असते हे मान्य करायला नेमका प्रॉब्लेम काय आहे? >

हे मान्य केलं आहे. खूप अगोदरच. पण केवळ भिन्नलिंगींना अनैसर्गिक वाटते, म्हणून ती अस्तित्वात असू नये, किंवा तो गुन्हा ठरावा, हे चूक. हेही तुम्हांला मान्य असेल, तर वादाचा प्रश्नच नाही. Happy

समलैंगीकत्व समुपदेशनाने किंवा इतर घटकांनी प्रभावित होऊन बदलवले जाऊ शकत असेल तर पूर्ण धाग्यातील मध्यवर्ती संकल्पना उभी राहात नाही.>>>> इथे थोडासा ग्रे एरिया असू शकतो. कदाचित ते "बदललेले" समलैंगिक मुळातच बाय सेक्शुअल असतील. किंवा सोशल कंडिशनिंगमुळे "होयबा तुमचंच खरं" म्हणून गप्प राहिले असतील./

समलैंगिकत्व बदलले गेले आहे याचे मानक कसे ठरवणार? त्या व्यक्तीने लग्न केले म्हणून? मुले झाली म्हणून?

गेल्या अख्ख्या लेखामधे आणि चर्चेमधे हाच मुद्दा येऊन गेलेला आहे. समाजाच्या इतर घटकांच्या दबावामुळे समलिंगी कित्येकदा आपले ओरियेण्टेशन लपवायला बघतात आणी परिणामी, मानसिकरीत्या कुजत राहतात. अशा व्यक्तींनी भिन्नलिंगी व्यक्तीशी विवाह केल्याने त्या दोघांमधेदेखील एक निकोप नाते तयार होऊ शकत नाही , परिणाम्ती त्या व्यक्तीच्या आयुस्।याची देखील ससेहोलपट होते. समाजाची जागृती, जाअणीव विकसित करणे याचसाठी गरजेचे आहे.

हे मान्य केलं आहे. खूप अगोदरच. पण केवळ भिन्नलिंगींना अनैसर्गिक वाटते, म्हणून ती अस्तित्वात असू नये, किंवा तो गुन्हा ठरावा, हे चूक. हेही तुम्हांला मान्य असेल, तर वादाचा प्रश्नच नाही. स्मित<<<

हे कधी व कोणी मान्य केलं चिनूक्स? माफ करा, पण लोकं येथे परदेशातील दाखले, सती, विधवा, पारधी वगैरे दाखलेच देत बसले. एकमेकांच्या बुद्धीवर शंकाच घेत बसले. रिकामे दगड अशी संभावना करत बसले इतरांची! ह्या सर्व प्रतिसादसमुद्रात तुम्ही जर कोठे इतकेच मान्य केले असलेत की

'भिन्नंलिंगीयांच्यामते समलैंगीकता अनैसर्गीक असणे हेही नैसर्गीक आहे'

तर माझ्यापुरती तरी ही चर्चा संपली.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

साती, यांना याच धाग्यावर परिस्थितिजन्य नसलेले समलैंगिकत्व टाळण्यासाठी, बदलण्यासाठी काय करायला हवे ते विचारलेले आहे. त्यांचे उत्तर तुम्हाला दिसले असल्यास दाखवून द्यावेत.

समुपदेशनाला अजिबात नकार नाही. जे संभ्रमात (संभ्रमही परिस्थितिजन्य असू शकतो, बहुतांशी असतो) आहेत त्यांची समुपदेशनाची गरज कोणीही नाकारत नाही. पण समुपदेशकाची भूमिकाही निकोप हवी. आधी लिहिले होते : काही समुपदेशक अशा संभ्रमावस्थेतील मुलांना उद्दीपन करतील अशी अर्थातच समलिंगी चित्रे दाखवून त्यांच्या गुप्तेंद्रियांना इलेक्ट्रिक शॉक देऊन त्यांचा लैंगिक कल बदलण्याचा दावा करतात.

काही व्यक्ती केवळ परिस्थितीवश किंवा संधी मिळाली म्हणून समलिंगी संबंधांचा अनुभव घेतात. (निव्वळ समलिंगींपेक्षा gays & lesbians उभयरतींचे bisexuals : प्रमाण बरेच जास्त आहे) नंतर आपल्याला भिन्नलिंगी संबंध जमतील की नाही याबद्दल त्यांच्या मनात साशंकता येते. अशांना समुपदेशन मिळू नये असे कोणीही म्हणत नाही.

लक्षात घ्या, समलिंगी हे कोणी धर्म/पंथ/इज्म/पक्ष प्रसारक/प्रचारक नाहीत. आपली संख्या वाढवण्याचा त्यांचा हेतू नाही.
जिथे समाजात मोकळेपणा वाढल्याने समलिंगींचे प्रमाण वाढले असे वाटते तिथे ते जाहीर /कबूल करण्याचे प्रमाण वाढलेले असते.

बेफिकीर,

दोन्ही लिंगांकडे आकर्षण असणार्‍या व्यक्ती असतात. तसंच, 'आपण नक्की कोण?' हा शोध घेणार्‍याही व्यक्ती असतात. हा शोध संपला की त्या स्थिरावतात. मात्र एक खूप मोठा वर्ग जन्मत: समलिंगी असतो. कसा, ते जिज्ञासाने आधी लिहिलं आहे.

समलैंगिकता समुपदेशनाने, मनोविकार तज्ज्ञाची ट्रीटमेंट घेतल्याने बरी होते, असा प्रचार करणार्‍या डॉक्टरांवर बंदी आणण्याचा विचार ब्रिटिश सरकार करत आहे.

स्वतःच्या लैंगिकतेबद्दल गोंधळ असू शकतो. त्यांनी जरूर समुपदेशनाचा मार्ग अवलंबावा, कारण दोन्ही लिंगांच्या व्यक्तींबद्दल आकर्षण असणार्‍या व्यक्तीही असतात. मात्र कोणी 'समुपदेशनामुळे समलैंगिकता बरी होते' असं सांगत असल्यास ते चूक आहे.

< चार भिंतींच्या आत कोण काय करतो ह्याच्याशी इतरांचा संबंध नाही हेही सर्वांनाच मान्य आहे.

. फक्त त्या समलैंगीकतेला मानवतावाद, नॉमिनेशन्स व लग्नबिग्न करण्याच्या परवानगीचे औदार्य, अमेरिका युरोप येथील दाखले ह्या आधाराने 'नैसर्गीक' मानायला लावू नयेत. ती अस्तित्वात आहे हे मान्य आहे, ती अनैसर्गीक वाटणे हेही तितकेच नैसर्गीक आहे. >

इतरांचा संबंध नाही तर अशा इतरांशी आपण जसे वागतो तसेच समलिंगींशी वागणे अशक्य का ठरते? हे इतर जसे राहतात तसेच समलिंगींनी राहण्यास विरोध का? त्यामुळे "समाजाचे" नक्की काय नुकसान होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे अनेकदा विचारूनही मिळालेली नाहीत.

>>>समलैंगिकता समुपदेशनाने, मनोविकार तज्ज्ञाची ट्रीटमेंट घेतल्याने बरी होते, असा प्रचार करणार्‍या डॉक्टरांवर बंदी आणण्याचा विचार ब्रिटिश सरकार करत आहे. <<<

मला ब्रिटिश सरकारशी काय करायचं आहे राव?

लक्षात घ्या, समलिंगी हे कोणी धर्म/पंथ/इज्म/पक्ष प्रसारक/प्रचारक नाहीत. आपली संख्या वाढवण्याचा त्यांचा हेतू नाही.<<<

हे वाक्य आवडलेही आणि हे आधीपासून मान्यही आहे.

जिथे समाजात मोकळेपणा वाढल्याने समलिंगींचे प्रमाण वाढले असे वाटते तिथे ते जाहीर /कबूल करण्याचे प्रमाण वाढलेले असते.<<< हे पटत आहे, पण हा येथला मुद्दा नाही, त्यामुळे एक नवीन फाटा नको.

<हे कधी व कोणी मान्य केलं चिनूक्स?>

बेफिकीर,
आधीचे प्रतिसाद वाचा हो...
कोणाला नैसर्गिक वाटो, कोणाला अनैसर्गिक..केवळ अनैसर्गिक वाटतं, म्हणून गुन्हा ठरवू नका, समान हक्कांना विरोध करू नका, इतकंच सांगणं आहे. आणि हे खरंच अनेकांनी आधी लिहिलं आहे. Happy

इतरांचा संबंध नाही तर अशा इतरांशी आपण जसे वागतो तसेच समलिंगींशी वागणे अशक्य का ठरते? हे इतर जसे राहतात तसेच समलिंगींनी राहण्यास विरोध का? त्यामुळे "समाजाचे" नक्की काय नुकसान होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे अनेकदा विचारूनही मिळालेली नाहीत.<<<

फक्त 'माझे' प्रतिसाद शोधलेत तर किमान चार ठिकाणी मी म्हणालेलो आहे की व्यक्तीशः मी अश्यांना वेगळे समजणारच नाही, समानच मानेन (किंबहुना, मी त्यांना समान मानेन ह्यात मला काही फार अभिमानास्पद वाटण्याचेही कारण नाही कारण मी किंवा ते ह्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे काही नाहीच).

पण त्यांच्या ओरिएन्टेशनला अनैसर्गीक मानण्याचा मला नैसर्गीक अधिकार आहे इतकेच माझे म्हणणे आहे.

बाकी, त्यांच्यामुळे समाजाचा फायदा काय होणार आहे हाही एक प्रश्नच आहे म्हणा, पण मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्या अस्तित्वाचा स्वीकार हे मुळीच न पटण्यासारखे नाही हे मीही आधीपासून म्हणतोच आहे.

<मला ब्रिटिश सरकारशी काय करायचं आहे राव?>

भारतीय डॉक्टर, शास्त्रज्ञ स्वयंभू नाहीत. तिकडचंच ज्ञान आपण इकडे वापरतो. त्यामुळे सतत समुपदेशनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानं ब्रिटिश सरकारचा दाखला दिला आहे.

केवळ अनैसर्गिक वाटतं, म्हणून गुन्हा ठरवू नका<<<

ह्यावर तर मीच शंका विचारलेली आहे की त्याला गुन्हा का म्हंटले जावे?

,

<बाकी, त्यांच्यामुळे समाजाचा फायदा काय होणार आहे हाही एक प्रश्नच आहे म्हणा, >

बेफिकीर,
तुम्ही हा प्रतिसाद तुमच्या संगणकावर टाइप केला. इंटरनेटच्या एका साईटीवर. अ‍ॅलन ट्युरिंग नामक एका व्यक्तीमुळे तुम्ही हे करू शकलात. तो समलिंगी होता.

बाकी, तुमच्या या वाक्याबद्दल आधी लिहून झालं आहे. समाजातल्या काही माणसांमुळे समाजाला काय फायदा होतो, या प्रश्नाचं उत्तर देण्यामुळे येणारी हताशा भयानक आहे.

भारतीय डॉक्टर, शास्त्रज्ञ स्वयंभू नाहीत. तिकडचंच ज्ञान आपण इकडे वापरतो. त्यामुळे सतत समुपदेशनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानं ब्रिटिश सरकारचा दाखला दिला आहे.<<<

ही एक शरमेची बाब म्हणावी लागेल. असो!

<ह्यावर तर मीच शंका विचारलेली आहे की त्याला गुन्हा का म्हंटले जावे? >
कारण कायदा अशा लैंगिक संबंधांना गुन्हा मानतो. कायदा भिन्नलिंगी संबंधांमधील काही क्रियांनाही गुन्हा मानतो. कायदा १८६० साली लिहिला गेला. आज आहे २०१३ साल.

अ‍ॅलन ट्युरिंग नामक एका व्यक्तीमुळे तुम्ही हे करू शकलात. तो समलिंगी होता.<<<

जो अ‍ॅलन ट्युरिंग जन्माला येण्यासाठी भिन्नलिंगीं जोडप्याची गरज होती Happy

<ही एक शरमेची बाब म्हणावी लागेल. असो!>

आपल्याकडे संशोधन होत नाही, ही शरमेची बाब असू शकेल. पण संशोधनक्षेत्रात प्रत्येक देशानं अमूक एक संशोधन करून, ते सिद्ध करून मगच नियम मानण्याची गरज नसते. थर्मोडायनामिक्सचे, न्यूटनचे गतीचे, ह्यूम-रोथरीचे संयुगं तयार होण्याचे नियम जगभरात सारखेच आहेत. भारतासाठी काही वेगळं नाही. ज्ञान देशांच्या सीमा पाळत नाही. जगभरात सगळं सारखंच.

<जो अ‍ॅलन ट्युरिंग जन्माला येण्यासाठी भिन्नलिंगीं जोडप्याची गरज होती स्मित>
पण त्या भिन्नलिंगी जोडप्यामुळे तुम्ही आज इथे टाइप करू शकता असं नाही. त्यासाठी अ‍ॅलन ट्युरिंगच हवा. त्यामुळे समाजाला त्याचा फायदा झालाच. विक्रम सेठमुळे माझे काही दिवस आनंदात गेले. नवरातिलोव्हाचाही काहींना फायदा झालेला असू शकतो. आहेत असे काही थोडंफार काम करणारे.

जणू असे फायदे ते लोक समलिंगी असल्यामुळेच होतात! Happy

चिनूक्स, पटेल इतपत त्यांची बाजू घेणे हे एकीकडे आणि समलैंगीकत्व म्हणजे जणू काही समाजाचे ध्येय असावे अश्याप्रकारे त्याची बाजू घेणे हे भलतेच!

जर समान मानता तर त्यांना एकमेकांचे जोडीदार म्हणून राहण्यास विरोध का? त्याने समाजाचे काय नुकसान होणार आहे?

समाजाचा काय फायदा हा मुद्दा आधी आला आहे. हा प्रश्न प्रत्येकानेच स्वतःला विचारायला नको का?

समलिंगींवर शिक्का मारल्याने समाजाचे नुकसान कसे ते सांगणारी एक बातमी :
अ‍ॅलन ट्युरिंग हा एक ब्रिटिश संगणकतज्ज्ञ. code breaker. त्याच्या कामगिरीमुळे दुसरे महायुद्ध जिंकण्यास दोस्त राष्ट्रांना मोठीच मदत झाली. समलैंगिक असल्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्याला शिक्षा ठोठावली. याची परिणती त्याने आत्महत्या करण्यात झाली. आता ब्रिटनच्या राणीने त्याला मरणोत्तर क्षमा प्रदान केली आहे.

<चिनूक्स, पटेल इतपत त्यांची बाजू घेणे हे एकीकडे आणि समलैंगीकत्व म्हणजे जणू काही समाजाचे ध्येय असावे अश्याप्रकारे त्याची बाजू घेणे हे भलतेच!>

हा तुमचा निष्कर्ष आहे. समलैंगिकत्व हे समाजाचे ध्येय नसले, तरी समानता हे ध्येय नक्की असायला हवे.

<जणू असे फायदे ते लोक समलिंगी असल्यामुळेच होतात! स्मित>

हे तुम्हीच लिहिलंत ते बरं केलंत. त्यामुळे 'समलिंगी लोकांचा समाजाला फायदा काय?' याचं उत्तर आपोआप मिळालं. Happy

या व्यक्ती समलिंगी असल्यानसल्या तरी काहीही फरक पडला नसता. त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची लैंगिकता यांचा काहीएक संबंध नाही. त्यामुळे 'त्यांचा समाजाला फायदा काय?' हा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ नये. Happy

भारतीय डॉक्टर, शास्त्रज्ञ स्वयंभू नाहीत. तिकडचंच ज्ञान आपण इकडे वापरतो.>>> या बेजबाबदार विधानाशी १०० टक्के असहमत आणि मी आणि माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांकडून आपला तीव्र निषेध !

SureshShinde,

भारतात वापरलं जाणारं वैद्यकीय ज्ञान हे पूर्णपणे भारतात निर्माण झालेलं आहे, असं तुमचं म्हणणं आहे का?

'तिकडचंच' असा शब्द न वापरता 'तिकडचं' असा वापर मी करायला हवा होता, हे मान्य. मात्र त्यामुळे माझा मुद्दा बदलत नाही. ज्ञानाची देवाणघेवाण होतंच असते, आणि आज वापरात असलेलं ज्ञान हे बहुतांश परदेशातून आपल्याकडे आलेलं आहे. वैज्ञानिक संज्ञा, थियर्‍या या बहुतांश परदेशी आहेत. बहुतेक सगळं मूलभूत संशोधन परदेशात झालेलं आहे.

आणि जगातला कुठलाच डॉक्टर, कुठलाच शास्त्रज्ञ स्वयंभू नसतो.

Pages