संस्कृत भाषेची उजळणी

Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24

इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा. Happy

संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया! Happy

+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'इथे जमलेल्या रसिकांचे वंदन करून आपण कारयक्रमाची सुरूवात करूया' असे चूकीचे मराठे बोलले जाते. >>
पण तिथे षष्ठी चा प्रत्यय येतच नाही.. मूळ मराठी शब्दच चुकीचा आहे त्यामुळे भाषांतर अजूनच चुकीचे झाले असावे...>>

हे कधीपासून म्हणायला सुरुवात केली लोकांनी? मी तर कायम रसिकांना (द्वितीया) वंदन करून असेच ऐकले आहे. सध्याची जोरदार टाळ्यांवर जगणारी अँकर जमात असलं मराठी वापरते काय? मला तरी आमच्या मराठीच्या बाईंनी शूरांना/रसिकांना वंदन असेच शिकवल्याचं आठवतंय. बाकी शूरान् वन्दे असायला हवं होतं हे बरोबर आहे कारण वंदनाची क्रिया शूरांवर होत आहे आणि कर्मार्थे द्वितीया!

संस्कृत काव्ये अफाट आहेत. ती मूळ स्वरुपात वाचल्याशिवाय आपल्याला त्यांचे एवढे कौतुक का केले जाते हे समजत नाही. 'शिशुपाल वध' हे माघ कवीचे काव्य त्यातल्या गतिचरित्रांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे काय तर त्यातले बरेचसे श्लोक विलोमपदे आहेत (पुढून वाचा मागून वाचा, सारखेच). मला कधी पूर्ण काव्य वाचायला मिळाले नाही पण हा प्रसिद्ध श्लोक ऐकला होता. याच्या दोन्ही ओळी विलोमपदात (palindrome) आहेत. जर अख्खा श्लोक विलोमपदातला आठवला कधी तर इथे टाकेन (असे खूप श्लोक त्या काव्यात आहेत पण आत्ता आठवत नाही.)

श्लोक :
वारणागगभीरा सा साराभीगगणारवा |
कारितारिवधा सेना नासेधावरितारिका ||

अर्थ : ती (सा) सेना जिच्यात पर्वताइतके (अग) मोठे हत्ती आहेत तिचा सामना करणे अतिशय अवघड आहे. ती सेना महान (ग्रेट, वरितारिका - वरतर चे रुप आहे मोस्टली) आहे आणि भयभीत (भीक्-ग्) लोकांचे आवाज (गणारव) ऐकू येत आहेत. तिने तिच्या शत्रूंचा नाश केला आहे. (कारिता + अरिवधा)

धन्या नाही.. सा रम्या नगरी महान सनृपती सामंत चक्रं च तत |पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चंद्रबिंबानना:... पुढचे काही आठवत नाही. Happy शेवट काही तरी कालाय तस्मै नमः असा आहे.

दिगोचि, लंपन - हा श्लोक म्हणताय का तुम्ही वैराग्य शतकातला ?

सा रम्या नगरी महान् स नृपति: सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बानना: |
उद्धृतः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ता: कथा:
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ||

उद्धृतः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ता: कथा: >>
आम्हाला हा श्लोक थोडा वेगळा होता - उन्मत्त: स च राजपुत्रनिवहस्ते - असा

बाकी धागा छान आहे हा. बर्‍याच सुभाषितांची उजळणी झाली.

छान वाटलं हा धागा बघून! शाळेत आठवी ते दहावी १०० गुणांचं संस्कृत होतं. घोकंपट्टी खूप असायची पण मार्कही चांगले मिळायचे Happy

पुस्तकातले नाटकांचे उतारे खूप आवडायचे, त्या बहुतेक नाटकांचे मराठी अथवा इंग्रजी अनुवाद नंतर वाचले गेले. स्वप्नवासवदत्त अतिशय आवडायचे. त्यातलं एक वाक्य अजूनही आठवतय. उदयनाचे वासवदत्तावर किती प्रेम होते हे वर्णन करत असताना एक पात्र म्हणते, 'धन्या सा: स्त्री यां तथा वेत्ति भर्ता, भर्तृस्नेहात सा दग्धाप्यदग्धा!' वासवदत्ता आगीत जळून गेली असं सगळ्यांना भासवलं असतं, पण उदयनाचं तिच्यावर इतकं प्रेम आहे की ती आगीत जळूनही न जळल्याप्रमाणेच चेतनामय, जिवंत आहे!

मालविकाग्निमित्र, मृच्छ्कटिक, मुद्राराक्षस या नाटकातले उतारेही आठवतात. नंतर ही सगळी नाटके वाचली (अनुवादित) तेव्हाही मजा आली होती.

मुद्राराक्षस हे आद्य Suspense thriller नाटक म्हणता येईल! बर्‍याच अनपेक्षित कलाटण्या आणि वेगवान कथानक आहे, शेवटी सर्व धागे एकत्र आणून व्यवस्थित स्पष्टीकरणही आहे Happy

परवा तापसवत्सराज या नाटकाचा उल्लेख वाचला, स्वप्नवासवदत्तचीच कथा पण उदयनाच्या नजरेतून. मत्रराज याने लिहिलेलं. कोणी हे नाटक वाचले/यासंबंधी ऐकले आहे का?

कोणी हे नाटक वाचले/यासंबंधी ऐकले आहे का? >> ऐकले आहे. खूप दुर्मिळ आहे. मला जेवढी माहिती आहे तेवढी देतो.
अनंग हर्ष नावाचा कलचुरी राजा होऊन गेला. त्यालाच मायुराज किंवा मत्रराज असेही नाव आहे. त्याने ८व्या शतकात तापसवत्सराज हे उदयनावर आणि उदात्तराघव हे रामायणावर, अशी २ नाटके रचली होती.

`द्विजोत्तम' म्हणजे उत्तम ब्राम्हण ना? गीतेत (१ ला अध्याय , ७ वा श्लोक) हे धृतराष्ट्राला उद्देशून म्हटले आहे का?

रावी, संजय युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला सांगत असतो. त्यात तो "दुर्योधन असे म्हणतो आहे की.." असं म्हणून दुर्योधनाचं बोलणं सुरूवातीला सांगतो. प्रत्यक्ष युद्धभूमीवर दुर्योधन गुरू द्रोणाचार्यांना "हे ब्राह्मणश्रेष्ठा, आपण मला सांगा की दोन्ही सैन्याचे बलाबल कसे आहे." असं म्हणतो. 'द्विजोत्तम' हा शब्द दुर्योधनाने द्रोणाचार्यांसाठी वापरला आहे, जो संजयाकडून सांगितला जातो. त्यामुळे ते संबोधन धृतराष्ट्रासाठी नाही.

अनंग हर्ष नावाचा कलचुरी राजा होऊन गेला. त्यालाच मायुराज किंवा मत्रराज असेही नाव आहे. त्याने ८व्या शतकात तापसवत्सराज हे उदयनावर आणि उदात्तराघव हे रामायणावर, अशी २ नाटके रचली होती.>>>

धन्यवाद पायस! हे नाटक वाचण्याची इच्छा आहे. मराठी अथवा इंग्रजी अनुवादाचा शोध सुरु आहे!

प्रज्ञा९ धन्स ! तुझी पोस्ट वाचून परत एकदा नीट वाचले आणि भवान , मदर्थे त्यक्तजीविता: चा ही संदर्भ लागला Happy

चीकू - थोडी अजून शोधाशोध केली मी तर हे सापडलं http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=363228
ठाण्यात ही इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडीज् जी काही संस्था आहे तिथे या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद निश्चित आहे. आधी गूगल हा शोध परिणाम दाखवत नव्हतं कारण त्यांनी स्पेलिंग मध्ये माती खाल्ली आहे (अनंग चं Anaga)

गुरु सारखा चालला पहिजे. माझा अंदाज.

गुरु: गुरू गुरव:
गुरुम् गुरू गुरून्
गुरुणा गुरुभ्याम् गुरुभि:
गुरवे गुरुभ्याम् गुरुभ्य:
गुरो: गुरुभ्याम् गुरुभ्य:
गुरो: गुर्यो: गुरूणाम्
गुरौ गुर्यो: गुरुषु
गुरो गुरू गुरव:

Pages