"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवजी, आपल्या लहानपणच्या व्याख्येतच फरक आहे. Light 1

आम्ही ज्या लहानपणच्या आठवणी सांगतोय, तेव्हा पडद्यावर 'अमिता बच्चन' आहे म्हणजे मारामारी असणार ह्या कल्पनेनं खुश व्हायचे दिवस होते. पडद्यावरची नावं आणि (मारामारी सोडून) इतर सीन्स ही नको असलेली गर्दी असायची. Happy

अमिता बच्चन >>> येस्स्स्स! Lol हेच नाव आहे त्याचं खरंतर.
पडद्यावरची नावं आणि (मारामारी सोडून) इतर सीन्स ही नको असलेली गर्दी असायची >>> अगदी अगदी

आम्हीपण अमिता बच्चन म्हणायचो आणि एक मित्र हरी त्याने अभिका बच्चन म्हटले त्याला हसलो होतो.
बहुतेक सुहाग? मध्ये अमिताभचा तो डायलॉग एवढा प्रसिद्ध झाला होता की मारामारी करताना मुलं खरोखर तसे करायचे:
ये क्या है?
चप्पल
कौनसी?
कोल्हापुरी
नंबर क्या है?
पुढचा काही उत्तर नाही द्यायचा, याचेच मित्र त्याच्या वतीने सगळी उत्तर द्यायचे, मग मारामारी सुरू.

लहानपणी तप केले की हळूहळू आपण तरंगायला लागतो असे वाटायचे. तसेच तरंगत वर वर जाणार असे वाटायचे. बर्‍याच वेळा तप करायच्या पोझिशन मध्ये आम्ही मित्र बसायचो. यामुळे दंगा होत नाही म्हणून घरचेही बहुतेक खूष असायचे. आम्हा काही मित्रांनी एकदा वेळ काढून खूप वेळ तप करायचे व सदेह स्वर्गात जायचे असाही प्लान केला होता. तो योग काही कधी आला नाही मात्र...

दुसरी गंमत आठवतेय म्हणजे साधारण दुसरी-तिसरीत असताना माझे दोन मित्र एकमेकांच्या शेजारी रहायचे. एकदा कशावरून तरी त्या दोघांना घरी मार पडला. दुसरे दिवशी हे दोघे खुप रागात होते. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे घरी पटत नाही म्हणून हिरो घरातून पळून जातो व स्मगलर किंवा डॉन बनतो, असा काहीसा विचार त्यांनी केला व घर सोडायची तयारी केली. म्हणजे तशी त्यावेळी समजूत होती की घराबाहेर पडले की सहजपणे स्मगलर किंवा डॉन बनता येते. दफ्तरात या दोघांनी काही कपडे ठेवले व संध्याकाळचे हळूच घराबाहेर पडले. वाटेत कोणा ओळखीच्याने संध्याकाळी का जाड दफ्तर घेऊन हे हिंडत आहेत याची चौकशी केली असताना हे स्मगलर बनायला घर सोडून चाललेत असे कळले. त्यांना धरून मग तो ओळखीचा घरी घेऊन आला. नंतर त्या दोघांच्या घरच्यांना हसावे का रडावे हेच कळत नव्हते. नंतर काही वर्षांनी आम्ही दहावीत असताना याची कोणीतरी आठवण करून दिली होती तेव्हा ते आठवून खूप हसलो होतो.

मला लहानपणी माझ्याच एका वर्गमैत्रिणीने तिच्या घरी किडनॅप करून ठेवले होते पूर्ण दिवसभर. Lol

माझी सातवीतली चांगली जिवाभावाची वर्गमैत्रीण शाळेच्या आधीचा सकाळचा क्लास संपतांना मला म्हणाली आपण आधी तिच्या घरी जाऊ (क्लास तिच्या घराजवळ होता) मग तिचे आवरून माझ्या घरी जाऊ आणि तिथून १२ वाजता शाळेत जाऊ. (शाळा माझ्या घराजवळ होती)
तिचे आईबाबा दोघेही बॅंकेत मोठ्या पदांवर असल्याने ते तिच्यासाठी जेवण बनवून ठेवून सकाळीच घराबाहेर पडत.

तर आम्ही क्लास संपवून साधारण दहा वाजता सायकल वरून तिच्या घरी पोहोचल्यावर ती म्हणे आज आपण शाळेत न जाता माझ्या घरी पत्ते, कॅरम खेळू, खाऊ, टीवी बघू वगैरे. मी हो नाही करायला लागले तर पठ्ठीने आतून कुलूप लाऊन घेत चावी लपवून ठेवली. मला वाटले ती गंमत करत आहे म्हणून आय प्लेड अ‍ॅलाँग फॉर अ बिट.
शाळेची वेळ होत आली तशी मी जाम रडकुंडीला आले. मला माझ्या घरच्या कडकलक्ष्म्या आई आजीची भितीही वाटत होती. मैत्रीणीला घरी फोन करू देत म्हंटले तर त्याकाळच्या त्या बटन डायल फोनलाही लॉक होते. मी कुलूप ऊघडायचा हट्ट केला तर त्यावर तिचा एकदम अ‍ॅग्रेसिव अविर्भाव पाहून मी बावरून गेली. शेवटी काहीच पर्याय न ऊरल्याने मी ऊसने अवसान आणून, मनातली भीती लपवत तिच्याबरोबर खेळत राहिले.

शेवटी तीनच्या सुमारास बाहेरून कोणीतरी दार जोरात वाजवले आणि ते वाजवायचे थांबेचनात. कोण आहे विचारले तर म्हणे पोलीस, ऊघडा नाही तर दार तोडून टाकू. शेवटी नाईलाजाने मैत्रीणीला कुलूप ऊघडून दार ऊघडावे लागले.

बाहेर माझे बाबा पोलिसांना घेऊन ऊभे होते. Proud

माझ्यासारखी स्कॉलर मुलगी क्लासवरून घरी येऊन युनिफॉर्म घालून शाळेत न गेल्याने मला कोणीतरी पळवून नेले असा समज आई आणि आजीने करून घेतला. त्यांनी बाबांना ऑफिसातून बोलावून आधी पोलिस स्टेशन मग पोलिसांना घेऊन क्लास, शाळा सगळीकडे विचारपूस करत (शाळेतल्या अनेक मैत्रीणी क्लासला होत्या आणि त्यांनी मला आणि माझ्या मैत्रीणीला सोबत निघतांना बघितले होते जे त्यांनी पोलिसांना सांगितले) शेवटी माझ्या मैत्रीणीचे घर गाठले.
दार ऊघडल्यावर बाबांना मला बघून खूप हायसे वाटले. त्यांनी मला विचारले क्लास वरून घरी का नाही आलीस, शाळेत का नाही गेलीस?
मी अपराधी भावनेने मान खाली घालून ऊभे होते.
मैत्रीणीने मात्र एकदम बाणेदार ऊत्तर दिले. 'आम्हाला खेळायचे होते म्हणून आम्ही शाळेला दांडी मारली'
..
झाले... घरी जाताच आईने आणि आजीने जो काही शारिरिक आणि शाब्दिक थयथयाट केला की ज्याचे नाव ते. मग मला शिक्षा म्हणून पुन्हा खोलीत बंद केले ते सकाळीच बाहेर काढले. Proud
पण आई आजीच्यामारा पेक्शाही दुसर्‍यादिवशी शाळेत जो-तो, अगदी शिक्षक सुद्धा माझ्याकडे मी अट्टल क्रिमिनल असल्यागत जे रोखून बघत होते त्या नजरा फार टोचल्या.

पुढे त्या मैत्रीणीशी फार मैत्री राहिली नाही .. भांडण असे झाले नाही पण संवाद संपत गेला.
वयात आल्यावर ऊमगले की एकुलत्या एक मुलीला सकाळी साताठ ते रात्रीच्या साताठ पर्यंतचे एकटेपण किती खुपत असेल, बोलायला, खेळायला कोणी नाही.... ज्यातून तिने असे काही बळजबरीचे खेळणे करावे.

<< स्मगलर बनायला घर सोडून चाललेत असे कळले. >>
हे एकदम भारी आहे. Lol

<< एकुलत्या एक मुलीला सकाळी साताठ ते रात्रीच्या साताठ पर्यंतचे एकटेपण किती खुपत असेल, बोलायला, खेळायला कोणी नाही... >>
सहमत

अश्विनी, खतरनाक किस्सा आहे. त्याहीपेक्षा वेगळी जाणवलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही व्हिक्टीम असूनही तुम्ही गप्प राहिल्यामुळे तुम्हाला दोषी मानलं गेलं ह्याचं वाईट वाटलं.

बाप रे भारी किस्सा आहे मी अश्विनी. तुम्ही शाळेत नाही म्हटल्यावर किती काळजीत पडले असतील घरचे!

त्या मुलीच्या एकटेपणाबद्दल वाईट वाटले.

डेंजर किस्सा आहे अश्विनी! बापरे, घरच्यांना किती काळजी आणि भीती वाटली असेल!

स्मगलर्सचा किस्सा भारी आहे Rofl

स्मगलर बनायला घर सोडून चाललेत असे कळले>> Lol

वर्गमैत्रिणीने तिच्या घरी किडनॅप करून ठेवले होते पूर्ण दिवसभर>>>असाच सेम किस्सा इथे सिंगापुरात घडला होता. १ दहा का बारा वर्ष वय मुलाने त्याच्या जवळ च्या मित्राच्या च्या घरी दडून राहून त्याच मित्रा ला पोलीसात तक्रार द्यायला सांगितली, जरा थ्रिल म्हणून Sad आई, वडील जरा तरी अटेन्शन देतील आणि काळजीत पडतील, या भावनेने त्याने असे केले होते

पोलिसांनी कसे कोण जाणे पण ताडले की मित्र खोट बोलतोय आणि तो लपलेला मुलगा सापडला. नंतर शाळेकडून त्या मुलाचे काऊनसीलींग झाले.

>> कथेतच संवाद असतात, मग पटकथा कशाला पाहिजे वेगळी, किंवा त्यांना फार काही काम नसेल, अशी माझी अजूनही समजूत आहे.

अवांतर होईल म्हणून थोडक्यात: कथा वाचून मनात त्या दृश्याची कल्पना साकारता येते. आता इथे कशी कल्पना करायची हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून असते. पण पटकथा हे पदड्यावर ती कथा कशी दिसेल याची "कुणीतरी" केलेली कल्पना असे म्हणता येईल. फरक इतकाच कि त्यांना व्यावहारीक मर्यादेत राहून जी काय असेल ती कल्पना करावी लागते. हे कुणीतरी म्हणजेच पटकथाकार. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पटकथा ही दिग्दर्शक, अभिनेते व इतर टीम साठी बनवलेली ब्ल्यूप्रिंट असते. त्यानुसार(च) सर्वांनी काम करायचे. पटकथा ही नाटकाच्या संहितेसारखी असते.

>> स्मगलर बनायला घर सोडून चाललेत
हे भारी होतं Lol

>> वर्गमैत्रिणीने तिच्या घरी किडनॅप करून ठेवले होते पूर्ण दिवसभर

हा किस्सा खरेच डेंजर आहे.
>> बाहेर माझे बाबा पोलिसांना घेऊन ऊभे होते
देवा! Lol

>> मला शिक्षा म्हणून पुन्हा खोलीत बंद केले ते सकाळीच बाहेर काढले.
हे वाईट वाटलं Uhoh तुमची चूक नसतानाही. अजूनही आपण त्यांच्याशी याबाबत बोलायला हवं असं मला क्षणभर वाटून गेलं.

ती कल्पना करावी लागते. हे कुणीतरी म्हणजेच पटकथाकार. >> अच्छा. मला वाटायचं हे तर दिग्दर्शक करतो आणि आपल्याला हवे तसे कथेत बदल करून घेतो.

>> हे तर दिग्दर्शक करतो आणि आपल्याला हवे तसे कथेत बदल करून घेतो.
म्हणून अनेकदा दोघे एकच असतात किंवा एकत्र काम करतात पटकथेवर. तरीही पटकथाकारापेक्षा दिग्दर्शक महत्वाचा. कारण पटकथा पडद्यावर साकारताना कॅमेरा, कास्टिंग आणि इतर बऱ्याच गोष्टीची त्याची जबाबदरी असते. पडद्यावर काय नी कसे दिसावे, त्या सर्वच बाबतीत दिग्दर्शकाचा निर्णय अंतिम असतो.

अश्विनी, तुमचा अनुभव एकदम खतरनाक आहे. तरीही तुम्ही गप्प बसून मैत्रीणीचे नाव सांगितले नाही म्हणजे कमाल आहे.

तुम्ही व्हिक्टीम असूनही तुम्ही गप्प राहिल्यामुळे तुम्हाला दोषी मानलं गेलं ह्याचं वाईट वाटलं. >> त्या काळी त्या वयात आपण विक्टिम की पर्पेट्रेटर हे ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे थोडीच होता.. मायबाप पालकच ठरवीत ना. Lol
आणि माझ्या दृष्टीने शाळा बुडवण्याचा जो अपराध माझ्याकडून घडला होता तो मला जास्त बोचत होता. नाही तर १०४ ताप असतांना सुद्धा 'अभ्यास बुडतो म्हणून मी शाळेत जाणारच' म्हणणारी, ह्या डेडिकेशनसाठी आणि कायम पहिल्या दुसर्‍या नंबरात आल्यावर आई आजीकडून मिळणार्‍या कौतुकाने हुरळून जाणारी मी, ह्या ब्लंडरमुळे 'आता आपली पत घसरली' ह्या भावनेतून मनात स्वतःला अपराधी मानूनच बसले होते.

मैत्रीणीकडे खेळतांना, मजा करतांना नियम मोडण्याची भिती वाटत असली तरी मलाही कुठेतरी आनंद वाटलाच होता. Happy

तसेही कोणी खेळण्यासाठी डांबून ठेवले काय किंवा कोणी शिक्षा म्हणून डांबून ठेवले काय.. की फर्क पेंदा है.

बोकीलांच्या शाळा मध्ये केवडाला लाईन देते का प्रकरणानंतर मार खाऊनही जोशी सुर्‍याविरूद्ध स्व्तःहून कागाळी करीत नाहीच ना Proud

असाच सेम किस्सा इथे सिंगापुरात घडला होता. >> लहानग्या/शाळकरी मुलांनी रचलेले बनाव ह्यावर एक भन्नाट धागा होऊ शकतो.

डेंजर किस्सा आहे अश्विनी! बापरे, घरच्यांना किती काळजी आणि भीती वाटली असेल! >>> अगदी अगदी.

स्मगलर्सचा किस्सा भारी आहे Rofl >>> हाहाहा.

लहानपणी मला - काही लोकं साप वगैरे तत्सम प्राण्यांना जनावर म्हणतात हे माहिती नव्हतं. जनावर म्हणजे माझ्या लेखी गायी-गुरं- फार कुत्रे वगैरे.

एकदा पावसाळ्यात शाळेतून घरी येत होते. एक रस्त्यात एक काका थांबून बाजूच्या छोट्या गटारीकडे बोट दाखवून येणार्‍या-जाणार्‍यांना सांगत होते - तिथे जनावर आहे...मी आत्ता बघितलं ते जनावर...मला कळेना की एवढी मोठी गाय त्या एवढ्याश्या गटारीत कशी गेली आणि मुख्य म्हणजे मला का दिसत नाहीये! पण तिथे फार न रेंगाळता मी घरी येऊन आईला सांगितलं की आज एक गाय गटारीत पडलेली बघितली वाटतं एका काकांनी रस्त्यात. मला दिसली नाही. एवढी मोठी गाय कशी त्या एवढ्याश्या गटारीत गेली माहित नाही. मग त्या काकांचं अ‍ॅक्चुअल वाक्य सांगितलं - जनावर, जनावर - तेव्हा आई हसत बसली आणि मला तिने सांगितलं की काही जणं सापाला जनावर म्हणतात - त्यांनी साप बघितला असेल गटारीत...

>> जनावर म्हणजे माझ्या लेखी गायी-गुरं
अगदी Lol Lol सेम सेम पिंच

ट्रक ला गाडी म्हणायची मोठी माणसं ते सुध्दा मला फार विचित्र वाटे

रायगड Lol
माझी आजी नेहमी जनावरच म्हणायची सापाला. नाग असेल तर जाती जनावर!

Pages